
येलमनचिल्ली येथील वास्तव्य सुखावह होते. पहाटे चहासुद्धा लवकर आणि उत्तम मिळाला. येथील पोलिसांनी अक्षरशः शेवटच्या क्षणी आमची माहिती मिळूनही आमची उत्तम व्यवस्था केली होती. त्यामुळे येथील पोलिस कार्यालयाला भेट देऊन मगच आपण निघूया असे आनंदने सांगताच आम्ही लगेचच ते मान्य केले. अर्थातच काल रात्री ज्यांनी आमची सोय केली होती त्यांची भेट आत्ता होणार नसली तरी ज्या पोलिस कार्यालयाने आमची सोय केली तिथे जाणे आम्हालाही आवश्यक वाटले. आमच्या हॉटेलपासून पोलिस स्थानक जवळच होते असे कळले. आम्ही तिथे पोहोचलो. तेथील उपस्थित केंद्रप्रमुखाला आमच्याबद्दल माहिती नव्हती. त्यांचा स्वभाव अतिशय नम्र होता. त्यांना भेटताना घरातीलच एखाद्या ज्येष्ठ आप्ताला भेटल्यासारखे वाटत होते. आनंदने त्यांना आमची आपल्या कार्यालयातर्फे कशी सोय झाली हे सांगितले. आनंद निवृत्त ACP असल्याचे कळताच ते केंद्रप्रमुखही आनंदित झाले. त्यांचे आभार मानत आम्ही येलमनचिल्लीचा निरोप घेतला. ह्या गावात राहू नका असे आनंदच्या पोलिस मित्रांतर्फे का सांगितले ह्याचा आम्हाला उलगडा होऊ शकला नाही. उलट आम्हाला तर येथील पोलिस आणि सामान्य नागरिकही अतिशय साधे, नम्र आणि मदतीला तत्पर असल्याचे जाणवले होते.

येलमनचिल्ली पासून आमचे आजचे गंतव्य स्थान असलेले राजमहेंद्रवरम (राजमुंद्री) हे शहर जवळपास १४२ किमी अंतरावर होते. मी सरळ गणिती आकडेमोड करत तीन टप्प्यात ते अंतर पार करायचे ठरवले. १० वाजेपर्यंत ५० किमी अंतर पार करून नाष्टा करायचे पुढे परत ५० किमी पार करून २ वाजेपर्यंत जेवण करायचे नंतर उरलेले ४०-४२ किमी अंतर ५ वाजेपर्यंत पार केले तर ह्या ऐतिहासिक शहरात फेरफटका मारता येईल असा हिशोब मी मांडला. राजमहेंद्रवरम ह्या शहराला राजमुंद्री असेही म्हणतात. गोदावरी नदीच्या काठावरील ह्या शहराची स्थापना ११ व्या शतकात पूर्व चालुक्य राजा राजराजा नरेंद्र यांनी केली. त्याच्या स्थापनेपासून, ब्रिटीश राजवटीखाली येण्यापूर्वी आणि कालांतराने आधुनिक आंध्र प्रदेशचा भाग बनण्यापूर्वी, चालुक्य, काकतीय आणि कुतुबशाहींसह विविध राजवंशांनी या शहरावर राज्य केले आहे.
१६०२ मध्ये डच लोकांनी राजमहेंद्रवरम येथे एक किल्ला बांधला. १८ व्या शतकात ब्रिटिशांनी या प्रदेशासह उत्तर सरकार ताब्यात घेतले. ब्रिटिश राजवटीत, राजमहेंद्रवरम हे गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय होते. १८६४ मध्ये ब्रिटिशांनी डच किल्ल्याचे तुरुंगात रूपांतर केले आणि १८७० मध्ये ते मध्यवर्ती कारागृहात रूपांतरित केले. १९२५ मध्ये, जिल्हा पूर्व आणि पश्चिम गोदावरीमध्ये विभागला गेला. शहराचे मूळ नाव राजमहेंद्रवरम होते, परंतु ब्रिटिश काळात ते हळूहळू राजमुंद्री असे बदलण्यात आले. २०१५ मध्ये, आंध्र प्रदेश सरकारने हे नाव अधिकृतपणे त्याच्या मूळ स्वरूपात बदलले .आज, राजमहेंद्रवरम त्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. म्हणूनच हे शहर आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. शहरात गोदावरी नदीकाठी मंदिरे, घाट आणि त्याच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या अवशेष सापडतात. अर्थातच म्हणूनच मला ह्या शहरात सूर्यास्तापूर्वी पोचून येथील संस्कृती अनुभवायची होती. त्यासाठी मी आखलेल्या गणिती आकडेमोडीप्रमाणे मार्गक्रमण करावे लागणार होते. आनंद, संजय आणि आमचा नवीन सहकारी विक्रम ह्या तिघांनाही मी ह्याची स्पष्ट कल्पना देऊन ठेवली.
