शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

मुक्काम विवेकानंद हाऊस: कोलकाता चेन्नई सायकल सफर


सुलुरपेट येथील आमचा मुक्काम अतिशय समाधानाचा होता. चेन्नई आता एका मुक्कामावरच होती. शेवटच्या दिवशी अंतर शक्यतो १०० किमी च्या आत ठेवायचा माझा मनसुबा साध्य झाला होता. त्यामुळेही मी निश्चिंत होतो. आम्ही नेहमीप्रमाणे प्रथम चहाची सोय पाहिली. अन्हिके उरकून आमच्या सायकली तयार केल्या. आम्ही केव्हाही निघालो तरी घड्याळबाबांनी ७.३० किंवा नंतरची वेळ दाखवण्याचे सातत्य आजही पाळले होते.

सायकल मोहिमेतील शेवटचा दिवस असला की माझा उत्साह कमी झालेला असतो. खरतर आळस नसतो पण आज मोहीम पूर्ण होणार ह्याचा आनंद असला तरी ती संपणार ह्यामुळे थोडा निरुत्साहही वाटत असतो. पेडल मारण्यात जोश नसतो...तर ते यांत्रिकपणे मारले जाते. आजही थोडे तसेच झाले. थोड्याशा कमी वेगातच सुरुवात केली. अंतर फार नव्हतेच. शिवाय चेन्नईमधील मुक्कामाची सोय झालेली होती. तिघांनीही सुरुवात संथपणे केली मात्र थोड्या वेळातच फुजीने लय साधली. संजय आणि आनंद मागे पडले. मी थोडा पुढे होतो. इतक्यात काही मुलांनी माझ्याकडे पाहत मला मी कोठून आलो आहे ह्याची चौकशी केली. मी 'मुंबईहून आलो आहे ' असे म्हणताच त्यांनी विचारले 'मुंबई पुणे का?' मी हो म्हणताच ती मुले जोरात ओरडली 'शिवाजीमहाराजकी....'. मी तेवढ्याच जोरात ' जय ' ओरडत असताना त्या मुलांनी आणि मी उजवा हात झटकन वर केला. महाराजांचे नाव ऐकताच त्या मुलांना आणि मलाही उत्साह वाटला.

रस्त्याच्या डाव्या कडेला एक खोपट होते..तिथे नक्की काय खायला मिळेल अशी शंका वाटत होती. फारशी स्वच्छता नसली तरी आसपास इतर काही पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे आनंद आणि संजय येईपर्यंत मी तिथेच वाट पहायची ठरवले. वाट पाहता पाहता माझी ऑर्डर दिली. नाष्टा मात्र अपेक्षेपेक्षा उत्तम होता. संजय आणि आनंदही लवकरच आले. भरपेट नाष्टा करून आम्ही पुन्हा टाच मारली. आता आम्ही तिघेही एकत्रच जात होतो. आंध्रप्रदेशातील रुंद रुंद महामार्ग संपून रस्ताही थोडा अरुंद झाला होता. शिवाय रहदारीही जाणवत होती. चेन्नई फार लांब नव्हते. वाटेतील लोक आमची चौकशी करत होते. आम्हाला शुभेच्छा देत होते, अभिनंदनही करत होते. चेन्नई अगोदर जेवणासाठी एक थांबा घेतला. तिथे फक्त भात मिळू शकत होता. रोटी, चपाती नव्हती. मग मी चिकन वरच जोर दिला. नुसता भात खाऊन पोट भरल्याचे समाधान झाले नसतेच. 

नंतर थोड्या वेळातच चेन्नई गाठली. विवेकानंद हाऊसची नेटकी इमारत दिसताच आम्ही खुष झालो. येथील आवारात सायकली लावून आम्ही चौकशी करण्यासाठी गेलो. 





मात्र अजून मोहीम संपन्न झाली नव्हती. तिथे कार्यालयामध्ये मी ज्या स्वामीजींच्या संपर्कात होतो त्यांची चौकशी केली. तेव्हा ते इथे नसल्याचे समजले. तसेच आमची राहण्याची कोणतीही व्यवस्था इथे झाली नसल्याचे सांगितले गेले. त्याबरोबर मी स्वामीजींचा मला आलेला मेल दाखवला. त्यावर येथील इसमाने सांगितले मेलमध्ये तुमच्या मोहिमेची विवेकानंद हाऊस येथे सांगता करू शकता एवढीच परवानगी दिली आहे. राहण्याची परवानगी मेल मध्ये नाहीये. मीही थोडा गोंधळलो. अर्थात चेन्नईमध्ये कुठेही राहण्याची सोय होऊ शकते हे माहित असल्याने मी निश्चिंत होतोच. मात्र मला राहण्याच्या सोयीचा उल्लेखही सापडला. त्याबरोबर त्या इसमाने सांगितले की विवेकानंद हाऊस येथे तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. इथे तशी काही व्यवस्था नाही. तुम्हाला मयलापोर येथील रामकृष्ण मठात जावे लागेल. तुमची राहण्याची व्यवस्था तिथे केली असणार. आम्ही लगेचच सायकलवर स्वार झालो. स्वामीजींना भेटायची उत्सुकता होती, तसेच थोडा आरामाही करायचा होता. 

वाटेत डाव्या बाजूला चेन्नई येथील विख्यात मरिना बीच पसरलेला होता. हा भारतातील सगळ्यात जास्त लांबीचा बीच आहे. साधारण तीन चार किमी अंतरावर असलेल्या रामकृष्ण मठात आम्ही शिरलो आणि स्वामी रघुनायकानंद ह्यांना भेटलो. त्याबरोबर त्यांना विलक्षण आनंद झाला. रामकृष्ण मठ येथे आमचे जंगी स्वागत करण्यात आले. तिथे उपस्थित असलेले प्रत्येक स्वामीजी इतके खूष होते की तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आमची ओळख करून देत होते.

