शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

शीण (कन्याकुमारी चेन्नई सायकल यात्रा भाग १२)


तिरूचेंदुर येथे सगळे सायकलस्वार चांगलेच रमले होते. समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा मन प्रसन्न करत होत्या. मात्र प्रत्येकाला वेळेचेही भान होते. त्यामुळे आपल्या उत्साहाला आवर घालत प्रत्येकजण त्वरेने परत फिरू लागला. अर्थात गर्दीमुळे आम्हाला सायकल हातात घेऊनच जावे लागते होते. अर्थात तरीही प्रत्येकाच्या मनातील तजेला चेहऱ्यावर दिसत होता.

गर्दीतून वाट काढत आम्ही सायकली बाहेर काढल्या. सायकलवर बसण्याची संधी मिळताच प्रत्येकजण ती संधी साधत होता. सर्वानन सगळ्यात पुढे होताच. त्याच्या मागोमाग आम्ही सगळेजण गर्दीतून वाट काढत रांगेत जात होतो. आमचे सहाय्यवाहन येथे येऊ शकत नव्हते हेही सगळ्यांना अगोदर कळले होतेच. अर्थात ते आता उपलब्ध नसल्याची माहितीही सगळ्यांना होती. शहराबाहेर जायची वाट फक्त सर्वाननला माहीत असल्याने त्याला नजरेच्या टप्प्यात ठेवणे भाग होते.

सर्वाननने अचानक उजवे वळण घेतले. गल्ली छोटीशीच होती. गर्दीही भरपूर होती. मागे वळून पाहायला थांबणे शक्य नव्हते. आम्ही सगळेजण जागा मिळेल तसे तिथे वळलो.  पुढे लगेच एक डावे वळण घेत मोकळी जागा दिसताच सर्वाननने वेग घेतला. सगळेजण तसे वळले. सर्वाननने तेथून परत उजवे वळण घेतले. माझ्या पुढील सायकलपटू तसेच वळले. मात्र खरतर इथे थोडी मोकळी जागा असल्याने मी मागच्या सायकलपटूचा अंदाज घेतला. माझ्या मागे पवन होता. त्याने मला पटकन सांगितले त्याच्या मागे अरुणा लागू होत्या त्या दिसत नाहीत त्या चुकू शकतात. खरतर ह्याच अंदाजाने त्यांना मी सहाय्य वाहनातून जायला सांगितले होते. मात्र त्यांनी माझ्या सुचनेकडे दुर्लक्ष करत त्या हट्टाने आमच्याबरोबर आल्या होत्या. त्यामुळे मलाही मनात त्यांचा राग आला होताच. मी त्याला म्हटले त्या ' चुकल्याच ' आहेत (चुकीचेच वागल्या आहेत). मात्र ह्यावेळी राग काबूत ठेवणे आवश्यक होते. मी सर्वाननला फोन लावला पण त्याने उचलला नाही. मग मी पवनला वेगाने पुढे जात सर्वाननला थांबवायला सांगितले आणि मी जागेवरच थांबून राहिलो. 

गणेशोत्सवात पुण्यात गर्दी असावी तशी गर्दी तिथे होती. त्यामुळे मलाही तिथे फार वेळ थांबता येत नव्हते. तेथील वाहतूक पोलीस मला पुढे जायला सांगू लागला तेव्हा त्याला मी अरुणा लागुंचे वर्णन करून त्यांना पुढील मार्गाचे मार्गदर्शन करायला सांगितले आणि पुढे गेलो. वाटेत अरुणा लागूंना फोन करण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्या फोनही उचलत नव्हत्या. 

थोड्याच वेळात मी शहराबाहेर पोचलो. येथून पुढे रहदारी आणि गर्दी नव्हती. ह्या रस्त्यावर काही अंतरावर सगळेजण एकामागोमाग रांगेत थांबले होते. रस्ता अरुंद होता. मी अरुणा लागू येईपर्यंत सगळ्यांना तिथेच थांबायला सांगितले. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. अरुणा लागू आम्हाला भेटायच्या आत अंधार झाला तर त्यांना शोधणार कुठे हा प्रश्न सतावत होता. शिवाय आम्ही थांबलो होतो तो रस्ताही तसा अरुंद आणि निर्मनुष्य होता. त्यामुळे आम्हालाही धोका होता. आता मात्र मी ठरवले होते की जेव्हा सहाय्य वाहन मिळेल तेव्हा सगळ्यांना सायकलिंसह सहाय्यवाहनात बसायला सांगायचे.

सुदैवाने अंधार पडायच्या आत अरुणा लागू आल्या. मात्र त्यांच्यासाठी आम्ही रांगेत थांबलो असताना त्या तश्याच सगळ्यांकडे दुर्लक्ष करत पुढे गेल्या. मग मात्र मी त्वरेने पुढे जाऊन त्यांना थांबवले. ह्या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वानन कोणालाही न सांगता पुढे निघून गेला होता. मग मी सगळ्यांना रांगेत क्रमाने उभे करून त्याच क्रमाने रांगेत सायकल चालवण्यास सांगितले आणि एक task दिला...

सगळ्यात पुढे असलेल्याने १ असा क्रमांक पुकारायचा, त्याच्या मागच्याने २, त्याच्या मागच्याने ३, असे करत शेवटच्याने त्याचा क्रमांक पुकारायचा. हे करताना ज्याला आपल्या मागच्याचा आवाज आला नाही त्याने थांबायचे. जर शेवटच्यापर्यंत व्यवस्थित क्रमांक पुकारले असतील तर परत शेवटच्याच्या पुढील क्रमांकावरील सायकलस्वाराने त्याचा क्रमांक पुकारायचा आणि उलट क्रमाने सगळ्यात पुढच्यापर्यंत क्रमांक पुकारत जायचे. ह्यामुळे सगळे सायकलस्वार व्यवस्थित आहेत हे अंधारातही कळत होते. आमची परेड जात असताना वाटेत सर्वाननही आम्हाला सामील झाला. रस्ता मात्र संपता संपत नव्हता. अंधार चांगलाच गडद झाला होता. मात्र दर पाच दहा मिनिटांनी आम्ही आमचा क्रमांक पुकारण्याचा task करत होतो. त्याने सगळेजण थोडे रिलॅक्सही होत होते.

जवळपास सात- साडेसात वाजता आम्ही काटकोनात महामार्गाला लागलो. आमचे सहाय्य वाहन दुसऱ्या रस्त्याने येऊन तिथेच उभे होते. आम्ही सगळेजण पायउतार होऊन तिथे जमा झालो. एव्हाना सगळ्यांचीच सहनशक्ती संपली होती. इतक्यात प्रमोदने मला अचानक म्हटले आता तू काहीतरी 'action' घे. अर्थातच हे अरुणा लागूंना उद्देशून होते. मला हे अगदीच अनपेक्षित होते. वास्तविक ह्या सगळ्या संभाव्य गोंधळाचा विचार करून मी अरुणा लागुंना सहाय्य वाहनात बसायला केव्हाच सांगितले होते. मात्र कोणालाही न सांगता न जुमानता त्या स्वतःहून सहाय्यवाहनातून उतरल्या होत्या. मी लगेचच प्रमोदला म्हटले 'ठीक आहे मी आत्ता action घेतो. येथून पुढे सगळ्यांनी सहाय्य वाहनातून आजच्या निवासस्थानाकडे जायचे.' खरेतर हे मी आधीच ठरवले होते. मात्र प्रमोदला वाटले की त्याच्या बोलण्यावर चिडून मी म्हणत आहे. अर्थातच अरुणा लागू राहिल्या बाजूला, आता आमच्यातच वाद सुरू झाला. माझ्या मनात हे स्पष्ट होते की आपल्याला हा भाग पूर्ण अनोळखी आहे, येथील पुढील रस्ता कसा आहे आपल्याला माहीत नाही, वाटेत घाट किंवा जंगल आहे का माहीत नाही, स्थानिक भाषा आपल्याला येत नाही आणि तसेच ज्याला येथील भाषा येते तो सर्वानन मात्र सगळेजण रांगेत बरोबर आहेत की नाही ह्याची काळजी न घेता वेगात पुढे निघून जातो. तसेच सहाय्य वाहन चालवताना सतीश शेवटच्या सायकलस्वाराच्या मागे न राहता वेगात पुढे जाऊन ५-१० किमी वर थांबत होता. हे पदयात्रेला ठिक होते पण सायकल यात्रेवेळी जर शेवटच्या सायकलपटुला अपघात झाला तर तो स्वतः कळवू शकत नाही आणि सहाय्य वाहन मागे नसेल तर त्याला मदतही योग्य वेळी मिळू शकत नाही.

आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आता पुन्हा अरुणा लागू कुठे चुकल्या तर संपूर्ण रात्र जागून रस्त्यावर काढावी लागेल. आणि पुढचा दिवसही वाया जाऊ शकेल.

 मात्र प्रमोद आता वेगळ्याच ट्रकवर गेला होता. सर्वानन ह्यावेळी अतिशय शांत होता. त्याने तोडगा काढला की मी आणि सगळ्या महिला सायकलस्वारांनी सहाय्य वाहनाने जावे. तो, प्रमोद, प्रसाद आणि पवन सायकल चालवत येतील. सतीशला मी त्यांच्यामागून वाहन चालवायला सांगितले आणि आम्ही सायकलिंसह सहाय्य वाहनात मागे बसलो. मात्र पुन्हा एकदा सतीशने सगळ्या सायकलपटुंच्या पुढे वाहन नेले. साधारण अर्धा पाऊण तास प्रवास केल्यावर आम्ही गंतव्यस्थानी पोचलो. सर्वांननच्याच ओळखीने आमची सोय थूतुकुडी शहाराजवळील Heavy Water Project च्या अतिथी गृहात झाली होती.

सुनिता आणि मी दोघेही पुढे जाऊन आमच्या राहण्याच्या सोयीची चौकशी केली. थोडा विसावा घेतोय तोच कळले की जेवणाची वेळ संपत आली आहे. त्यामुळे लगेचच जेवायला गेलो. मागून येणाऱ्या चार शिलेदारांसाठीही त्यांना सूचना दिली. ते चौघे येईपर्यंत जेवण संपतच आले होते. जेवण आणि निवासाची व्यवस्था मात्र उत्तमच होती. सगळ्यांना झोप अनावर झाली होती. पहाटे ५.३०-५.४५ ला सुरू झालेली आजची रपेट संपली. तेव्हा साधारण ९-९.३० वाजले होते. दिवसभरात जवळपास १२० किमी अंतर पार केले होते. अंतरापेक्षा सगळ्यांनाच शीण आला होता तो तब्बल १५ - १६ तास प्रवास करण्याचा ...


आमचा पहिल्या दिवशीचा मार्ग


आम्हाला सहाय्य वाहन मिळाले ते ठिकाण B ह्या अक्षराने दाखवले आहे. ते थिरुचेंदुर येथील मंदिरापासून १४ किमी वर होते. तेथून आमचे गंतव्यस्थान असलेले HWP चे अतिथी गृह २० किमी अंतरावर होते. वरील नकाशातील C ह्या अक्षराने अतिथीगृह दाखवले आहे.

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

तिरूचेंदुर (कन्याकुमारी चेन्नई सायकल सफर भाग ११)



तिरुचेंदुर हे शहर तामिळनाडू राज्याच्या आग्नेय दिशेला वसलेले आहे. भगवान मुरुगन (कार्तिकेय) ह्या देवाच्या प्रमुख सहा मंदिरांपैकी एक मंदिर येथे आहे. शहरातील लाल मातीमुळे ह्या शहराला तिरूचेंदुर हे नाव पडले. 

अशी अख्यायिका आहे की भगवान मुरुगन ह्यांनी सुरपद्मन ह्या राक्षसाचा या ठिकाणी पराभव केला होता. नंतर देवी, देवता ह्यांना पर्वत, समुद्र आणि नदी असलेल्या ठिकाणी भगवान मुरुगन ह्यांची पूजा करायची होती. त्यामुळे त्यांनी तिरूचेंदुर हे ठिकाण निवडले. समुद्रकिनारी वसलेले भगवान मुरुगन ह्यांचे हे एकमेव निवासस्थान आहे असे म्हटले जाते. येथील मंदिर अतिशय प्राचीन आहे. 

पोर्तुगीजांशी झालेल्या युध्दात तिरुचेंदूर येथील मुरुगन मंदिर १६४६ ते १६४८ या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले होते. स्थानिक लोकांनी त्यांचे मंदिर मुक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. कालांतराने डचांनी मंदिर रिकामे केले. मात्र, निघताना त्यांनी षण्मुखर नावाच्या मिश्रधातूपासून बनवलेल्या २ उत्सव मूर्ती चित्रित केलेले शिल्प काढून टाकले आणि ते सोबत घेतले. मात्र त्यांच्या सागरी प्रवासादरम्यान, त्यांना जोरदार वादळाचा सामना करावा लागला आणि मूर्ती चोरल्याची चूक त्यांना लक्षात आली. त्यांनी ती मूर्ती समुद्राच्या मध्यभागी टाकली आणि वादळ लगेच थांबले. नंतर, मुरुगनचे निस्सीम भक्त वडामलियप्पा पिल्लई यांना स्वप्नात मुरुगनने दर्शन दिले आणि समुद्रात जिथे मूर्तीचा त्याग करण्यात आला होता ती जागा दाखवली. तिरुचेंदूर मंदिरातील वदमलैयप्पा पिल्लई यांनी मासेमारीच्या बोटीतून घटनास्थळी जाऊन १६५३ मध्ये मूर्ती मिळवली. ही कथा मंदिराच्या आतील चित्रांमध्ये दर्शविली आहे.

आम्ही तिरूचेंदुर शहरात पोचलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी दिसत होती. आम्ही सर्वाननच्या मागोमाग देवळापाशी पोचलो. देवळाच्या आवारात भगवान मुरुगन ह्यांचे वाहन असलेले मोर मोठ्या संख्येने दिसत होते.

सर्वाननने आम्हाला सांगितले की आम्ही गेलो तो ऐप्पासी ह्या तमिळ महिन्यातील मधील स्कंध षष्ठी ह्या वार्षिक उत्सवाचा दिवस होता. तमिळ सुट्ट्या, व्रत, सणांच्या बहुतेक तारखा तमिळ दिनदर्शिकेवर आधारित असतात. पोंगल, पुथंडू, चित्र पौर्णिमा, व्यास पूजा, आदि पूरम, श्री कृष्ण जयंती, कार्तिकाई दीपम हे काही प्रमुख तमिळ सण आहेत, ज्यांच्या तारखा तमिळ कॅलेंडरवर आधारित आहेत.

तमिळ कॅलेंडर हे शालिवाहन शकाप्रमाणे चांद्र कॅलेंडर नसून ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे सौर कॅलेंडर आहे. आपल्या देशाचे जे अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर आहे तेही सौर कॅलेंडर आहे.