खरतर मला संजयबद्दल अजिबात शंका नव्हती. विक्रम हे नियोजन पाळेल अशी आशा होती. मात्र आनंदबद्दल मी अजूनही साशंक होतो. वास्तविक आज आमच्या मोहिमेतील नववा दिवस होता. त्यामुळे आनंदकडून त्याने हे वेळापत्रक पाळावे ह्याची अपेक्षा करणे गैर नव्हतेच. शहराबाहेर पडून महामार्गाला लागेपर्यंत आम्ही बरोबरच होतो. अंतराचा अंदाज घेत वेग योग्य राखणे ही आजची प्रत्येकाची जबाबदारी होती. मात्र थोड्या वेळातच आनंद, संजय आजही मागे राहिले. अर्थात आज त्यांच्याबरोबर विक्रम होता. मी मात्र वेगाशी प्रतारणा करणार नव्हतो. रस्ता अतिशय सुंदर होता. आजूबाजूचा निसर्गही खुणावत होता. काल उन्हाचा प्रचंड त्रास झाला होता मात्र आत्ता सकाळी येथे हवेत सुखद गारठा होता. सायकलवण्यासाठी एकदम पोषक वातावरण होते.



साधारण ५० किमी अंतर पार होत असताना छोटासा घाट लागला. तो घाट चढून जाताच रस्त्याच्या डाव्या हाताला दोनतीन टेबल मांडलेली दिसली. समोर एक टपरी होती. साधारण १०- १०.१५ वाजले होते. अर्थातच भूकही लागली होती. मी आनंद आणि संजयला मेसेज पाठवला की मी इथे नाश्त्यासाठी थांबत आहे. तेव्हा लवकर इथे पोहोचा. मात्र तिथे नाश्त्यासाठी काहीच दिसत नव्हते. मी चहाची ऑर्डर दिली. चहाची वाट बघत असताना दुकानात बरेच खाद्यपदार्थ बरण्यांमध्ये भरून ठेवलेले दिसत होते. त्यात लाडूही होते. मी एक लाडू खाल्ला. लाडू एकदम स्वादिष्ट होता. भूक लागली होतीच. चहाबरोबर थोडी बिस्किटे आवश्यक होती.


चहा घेऊन मी त्या टेबलपाशी बसलो. दुकानदार वयस्क जोडपे होते. दुकान रस्त्याच्या डावीकडे होते आणि तिथे बरीच मोकळी जागा होती. तरी शेजारी एकही इतर दुकान नव्हते. मला चहा देऊन ते दोघेही कुठे गायब झाले कळेना. माझा चहा, बिस्किटे नाष्टा झाला तरी ना त्या दुकानदार जोडप्याचा पत्ता होता ना माझ्या सहकाऱ्यांचा. लाडू खाऊन माझी भूकही चाळवली होती. मी थोडा वेळ त्या जोडप्याची वाट पाहिली. अखेरीस न राहून बरणीतून आणखी एक लाडू खाल्ला. चव जिभेवर चांगलीच रेंगाळत होती. आता भूक खवळली होती. मी बरणीतून एकामागोमाग एक लाडू काढून खायला सुरुवात केली. पाचसहा लाडू खाऊन झाल्यावर जरा बरे वाटले. माझे सहकारी अजूनही आले नव्हते. खरतर मला इथे येऊन अर्धा पाऊण तास झाला होता. आम्ही वेळापत्रकाच्या मागे पडलो होतो. पुन्हा एकदा चहा घेऊन मी त्यांना पुढे जात असल्याचे सांगून आपल्या नियोजनापेक्षा उशीर होत असल्याची आठवण करून दिली.
मी मात्र एक निश्चय केला की ते तिघे वेळापत्रकाच्या मागे राहत असतील तरी आपण ते पाळायचे. मुळात ते तिघे एकत्र होते. मी वेळापत्रक पाळल्यास उजेडात गंतव्यस्थानी पोहोचू शकत होतो. आमची आजची व्यवस्था अजून झाली नव्हती. उजेडात पोचल्यास ती व्यवस्था शोधायलाही वेळ मिळणार होता. शिवाय दुर्दैवाने वाटेत काही मदत लागली तर वाटेतील एखाद्या गावात मदत मिळणे कठीण असले तरी राजमहेंद्रवरमसारख्या महत्वाच्या ठिकाणी ती मदत मिळू शकली असती.
