रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आंतरराष्ट्रीय सीमा आहे, जी गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहे. 

शहर पार करताच समोर फरक्का बॅरेज दिसत होते. उत्तर बंगालला जोडण्यासाठी गंगा नदीवरील हे एक महत्वाचे बॅरेज आहे. हे बॅरेज बांगलादेशपासून जेमतेम १८ किमी अंतरावर आहे. बांगलादेशची अंदाजे ७०% लोकसंख्या आणि भारताची अंदाजे ५०% लोकसंख्या गंगा खोऱ्यात राहते. भारताच्या एकूण सिंचित क्षेत्रापैकी ४३% क्षेत्रही गंगा खोऱ्यात आहे, आणि तिच्या काठावर अंदाजे १०० शहरी वस्त्या असून एकूण लोकसंख्या अंदाजे १२० दशलक्ष आहे. फरक्का बॅरेजच्या बांधकामानंतर, गंगा-पद्मा नदीतील पाण्याचा जास्तीत जास्त प्रवाह लक्षणीयरीत्या कमी झाला. प्रवाहातील या घटीमुळे भारत आणि बांगलादेशात अनेक समस्या निर्माण झाल्या; यामध्ये माशांच्या विविध प्रजातींचे नुकसान, पद्मा नदीच्या उपनद्या आटणे, बंगालच्या उपसागराकडून खारे पाणी आत येण्याचे प्रमाण वाढणे आणि सुंदरबनमधील खारफुटीच्या (मँग्रोव्ह) जंगलांचे नुकसान होणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. बांगलादेशमध्ये, असे मानले जाते की जलमार्गाचे नियमन केल्यामुळे क्षारतेची पातळी वाढली आहे, मत्स्यव्यवसाय दूषित झाला आहे, जलवाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे आणि पाण्याच्या गुणवत्तेला व सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वाढलेल्या क्षारतेमुळे जमिनीतील ओलाव्याची पातळी कमी होण्यासोबतच वाळवंटीकरणही झाले आहे. अर्थातच, या धरणाचा दोन शेजारी देशांमधील संबंधांवर अजूनही महत्त्वपूर्ण परिणाम होतो. 

बिहारमधील पुरासाठीदेखील फरक्का बॅरेजवर टीका केली जाते, कारण त्यामुळे गंगेच्या पात्रात गाळाचे प्रमाण अत्यधिक वाढले आहे. फरक्का बॅरेजमुळे गंगा नदीच्या प्रवाहातून होणारे माशांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात मंदावले. 'हिल्सा' (किंवा 'इलिश') सारखे समुद्रातील प्रौढ मासे प्रजननासाठी सहसा गोड्या पाण्याच्या नद्यांमध्ये येतात. फरक्का बॅरेज बांधल्यानंतर, या माशांना प्रजननासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणारी कोणतीही 'फिश लॅडर' (माशांसाठीची विशेष वाट) तयार करण्यात आली नाही. या बॅरेजच्या निर्मितीनंतर भारतातील हिल्सा माशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली, तर बांगलादेशातील पद्मा नदीच्या खालच्या पट्ट्यात मात्र त्यांची संख्या चांगली राहिली. २०१६ पासून, फरक्का बॅरेजवर काही 'फिश लॅडर्स' (माशांसाठीच्या विशेष वाटा) बांधण्यात आल्या आहेत.

भारत आणि बांगलादेशमध्ये तणाव निर्माण करणारे फरक्का बॅरेज उत्तर बंगालला मात्र जोडण्याचे महत्वाचे काम करत होते. 