तामिळ कॅलेंडर ६० वर्षांचे चक्र फॉलो करते. आम्ही सायकल सफर करत होतो त्या तामिळ वर्षाचे नाव सुभकृत असे होते. तमिळ नवीन वर्ष मेष संक्रांतीला सुरू होते ज्या दिवशी ख्रिस्ती कालगणनेनुसार १४ एप्रिल हा दिनांक असतो. (भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा नववर्ष दिन असतो त्या दिवशी ग्रेगोरियन दिनांक लीप वर्ष वगळता २२ मार्च असतो, लीप वर्षात २१ मार्च असतो). तमिळ कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याचे नाव चिथिराई असे असून नववर्षदिन - दिनांक चिथिराई १ हा पुथंडू म्हणून साजरा केला जातो.

तामिळ महिने संक्रांतीच्या दिवशी सुरू होतात. तामिळ कॅलेंडरमधील महिन्यांच्या दिवसांची संख्या २९ ते ३२ दिवसांच्या दरम्यान असते. तमिळ कॅलेंडरच्या महिन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -

चिथिराई (एप्रिल-मे), 

वैकासी (मे-जून), 

आनी (जून-जुलै), 

आडी (जुलै-ऑगस्ट), 

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर), 

पुरातासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) , 

ऐप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर), 

कार्तिकाई (नोव्हेंबर-डिसेंबर), 

मार्गझी (डिसेंबर-जानेवारी), 

थाई (जानेवारी-फेब्रुवारी), 

मासी (फेब्रुवारी-मार्च), 

पंगुन (मार्च-एप्रिल). 

तिरुचेंदुर येथील मंदिरात वर्षभर उत्सव साजरे केले जातात, ज्यात मासी महिन्यातील ब्रह्मोत्सवम, चिथिराईत १० दिवस वसंतोत्सव, वैकासी विसकम १२ दिवस आणि ऐप्पासी मधील स्कंध षष्ठी यांचा समावेश आहे. अवनी महिन्यातील पेरुंथिरुनाल आणि मासी महिन्यातील पेरुंथिरुनाल असे दोन महाउत्सव आहेत जे १२ दिवसांचे आहेत.

तिरुचेंदूर येथे १२ दिवस चालणाऱ्या मासी थिरुविझा उत्सवासाठी बरेच लोक जमतात. कयामोझी अथिथा नादरहल अरकट्टलाई मंडहपदी समिती उत्सवाच्या सहाव्या आणि सातव्या दिवशी कार्यक्रम आयोजित करते. उत्सवाच्या दहाव्या दिवशी, तिरुचेंदूर मंदिराचे अध्यक्ष भगवान सन्निधी स्ट्रीटमधील थिरुनेलवेली दक्षिणमारा नादर संगममध्ये विशेष हजेरी लावतात. तिरुचेंदूर येथील श्री सुब्रमण्यवामी मंदिराच्या मासी मगम उत्सवात हजारो भाविक पूजा करतात. अनेक शतकांपूर्वी अथिथा नाडर कुळाने हा उत्सव सुरू केला होता आणि त्यात पाली-विदलाई एरिधाल सारख्या धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

स्कंध षष्ठी ह्या वार्षिक उत्सवाच्याच दिवशी आम्ही तिथे जाणे ही पर्वणीच होती. मात्र मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा आम्ही विचारही करू शकत नव्हतो. सर्वाननने चौकशी केली असता आम्हाला समजले की सकाळी ८ वाजता जे रांगेत उभे राहिले होते ते आत्ता म्हणजे संध्याकाळी ५ वाजता दर्शन घेऊन बाहेर पडत होते. भगवान मुरुगन ह्यांच्या मूर्ती ऐवजी त्यांच्या वाहनाच्या दर्शनाचा लाभ घेऊन आम्ही मंदिराच्या दुसऱ्या बाजूस गेलो. तिथे अथांग सागर पसरलेला होताच. मात्र जणू त्याला आव्हान देण्यासाठी अलोट जनसागरही पसरला होता.




रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

निर्धार (कन्याकुमारी चेन्नई सायकल सफर भाग १०)

 


वल्ली रेस्टॉरंट.... मानापड पासून साधारण ६ किमी अंतरावर असलेल्या कुलसेखरपाटनम ह्या ठिकाणी हे क्षुधाशांतीकेंद्र दिसताच सगळ्यांनी तिथे मोर्चा वळवला. सायकली जेमतेम उभ्या करून सगळेजण मेजाकडे वळले. आजूबाजूला बरीच मोकळी जागा, छोटीशी बाग दिसत होती. बहुधा एखाद दोन बाजही तिथे असाव्यात. सगळेजण मनसोक्त जेवले. सायकल सफरीचा पहिलाच दिवस. त्यात कडाक्याची लागलेली भूक. आडवा हात मारल्यावर कोणाचेही पाय लगेच कामाला लागायला तयार नव्हते. 

थोड्या वेळात सर्वानन आणि प्रमोदही आले. आम्ही इथे उदरभरण करत असताना त्यांनी मानापड येथील समुद्रकिनारी समुद्राचा मेवा फस्त केला होता. दोघेही अगदी तृप्त मनाने परतले होते.  



आमचे हॉटेल बघून ते दोघेही जरा रेंगाळले खरे. पण घड्याळबाबाही त्यांचे हात फिरवत असल्याने आम्हाला सुस्ती  
आवरावी लागली. खरतर एव्हाना चहापानाचीच वेळ झाली होती. जवळपास ५०-६० किमी अंतर बाकी होते जे अंधार पडायच्या आत गाठणे आवश्यक होते. कारण आमच्या मार्गात मोठी शहरे तर राहो छोटी वस्ती सुद्धा अभावानेच आढळत होती. अश्या ठिकाणी कोणी मागेपुढे झाले आणि त्याला कोणी स्थानिक भेटला असता तरी त्याची मदतही घेता आली नसती. कारण आम्हाला स्थानिक भाषा येत नव्हती आणि अश्या कमी वस्तीच्या ठिकाणी स्थानिकांना इतर भाषा न येण्याची शक्यता जास्त होती. त्यातच अरुणा लागू आणि सतीश ह्यांना गुगल मॅपही समजत नव्हता. अरुणा लागू ह्यांचा जास्तीत जास्त वेग १०-१२ किमी प्रतीतास एवढा होता, तर आम्हाला आता साधारण २०-२५ किमी प्रतितास वेगाने जायचे होते. त्यामुळे मी अरुणा लागू ह्यांना पुन्हा एकदा सहाय्य वाहनातच बसण्यास सांगितले.

आम्ही बाकी सर्व सायकलपटुंनी वेग घेतला. थोड्याच वेळात आम्ही एका शहरात शिरलो. तिथे बराच पोलीस बंदोबस्त दिसत होता. गर्दीही खूप दिसत होती. आम्ही एका चौकात अडकलो. सर्वानन चौकशी करत होता. सर्वाननने आम्हाला सांगितले की येथून उजवीकडे एक मंदिर आहे तिथे आपल्याला जायचे आहे. आमच्या सहाय्य वाहनाला तेथून सरळ जाता येणार नव्हते तर डावीकडे वळून बायपासने जावे लागणार होते. दरम्यान अरुणा लागू सहाय्य वाहनातून उतरून पुन्हा सायकलवर स्वार झालेल्या दिसल्या. एकतर प्रचंड गोंधळ सुरू होता. त्यांना ना गुगल मॅप समजत होता ना तमिळ भाषा येत होती तसेच अंधाराची वेळ जवळ येत होती. त्यामुळे त्यांना मी सहाय्य वाहनाने पुढे जायला सांगितले. मात्र त्यांनी त्या सूचनेकडे पूर्ण दुर्लक्ष केले. 