आनंदने मला मेसेज पाठवला की ते तिघे मागे नाष्टा घेण्यासाठी थांबले आहेत. मी येथे पाऊण एक तास थांबूनही ते आले नाहीत. आम्ही वेळापत्रकाच्या मागे अधिकच मागे पडत होतो. त्यामुळे मी पुढे निघालो. दुपारी दोन पर्यंत एकूण १०० किमी अंतर पार करणे गरजेचे होते. मी सायकल दामटवली.
वाटेत बरेच पदयात्री दिसत होते..त्यातील काही जणांनी भगवे कपडे घातले होते. एक मध्यमवयीन जोडपेही त्यात होते. मी त्यांच्याजवळ थांबून त्यांची चौकशी केली. ते सगळेजण विशाखापट्टणम येथून चालत विजयवाडा येथे निघाले होते.
विशाखापट्टणम ते विजयवाडा हे अंतर जवळपास ३५० किमी होते. विजयवाडा हे शहराभोवती असलेल्या टेकडीवर असलेल्या अलंकृत कनक दुर्गा मंदिरासाठी ओळखले जाते. हे सगळे भाविक त्या देवीच्या दर्शनासाठीच पायी निघाले होते. तेथील उंडावल्ली लेण्यांमध्ये वाळूच्या टेकडीवर कोरलेली आणि विस्तृत पुतळ्यांनी सजवलेली प्राचीन दगडी मंदिरे आहेत. शहराजवळ कृष्णा नदीच्या पलीकडे प्रकाशम बॅरेज पसरलेला आहे. जवळच भवानी बेट आहे, जिथे जंगले आणि पाण्याच्या काठावरील बागा आहेत. त्या जोडप्याबरोबर तसेच इतर भाविकांबरोबर थोड्या थोड्या गप्पा मारत मी पुढे जात होतो. मध्यानीची वेळ असल्याने मलाही थोडा विसावा हवा होता. उन्हे तापली होतीच. खरेतर त्या भाविकांना आणि मला एकमेकांची भाषा समजतही नव्हती. मात्र भावनांची भाषा एक होती. एकमेकांविषयी आदर आणि प्रेम होते. त्यामुळे एकमेकांच्या भावना समजत होत्या.



पोटातल्या लाडूंनी मला बरेच इंधन पुरवले होते. मात्र त्यालाही अडीच तीन तास उलटून गेले होते. साधारण पाऊण वाजता मी पुन्हा चहा घेतला आणि त्या इंधनाच्या जोरावर पुढील अर्ध्या तासात उपहारगृह सापडले की त्या तिघांसाठी थांबायचे ठरवले मात्र दीड वाजेपर्यंत कोणतेही खोपटवजा हॉटेलही सापडेना. पुढे एक मोठा चौक दिसला. मला जरा हायसे वाटले. एक छोटेसे मार्केट तिथे होते. परिसरातील ते मोठे गाव असावे. मात्र तिथेही कोणती खानावळ सुद्धा दिसत नव्हती. फळांनी भरलेले एक दुकान तिथे दिसले. मी तिथे काही संत्री खरेदी केली आणि बसण्यासाठी जागा शोधण्यासाठी पुढे निघालो.


थोड्या अंतरावर एक शेडवजा बस स्टॉप दिसला. ऊन रणरणत होते..आजही खायला ... जेवायला मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. मी जवळची संत्री खाण्यासाठी बाहेर काढली. आधी संजय आणि आनंदला कळवले की वाटेत कोणतेही उपहारगृह दिसत नाहीये तेव्हा वाटेत चौकात फळे दिसतील ती खाऊन घ्या. संत्री थोडी आंबटच होती. मात्र पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना ती गोड वाटत होती. त्या बसस्टॉपवर संत्री खाऊन मी पुन्हा त्या तिघांची वाट पाहण्यात अर्धा तास घालवला. आनंदच्या पोलिस मित्रांकडून अजूनही राजमहेंद्रवरम येथे राहण्याच्या सोयीबद्दल काहीही कळले नव्हते. आता अधिक विश्रांती घेत थांबलो तर राजमहेंद्रवरम येथे राहण्याची सोय शोधण्यासाठी वेळ मिळाला नसता. त्यामुळे मी पुढे जात असल्याचे दोघांना सांगून पुढे निघालो.