रघुनायकानंद स्वामीजींनी आम्हाला सांगितले की आज शारदामातेची जयंती असल्याने आज रामकृष्ण मठ येथे उत्सव  आहे. त्यामुळे आमची आजची राहण्याची व्यवस्था रामकृष्ण मठात नव्हे तर विवेकानंद हाऊस येथेच होईल. त्याबरोबर मी त्यांना सांगितले की आम्हाला तेथूनच इथे पाठवले आहे. त्यावर ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुमची आजची व्यवस्था तिथे होईलच. शिवाय जर तुम्हाला पुढील दोन तीन दिवसही तिथे राहायचे असेल तरी तुम्ही तिथे राहू शकता आणि जर तुम्हाला इथे राहायचे असेल तर उद्या इथे येऊ शकता.


आज शारदामातेची जयंती असणार असल्याचे मी मोहीम ठरवली तेव्हाच मला माहित होते. मी रघुनायकानंद ह्यांना तसे सांगताच ते भलतेच खुष झाले. सगळ्याच स्वामीजींना आम्हाला भेटून खूप आनंद झाला होता. तेथील अध्यक्षांना भेटताच त्यांनीही अगदी मनमोकळेपणे आमचे स्वागत केले.

खरोखर सर्वच स्वामींनी आम्हाला अक्षरशः डोक्यावर ठेवण्याचे तेवढे बाकी ठेवले होते. तिथे माझी एक छोटी मुलाखतही चित्रबद्ध झाली. ह्याशिवाय प्रत्येक स्वामी आणि कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मुलाखत घेतल्या त्या वेगळ्याच. इतके कौतुक पाहून आम्हाला फार संकोच वाटत होता. खरतर शारदमातेचा उत्सवाचा दिवस, त्यामुळे ते सगळे कार्यक्रमाच्या गडबडीत होते. आमची राहण्याची व्यवस्था विवेकानंद हाऊस मध्ये होती. आम्ही जायला निघालो, दरवाजापर्यंत गेलो की परत कोणीतरी बोलावत होते. 

आम्हाला समोसा, चहा घ्यायला लावला. आम्ही खूप संकोचलो होतो. पण त्यांना नकारही धड देता येत नव्हता. नाष्टा चहा करून आम्ही पुन्हा विवेकानंद हाऊस येथे जायला निघालो. मात्र मठातील स्वामींनी आम्हाला आग्रह केला की उद्या नक्की मठात राहायला या. दोन्ही ठिकाणच्या व्यवस्था त्यांनीच केल्या होत्या. निवड आम्ही करायची होती. पुन्हा एकदा विवेकानंद हाऊसला पोचताच आमचे तिथेही स्वागत झाले. कार्यालयाशेजारी चार पाच खोल्यांची बैठी इमारत होती. तिथे आमची राहायची व्यवस्था झाली. 

                                           

रामकृष्ण मठ आणि विवेकानंद हाऊस दोन्ही ठिकाणी आम्हाला रात्रीच्या जेवणाचेही आमंत्रण आम्हाला दिले होते. माझा चेन्नई स्थित सायकलमित्र रवी ह्याचे आम्हाला जेवणाचे खूप आधीपासूनच मिळाले होते. त्यामुळे आम्ही त्याचे निमंत्रण स्वीकारले होते.

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

चेन्नईच्या वेशीवर: कोलकाता चेन्नई सायकलसफर


Check out my ride on Strava: https://strava.app.link/nUgNGFIkUYb

क्रांथी सरांनी कावली येथे आमची उत्तम सोय करून दिली होती. त्यामुळे काल रात्री छान आराम मिळाला होता. अर्थातच येथील हॉटेलमधून सकाळी निघताना  क्रांथी सरांना आम्ही निघत असल्याचा मेसेज केला. त्यावर त्यांचा पुढील प्रवासासाठी शुभेच्छा आणि कोणतीही मदत लागल्यास निसंकोच कळवा असा संदेश त्वरित आला. आम्हीही निर्धास्त मनाने सायकलावयाला सुरुवात केली. आजही आम्ही साडेसात नंतरच निघालो होतो. तिघेही एकामागोमाग जात होतो. शहराबाहेर पडत असताना साधारण चार किमी अंतर पार केले अन् .... हायवेला लागलो न लागलो तोच आनंदची सायकल परत पंक्चर झाली. काल संध्याकाळी खरतर त्याने ट्यूब बदलली होती. त्यानंतर सायकल चालवली नव्हतीच. मात्र बहुधा त्याने टायर तपासला नव्हता. कावली येथील सायकल दुरुस्ती दुकान ९ व्हायच्या आधी उघडत नाही ही बहुमूल्य माहिती आम्हाला आधीच मिळाली होती. चर्चा चर्वण करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. आम्ही स्वतः पंक्चर काढायचे ठरवले तर पाण्यात ट्यूब तपासल्याशिवाय आमच्या कोणालाही पंक्चर शोधता येत नव्हते. जवळपास पाणीही नव्हते आणि पाण्यामध्ये ट्यूब बुडवून पहायला कोणते भांडेही आमच्याकडे नव्हते.

अखेर आम्ही हायवेला उभे राहून एखादे वाहन शोधून त्यामध्ये सायकली टाकून पुढील गावात जायचे ठरवले. बराच वेळ वाहन मिळेना आणि भेटणारे लोक सांगत होते की पुढे जवळपास सायकलचे दुकान नाही. अर्धा पाऊण तास झाल्यावर आनंदने क्रांथी सरांना फोन लावला. इतक्यात मी त्यांचा मला आलेला reply पाहिला की काही लागले तर फोन करा. त्यांना कशी telepathi लागली की आम्हाला मदत लागेल?

