शनिवार, २२ मार्च, २०२५

रेल्वे फलाटाची सैर

Burdwan रोड येथील पोर्टलँड पार्क पासून आम्ही हावडा रेल्वे स्थानकाकडे निघालो. स्थानिक बसमध्ये मुंबईसारखी गर्दी नव्हती. रेल्वे स्थानक येथे पोचल्यावर पार्सल ऑफिस ची चौकशी केली

हावडा रेल्वे स्थानक (हावडा जंक्शन)  हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात व्यस्त रेल्वे संकुल आहे. तसेच ते भारतातील सर्वात जुने रेल्वे संकुल देखील आहे.  हावडा हे कोलकाता महानगर क्षेत्राला सेवा देणाऱ्या पाच मोठ्या इंटरसिटी रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.  सियालदह, संत्रागाची, शालीमार आणि कोलकाता ही इतर चार रेल्वे स्थानक ह्या महानगरात इंटरसिटी सेवा देत आहेत.

हावडा येथून प्रथम १८ जून १८५३ रोजी तत्वावर गाडी धावली. गाड्यांची निर्मिती ऑस्ट्रेलियात होत होती. मात्र ते घेऊन येणारे जहाज बुडाल्याने रेल्वेमार्ग सुरू व्हायला उशीर होत गेला. अखेरीस गाड्या स्थानिक पातळीवर तयार केल्या गेल्या आणि लोकोमोटिव्ह कलकत्त्याला नेण्यात आले. अखेरीस  हावडा हुगळी ह्या मार्गावर पहिली सार्वजनिक ट्रेन १५ ऑगस्ट १८५४ रोजी धावली. त्याकाळी, हे स्थानक सध्या हावडा येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचे कार्यालय असलेल्या ठिकाणी होते. त्यात एक लाईन आणि प्लॅटफॉर्म, तिकीट खिडकी आणि एक आधार देणारी इमारत होती. दोन आठवड्यांनंतर पुंडोहला जाणारी लाइन सुरू करण्यात आली. पहिल्या ४ महिन्यांत, १०९००० पेक्षा जास्त प्रवाशांनी सेवेचा वापर केला. ही गाडी फेयरी क्वीन सारखीच होती

सध्या हावडा स्थानकात एकंदर २२ फलाटांचा वापर होत असतो. येथून एकूण २५२ मेल/एक्स्प्रेस ट्रेन्स आणि ५०० ​​उपनगरी ईएमयू गाड्या दररोज सुटत असतात. ह्याखेरीज माल आणि पार्सल गाड्या देखील येथून निघतात. दिवसाला १० लाखाहून अधिक प्रवासी येथे येत असतात.  या स्टेशनला जोडणारा हावडा-बर्दधमान मुख्य मार्ग हा सर्वात व्यस्त मार्ग आहे.

आम्ही रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश केला. चौकशी कुठे करावी हेच कळेना. आनंदमधील पोलिस जागा झाला. कोणत्या माणसाला पकडले की नेमके उत्तर मिळेल हे त्याने बरोबर जाणले. एका हमालाला त्याने विचारले. त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही तिघे त्या ऑफिसमध्ये पोचलो. मात्र तिथे आमचे सामान मिळणार नव्हते. तेथील ऑफिसमध्ये आम्हाला दुसऱ्या टर्मिनलला जायला सांगितले.

आम्ही टर्मिनस १ येथे होतो. येथून पूर्व रेल्वेच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या आणि दक्षिण पूर्व रेल्वेच्या लोकल ट्रेन्स जात असतात. आम्ही येथील फलाट क्रमांक १ येथून पुढे जाऊ लागलो. टर्मिनस १ मधील १५ फलाट ओलांडले.  तिथे पुन्हा चौकशी केली. कारण पुढे जायला रस्ताच दिसेना. पुन्हा हमाल, रेल्वे पोलिस ह्यांच्याकडे चौकशी केली. 