सर्वानन पाठोपाठ आम्ही डावीकडे वळलो. तिथे अभूतपूर्व गर्दी दिसत होती. आमचे सहाय्य वाहन निघून गेले होते. अरुणा लागू सायकलसह आमच्या मागे येत होत्या. प्रसाद सरवटे त्यांना साथ करत होता. त्याच्या आणि माझ्याही चेहऱ्यावर तणाव होता आणि सत्तरीच्या उंबरठ्यावरील अरुणा लागू निवांत होत्या. त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार कायम होता....

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

आधी पोटोबा (कन्याकुमारी चेन्नई सायकल सफर भाग ९)



अधिरसम आणि चहा हे इंधन जठराग्नीमध्ये भरल्यानंतर आमची वाहने वेगात जाणे अपेक्षित होते. अजून जवळपास ७० किमी अंतर बाकी होते आणि साधारण दोन थांबे घ्यावे लागणार होते. त्यापैकी एक जेवणाचा म्हणजे साधारण तासभराचा. तसेच अरुणा लागू ह्यांच्या वेगाने जायचे तर आणखी एक तिसरा थांबा घ्यावा लागणार होता. काम - काळ - वेग हे त्रैराशिक मांडले तर अरुणा लागू ह्यांच्या वेगाने अंधाराच्या आत गंतव्य स्थान गाठणे अशक्य होते. तसेच त्या स्वतः आणि आमचा सहाय्य वाहन चालक सतीश दोघांनाही गुगल मॅप समजत नव्हता. हा सर्व विचार करता मी अरुणा लागू ह्यांना जेवण होईपर्यंत सहाय्य वाहनात बसायला सांगितले. तसेच जेवण झाल्यावर पुढचा अंदाज घेऊ असेही सांगितले.

अरुणा लागू आता सायकल चालवणार नसल्याने मी, सर्वानन आणि प्रसाद वेगात जाऊ लागलो. अर्थातच आम्ही लवकरच पुढे गेलेल्या संघाला गाठले. अधिरसम आणि चहाने वेळ मारून नेली असली तरी तासाभरातच पोटात कावळे ओरडू लागले. मात्र वाटेत कुठेही साधी टपरीही दिसत नव्हती. आता मी आघाडी घेतली आणि सगळ्यांच्या पुढे जाऊ लागलो.



सर्वानन माझ्या बरोबरच होता. आम्ही करुमेनी नदीच्या जवळून जात असताना लांबवर एक ख्रिस्ती प्रार्थनास्थळ दिसले. लांबून ते फार सुंदर दिसत होते. सध्या विठोबा (तोही ख्रिस्ती) पेक्षा  पोटोबाची काळजी लागली होती. इतक्यात नदिपलिकडे मानापड शहर दिसू लागले. 


आम्ही पुल ओलांडून पुढे जाणार इतक्यात सर्वाननने आम्हाला उजव्या बाजूला वळण घेत नदीच्या अलीकडील काठाने जात असलेल्या रस्त्याला नेले. सगळेजण जरा अडखळलेच कारण भूक लागलेली असताना हे वळण कशाला असाच भाव सगळ्यांच्या मनात उमटला होता. सर्वाननने त्या दिशेला हॉटेल असल्याचे सांगितल्याने नाखुशिने का होईना सगळेजण त्याच्या मागे जाऊ लागले. पुढे त्याने पुन्हा एक उजवे वळण घेतले. आता अगदीच ओबड धोबड रस्ता सुरु झाला होता. सर्वानन आणि प्रमोद मागे न बघता जात होते. पुढे गेल्यावर ते चर्च होते. भूक लागली असताना आता चर्च कशाला असा विचार करत थोड्या अंतरावर इतर सर्वजणांनी जणू धरणेच धरले. अस्मादिकही त्यात सामील होतेच. प्रमोद मागे येऊन सगळ्यांना पुढे हॉटेल असल्याचे सांगू लागला. मात्र आजूबाजूची परिस्थिती पाहून कोणीही त्यावर विश्वास ठेवत नव्हते. किंबहुना जठराग्नी आता इतर विचार करायला परवानगी देत नव्हता.


इतक्यात सतीशचा फोन आला. तो मानापड पुलापाशी आला होता. सर्वानन पुढे यायला सांगत होता तर सतीश परत मागे बोलावत होता. अखेरीस सतीशला पुढे जाऊन हॉटेल शोधायला सांगून आम्ही सर्व माघारी फिरलो. सर्वानन आणि प्रमोद मात्र चर्चजवळ थांबले.

असे म्हटले जाते की येथील स्थानिकांनी ख्रिस्ती शक १५३२ मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारला. नंतर १५४२ मध्ये फ्रान्सिस झेवियर नावाचा धर्मप्रसारक इथे आला. येथील चर्च मात्र १५८२ साली बांधले गेले असावे. जॉन डी सलानोव्हा ह्या धर्मप्रसारकाच्या मागणीनुसार जेरुसलेम येथील true cross चा एक अवशेष येथे आणला गेला आहे. १ ते १४ सप्टेंबर ह्या काळात तो अवशेष लोकांना सार्वजनिकरीत्या दाखवला जातो. ह्या काळात इथे मोठा उत्सवच असतो.

आम्ही मात्र ह्या ख्रिस्ती प्रार्थनास्थळाकडे न जाता नदी ओलांडून मानापड शहराकडे वळलो. ओह, शहर कसले थोडीफार घरे वगळता तिथे काहीच नव्हते. सतीश हॉटेल शोधायला पुढे गेला होताच. आम्ही त्याच मार्गाने पुढे गेलो. आता खरतर पोटातील कावळे कोकलू लागले होते. सतीशला फोन केल्याबरोबर त्याने हॉटेल सापडल्याचे सांगितले. 

ख्रिस्ती धर्म स्थळापासून ते हॉटेल जेमतेम ६ किमी अंतरावर होते. मात्र प्रत्येक पेडल बरोबर आमचा जठराग्नी अधिकाधिक प्रज्वलित होत होता. सतीश दिसताच सगळ्यांनी सुस्कारा सोडला. रस्त्याच्या उजवीकडे एक छानसे गार्डन रेस्टॉरंट दिसत होते.... 

अधिरसम (कन्याकुमारी चेन्नई सायकलसफर भाग ८)


वट्टकोट्टाई किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून आम्ही पुन्हा कूच केले. रस्ता बऱ्यापैकी रुंद आणि मोकळाच होता. त्यामुळे सगळ्यांनी चांगलाच वेग घेतला. थोड्याच वेळात पुन्हा एकदा अरुणा लागू आणि मी इतरांच्या पेक्षा बरेच मागे राहिलो. मी सर्वांननला तशी कल्पना दिली. त्याने आम्हाला पुढे पवनचक्की दिसतील त्यांना follow करा असे सांगितले.