आनंदने त्यांना कळवल्यावर त्यांनी लगेचच त्यांचा canter पाठवला. Canter मध्ये बसल्याबसल्या सायकलींचे जवळपासचे दुकान शोधू लागलो. त्यात नेल्लोर येथील Elite cycle ह्या दुकानाची माहिती विश्वासार्ह वाटली. आता तिन्ही सायकली आणि त्यांच्या पाठीवरचे सामान लादून canter ने थेट नेल्लोर मधील Elite cycle गाठले.  क्रांथी सरांनी काल राहायची, जेवायची सोय केली होतीच. आज वाहनाचा खर्चही घेतला नाही.वाहनचालकाला त्याचे मानधन विचारले तर तोही काही घेईना. क्रांती सरांचे आम्ही खास पाहुणे होतो. 

Elite cycle हे दुकान चौकालगत होते. आमच्या सायकली दुकानासमोर लावून आम्ही दुकानात शिरलो. दुकानात काउंटरवर बसलेल्या माणसाने आणि कर्मचाऱ्याने आमची चौकशी केली. आमच्या सायकलवर लादलेले सामान त्यांनी पाहिले होतेच. आम्ही आमच्या मोहिमेविषयी माहिती देत आनंदच्या सायकलचे पंक्चर काढून देण्याची विनंती केली. त्यांचे दुकान खरेतर अजून सुरू होतेच होते. आम्हाला भूकही लागली होती. आनंद तिथे दुकानदाराशी बोलत असताना मी आणि संजय जवळपास हॉटेल शोधू लागलो. तिथे नाष्टा आणि कॉफी उत्तम होती. आमचा नाष्टा होईपर्यंत Elite cycle मध्ये आनंदच्या सायकलचे पंक्चर काढले गेले. तिथे कळले की कालच्याच जागी परत पंक्चर होते. आनंदने काल ट्यूब बदलली तरी टायर तपासला नव्हता त्यामुळे तेथील खिळ्याने त्याचे काम परफेक्ट केले होते. त्यांना आम्ही दुरुस्तीचे पैसे विचारले. काउंटर असलेला माणूस दुकानाचा मालक नव्हता तर तो तिथे मॅनेजर पदावर काम करत होता. त्यांचे नाव होते सुब्रमण्यम. दुकानातील mechanic अनिल आणि मॅनेजर सुब्रमण्यम दुरुस्तीचे पैसेच घेईनात. उलट सुब्रमण्यम ह्यांनी आम्हालाच चहा कॉफी पाजली. ते म्हणाले की दुकान मालकाची strict instruction आहे की रायडर्स कडून पैसे घ्यायचे नाहीत. सुब्रमण्यम ह्यांनी स्वतःचा फोटोही काढू द्यायला नकार दिला. ते फारच नम्रपणे वागत होते. दुरुस्ती होऊन निघेपर्यंत १२ वाजले होते. 



टेम्पोच्या वेगात आम्ही आत्तापर्यंत गती गाठली होती. ५० किमी अंतर कमी झाले होते. आम्ही आज नायडुपेटा इथे मुक्काम करणार होतो. पण टेम्पोमुळे आम्ही आजचे काही अंतर वेगाने कापले होते. त्यामुळे मी नायडूपेटा इथे मुक्काम करायचा की पुढे जाऊन सुलुरूपेटा इथे मुक्काम करायचा हा किडा संजय आणि आनंद ह्यांच्या मनात सोडून तो निर्णय त्या दोघांवर सोडला. मनातल्या मनात सुलुरूपेटा त्यांनी येथे पोचण्यासाठी तयार व्हावे ह्यासाठी दोघांना सूचक वाक्ये टाकत होतो... उद्याचा प्रवास कमी होईल, सुलुरूपेटा इथे बर्ड sanctury आहे... अशी विधाने टाकत होतो.

नेल्लोर येथे थोड्या उशिराने नाष्टा झाला होता. साधारण ३ वाजता कुठे जेवायला मिळते का ते पाहू लागलो. वाटेत हॉटेल दिसत नव्हतेच. इतक्यात तिरुमाला डेअरी चे विक्री केंद्र दिसले. म्हैसूर पाक, गुलाबजाम आणि बदाम मिल्क वर जेवण भागवले. आज आनंद आणि संजय ह्यांना मी सांगितले होते की आजचे गंतव्यस्थान , वेग ह्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा. 




दोघेही आज फार ब्रेक घेत नव्हते. नायडूपेटाच्या वेशीवर मी दोघांना विचारले की इथे थांबायचे की आणखी २७ किमी पुढे सुलुरूपेटा इथे जायचे. दोघांनी सुलुरूपेटच्या पारड्यात मत टाकले आणि मी निःश्वास सोडला. चेन्नईचे अंतर कमी होत होते. आम्हाला अखेरच्या दिवशी १०० पेक्षा कमी अंतर सायकलवायला लागले असते. वाटेत अनेकजणांना आमच्याबरोबर फोटो हवे होते आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर फोटो हवे होते. 

                     राजू (आनंद) आणि राजुपालेम


 १२२- १११-१०० किमी ... चेन्नई जवळ येत होती. सूर्य आणखी वेगाने अस्ताला जात होता. आज मात्र मी आज अंधाराची तमा बाळगणार नव्हतो. उद्याचे अंतर कमी होत आहे. ह्याचे समाधान जास्त होते कारण उद्या विवेकानंद हाऊसला वेळेवर पोचायला हवे होते. चेन्नई मधील सायकल मित्र रवी रोज चौकशी करत होता. त्यालाही भेटायची घाई झाली होती. कदाचित चेन्नईमधील सायकल क्लबचे सदस्यही भेटू शकणार होते.