साधारण तासाभरात मी पुन्हा आमची राहण्याची काही सोय झाली आहे का याची चाचपणी केली. मात्र आनंदने कळवले की अजूनही काहीच निरोप आला नाहीये. इतक्यात मला आमचा ठाणेकर मित्र विवेक करमरकरने राजमहेंद्रवरम येथील इस्कॉन मंदिरात सोय होऊ शकेल असे सांगितल्याची आठवण झाली. एव्हाना साधारण सव्वा तीन वाजले होते. मी चहासाठी थांबा घेतला आणि लगेचच इस्कॉन मंदिरात फोन लावून तेथे राहण्याची सोय होऊ शकते का ह्याची विचारणा केली. आम्ही कोणीही त्यांचे सभासद नव्हतो. मात्र तरीही आमची सशुल्क सोय होऊ शकेल असे त्यांनी कळवले. मी लगेचच आनंदला आपली इस्कॉन मंदिरात सोय झाली असल्याचे कळवले. माझ्यापासून राजमहेंद्रवरम शहर अजूनही साधारण पस्तीस किमी लांब होते. सोय होत असल्याने मी आता धीम्या गतीने जाऊ लागलो. माझ्या अंदाजाने त्या तिघांनी आता मला गाठायला हवे होते..
साधारण सव्वापाचच्या सुमारास आनंदने मेसेज केला की आंध्र पोलिसांनी राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे आपण इस्कॉन मंदिर रद्द करू या. आंध्र पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये आमची सोय केली होती ते हॉटेल माझ्यापासून साधारण सात किमी अंतरावरच होते. म्हणून मी पुन्हा एकदा चहासाठी थांबा घेतला आणि त्यांना तसे कळवले. ते तिघेही माझ्यापासून साधारण पाच किमी मागे होते. त्यामुळे माझा चहा पिऊन होईपर्यंत ते येतील असा माझा अंदाज होता. त्यांनीही मला तसे कळवले होते. त्यांच्या ठिकाणापासून अर्धा पाऊण तासात आम्ही हॉटेल गाठू शकत होतो. मात्र चहा पिऊन अर्धा तास झाला तरी ते येईनात म्हणून मी फोन केला. तेव्हा संजयने मला सांगितले ते जेवणासाठी थांबले आहेत. मला ह्याचा काहीच उलगडा होईना की मी त्यांच्यापासून फक्त १५- २० मिनिटे अंतरावर त्यांची वाट पाहत आहे हे माहित असूनही मला काहीच न कळवता ते अचानक जेवायला का थांबले. तसेही आणखी पाऊण तासात तर आम्ही राहण्याच्या ठिकाणी पोचणार होतोच. मी फोन केला तेव्हा त्यांनी मागितलेले जेवणही आलेले नव्हते. मग मात्र मी त्यांना कळवले की मी आता पुढे निघतो आणि आमचे राहण्याचे हॉटेल गाठतो, तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे या.
राजमहेंद्रवरम शहर बऱ्यापैकी मोठे आहे. शहराचे क्षेत्रफळ १६० चौरस किमी असून हे आंध्र प्रदेशातील लोकवस्तीच्या तुलनेत पाचवे मोठे शहर आहे. मी शहरात शिरत असतानाच शहरी ट्रॅफिक जाणवू लागले. त्यामुळे शेवटचे सात किमी अंतर कापायला अर्धा पाऊण तास तरी गेला. आंध्र पोलिसांनी आमची सोय केलेले अथीधी इंटरनॅशनल हे हॉटेल तीन तारांकित होते. हॉटेलच्या आवारातच त्याची कल्पना येत होती. माझी सायकल त्या हॉटेलच्या प्रशस्त आवारात पार्क करून मी रिसेप्शनकडे वळलो. तिथे मात्र आमची काही सोय झाल्याची माहिती नव्हती. मी आनंदला कोणाच्या नावाने बुकिंग आहे हे विचारले. त्याने त्याच्याच नावाचे बुकिंग असल्याचे सांगितले. पण रिसेप्शनला त्याचे नाव दिसत नव्हते. मग मात्र मी आंध्र पोलिसांतर्फे काही बुकिंग आहे का हे विचारले. रिसेप्शन काउंटरला त्याची माहिती नव्हती. इतक्यात त्या हॉटेलचे एक वरिष्ठ माझ्याकडे आले. त्यांना आमच्या वास्तव्याची माहिती मिळाली होती. त्यांनी मला लॉबीमध्ये बसायला सांगितले. लॉबी अतिशय सुंदर, प्रशस्त आणि सजवलेली होती.