मी आणि अरुणा लागू वेग घेत होतो. इतक्यात एक मोठा महामार्ग T आकारात सामोरा आला. पवनचक्की तर T junction च्या दोन्ही बाजूला दिसत होत्या. आता कोणत्या दिशेच्या पवनचक्कीचा मार्ग निवडायचा. रस्त्याला फलकही नव्हते. पुन्हा सर्वांननला फोन केला. त्याच्या सांगण्याप्रमाणे डावीकडे वळलो. काही अंतरावर पुन्हा डाव्या हाताला एका छोट्या रस्त्याच्या वळणावर सगळी टीम थांबली होती. त्यामुळे आमची पुन्हा चुकामूक झाली नाही. मात्र आमच्या सहाय्य वाहनाचा सारथी सतीशचा फोन आला की तो कुठे आहे तेच त्याला कळत नाहीये. मी त्याला गूगल लोकेशन पाठवले आणि त्यानुसार यायला सांगितले. तेव्हा सतीशने सांगितले की त्याला गुगल मॅप समजत नाही. त्याच्या बरोबर असलेला सहकारी संजय हा देखील ह्याबाबतीत अनभिज्ञ होता. हा आम्हाला मोठाच धक्का होता. कारण आता त्याचे साह्य आम्हाला होणार असले तरी त्यालाही आमच्या सहाय्याशिवाय मार्गक्रमण करत येणार नाही हे स्पष्ट होते. त्याला आसपासच्या माणसाला फोन द्यायला सांगितला. आमचा वाटाड्या सर्वाननने त्या स्थानिक माणसाला मार्गदर्शन केले. त्याने सतीशला समजावले. त्यानुसार सतीश आमच्यापाशी पोचला.

सर्वानन आणि प्रमोद हे भाभा अणु ऊर्जा प्रकल्पात कार्यरत आहेत. आजच्या नाश्त्याची सोय त्यांच्याच कार्यालयातील ओळखीमूळे करण्यात आली होती. कन्याकुमारीपासून साधारण १६ किमी अंतरावर कुडनकुलमजवळील अणु ऊर्जा प्रकल्पाच्या उपहारगृहात आमच्या नाश्त्याची सोय करण्यात आली होती.


मनसोक्त नाष्टा झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा कूच केले. थोड्या वेळातच मुख्य रस्त्याला लागलो. रुंद आणि मोकळा रस्ता असल्याने सायकली वेग घेऊ लागल्या. आता मी, अरुणा लागू आणि आमचे सहाय्य वाहन तिघेही पाठोपाठ जाऊ लागलो.



वाटेत दिसणारी सुंदर मंदिरे आणि निसर्ग आम्हाला उल्हसित करत होते. मोकळ्या रस्त्यावरील मोकळा वारा आम्हाला वेग घेण्यास प्रोत्साहित करत होता. रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण वाहनांना सहाय्यभूत ठरत असते. त्यामुळे प्रवास वेगवान होतो आणि वेळ वाचत असल्याने उद्योगधंद्यांनाही मदत होत असते. अर्थातच आपली प्रगती होते असे आपण म्हणतो. मात्र वाहनांच्या ह्या वाढलेल्या वेगाचे परिणाम म्हणजे जैवविविधतेची हानी...







पश्चिमी घाट अथवा सह्याद्रीच्या पर्वत रांगातील जैववैविधता हा भारताचा अनमोल ठेवा आहे. सह्याद्रीइतकी समृध्द जैववैविधता संपूर्ण जगात अभावानेच आढळते. वाहनांच्या धडकेत ठार झालेली ही फुलपाखरे हे तर केवळ अश्या हानीचे अगदी छोटे प्रतीक आहे. मात्र वेगवान वाहनाच्या धडकेत मोठे प्राणीही ठार होत असतात. कित्येक प्रजाती अश्या प्रकारे नष्ट झाल्या आहेत/ होण्याच्या मार्गावर आहेत. SOS (Save Our Sahyadri) ह्या नवापूर ते महाबळेश्वर आणि सावंतवाडी ते महाबळेश्वर ह्या सायकलसफरी दरम्यान आनंद पेंढारकर, अविनाश हरड आणि इतर मार्गदर्शक यांच्यामुळे ही जाणीव प्रकर्षाने झाली.

स्वयम् चलीत वाहनांच्या वेगामुळे ही फुलपाखरे दिसत नसली तरी केवळ मानवी शक्तीचे इंधन वापरणाऱ्या सायकल ह्या वाहनावरून प्रवास करता ती नक्कीच दृष्टीस पडतात. 


रस्ता पूर्णपणे मोकळा होता. अधूनमधून मीरा आणि सर्वानन ह्यांच्या संपर्कात राहून मी पुढील टीम आणि आमच्यामध्ये किती अंतर आहे ह्याचा अंदाज घेत होतो. मीरा आणि मी दोघांनी एकमेकांचे location शेअर केले होतेच. आता सूर्य डोक्यावर आला होता. आम्ही कुठेही न थांबता सायकलवत होतो. मी मीराचे लोकेशन पाहिले तर ती साधारण ३ किमी अंतरावर होती. फोन केल्यावर समजले की सगळेजण तिथे थांबले आहेत. अंतर थोडेच असल्याने आता मी अरुणा लागुंच्या पुढे गेलो आणि सतीश त्यांच्या मागे होता. Map नुसार पाहिला तर आता जेमतेम १०० मीटर वर T junction होता, तिथे उजवीकडे वळल्यावर आणखी १०० मीटर वर सगळेजण थांबले होते. जठराग्नीही जागृत झाला होता. त्यामुळे मी अरुणा लागुंना पुढे वळणावर उजवीकडे वळा असे सांगून वेग घेतला. लगेचच सगळी टीम दिसली. त्यांचे खानपान सुरू होते. मी अरुणा लागू येण्यासाठी थांबायचे ठरवले. १० मिनिटे झाली तरी त्या दिसेनात. एवढ्यात सतीश आला. तो काही अंतर आधी थांबल्यामुळे तो आणि अरुणा लागू ह्यांच्यात अंतर पडले होते. पुढे वाटेत त्याला अरुणा लागू दिसल्या नव्हत्या. ह्याचा अर्थ त्या डावीकडे वळल्या होत्या. त्यांना लगेच फोन केला. सतीशलाही त्याचे वाहन वळवून त्यांना आणण्यासाठी पाठवले. 

एव्हाना आमचे कन्याकुमारीपासून साधारण ५०-६० किमी अंतर पार झाले असावे. मध्यान्ह उलटून गेली होती पण इथे जेवण मिळणार नव्हते. आधी आलेली टीम बराच वेळ थांबली होती. त्यांचे खाणे झाले होते. त्यामुळे त्यांना तासभर दौड करून मग जेवायला थांबा असे सांगितले. सर्वानन आणि प्रसाद मात्र आमच्याबरोबर थांबले. मलाही भूक लागली होती. तिथे चहा होता पण खायला केवळ एकच पदार्थ तिथे दिसत होता. दुसरे काही नव्हते म्हणून तो घेतला आणि एका छानशा पदार्थाची इथे ओळख झाली. हा साधारण पुरीसारखा दिसणारा पण गोड पदार्थ मला खूप आवडला. तो होता अधिरसम. 

कृष्णदेवरायच्या कारकीर्दीत म्हणजे १६ व्या शतकातही अधीरसम बनवला जात असल्याचे शिलालेख आहेत. कुंभकोणम जवळील नल्लुर येथील पंचवर्णेश्वर मंदिरात वार्षिक उत्सवानिमित्त देवांना ६००० वड्यांसह ६००० अधिरसमचा नैवेद्य दाखवला जातो. तामिळनाडू येथे अधिरसम हा दिवाळीसाठी महत्वाचा पदार्थ आहे.



चहा आणि अधिरसम ही जोडी विजोड वाटली आत्ता तरी माझी क्षुधाशंती त्या जोडीने केली होती. आता पुन्हा तासभर दौड करण्याइतके मनुष्यशक्तीचे इंधन भरले गेले होते.