अंधार होत असताना आंध्र पोलिसांकडून राहण्याच्या व्यवस्थेबद्दल काही कळत नव्हते. वाटेत एक फॉरेस्ट ऑफिसर भेटला. त्यानेही जवळपास काही व्यवस्था नसल्याचे सांगितले. किमान १५ किमी गेल्यावर सुलुरुपेट इथेच व्यवस्था होईल असे त्यानेही सांगितले. साधारण ७.१५ वाजता आम्ही सुलुरुपेट इथे पोचलो. आनंदने आंध्र पोलिस खात्याकडून काही सोय झाली आहे किंवा होते आहे का ह्याचा अंदाज घेतला. मात्र आंध्र पोलिसांकडून आमच्या राहण्याची सोय होऊ शकली नव्हती. आम्ही तेथील मुख्य चौकात उभे राहून लॉज शोधत होतो. ह्या चौकात डावीकडे वळणारा रस्ता श्रीहरिकोटा येथे जातो. मोहीम आखत असताना मी आजचा चेन्नई आधीचा मुक्काम श्रीहरिकोटा अथवा सुलुरपेट येथे करून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरीक्ष केंद्राला भेट देण्याचे ठरवले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे अंतरीक्ष केंद्राला भेट देण्याचा विचार आम्ही रद्द केला होता.

आम्ही त्या चौकात थांबलो असता बरेच लोक आमची चौकशी करत होते, आमच्याबरोबर फोटो काढून घेत होते. त्यातील एकाने विचारले तुम्ही सायकलने का फिरत आहात. मी त्याला म्हटले मला भारत पाहायचा आहे, लोकांना भेटायचे आहे. मी सायकलने आलो म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत आहात, कार मधून आलो असतो तर बोलला असतात का? तो म्हणाला मला तुमच्याबद्दल खूप आदर वाटत आहे. त्याने लॉजही सुचवला. आम्ही तिथे गेलो. मुन्नाभाई धाब्याशेजारी लॉज असल्याचे तो म्हणाला. तो धाबा वाटेत हायवेला पाहिला होता. पण तेव्हा तिथे लॉज आहे हे कळले नव्हते. परत धाब्यावर गेलो. तिथे विचारले तर शेजारच्या इमारतीमध्ये असलेला श्रीराम रेसिडेन्सी लॉज समजला. इथे रिसेप्शनवर एक बाई होत्या. त्यांनी लगेचच रूम दिली. जेवण अर्थातच मुन्नाभाईंकडे झाले. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत असताना काही मुलांनी गावात आलेले तीन सायकलपटू आम्हीच असल्याचे ओळखले. त्यांनाही आमच्याबरोबर फोटो काढायचे होते.





गाव लहान होते. आम्ही शोधलेला लॉज महामार्गालगत होता. तिथे वस्तीही कमी होती. त्यामुळे आमची प्रसिद्धी लगेच पसरली होती. आमच्या मोहिमेतील आंध्र प्रदेशातील हा शेवटचा मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी आम्ही तामिळनाडूमध्ये प्रवेश करणार होतो जो मोहिमेचा शेवटचा दिवस असणार होता. चेन्नई आता फक्त ८० किमी अंतरावर होती... 

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

ईश्वरी योजना: कोलकाता चेन्नई सायकल सफर

आज आमच्या विशाखापट्टणमच्या मित्राने विक्रमने आमचा निरोप घेऊन तो गोव्याकडे निघाला. गेले काही दिवस तो आमच्या मोहिमेचाच एक भाग झाला होता. त्याची दिशा खरतर पश्चिमेकडे होती तर आमची दक्षिणेकडे. मात्र दोन वेगळ्या दिशांना प्रवास करत असतानाही काही सामाईक अंतर आम्हाला एकत्र पार करता आले. त्यादरम्यान आम्हाला एकमेकांचे अनुभव शेअर करता आले. एकमेकांबरोबर काही नवीन अनुभव घेता आले. आपल्या जीवनप्रवासात असे अनेक प्रवासी आपल्याला भेटत असतात ज्यांच्याबरोबर खूप कमी वेळ एकत्र घालवता येतो मात्र त्यामध्ये येणारे अनुभव कायम आठवणीत राहतात. आमचा गोवेकर मित्र विक्रम ह्याच्याबरोबर असेच कायम आठवणीत राहतील असे क्षण आम्ही अनुभवले होते. 

विक्रम त्याच्या दिशेला निघाला खरा मात्र नंतर सायकलची हवा भरण्यातच आमचा अर्धा तास गेला. वास्तविक रोज हवा भरायची गरज नसतेच, मात्र आनंदकडे जो ऑटोमॅटिक पंप होता त्याच्या जोरावर आम्ही उगाचच रोज हवा चेक करत होतो. तो पंप लावताना ट्यूब मधील हवा नेहमीच कमी होत असे आणि आम्ही पुन्हा एकदा ती कमी झालेली हवा भरत बसत असू. खरतर हे नसते उपद्व्याप होते. आजही आम्ही तोच प्रयोग पुन्हा एकदा नव्याने करत होतो. मात्र आनंदच्या ट्यूबमध्ये हवा भरली जाईना. त्याच्या ट्यूब मध्ये हवा भरताना पंपचा प्रेस्ता व्हॉल्व तिरका लागून अडकला होता. राजू म्हणाला आपल्याला उशीर झाला ह्यात काहीतरी देवाची योजना असावी. आजही अंतर १४० किमी च्याच आसपास होते. त्यामुळे नंतर मात्र तिघेही सुसाट निघालो. तिघांचा सूर छान लागला होता.

जवळपास पन्नास किमी अंतर पार होत असताना मला महामार्गालगत एक छानसे उपहारगृह दिसले. महामार्गाला तिरक्या दिशेला असणारे ते उपहारगृह खूप छान दिसत होते. मी फुजीला तिथे वळवले. तिथे बसायला कोणतीही सोय नव्हती. मात्र स्वच्छता होती, टापटीप होती. वातावरण छान होते. तिथे पाहताच येथील पदार्थ चविष्ट असतील असे वाटत होते. सर्वसाधारण दक्षिणात्य नाश्त्याचे पदार्थ तेथील पदार्थसुचीवर दिसले. मात्र त्या सूचीवरील उजवी बाजू बघताच मला कळेना की जिथे फक्त उभे राहून खाण्याची सोय आहे तिथे वातानुकूलित उपहारगृहात असू शकतील असे आकडे का लिहिले आहेत. अर्थातच अश्या अवास्तव किंमती देऊन नाष्टा करण्यात मला रस नव्हता. मी थोड्याशा नाइलाज मिश्रित रागाने तेथून फुजीवर स्वार झालो.