बराच वेळ झाला तरी मला चावी मिळेना. मी थोडा अस्वस्थ झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला इतर जण कधी येतील ह्याबद्दल विचारले. मी त्यांना सांगितले ते बरेच मागे आहेत त्यांना उशीर होईल. हे सांगितल्यावर त्यांनी मला लगेचच चावी दिली. रूम उघडून पाहतो तर काय... रूम अतिशय प्रशस्त होती. शिवाय फर्निचर सुंदर होतेच. अतिरिक्त रूम, बाल्कनी होती. मुख्य म्हणजे चक्क बाथटब होता. मी पहिल्याप्रथम एक चहाची ऑर्डर दिली. एका भल्यामोठ्या थर्मासमध्ये चहा आला. मी एक कप चहा प्यायला. तरीही अजून एक दीड कप चहा शिल्लक होता. तिघेही अजून आले नव्हते. मी उरलेला चहाही फस्त केला आणि बाथटबकडे मोर्चा वळवला.
साधारण आठ वाजता आमची त्रिमूर्ती हॉटेलमध्ये आली. संजयच्या सायकलचा शहरात शिरत असतानाच काहीतरी घोटाळा झाला होता. मी लगेचच येथील डेकॅथलॉन दुकानाचा पत्ता संजयला पाठवून तिथे जायला सांगितले. थोड्या वेळाने संजयच्या रूममध्ये गेलो तर संजय रूममध्ये होते. मला ह्याचे आश्चर्यच वाटले की इतक्या लवकर संजय डेकॅथलॉनमध्ये जाऊन कसे आले. तर संजयने उत्तर दिले की तो उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी तिथे जाणार आहे. मला तर त्यांच्या बोलण्याचा अर्थच कळेना. आम्हाला सकाळी सातच्या आधी निघायचे होते, डेकॅथलॉन दुकान तर दहा साडेदहा आधी उघडणार नाही ह्याची खात्री होती. मग संजय इतका वेळ का थांबले आणि उद्या जाईन असे कसे म्हणू शकतात. मी त्यांना म्हटले तुम्ही ताबडतोब निघा. दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी कोण सकाळी सातच्या आधी सायकल दुरुस्त करून देणार. गंतव्यस्थानी आपण वेळेवर पोचायला मी का सांगत असतो ह्याचीही त्यांना आठवण करून दिली. मी नेहमी सांगत असायचो की आपण मुक्कामी सूर्यास्ताच्या आत पोचलेच पाहिजे म्हणजे ते शहर बघायला, सायकलची दुरुस्ती करायला पुरेसा वेळ मिळतो. शिवाय जेमतेम दहा बारा किमी अंतरावर असताना जेवणासाठी थांबायचा निर्णय घेऊन त्या तिघांनी वेळ घालवला होताच शिवाय त्यानंतर जवळपास तीन तासांनी ते पोचले होते.
मी सांगितल्यावर मात्र संजय डेकाथलॉन मध्ये जायला तयार झाले. त्यांनी मलाही सोबत यायला सांगितले. मी माझ्या रूममध्ये परत आलो. मात्र मला चष्मा कुठे ठेवला हेच आठवेना. त्यात पाच दहा मिनिटे गेली. तरी चष्मा सापडला नाही. मग मी संजयला एकट्यानेच डेकाथकॉनला जायला सांगितले. माझी चौकशी करायला आनंद आला. त्याला मी चष्मा सापडत नसल्याचे सांगितले. अख्खा एक ACP माझ्या तावडीत सापडला होता. त्यालाच अखेर मी चष्मा शोधायला सांगितले. मी चष्मा न लावल्याने नीट शोधू शकणार नव्हतो. अखेर आनंदच्या पोलिसी डोळ्यांनी माझ्या चष्म्याचा शोध लावला. संजयदेखील त्यांची सायकल दुरुस्त करून घेऊन आले. आमच्या हॉटेलसमोरच एक खानावळ होती. तिथे आंध्र पद्धतीचे उत्कृष्ट जेवण आम्हाला मिळाले. त्या तिघांचे दुपारचे जेवण संध्याकाळी झाले होते तर मला आज आंबट संत्र्यावर भागवावे लागले होते. रात्रीच्या जेवणाने पुन्हा एकदा कसर भरून काढली.