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

वट्टकोट्टाई (कन्याकुमारी चेन्नई सायकलमोहीम भाग ७)



कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्र येथून मोहिमेला सुरुवात करत असताना सगळे सायकलस्वार एका रांगेत जाऊ लागले. केंद्राच्या आवारात मुख्य प्रवेशद्वारापर्यंत थोडा चढ आहे. सर्वानन हा आमचा मुख्य वाटाड्या होता. त्यामुळे अर्थातच तो सगळ्यात पुढे होता. त्याच्या मागोमाग इतर सायकलस्वार जात होते. सगळ्यात शेवटी अस्मादिकांची वर्णी लागली होती. माझ्या पुढे होत्या आमच्या संघातील सर्वात ज्येष्ठ सायकलपटू अरुणा लागू.

सर्वाननने कूच करताच इतर सगळे त्याच्या पाठोपाठ निघाले. चढ चढतानाच अरुणा लागू ह्यांच्यापुढील संघ आणि अरुणा लागू ह्यांच्यामध्ये अंतर पडले. माझी अपेक्षा होती की मुख्य रस्ता सुरु होताच सगळेजण रांगेत थांबले असतील. मी आणि अरुणा लागू मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पडलो तर कोणीच दिसेना. डावीकडे जायचे नाही हे माहीत होते. मात्र उजवीकडे गेल्यावर लगेचच दोन रस्ते फुटले होते. त्यातील नक्की कोणत्या रस्त्याने जायचे? समोर कोणत्याही रस्त्याला पुढील सायकलस्वार दिसत नव्हता.

खरतर सगळ्यांना मोहीम सुरू करतानाच एक सूचना दिली होती ... look back. आपल्या मागील सायकलपटु आपल्यामागे आहे ह्याची खात्री केल्याशिवाय पुढे जायचे नाही. बहुधा मोहीम सुरू होत असल्याच्या उत्साहाने त्या सूचनेवर मात केली होती. साहजिकच आम्ही दोघंही लगेचच थांबलो. आजूबाजूच्या लोकांना इतर सायकलस्वार कोणत्या रस्त्याने गेले आहेत हे विचारून उजवीकडचा रस्ता पकडला. आमचे सहाय्य वाहन मागून येणार होते. 

मी आणि अरुणा लागू पाठोपाठ लागू जाऊ लागलो. रस्ता फार रुंद नसला तरी फार रहदारीही नव्हती. जेमतेम १०-१५ मिनिटे सरळ गेलो तोच एक चौक लागला. आम्ही सरळ जाऊ लागलो तोच तमिळ भाषेत काही लोक ओरडू लागले. भाषा येत नसल्याने आम्हाला काही कळत नव्हते पण त्यांच्या खाणाखुणा आम्हाला उजवीकडे वळायला सांगत होत्या. मी गुगलकाकांना विचारले तर ते सरळ जायला सांगत होते. इथे वळायचे असते तर एका सायकलपटूने तरी थांबणे आवश्यक होते. अखेरीस सरळ सर्वाननला फोन लावला. तेव्हा त्याने उजवीकडे वळायला सांगितले. तिथे एक किल्ला असल्याने तिथे जायचे असल्याचे त्याने सांगितले. वळल्यानंतर थोड्याच अंतरावर तो किल्ला असल्याचे त्याने सांगितले.

आमची दुक्कल वळली आणि खरोखरच काही अंतरावर एक भुईकोट किल्ला दिसला. अरुणा लागू ह्या दुर्गप्रेमी आहेत. त्यामुळे त्या लगेचच खुष झाल्या. आमचे इतर सहकारी एव्हाना तिथे स्थिरावले होते. तिथे काही सैनिकी शिस्तीतील लोक आम्हाला दिसले. आमच्या सहकाऱ्यांची त्यांच्याशी गट्टी जमली होती. त्यांच्याबरोबर छायाचित्रे घेण्यात आमचे सहकारी दंग होते. तिथे गेल्यावर समजले की ते कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्पातील कर्मचारी होते. कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प (KKNP) हा तामिळनाडू येथील तिरूनवेली जिल्ह्यातील राधापुरम तालुक्यातील अणुप्रकल्प आहे. 





१८ व्या शतकात त्रावणकोर राज्यात तटरक्षक दुर्ग म्हणून वट्टाकोट्टई किल्ला बांधला गेला. ह्या किल्लाच्या बांधणीमध्ये त्रावणकोरच्या राजाचा विश्वासू सहकारी मार्तंड वर्मा तसेच डच नौदल अधिकारी कॅप्टन युस्तचियस डी लॅनॉय  ह्यांचे मोठे योगदान आहे. हा डच सेनानी त्रावणकोरच्या सैन्यात कसा हा इतिहास रोमांचक आहे.

१८ व्या शतकाच्या सुरुवातीस त्रावणकोरचा शासक मार्तंड वर्मा ह्याने विस्तारवादी धोरण स्वीकारत मलबार किनारपट्टीवरील अनेक प्रदेश जिंकले. तिथे असलेल्या डच ईस्ट इंडिया कंपनीची मसाल्याच्या व्यापाराची मक्तेदारी त्रावणकोरच्या राजाने मोडीत काढली. मग डचांनी कोची, थेक्कुमकुर, वडाक्कुमकुर, पुरक्कड, कोल्लम आणि कायमकुलमच्या राज्यकर्त्यांशी युती केली. नंतर डचांनी त्रावणकोरच्या राजाला युद्ध करण्याची धमकी दिली. मार्तंड वर्माने ही धमकी फेटाळून लावली. त्याने उत्तर दिले की तो तर काही दिवस युरोपवर आक्रमण करण्याचा विचार करत होता.

डचांनी सुरुवातीच्या मोहिमेत लष्करी यश मिळवले. मात्र अखेरीस कोलाचल येथील लढाईत डचांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले गेले. नंतर मार्तंड वर्माने त्यांना त्यांची शस्त्रे परत दिली आणि त्यांना त्रावणकोरच्या सैन्यात सामील होण्यास सांगितले. युस्टाचियस डी लॅनॉय आणि ड्युवेन्सचॉट यांच्यासह अनेक युरोपियन कैद्यांनी ही ऑफर स्वीकारली. कोलाचेलमधील डचांचा पराभव हा त्रावणकोर - डच युध्दाचा टर्निंग पॉइंट होता. डी'लेनॉय यांनी पुढील दोन दशके त्रावणकोर राज्याची सेवा केली आणि त्रावणकोर सैन्याच्या वालिया कपिथान (वरिष्ठ ऍडमिरल) या पदावर त्यांची बढती झाली. संपूर्ण त्रावणकोर सैन्याचे आधुनिकीकरण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे त्यांनी त्रावणकोर सैन्याला युरोपियन शैलीतील लष्करी कवायती आणि लष्करी डावपेचांचे शिक्षण दिले. त्यांना उदयगिरी हा किल्ला देण्यात आला. स्थानिक पातळीवर हा किल्ला ' दिल्लानई कोट्टा ' (डी लेनॉयचा किल्ला) म्हणून ओळखला जातो. कुलाचल युध्दाचा आणखी एक महत्वाचा परिणाम म्हणजे त्रावणकोर राज्याने काळी मिरी व्यापार ताब्यात घेतला. डच या पराभवातून कधीच सावरले नाहीत आणि यापुढे मोठ्या वसाहतींचा धोका निर्माण झाला नाही

 याच डी लेनॉयने त्रावणकोर मध्ये केलेल्या संरक्षण किल्ल्यांचा एक भाग म्हणून वट्टाकोट्टाईची पुनर्रचना केली. बंगालच्या खाडीकिनारी असलेला हा किल्ला ग्रॅनाईट ब्लॉक्सचा बनलेला आहे. आज ह्या किल्ल्याचा काही भाग समुद्रात पसरलेला आहे. असे म्हटले जाते की किल्ला आहे तो भाग काही काळ पांडवांच्या ताब्यात होता. किल्ल्याच्या भिंतीवर माश्यांच्या संकल्पनेनुसार नक्षी आहे ती पांडवांचे प्रतिनिधीत्व करते. किल्ल्यावर असलेल्या परेड मैदानावरून एका बाजूला बंगालच्या उपसागराचे धसमुसळे पाणी दिसते तर दुसरीकडे अरबी समुद्राचे शांत पाणी दिसते. येथील आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे काळ्या वाळूचा समुद्रकिनारा.