त्यांनी टर्मिनल २ चा रस्ता दाखवला. येथे  प्लॅटफॉर्म १७ ते २३ हे फलाट आहेत. टर्मिनल २ हा नवीन कॉम्प्लेक्स आहे. येथून  दक्षिण पूर्व रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येतात. सगळे २३ फलाट ओलांडल्यावर समजले की पार्सल ऑफिस फलाट क्रमांक १७ येथे आहे. टर्मिनल २ ला पुन्हा ओलांडले. फलाट क्रमांक १७ कुठे आहे हेच कळेना. पुन्हा पुन्हा चौकशी करत एकदाचे पार्सल ऑफिस शोधले. 



तीनही सायकल आनंदच्या नावानेच पाठवल्या होत्या. पार्सल ऑफिस मध्ये गेल्यावर कळले की तिथे ओळखपत्राची एक प्रत सादर करावी लागणार आहे. आनंद आणि संजयला तिथेच थांबायला सांगून मी आनंदच्या ओळखपत्रांच्या प्रती काढून आणल्या. सायकली हातात आल्यावर तिघांनाही हायसे वाटले. हावडा रेल्वे स्थानकाची आमची सैर संपली होती.

त्या ऑफिसमधून निघताना बाहेर दाखवण्यासाठी आम्हाला पावती दिली होती. आम्ही ऑफिसमधून गेट पर्यंत जाताना सायकली वेष्टनात होत्या. गेटजवळ ती वेष्टने काढली मात्र.....

आनंदची सायकल डुगडुगत होती...

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

कोलकातातील स्वागत

कोलकाता... विमानतळावर उतरलो मात्र... अचानक लक्षात आले. माझ्या हातात असलेली पांढऱ्या रंगाची पिशवी दिसत नव्हती. आधी पटकन लक्षात येईना त्या पिशवीत नक्की काय असावे. मग हळूहळू विचार केला.... इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्या पिशवीत असणार... सायकलचे दिवे, चार्जर, charging cable.. ठीक  आहे, फार काही अजून नसावे. हळूहळू जाग येत होती, तसा विचार केला...अजून काय बरं असावे. हम्म, चहासाठी पाणी गरम करण्याचा विजेवर चालणारा जार.... ओह, आणि... ह्या मोहिमेसाठी खास घेतलेला... कॅमेरा... GoPro १२... ! 

हा कॅमेरा ह्या मोहिमेसाठी मुद्दाम विकत घेतला होता. त्याची किंमतही चांगलीच होती. कॅमेराची किंमत श्विनपेक्षा सुद्धा जास्त होती. नक्की कुठे विसरलो...? विमानात मी ती पिशवी आणली नसावी.. नव्हती...म्हणजे मग.. बोर्डिंग पास घेतानाच...?

आनंदने धीर दिला. म्हणाला.. तू लगेच तक्रार कर. मी आणि संजय विमानतळावर तक्रार दाखल करायला चौकशी केली. विमानतळ कार्यालय आणि एअर इंडिया एकमेकांकडे बोट दाखवत होते. मी हताश झालो होतो. मात्र एअर इंडिया अधिकाऱ्याने नीट समजावले ते म्हणाले तुम्ही मुंबई विमानतळावर संपर्क साधा. त्यांच्या संकेतस्थळावर तक्रार दाखल केली. मीराची मैत्रीण मोनिका मुंबई विमानतळावर एअर इंडिया मध्येच काम करते. तिला सगळी कल्पना दिली. तिलाही चौकशी करायला सांगितले.

हे सगळे सोपस्कार करेपर्यंत डॉ केळकर ह्यांनाही सगळी कल्पना देत आम्हाला उशीर होत असल्याचे कळवले होते. अखेरीस सामान परत मिळण्याची खात्री नसली तरी शक्यता गृहीत धरून विमानतळ सोडण्याचा निर्णय घेतला. ह्या सगळ्यात बराच वेळ गेल्यामुळे आता थेट केळकरांकडे जाऊन मग सायकल आणायला कोलकाता रेल्वे स्थानकावर जायचे ठरवले.