 आनंद आणि संजय अजून आले नव्हते. मी पुन्हा फुजीला दौडवणार तोच पुढे अगदी लगेचच महामार्गाच्या डावीकडे एक मोठा ओपन टेम्पो दिसत होता. 







तिथे बरेच लोक उभे होते. लांबूनच तिथे दक्षिणात्य खाद्य पदार्थ मिळत असल्याचे जाणवत होते. त्या टेम्पोमध्येच किचन तयार केले होते. त्या टेम्पोला जोडूनच basin साठी नळ ही होता. इडली, डोसा, उत्तप्पा असे पदार्थ उपलब्ध होते. मी पोचल्यावर पाठोपाठ आनंद आणि संजयही आलेच. आमचे पन्नास किमी अंतर विनाथांबा पार झाले होते. त्यामुळे इंधनाची गरज चांगलीच जाणवत होती. आम्ही जठराग्नीला आहुती देत इंधन भरून घेतले. येथील पदार्थ जगात इतर कुठेही मिळणार नाहीत इतके चविष्ट होते. मला तर शक्य असते तर त्याला डोंबिवलीमध्ये दुकानच टाकून दिले असते 🤣.

अजूनही जवळपास १०० किमी अंतर बाकी असल्याने आम्हाला तिथे जास्त थांबणे शक्य नव्हतेच शिवाय हाच वेग आणि सातत्य कायम राखणे गरजेचे होते. मात्र आनंद आणि संजयच्या पोटात इंधन भरले की सायकल पर्यंत ते पोचत नाही. त्यामुळे दोघेही रेंगाळले होते. नंतर मात्र मी थोडा पुढे गेलो. 







साधारण दोनेक तास पाय मारून झाल्यावर पुन्हा एकदा इंधनाची गरज जाणवू लागणे स्वाभाविक होते. एखादा धाबा दिसतोय का हे मी शोधत होतो. मात्र बऱ्याच अंतरात काही खायला मिळेना.  मग मी प्रोटीन powder आणि दोन लाडू खाऊन घेतले. आंध्र प्रदेशात बऱ्याच अंतरात खायला न मिळणे हा अनुभव सतत येत होता. खरतर त्यासाठीच प्रोटीन पावडर आणि हे भुकलाडू मी बरोबर ठेवले होते. मात्र तो रोजच जेवणाला पर्याय ठरू शकत नव्हता. जेव्हा १४०- १५० किमी अंतर पार करायचे असेल तेव्हा जेवणही छान मिळणे गरजेचे होते. आज मात्र आमचे नशीब जोरावर होते. मी शोधक नजरेने पाय मारत असताना रस्त्याला बरीच मोकळी जागा दिसली. तिथेच आत मध्ये एक धाबा दिसत होता. मी पुढे जाऊन पाहतो तर ' बिहार झारखंड धाबा ' असा फलक दिसला. आंध्र प्रदेशात उत्तर भारतीय धाबा दिसल्याने मला जरा हायसे वाटले. नुसता भात खाऊन माझे समाधान होत नव्हतेच. इथे रोटी, पराठे मिळतील अशी आशा होती. धाब्यावर छानसे फुलके मिळत होते. सोबत मटार पनीरची भाजी होती. मी खुष झालो. मी फुलके आणि नंतर पनीर वर ताव मारत असतानाच आमचे आसाममधील मित्र दिगंत बारुआह आणि जितेंदरसिंगही तिथे आले.




 हे दोघेही गेले तीन दिवस आम्हाला वाटेत भेटत होते. तेही सायकलपटू असले तरी सध्या मोटर सायकलने फिरत होते. इथून तिरुपती धनुष्कोडी कन्याकुमारी मुंबई मध्य प्रदेश मार्गाने परत आसामला जाणार होते. थोड्या वेळात आनंद आणि संजयही आले. माझे जेवण आटोपले होतेच. दिगंत आणि जितेंदर थोडी विश्रांती घेऊन पुढे निघाले आणि पाऊस सुरू झाला. अर्थातच आम्हाला आणखी थोडी विश्रांती घ्यावी लागली.


आनंद ला आम्ही मित्रमंडळी राजू अशी हाक मारतो. काल आनंदपुरम गाव दिसले होते तर आज राजुपालेम