हा किल्ला बघण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत जाता येते. कन्याकुमारी स्टेशनपासून वाहतूकसेवा उपलब्ध आहे.


आम्ही गेलो तेव्हा मात्र किल्ला पाहण्याची वेळ नव्हती. त्यामुळे किल्ल्याचा भूगोल आम्हाला स्वतःला अनुभवता आला नाही. मात्र त्रावणकोरच्या सैन्याने डच ह्या युरोपियन सैन्याचा पराभव केला ह्या इतिहासाचे समाधान नक्कीच होते. आमचे सैन्य आता पुढे कूच करण्यासाठी सज्ज होते. आमच्या सायकलीही पुढे दौडण्यासाठी फुरफुरू लागल्या होत्या.

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

मोहिमेचा शुभारंभ (कन्याकुमारी चेन्नई सायकलमोहिम भाग ६)

 


तीन समुद्रांचा संगम होत असलेल्या स्थळी असलेले विवेकानंद शिळा स्मारक आणि कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्र ह्यांची स्थापना १९७२ साली श्री एकनाथजी रानडे ह्यांनी केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. व्यक्तीच्या गुणांची पारख ते उत्तम रीतीने करत. लालबहादूर शास्त्री, शेख अब्दुल्ला, ज्योती बसू ह्यांच्या पत्नी कमला बसू, राममनोहर लोहिया, इंदिरा गांधी, देवीलाल अश्या अनेक व्यक्तींना त्यांनी ह्या कार्यासाठी जोडले. अश्या रीतीने विविध विचारधारा एकत्र आणत एकनाथजी ह्यांनी विवेकानंद केंद्र निर्माण केले आहे. ते असे नेहमी म्हणत की संपूर्ण धार्मिक भावना लोककल्याणासाठी उपयोगात आणल्या तर राष्ट्राचे पुनर्निर्माण होऊ शकते. 

१९८२ साली त्यांचे निधन झाले तेव्हा शोध घेऊनही त्यांचा एकही फोटो मिळाला नाही कारण ते कार्याला स्वतःपेक्षा मोठे मानत असतं. अर्थातच श्री रानडे ह्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आम्हाला आला नसला तरी त्यांच्याच बरोबर कार्य करणारे श्री अंगिरसजी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि आमचा सायकल दौरा सुरू करण्यासाठी flag off करायला येणार होते हा आमच्यासाठी मोठा बहुमान होता.

श्री अंगिरस हे विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय कोषाध्यक्ष होते. त्यांचे वय ८० च्याही पुढे असावे. त्यामुळे आता वयोमानानुसार त्यांना कोणतीही जबाबदारी नाही. तरीही ते रोज विवेकानंद केंद्रात ८-८.३० वाजता येत असतात. आम्ही मात्र पहाटे ६.३० ला निघणार होतो. हे समजताच श्री राजकुमार थोडे चिंतेत पडले. 

पहाटे लवकर उठून आम्ही विवेकानंद केंद्रातून समुद्रकिनारी जाऊन सूर्योदय पाहणे नक्की केले होते. सगळेजण त्याप्रमाणे सायकलसह निघालेही. आजचा सूर्योदय कालच्या रात्रिपेक्षा नक्कीच वेगळा होता. पहाटेच्या वेळेत मनातील रात्रीचा अंधार पूर्ण नाहीसा झाला होता.  

आम्ही सगळेजण उत्साहात होतो. मात्र सूर्य आता रुसून बसला होता. तो ढगाआड दडी मारून बसला होता तो बाहेर यायलाच तयार नव्हता. आम्हीदेखील त्याच्याकडे लक्ष नसल्याचे नाटक करत आमची फोटोग्राफीची हौस पुरी करून घेत होतो. समुद्रही थोडा मागे सरकला होता. त्याचा लाभ घेत पवन, प्रसाद आणि प्रमोद हे तिघेही सायकलींसह समुद्रतट ओलांडून खाली उतरले. समुद्राच्या लाटा मागे गेल्या असल्याने तिघेही निवांतपणे मातीत बागडू लागले होते. इतर कोणत्याही वाहनाने प्रवास करताना मनातील लहान मूल इतक्या सहजी बाहेर येत नाही. सायकलसफर मात्र प्रवासात आपल्याला स्वतःशीच पुन्हा नव्याने ओळख करून देत असते. 

दरम्यान सूर्य ढगाआड लपला तरी घड्याळबाबा टिकटिक करतच होते. सूर्य कितीही झाकला तरी दिवस उजाडत होता. आता समुद्रातून उगवणारा सूर्य नजरेस पडणार नव्हता हे निश्चित झाले होते.




इतक्यात राजकुमार ह्यांचा फोन आला की हजरत अंगिरस आमच्या फ्लॅग ऑफ साठी पहाटे साडेसहालाच हजर झाले आहेत. सूर्योदय पाहायला न मिळाल्याने थोडे निराश झालो असलो तरी आदरणीय अंगिरसजी आमच्यासाठी पहाटे उठून आले आहेत हे ऐकून उत्साह आला. एकनाथजी रानडे ह्यांच्या स्मारकापाशी श्री अंगिरसजी येऊन थांबले होते. श्री राजकुमारजी देखील त्यांच्याबरोबर आले होतेच. आम्ही तेथील बागेत शिरलो तोच पूर्वेला झाडामागून सूर्य डोकावताना दिसला. बहुधा अंगिरस ह्यांना भेटायला तोही उत्सुक झाला होता. मोरांचा आवाजही येत होता. वातावरणात चांगलाच उत्साह भरला होता. 



अंगिरसजी प्रत्येक सायकलस्वाराची चौकशी करत होते. प्रत्येकाचे पूर्ण नाव ते विचारत असताना काही सायकलपटू थबकले. तेव्हा राजकुमार ह्यांनी सांगितले की अंगिरसजी ह्यांना विवेकानंद केंद्राचे encyclopedia म्हणतात. केंद्रामध्ये कोण कधी येऊन गेले आहे हे ते अचूक सांगू शकतात ह्याचसाठी ते प्रत्येकाला पूर्ण नाव विचारत आहेत.
 
प्रत्येक सायकलपटुशी ओळख झाल्यावर मात्र सगळे सायकलपटू एका रांगेत उभे राहिले. अंगिरसजी ह्यांनी फ्लॅग ऑफ करताच आमच्या सायकलमोहिमेचा शुभारंभ झाला.


पाहुणचार (कन्याकुमारी चेन्नई सायकलसफर भाग ५)


सर्वानन सगळ्यांच्या आधी तामिळनाडू येथे पोचला होता. सुनिता आणि अवनी ह्यांनी कन्याकुमारी येथे जाण्यासाठी रेल्वे मार्ग निवडला तर आम्ही उर्वरित सात जण त्रिवेंद्रम पर्यंत हवाई मार्गाने जाऊन पोचलो.

आमचा गट मुंबईहून त्रिवेंद्रम येथे विमानाने पोचला तेव्हा आम्हाला घेण्यासाठी त्रिवेंद्रम वनवासी कल्याण आश्रमातील सहकारी त्रिवेंद्रम एअरपोर्ट येथे आले होते. त्यांच्या गाडीतून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी गेलो.  विमानतळापासून साधारण १० किमी अंतरावरील उल्लुर ह्या गावी एका टुमदार बंगल्यामध्ये आमच्या राहण्याची सोय केली होती. 