गंगा नदी आमच्या डावीकडून वाहत येत होती आणि उजवीकडे वाहत जात होती... ती बांगला देशाच्या दिशेने. आम्हाला नदी ओलांडून पुढे जायचे होते. सायकल चालवत आम्ही नदीवरील पुलाजवळ आलो. बॅरेजवरील पुलावर चारपदरी रस्ता होता. पुलावर रस्त्याच्या कडेला साधारण १० फूट रुंदीचा पदपथही होता. पुलावर प्रवेश करत असताना रस्ता मात्र खराब होता. वाहतूकही बऱ्यापैकी होती. मी पुलाजवळ जाताच एका जवानाने मला अडवले. मी थोडा गोंधळलो. कदाचित येथे सायकलने पूल करायला मनाई तर नाही, हा रस्ता केवळ मोठ्या गाड्यांसाठी राखीव तर नाही? मला त्या जवानाने पदपथावरून सायकल चालवायला सांगितले. त्याप्रमाणे मी पदपथावरून सायकलने जाऊ लागलो. पुल बराच जुना असल्याचे जाणवत होते. १९६२ साली ह्या पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. तब्बल १ अब्ज डॉलर्स करून बॅरेजचे काम १९७० साली पूर्ण झाले होते. मात्र बॅरेज सुरू व्हायला १९७५ साल उजाडावे लागले होते. जीर्ण झालेल्या फरक्का बॅरेजवरून प्रवास करणे ही रोजच्या संयमाची परीक्षा ठरली आहे.  हा जुना बॅरेज वाहनांचा प्रचंड ओघ हाताळण्यास असमर्थ ठरत होता. त्यामुळेच बहुधा सायकलच्या वेगामुळे इतर वाहनांचा खोळंबा होऊ नये, म्हणून त्या जवानाने सायकल पदपथावरून चालवायला सांगितली होती. पदपथ मात्र पूर्ण रिकामा होता.

नदीच्या विशाल पात्राची कल्पना पुल सुरू होण्या अगोदर येत होती.  त्यामुळे नदीकडे पाहत सायकलवायला मिळेल ह्या कल्पनेने मी खुष झालो होतो. पुलाशेजारील पदपथावर सायकल चढवली मात्र आणि.. माझी पार निराशा झाली. पुलाच्या डाव्या बाजूला अंदाजे ६ फुटांपेक्षा उंच कठडा होता. रस्त्याच्या पुलाला खेटूनच डावीकडे रेल्वेमार्गही होता. त्यामुळे डावीकडे नदीचे पात्र पाहताही येत नव्हते. उजव्या बाजूला चारपदरी रस्त्याच्या पलीकडे बांगला देशाच्या दिशेने वाहणाऱ्या नदीच्या पात्राच्या ' दूरदर्शन ' वरच समाधान मानावे लागत होते. नदीचे पात्र रुंद तर होतेच शिवाय चांगलेच खोल असल्याचे लांबूनही जाणवत होते. तेथील पाण्याच्या प्रवाहाचा खळाळ आणि पात्राची रुंदी, खोली पाहता ही नदी नव्हे तर ' नद ' च होता. फरक्का बॅरेजला आव्हान देत बांगलादेशकडे जाणारा तो अजस्त्र नद आपल्याच नादात वाहत होता.

पुल चांगलाच लांब होता. वाटेत काही ठिकाणी टेहेळणी पथकही तैनात होते. पदपथावरून जात असल्याने वेगही कमी झाला होता. पदपथावर चालत जाणारे तर कोणीच नव्हते. त्यामुळे सायकल संथ मात्र विना अडथळा जात होती. पुल पार करायला आम्हाला जवळपास २० मिनिटे लागली. ह्या बॅरेजची लांबी २२४५ मीटर आहे. मात्र एवढ्या विशाल पात्राचे नीट दर्शन न मिळाल्याने नदीपात्रावरील सायकलवण्याची मजा घेता येत नव्हती.

एव्हाना भूकही लागली होती. सुदैवाने पूल पार करताच डाव्या बाजूला एक खोपट दिसले. लांबून पाहता तिथे जेवण मिळेल असे वाटत नव्हते. मात्र किमान चहा घेऊन तरी पुढे जाता येईल अश्या अपेक्षेने आम्ही तिथे शिरलो. शेजारीच फरक्का सुपर थर्मल पॉवर स्टेशन दिसत होते. हे पॉवर स्टेशन २१०० मेगावॉट क्षमतेचे होते.