पाऊस संपून निघेपर्यंत ३.४५ वाजत आले होते. आता भास्कराचार्य जेमतेम दीडेक तास साथ देणार होते. त्यामध्ये ४८ किमी अंतर कापायचे होते. त्यामुळे आता आम्हाला निर्धाराने वेग कायम राखत पुढे जावे लागणार होते. मात्र आत्तापर्यंतच्या अनुभवावरून आनंद आणि संजय पोटात इंधन गेल्यावर संथ होणार ह्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांना वेग घेतलात तर निदान सात वाजेपर्यंत तरी पोहोचू असे सांगितले. मात्र लगेचच लक्षात आले की दोघांनी ते मनावर घेतले नाहीये. खरतर आता किमान २० किमी प्रतितास वेगाने जावे लागणार होते. तरच मध्ये एखादा ब्रेक घेऊन तीन तासात गंतव्य स्थान गाठता आले असते. ते दोघेही वेग घेत नाहीयेत हे लक्षात आल्यावर मात्र मी पुढे निघालो. दोनेक तासात ४८ किमी अंतर कापून शांतपणे हॉटेलच्या रूम मध्ये वाट पहायची ठरवली. कारण आता एखादी अडचण आली तर राखीव वेळ आमच्याकडे नव्हता. मी सायकल चालवत असताना आणखी एक गोष्ट लक्षात येत होती की १५- २० किमी अंतरात छोटेसे खोपटही नव्हते. म्हणजेच अंधार पडायच्या आत आम्हाला जास्तीत जास्त अंतर कापायला हवे होते. अन्यथा अडचणीची  वेळ आली तर आम्हाला कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नव्हता. मी साधारण ३० किमी अंतर कापलेही. इतक्यात संजयचा फोन आला की राजूची सायकल पंक्चर झाली आहे. मी त्यांना त्यांचे location विचारले. पाहिले तर ते माझ्यापासून साधारण १० किमी मागे होते. मागच्या १० किमी मधल्या पट्ट्यात मनुष्य वस्तीच दिसली नव्हती. ज्या गोष्टीची भीती होती ती समोर ठाकली होती. त्यांच्यासाठी मागे जाण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे त्यांना एखादा टेम्पो बघायला सांगून मी तोपर्यंत पुढे गाव दिसले की पर्याय शोधतो असे सांगीतले. नशिबाने थोड्या वेळातच एक गाव दिसले. तिथे एक रिक्षा स्टँड होता. मी तिथे पोचल्यावर सगळे रिक्षावाले माझी चौकशी करू लागले. मी त्यांना परिस्थिती सांगितली आणि म्हटले तुम्ही तिथे जाऊन दोघांना सायकलसह कावळी गावात आणून सोडा. कावळी गाव रिक्षा स्टँडपासून जवळपास १०- १५ किमी पुढे होते. तर माझे साथीदार आमच्यापासून १० किमी मागे होते. म्हणजे जी रिक्षा जाईल तिला आधी १० किमी मागे जाऊन तिथून परत २० किमी अंतरावरील कावळी गावात येऊन परत मागे त्यांच्या स्वतःच्या घरी १० किमी असे ४० किमी अंतर कापावे लागणार होते. तेथील रिक्षावाले खरोखरच चांगल्या स्वभावाचे होते. त्यांच्यात थोडी चलबिचल सुरू झाली होती. एकतर संध्याकाळ झाली होती. अंधार सुरू होत होता. त्यात हा दोन सायकल स्वार , दोन सायकली असा लवाजमा घेऊन एकंदर ४० किमी अंतर पार करायचे होते. अर्थात गाव छोटेसे होते म्हणजे तिथे जागही फार उशिरापर्यंत नसावी. मात्र लक्ष्मीनारायण नावाचा रिक्षावाला तयारही झाला. मी आनंद आणि संजय दोघांना फोन करू लागलो. मात्र दोघेही फोन उचलेनात. त्यांना मेसेजही पाठवला. लक्ष्मीनारायणचा संपर्क क्रमांक कळवला. मला पुढे कावळी गावापर्यंत अंधारात एकट्याने सायकल चालवत जायचे होते. रस्त्यात मनुष्यवस्ती असणार नव्हतीच. मी वाटेत जंगल आहे का/ जंगली प्राण्यांचा उपद्रव आहे का ह्याची चौकशी केली. तसे काही नसल्याचे समजताच थोडा निश्वास सोडला. बराच वेळ संजय आणि आनंद फोन मेसेजला उत्तर देत नसल्याने रिक्षावाल्यांना त्या दोघांचा नंबर दिला. आता अंधार सुरू होत होता. मी परत वेग घेतला. कावळी गावाची हद्द सुरू झाल्यावर मला हायसे वाटले. एव्हाना लक्ष्मीनारायणही त्या दोघांना घेऊन निघाल्याचे समजले.


मी थोड्या वेळातच आमची व्यवस्था झाली होती त्या हॉटेलला पोचलो. तिथे आमची व्यवस्था चौथ्या मजल्यावर होती. सुरुवातीला ह्याही हॉटेलमध्ये आमच्या स्वागताचा गोंधळ झाला. मात्र येथील पोलिसप्रमुख क्रांथी सरांनी येथील हॉटेल व्यवस्थापनाला समजावल्यावर माझी व्यवस्था झाली. माझे आवरेपर्यंत लक्ष्मीनारायण दोन्ही सायकली त्यावरचे सजीव आणि निर्जीव luggage घेऊन हॉटेलला पोचला. 

लक्ष्मीनारायणने केलेल्या मदतीमुळे आनंद अगदी भारावून गेला होता. त्यानेही लक्ष्मीनारायणला अगदी खूष केले. तसेच आंध्र पोलिसांनी आम्हालाही खूष केले. आज निवासाबरोबर भोजन ही त्यांच्यातर्फे होते. दिवस चांगलाच घडामोडींचा आणि लांबला होता मात्र आंध्र पोलिसांनी दिलेल्या जेवणामुळे आमचा शीण निघून गेला.

आनंद सकाळी जी ईश्वरी योजना म्हणत होता ती नेमकी कोणती हा प्रश्न मला पडला होता!

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

ब्रिंदाबन vs ब्रिंदाबन : कोलकाता चेन्नई सायकलप्रवास




एलुरु गावातून आम्ही साधारणपणे सात वाजता सायकल चालवायला सुरुवात केली. गावातून मुख्य महामार्गाला जायला थोडा वेळ लागला. तोपर्यंतचा रस्ता अरुंद असला तरी कमी वाहतुकीचा आणि चढउतार फार नसलेला आणि खड्डेरहित होता. वातावरणही छान होते. आज अंतर साधारण १४० किमी होते. त्यामुळे मी प्रथमपासूनच सरासरी वेग कायम राखण्याचे ठरवले होते. आनंद, संजय आणि विक्रम हे तिघे कायम एकत्र असणार होते.