केरळ येथील वनवासी कल्याण केंद्राचे Vice President श्री मधुसूदन ह्यांच्या एका नातेवाईकांचे ते घर होते. त्यांच्या घरी मल्याळम वगळता भाषा येत नव्हती. मधुसूदनजी स्वतःही मितभाषी होते. मात्र ती कसर केंद्राचे केरळ येथील सेक्रेटरी श्री देवकुमार हे भरून काढत होते.

श्रीकुमार, श्री मधुसूदन आणि श्री देवकुमार हे तिघेही खरतर आम्हाला प्रथमच भेटले होते. मात्र त्यांच्याशी बोलताना आम्ही प्रथमच भेटत आहोत याची जाणीवही होत नव्हती. गप्पा रंगत असल्या तरी दुसऱ्या दिवशी तेथून कन्याकुमारीपर्यंत प्रवास करायचा होता. अर्थातच आम्हाला शुभेच्छा देऊन श्रीकुमार आणि श्री देवकुमार परतले. 

दक्षिण भारतामध्ये भाषेपेक्षा जास्त अडचण येते ती लिपीची. मात्र आमची ती अडचण सोडवण्यासाठी आमच्याबरोबर मधुसूदनजी होतेच. दुसरे दिवशी सकाळी ते आमच्याबरोबर तेथील बस स्थानकापर्यंत आले होते. मात्र तेथील अगम्य लिपीमूळे कन्याकुमारी येथे जाणारी बस नेमकी कोणत्या फलाटावर उभी आहे हे कळणे अवघड होते. बहुधा आमची अडचण ओळखून श्री मधुसूदनजी आमच्या मागोमाग बस स्थानकात शिरले. आम्हाला योग्य बसमध्ये तर त्यांनी बसवलेच. मात्र बस निघेपर्यंत ते तिथे उभे होते. आपल्या घरातील सदस्य गावाला जात असताना बस दिसेनाशी होईपर्यंत हात हलवणाऱ्या आप्तस्वकीयाप्रमाणे ते खरोखरच बस जाईपर्यंत थांबले होते. 

सायकल प्रवासात बघायला मिळणाऱ्या स्थळांपेक्षा मला महत्वाचे वाटतात ते हे सुहृद! हे सखे सोबती काही तास आपल्याला भेटतात मात्र हा ठेवा पुढे आयुष्यभर पुरणारा असतो. ह्यापेक्षा मोठी संपत्ती ती काय?

दरम्यान अवनी आणि सुनिता रेल्वेने नागरकोविलपर्यंत जाणार होत्या. आमची बसही त्रिवेंद्रम पासून नागरकोवील येथेच जाणार होती. आमच्या अंदाजाप्रमाणे आम्ही सगळेच तिथे एकाच वेळी पोचणार होतो. मात्र मुंबईच्या traffic पेक्षाही संथ जाणाऱ्या रस्ता वाहतुकीमुळे आमची बस अगदी सूशेगात जात होती. आम्ही नगरकोविल येथे पोचेपर्यंत अवनी आणि सुनिता ह्यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रही गाठले होते. 

नगरकोवील येथे क्षुधाशांती करून आम्हीही विवेकानंद केंद्र गाठले खरे.... मात्र... इथे एक वेगळेच स्वागत अनुभवास आले.

केंद्राचे सर्वेसर्वा श्री राजकुमार ह्यांनी आमच्या निवासाची नेमकी व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे आमच्या आधी पोचलेले सतीश दप्तरी, संजय, अवनी आणि सुनिता ह्यांनी स्वतःच बुकिंग करून रूम घेतली होती. आम्हाला एक मोकळा hall निवडावा लागला ज्यामध्ये झोपण्यासाठी ना पुरेश्या सतरंज्या होत्या ना जागा. 

अखेरीस नाईलाजाने तो हॉल ताब्यात घेऊन आम्ही विवेकानंद रॉक येथे गेलो.




आम्ही विवेकानंद रॉक येथे असतानाच सर्वानन विवेकानंद केंद्र येथे पोचला. त्यानेही एक वेगळी रूम बुक केली. त्याला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण विवेकानंद केंद्र येथे परतलो. 

कन्याकुमारी येथे होणारा सूर्यास्त पाहण्यासाठी अवधी फारच थोडा उरला होता. श्री राजकुमार ह्यांना सांगून आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी निघालो. सर्वानन वायू वेगाने निघाला, मात्र अरुणा लागू ह्यांची सायकल वेगच घेईना. बाकी सायकलपटू सर्वाननच्या मागे दौडत गेले. मात्र मी आणि प्रमोद असे दोघेजण अरुणा लागू ह्यांच्यासाठी कमी वेगात जाऊ लागलो. पण त्यांच्या वेगाने सूर्यास्त गाठता येणार नाही हे लक्षात आले. मग त्यांना कुठे यायचे ते सांगून मी आणि प्रमोद पुढे निघालो. 



 अंधार पडायच्या आत आम्ही किनारा गाठला खरा पण सूर्याने आम्हाला अस्त पाहू दिला नाही. आधी पोचलेले आमचे चार शिलेदार मात्र वेळ साधू शकले. अखेरीस तिमिराच्या साथीने आम्ही विवेकानंद केंद्र गाठले तेव्हा साधारण सात - साडेसात वाजले असावेत.

श्री राजकुमार ह्यांना संपर्क साधून आम्ही परतल्याची वर्दी दिली तर ते म्हणाले ताबडतोब जेवायला या. ते स्वतः आणि इतर काही जण आमची जेवणासाठी वाट पाहत आहेत. आम्हीही त्वरा करत जेमतेम सायकल ठेवून त्यांनी सांगितल्या ठिकाणी पोचलो. मात्र तिथे ना राजकुमारजी होते ना इतर कोणी कार्यकर्ते. त्या मेस मधील लोकांनी आम्हाला जेवण संपल्याचे सांगितले. काही पोळ्या आणि लोणचे इतकेच शिल्लक होते. राजकुमार ह्यांना फोन केल्यावर १०-१५ मिनिटांनी ते उगवले. आल्यावर कोठून तरी थोडी भाजी त्यांनी आणली. ना ती भाजी पुरेशी होती ना पोळ्या. त्यांना ह्या अव्यवस्थेबद्दल विचारले तर ते उलट सांगू लागले की त्यांना नेमके कितीजण येणार, त्यात पुरुष किती, स्त्रिया किती हे कळवले नव्हते. त्यामुळे रुमची व्यवस्था होऊ शकली नाही, तसेच जेवणाच्या अव्यवस्थेबद्दलही ते थातुर मातुर कारणे देऊ लागले. मी त्यांना ताबडतोब कित्येक दिवस आधी पाठवलेला मेसेज आणि नंतर फॉलोआप साठी पाठवलेले सविस्तर मेसेज दाखवले आणि फोनबद्दल ही आठवण करून दिली. तेव्हा मात्र त्यांनी कार्यबाहुल्यामुळे अव्यवस्था झाल्याचे कबूल केले. 

अगत्याशिल केरळ राज्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे, तसाच तामिळनाडूमधील कटू अनुभवदेखील ह्यापूर्वी घेतला आहे. मात्र फक्त २४ तासात केरळ मधील त्रिवेंद्रम आणि तामिळनाडू येथील कन्याकुमारी ह्या दोन ठिकाणच्या पाहुणचारात जमीन अस्मानाचा असलेला फरक जाणवत होता.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...