आम्ही त्या खोपटामध्ये शिरून पाहिले. आतील जागा चांगलीच मोठी होती. समोर बरीच मोकळी जागा होती. दरवाजाच्या उजव्या बाजूला काही टेबल आणि खुर्च्या मांडल्या होत्या. तर डाव्या बाजूला अगदी आतल्या बाजूूला किचन दिसत होते. ते बंदिस्त नव्हते. एकाच हॉल मध्ये बिनभिंतीचा तो कारभार होता. मालक आणि मालकीण आमचा अंदाज घेत होते आणि आम्ही त्यांचा अंदाज घेत होतो. समोर बसलेले ग्राहक उत्सुकतेने आमची चौकशी करू लागले. आम्ही मुंबईहून आलो आहोत हे ऐकताच ते खुष झाले. व्यापारानिमित्त त्यांचा मुंबईशी नियमित संपर्क होता. त्यांनी लगेचच त्याच्या मुंबईतील मित्राला फोन लावला. त्यांचा मुंबईतील मित्रही आमची मोहीम ऐकून खुष झाला. मनोज त्या मुंबईतील मित्राशी फोनवर बोलत होता तर मी येथील नवीन मित्राशी गप्पा मारू लागलो. आमची मोहीम त्यांना रोमांचकारी वाटत होती. एव्हाना हॉटेलचे मालक, मालकीण आणि आम्हीही एकमेकांबद्दल आश्वस्त झालो. आम्ही येथेच जेवण करण्याचे ठरवले. एकतर भूक लागली होतीच. शिवाय कालच्या दुपारचा अनुभव ताजाच होता. जेवण मात्र छानच होते. हॉटेल मालक आणि मालकिणीला आम्ही धन्यवाद दिले. त्यांनी आणि येथे परिचित झालेल्या आमच्या नवीन मित्राने आम्हाला शुभेच्छा दिल्या. 

आम्हाला त्या शुभेच्छांची आज खरोखरीच गरज होती. कारण आम्ही आज ज्या गजोल ह्या गावी मुक्काम करायचे ठरवले होते त्या गावाचे नावही ऐकले नसल्याचे आम्हाला काहीजणांनी सांगितले होते. तिथे पोचल्यावर आम्हाला राहण्याची व्यवस्था शोधायची होती. अर्थातच त्यासाठी सूर्यास्ताच्या अगोदर पोचायला हवे होते. अद्यापही जवळपास ६५ -७० किमी अंतर बाकी होते. सूर्यास्ताच्या सुमारास आम्ही गजोल गाठले खरे. मात्र हमरस्त्याला हॉटेल दिसेना. आम्ही गावाकडे वळलो. चौकशी करता सुरुवातीला एक दोन हॉटेलने आम्हाला राहण्याची परवानगी नाकारली. अंधार होत असल्याने थोडी चिंता वाटू लागली. मात्र तिसऱ्या ठिकाणी आमची सोय झाली. थोडे फ्रेश होऊन आम्ही आजच्या राइडचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलो.




                                                             



शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

जयहिंद: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग २२

 


बंगालमध्ये आमचा पाहुणचार उत्तम होत होता. येथील खाद्यपदार्थांची विविधता आमच्या रसनेची तृप्ती करत होती. तसेच येथील माणसेही आमची मने जिंकत होती. अब्दुलबरोबर मराठी आणि बंगाली भाषांचे नातेही उलगडत होते. एखादा माणूस किती साधा, सरळ आणि निर्मळ असावा ह्याचे अब्दुल हा मूर्तिमंत उदाहरण होता. रात्री आमची झोपही अगदी शांत आणि व्यवस्थित झाली. पहाटे आम्ही येथून निघण्याची तयारी करू लागलो. अब्दुलप्रमाणेच इतरही काही युवक येथे नोकरीनिमित्ताने राहत होते. त्यांच्यापैकी दोघेजण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले.

अब्दूलने त्यांची आमच्याशी ओळख करून दिली. आमच्या मोहिमेविषयी आम्ही त्यांना माहिती दिली. दोघांनाही आमच्या मोहिमेविषयी उत्सुकता वाटत होती. त्याच्या एका मित्राचे नाव होते राज! तो तेथील क्रिकेट क्लब मधील होतकरू खेळाडू होता. तेथील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो प्रयत्न करत होता. IPL खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी त्याला शुभेच्छा देत आम्ही आमच्या सायकली तयार केल्या. आमच्या सायकलींवर सामान लादताना अब्दुल आणि त्याचे मित्र कुतुहलाने पाहत होते. 'लवकरच आम्ही तुला IPL खेळताना पाहू, त्यावेळी आमच्या तिकिटाची सोय कर ', असे राजला सांगत आम्ही तिघांचाही निरोप घेतला.