सुरुवातीचे चाळीस किमी अंतर कापून झाल्यावर मी नाष्टा करण्यासाठी थांबलो. एव्हाना साडेनऊचा सुमार झाला होता. माझ्या पाठोपाठच विक्रम आला. इथे दक्षिणात्य पदार्थ फारच छान मिळत होते. माझ्या मनातील घड्याळ सुरू होते. दोन तासात चाळीस किमी त्यानंतर अर्धा तास थांबा घेतला. तर सरासरी वेग २० किमी प्रतितासाहून १६ किमी प्रतितास इतका कमी होणार होता. दिवसभरात १४० किमी अंतर कापायचे होते. त्यामुळे उरलेले १०० किमी अंतर कापायला साधारण साडेचार वाजले असते. 


माझा नाष्टा होत असताना संजय आणि आनंदही पोचले. त्यांचाही नाष्टा झाला. मात्र एव्हाना दहाच काय साडेदहा वाजून गेले होते. मी सगळ्यांना आपण अर्धा तास मागे पडलो आहोत ते आता cover करावे लागतील असे सांगून पुन्हा एकदा सायकलवायला सुरुवात केली. आनंदला वाटेत विजयवाडा येथे decathlon चे दुकान असल्याचे माहित होते. त्यामुळे त्याला तिथेही जायचे होते. विजयवाडा शहर हे आंध्र प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर जवळपास दोन हजार वर्षांपासून वसलेले आहे. विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिराचा इतिहास आख्यायिका आणि पौराणिक कथांनी भरलेला आहे. प्रमुख देवता, देवी कनक दुर्गा, स्वयंभू असल्याचे मानले जाते. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या इंद्रकीलाद्री टेकडीवर स्थित आहे.



शहरात प्रवेश करत असतानाच शहरातील गर्दीचा अंदाज येत होता. कोलकाता चेन्नई महामार्ग शहरातूनच जात होता. माझ्या सायकलची चाल चांगलीच मंदावली होती. महामार्ग इतका गजबजलेला होता की बऱ्याचदा सायकलवरून पायउतार व्हावे लागत होते. त्यातच सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिस इमाने इतबारे काम करत होते. त्यामुळे चालण्याची गतीही सायकलपेक्षा जास्त वाटत होती. अश्याच गजबजलेल्या ठिकाणी रस्त्याच्या डावीकडे decathlon दुकान दिसले. ते तिघेही नजरेच्या टप्प्यात दिसत नव्हते. दुकानात शिरल्यास वेळ मोडला जाणार हे निश्चित होते. त्यामुळे मी दुकानाकडे दुर्लक्ष केले. सूर्यही डोक्यावर आला होता. त्यामुळे लवकरात लवकर ह्या गर्दीतून बाहेर पडून वेग वाढवणे आवश्यक होते. पुढेही सिग्नल यंत्रणा कार्यरत होतीच. जवळपास अर्धा तास त्या वाहतुकीत अडकल्यानंतर मी विजयवाडा शहराच्या बाहेर पडत होतो. बाहेर पडल्यावर नदीवर एक लांबलचक पूल दिसत होता. नदीचे पात्र खूप लांबवर पसरले होते. पलीकडचा किनारा स्पष्ट दिसतही नव्हता. मात्र पात्राचा किमान पाऊणपट भाग कोरडाच दिसत होता. एवढ्या प्रचंड पात्रात अक्षरशः वाळवंट पसरल्यासारखे वाटत होते. नदीचे रखरखीत पात्र पाहून फार वाईट वाटत होते.

नदीचे पात्र जसे कोरडे पडले होते तसाच माझा घसाही कोरडा पडला होता. मी सायकल बाजूला लावून पाणी प्यायलो. तहान भागल्यानंतर पुन्हा ताज्या दमाने सुरुवात केली. साधारण १०० किमी अंतरावर जेवायला थांबायचे ठरवले होते. मात्र उकाडा आणि लागलेली भूक ह्यांच्यामुळे मी जेमतेम ८०/८२ किमी अंतरावरच जेवण घ्यायला थांबलो. तिथे एक छानसे हॉटेल दिसत होते. जेवण अस्सल दाक्षिणात्य पद्धतीचे म्हणजे फक्त भाताचेच होते. परत पुढे किती अंतरावर जेवायला मिळेल ह्याची काहीच शाश्वती नव्हती. त्यामुळे मी जेवायला थांबलेले लोकेशन इतरांना कळवून मी सायकल थांबवली. जेवण छान रुचकर होते. जेवण करून जवळपास अर्धा एक तास वाट पाहिल्यावर मात्र मी पुढे जाण्याचे ठरवले. कारण अजून जवळपास ५०-६० किमी अंतर बाकी होते आणि दुपारचे अडीच वाजून गेले होते. गेल्या दोन दिवसात आलेले अनुभव विचारात घेता सूर्यास्तापूर्वी गंतव्यस्थानी पोचणे किती आवश्यक आहे हे पुरेसे स्पष्ट झाले होते.

मी आणखी दीड तासाने चहासाठी थांबेन असा तिघांना निरोप देऊन पुन्हा सायकलवायला सुरुवात केली. थोडे पुढे जातोय न जातोय तोच मला समोरच्या बाजूने पाचसहा जण चालत येत असलेले दिसले. त्यांच्यात एक म्हातारे गृहस्थ होते. ज्यांनी धोतर घातले होते, कपाळाला टिळा आणि डोक्याला मुंडासे होते. बरोबर एक बाई होत्या त्यांनी पाचवारी साडी घातलेली होती. इतर चारजण मागे येत होते. त्यांना पाहताच मला ते महाराष्ट्रातून आले असावेत अशी शंका आली. ते जवळ येताच मी त्यांना नमस्कार करत सायकल थांबवली. त्यांची चौकशी करताच समजले की ते औंढ्या नागनाथ येथील रहिवासी आहेत. बाबा दरवर्षी पंढरपूर वारी करत असतात..आता ते औंढ्यानागनाथ येथून श्रीशैल्यम येथे आले होते. तेथून विजयवाडाला जाऊन परत औंढ्यानागनाथ येथे परतणार होते. हा सगळा प्रवास ते पायी करत होते. ही संपूर्ण मोहीम अंदाजे तीन महिन्यांची होती. त्यापैकी निम्मा प्रवास झाला होता. आमचा सायकलप्रवास त्यांच्या पायी प्रवासापुढे अगदीच नगण्य होता. बाबांना मी विचारले माझ्याकडे काही लाडू आहेत ते जर मी तुम्हाला दिले तर तुम्ही ते स्वीकाराल का! त्यांनी हो म्हणताच माझ्याकडे असलेला लाडूचा एक डबा मी त्यांना दिला. त्यांना शुभेच्छा देऊन मी माझा प्रवास पुन्हा सुरू केला.