सकाळची वेळ अतिशय प्रसन्न होती. आम्ही शांतपणे सुरुवात केली. आम्ही राष्ट्रीय महामार्ग सोडून राज्य रस्त्याने जात होतो. तो अरुंद होता. आमच्या मार्गापासून बांगला देशाची सीमारेषा  जवळच होती. आमच्या मार्गाला साधारणपणे ती सीमारेषा समांतर जात होती. रस्त्यात सगळीकडे मुस्लिम वस्ती होती. बहुतांश ठिकाणी गायी, बकऱ्या पाळलेल्या होत्या. मशिदीतून बांग ऐकायला येत होती. रस्त्यात सगळेजण आपापल्या कामात गर्क होते. इतक्यात एक अडीच तीन वर्षांचा मुलगा आम्हाला पाहून रस्त्यावर धावत आला. तिथे येताच तो ओरडायला लागला. मला पटकन तो काय म्हणतोय ते कळले नाही. मी त्याच्याकडे पाहिले. रस्त्याच्या डावीकडे अंगण होते. त्यापलीकडे असलेल्या घरातून धावत येत तो काहीतरी ओरडत होता. त्याच्या आवाजामुळे सायकलचा वेग एकदम कमी करून मी त्याच्याकडे बघू लागलो.  तो छोटा मुलगा माझ्याकडे पाहत कडक सॅल्युट मारत ओरडत होता.... 'जयहिंद!' त्याला घरातून काय शिक्षण मिळत होते, त्याच्यावर काय संस्कार होत होते.. हे उघडच होते. भारतीयत्वाचे बाळकडूच त्याला पाजले गेले होते. भारताची बांगलादेशकडील सीमारेषा किती बळकट आहे ह्याचे प्रत्यंतर आम्हाला येत होते.

लवकरच आम्ही पुन्हा महामार्गाला लागलो. वातावरण अतिशय सुंदर होते. रस्ताही चांगला होता. आम्हाला पाहून अनेकजण आमची प्रशंसा करत होते, आम्हाला शुभेच्छा देत होते. 



वाटेत एकाने आम्हाला थांबवले. त्याला आमची मुलाखत घ्यायची होती. तो एक यूट्यूब चॅनेल चालवत होता. वास्तविक तो एक चांगल्या ठिकाणी कामही करत होता. त्याच्या यूट्यूब चॅनेलसाठी त्याने आम्हा तिघांचीही थोडक्यात मुलाखत घेतली. आमच्याशी बोलत आमच्या मोहिमेविषयी त्याने मन त्या चॅनेलवर माहिती दिली. आम्हाला शुभेच्छा देत त्याने आमचा निरोप घेतला. अश्या मोहिमेदरम्यान आपली कोणी आस्थेने चौकशी करत असेल तर आपल्याला नक्कीच समाधान वाटत असते. मात्र त्या दरम्यान वेळ, काम, वेग ह्यांचेही भान सुटू द्यायचे नसते.


कल्याण, शहाड कडून टिटवाळा येथे जात असताना वाटेत 'पाचवा मैल' असा एक स्थानदर्शक दगड आहे. बंगालमधील रघुनाथगंज सोडल्यावर बऱ्याच वेळाने आम्हाला 'आठ मैल' असा स्थानदर्शक दगड दिसला. शहाड पुढील 'पाचवा मैल ' पाहून मला नेहमी प्रश्न पडायचा हे 'पांचवा मैल' नेमके आहे तरी आहे.. कुठून मोजले? आज पर्यंत पहिले चार मैल कधी दिसले नव्हते. पुढे सहा, सातवा मैल सुद्धा कधी दिसले नाही. आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळील शहाडपाशी 'पाचवा मैल' तर भारताच्या पूर्व सीमारेषेजवळ हे 'आठवा मैल'. 'पाचवा मैल' आणि 'आठ मैल' ह्या दोन ठिकाणामध्ये महाराष्ट्र ते बंगाल एवढा विभाग सामावला आहे ह्याची आम्हाला जाणीव नव्हती. सहावा मैल आणि सातवा मैल कुठे आहेत ह्याचीही मला आता उत्सुकता वाटायला लागली.


बंगाल मला विशेष आवडायला लागला होता. कारण शाळकरी मुले आणि मुली सायकली चालवत शाळेत जात आहेत हे दृश्य येथे अगदी नियमितपणे दिसत होते. शाळांच्या प्रांगणात मोठ्या संख्येने सायकली उभ्या असलेल्या पाहून खूप समाधान वाटत होते. मुंबई, कोलकाता सारखी महानगरे ह्या वैभवाला मुकली असली तरी येथील गावागावात सायकलींचे प्रगतीचे वारे वाहत असल्याचे पदोपदी जाणवत होते.





रविवार, २ ऑगस्ट, २०२६

खादाडी: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २१

अब्दूलला आम्हाला रघुनाथगंज दाखवायचे होते. खरतर तो आग्रह करत होता की आम्ही आणखी एकदोन दिवस रहावे. त्याच्याबरोबर त्याच्या आई वडिलांना भेटायला जंगीपूरलाही यावे. पण आम्हाला ते शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरात लवकर आम्हाला निघायचे होते. संध्याकाळच्या थोडक्या वेळात त्याने जमेल तेवढे रघुनाथगंज आम्हाला दाखवायचे ठरवले.

आम्ही फिरायला बाहेर पडलो. अब्दुल आणि माझ्या गप्पा सुरू होत्याच. बंगाली, मराठी शब्दांच्या गमतीजमती आम्ही एकमेकांना सांगत होतो. ' आई ' .... माँ ला मराठीत आई म्हणतात ना! तो मला विचारत होता. मी म्हटले हो, पण तुला कसे माहित! अब्दूलने मला सांगितले होते की तो बंगालच्या बाहेर अद्याप गेला नव्हता. तो म्हणाला चित्रपटात मी पाहिले आहे. त्यानंतर बंगाली आणि मराठीतील काही जवळपास असणारे शब्द आम्ही एकमेकांना विचारत आणि सांगत होतो.

दरम्यान मी अब्दुल आम्हाला बाजारात घेऊन गेला. त्याने आम्हाला दरबेशपारा येथील नियोगी टिफीन स्टोअर मध्ये नेले. हे तेथील खवय्यांचे खास ठिकाण होते. तिथे गेल्यावर ठाण्यातील मामलेदार मिसळ अथवा पुण्यातील डेक्कन पाशी असलेल्या आप्पांच्या उपहारगृहाची आठवण होत होती. त्या उपहारगृहामध्ये फारतर चार पाच टेबल असावी. मात्र तिथे चांगलाच राबता होता. तेथील कचोरी खूपच छान असल्याचे आम्हाला सांगितले. खरोखरच कचोरी अप्रतिम होती. आम्ही खात असतानाच तिथे जिलबीचा घाणाही काढला जात होता. अब्दूलने आम्हाला येथील जिलेबी खाण्याचाही आग्रह केला. जीभ चाळवली होतीच. आम्ही लगेचच जिलेबीवर आडवा हात मारला. 




तिथून तो आम्हाला नदीकाठावर घेऊन गेला. तिथे आरती सुरू होती. आम्हाला त्याने नदीचे दर्शन घडवले. तिथे मिळणारे खाद्यपदार्थ त्याला आम्हाला खाऊ घालायचे होते. नदीजवळील सुभाष दीप च्या ' चा ठेक ' पाशी आम्ही आलो. चहा तर हवा होताच. ' चा ठेक' मध्ये फर्मास चहा मिळाला. आमची भ्रमंती सुरू होती त्याबरोबर खादंती सुद्धा सुरू होती.








अब्दूलने आमचा पाहुणचार त्या एका संध्याकाळीच व्यवस्थित आणि यथायोग्य करायचा चंग बांधला होता. तिथून आम्ही परत एकदा बाजारात बालीघाटा रस्ता येथे गेलो. रस्ता चिंचोळा होता. थोडाफार अंधारही होता. रस्त्यावर फार गर्दी नव्हती. इतक्यात एक दुकान दिसले...बादल चंद्रा घोष स्वीट शॉप! दुकान साधेसुधे होते. तेथील पदार्थात वैविध्य होते. अब्दूलने आम्हाला येथील मिठाई खाण्याचा आग्रह केला. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रसगुल्ले होते. ते पाहून माझ्या तोंडाला चांगलेच पाणी सुटले. आम्ही तीनचार प्रकारचे रसगुल्ले मटकावले. मनोज स्वतः रसगुल्ले खायचा नाही. मात्र मला आग्रह करायचा. मी त्या आग्रहाला आनंदाने बळी पडायचो. मनोजला मिष्टी दोही हवे होते. त्याने त्याचीही चांगलीच तारीफ केली. मग मला आणि संजयला मिष्टी दोही घेणे तर क्रमप्राप्तच होते. बंगाल मध्ये रसगुल्ले आणि मिष्टी दोही न खाणारा अरसिकच म्हटला पाहिजे. 