साधारण सव्वातीनला आनंदचा संदेश आला की त्यांनी १०० किमी अंतर पार केले आहे. मात्र त्यांनी अजून जेवण केले नव्हते. ते आता जेवण्यासाठी थांबणार होते. मला कळेना मी माझे जेवण करून एक तास थांबलो होतो. तरीही ते तिघे आले नव्हते आणि जेवणासाठीही थांबले नव्हते. मग त्यांचा इतका वेळ गेला कुठे. बरं त्यांना विचारलं तर दोघेही उत्तर काहीच देत नव्हते.

मी थोड्या वेळातच चहासाठी थांबलो. कदाचित इथे मी थोडा वेळ घालवला तर त्यांनी मला गाठले असते. आमचे आजचे राहण्याचे ठिकाण चिलकालूरिपेट माझ्या थांब्यापासून जेमतेम २० किमी म्हणजे तास सव्वा तासाच्या अंतरावर होते. म्हणजे मी पाच साडेपाच पर्यंत हॉटेलमध्ये पोचू शकत होतो. मात्र आंध्र पोलिसांनी अजून तरी काहीच कळवले नव्हते. मी चहा घेऊन पुन्हा अर्धा तास घालवला. तरीही तिघांचा पत्ता नव्हता. अखेर मी थेट चिलकालुरीपेट येथे जाऊन हॉटेल शोधायचे ठरवले. ह्या गावच्या नावाचा उच्चार करताना बराच गोंधळ होत होता...चिलकालुरिपेट की चिकलारूलीपेट! अखेर एके ठिकाणी देवनागरी लिपी मध्ये गावाचे नाव दिसल्यावर उलगडा झाला.







चिलकालुरीपेट शहरासाठी साधारण ८ किमी अगोदर महामार्गाच्या डावीकडे वळलेला रस्ता होता. मी शहरात पोचलो. आंध्र पोलिसांकडून अजूनही नक्की काही कळत नव्हते. मग मी गुगलवर इतर हॉटेल्स शोधायचे ठरवले. मात्र आनंदने कळवले की आंध्र पोलिस सोय नक्कीच करणार आहेत. एका चौकात मी थांबून राहिलो. शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्याबद्दल कुतूहल वाटत होते. ते थांबून माझी चौकशी करत होते. माझी मोहीम ऐकून तेही उत्साहित होत होते. मात्र त्यांच्यापैकी एकालाही हिंदीचा गंधही नव्हता. मला मात्र आश्चर्य वाटत होते. बंगाल, ओरिसा, आंध्र, तमिळनाडू, केरळ ह्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिकांना हिंदी भाषा येत नव्हती तरी ती भाषा महाराष्ट्रात का थोपवली जात आहे. 


मी जवळपास तासभर ह्या विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारल्या मोबाईलवर चेस खेळला. त्यानंतर आंध्र पोलिसांकडून आजची व्यवस्था कोणत्या हॉटेलमध्ये केली आहे त्याचा निरोप आला. मी जिथे उभा होतो त्याच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये ब्रिंदाबन हॉटेलमध्ये आमची सोय झाली होती. हे कळताच मला हायसे वाटले. ती इमारत चार मजली होती. मात्र खालच्या मजल्यावर कुठेच राहण्यासाठी हॉटेल दिसत नव्हते. तिथे एक शॉपिंग complex होता. मी त्या शॉपिंग complex मध्ये शिरलो. तर आतमध्ये मला जे नाव सांगितले होते त्याच नावाचे हॉटेल ब्रिंदाबन दिसले जिथे फक्त जेवण्याची सोय होती. पण राहण्याची सोय नव्हती. मी तिथे रिसेप्शनवर विचारले की ह्याच नावाचे इतर कोणते हॉटेल इथे आहे का जिथे राहण्याची सोय आहे. तेव्हा त्यांनी नाही म्हणून सांगितले. मला आंध्र पोलिसांकडून हॉटेलचा नंबर मिळाला त्या नंबरवर फोन केला असता त्यांनी सांगितले की तुम्ही बिल्डिंगसमोरच थांबा आमचा माणूस तुम्हाला घ्यायला येतो आहे. लगेचच एक माणूस माझ्याकडे आला. त्याने बिल्डिंगच्या मागच्या बाजूला मला नेले तिथे खाली पार्किंग मध्ये सायकल ठेवायला सांगितले आणि तिथेच असलेल्या लिफ्टने चौथ्या मजल्यावर नेले. तिथे आमची राहण्याची सोय असलेले हॉटेल ब्रिंदाबन होते. मी त्यांना तळमजल्यावर मला का चुकीचे सांगितले गेले हे विचारले तर तेव्हा समजले की त्या दोनही व्यवस्थापनांचा एकमेकांशी संबंध नव्हता. आणि तळमजल्यावरील हॉटेलचे व्यवस्थापन मुद्दाम ह्या हॉटेलची माहिती देत नाहीत. थोड्या वेळाने माझे तीनही साथीदारसुद्धा आले. तळमजल्यावरील हॉटेल मध्ये जेवणाचे टाळत आम्ही जेवण्यासाठी आसपास दुसरे हॉटेल शोधले. त्यांनी त्यांच्या आडमुठ्या आणि त्रासदायक वागणुकीमुळे ग्राहक मात्र घालवले होते.



 







फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...