आता आम्ही परत अब्दुलच्या घराकडे वळलो. तो म्हणत होता आता आपण जेवण करू आणि मगच घरी जाऊ. दुपारी जेवण मिळत नव्हते आणि आता तर पोटावर अत्याचार सुरू होते. आम्ही त्याला म्हटले आत्ता एवढे खाणे झाले आहे आता इतक्यात तरी जेवण जाणार नाही. त्याबरोबर तो आम्हाला एक मैदानाकडे घेऊन गेला. तिथे एक बंदिस्त बॅडमिंटन कोर्टही होते. तिथेही आम्ही थोडा वेळ काढला. आमचे पोट मात्र तुडुंब भरलेले होते. 

अब्दूलने आमचा उत्तम पाहुणचार केला होताच, रघुनाथगंमधील तऱ्हेतऱ्हेचे खाद्य पदार्थ खायला घातले होते. मात्र त्याने फार खाल्ले नव्हते. आम्ही विचार केला की आमच्याबरोबर तो ही जेवेल. त्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर कुंडू हॉटेलमध्ये गेलो. ही एक खानावळ होती. अब्दूलने आमच्याकरता थाळीची ऑर्डर केली. तीनच थाळी आल्या. अब्दूलने फक्त आमच्यासाठी जेवण मागवले होते. ही त्याची नेहमीची मेस नव्हती. तो स्वतः त्याच्या नेहमीच्या मेसमध्ये जेवायला जाणार होता. आम्हाला ह्याची कल्पनाच नव्हती. थाळी मध्ये फक्त भात होता.... तोही डोंगराएवढा! आमचे पोट तर आधीच तुडुंब भरलेले होते. लाजेखातर थोडा फार भात खाणे क्रमप्राप्त होतेच. तो खाल्ला जावा म्हणून मी आणि मनोजने मासे मागवले. पण आमचे पोट भातही नाकारत होते आणि मासेही. पोटाला दामटवत आम्ही मासे संपवले. मात्र तो भात अर्धाही संपवता येत नव्हता. खरतर तिघांसाठी मिळून एकच थाळी मागवली असती तरी चालले असते. आम्ही पूर्ण शरणागती पत्करली.

तिथून आम्ही अब्दुलच्या वसतिगृहाकडे निघालो. मला जिरे घ्यायचे होते. पण त्याला हिंदी किंवा इंग्रजीत काय म्हणतात ते मला माहित नव्हते. बंगाली मध्ये त्याचे भाषांतर काय असेल ह्याची तर सुतराम कल्पना नव्हती. आम्ही घरातून निघाल्यापासून जिऱ्याला हिंदी इंग्रजीत काय म्हणतात ते आठवत होतो. अखेरीस मी अब्दूलला म्हटले मला जो पदार्थ घ्यायचा आहे तो किराणा दुकानात मिळतो, तो बडीशेप सारखा दिसतो. त्याला लक्षात येईना. मग मी गुगल करून त्याला फोटो दाखवला. त्यासरशी अब्दुल लगेच म्हणाला...' जीरा!'. मी डोक्याला एवढा ताण देऊन अब्दूलला जीरा हवय हे कसे सांगायचा ह्याचा विचार करत होतो. आणि... जिऱ्याला बंगालीतही जीरा म्हणत असतील ह्याचा विचारच केला नव्हता. घरातून निघाल्यापासून मी आणि अब्दूलने मराठी बंगालीत साम्य असलेले काही शब्द आठवून एकमेकांना सांगितले होते. त्याची मजा घेतली होती. मात्र जिऱ्याने माझी चांगलीच फिरकी घेतली होती.

आम्ही घरी आलो. बहुधा आम्हाला मोकळीक मिळावी म्हणून तो शेजारी त्याच्या मित्राकडे झोपायला गेला. काय नाते होते आमचे आणि अब्दुलचे! आम्ही ह्या आधी कधी भेटलो नव्हतो, परत कधी भेटू माहित नाही. मात्र आमचे नाते जोडले गेले ते कायमचे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अब्दुल आणि पश्चिम किनाऱ्यावरील आम्ही ह्यांचे बंध कायमसाठी बांधले गेले. Cuouchsurfing च्या माध्यमातून असे अनेक अनोळखी लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांप्रमाणे आपला पाहुणचार करतात किंवा आपणही तसे कोणाला आमंत्रित करू शकतो. ह्यातून मिळणारा आनंद पैशाने विकत घेता येत नाही.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...