अलीपोर भागातील Burdwan रोड येथील डॉ केळकर ह्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथील भलामोठा दरवाजा कसा उघडायचा ते कळेना. केळकरांना फोन केला..इतक्यात आनंदने तो दरवाजा उघडला. दरवाजा उघडून आत पाहतो तर प्रशस्त आवार नजरेस पडले. डॉ केळकर सुहास्य वदनाने आमचे स्वागत करायला येतच होते. आवार चांगलेच मोठे होते, त्यामध्ये बगीचा केला होता, समोर मोठे गवताच्छादित मैदानही होते. 





डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी अतिशय शांत स्वभावाचे होते. दोघेही मोजकेच बोलत होते, मात्र अतिशय अगत्याने वागत होते. बंगल्यात आधी एक बाल्कनी होती, आत प्रशस्त दालन होते. दालनाच्या आत तीन चार बाजूंना वेगवेगळ्या खोल्या होत्या. बाहेरील दालन अतिशय सुंदर आणि टापटिपीने सजवले होते. वास्तविक आम्ही प्रथमच त्यांना भेटत होतो. मात्र त्यांच्या स्वागताने आमचा संकोच अगदीच लगेच निघून गेला. त्या दालनाच्या एका बाजूला त्यांनी आमची रहायची सोय केली होती. तिथेही एका आत एक अश्या दोन खोल्या आणि त्याहून आत मध्ये अतिशय प्रशस्त असे बाथरूम होते. एकंदरीत हा एक राजवाडाच होता. मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चौरस फुटफुटाच्या मोजमापात राहणाऱ्या आम्हा तिघांनाही इतक्या मोठ्या बंगलीची अपेक्षाच नव्हती. मी तर स्वप्नातही इतक्या प्रशस्त जागेत स्वागत होणार आहे ह्याची कल्पनाही केली नव्हती.

डॉक्टरांच्या पत्नीला बागकामाची आवड होती. त्यांनी वेगवेगळी फुलझाडे लावली होतीच. शिवाय आवारात मोठमोठे वृक्षही होते. काही पक्षी तिथे नियमित येत असत. त्यांचेही स्वागत डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी आनंदाने करत असत. खरतर तर ते पक्षीही त्यांच्या घरातील सदस्यच झाले होते.







निवासस्थानाप्रमाणे डॉक्टरांचे मनही मोठे होते. खरतर डॉक्टरांना भेटून, सामान ठेवून लगेच सायकल आणायला जायचा विचार होता. सकाळच्या गडबडीत नाश्ताही केला नव्हता. डॉक्टरांनी चहा विचारल्यावर लगेचच होकार दिला. चहा बिस्किटे घेतली. गप्पाही सुरू होत्या. डॉक्टरांची दोनही मुले परदेशात स्थायिक होती. इथे ह्या बंगल्यात आता दोघे पतिपत्नीच राहत होते. 

सायकल आणण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे जायचा विचार असला तरी आता भूकही लागली होती आणि डॉक्टर दांपत्याचे अगत्य पाहून लगेच पायही निघत नव्हता. त्यामुळे आम्ही जेवण करूनच निघायचे ठरवले. जेवण करून थोडी विश्रांतीही घेतली.

दुसऱ्या दिवशी पहाटे बेलूर मठ येथून निघायचे असल्याने रात्री तिथेच मुक्कामाला जायचे होते. मात्र डॉक्टर आम्हाला रात्रीही इथेच राहण्याचा आग्रह करत होते. आमची मनस्थिती द्विधा होत होती. अर्थातच डॉक्टरांचे अतिथ्यशील वागणे, येथील निवांत आणि शांत वातावरण, एकंदर परिसर पाहून येथेच मुक्काम करण्याचा मोह आम्हालाही सुटत नव्हताच.

अखेरीस कुठे राहायचा ह्याचा निर्णय सायकल आणल्यावर घेऊ असे ठरवत आम्ही रेल्वे स्थानकाकडे निघालो.

गुरुवार, २० मार्च, २०२५

सांस्कृतिक आधुनिक शहर (कोलकाता भाग ३): कोलकाता चेन्नई सायकल सफर

 



कोलकाता शहराला व्यावसायिक चित्रपटगृहांचा फार मोठा इतिहास आहे.  कलकत्त्याचे पहिले व्यावसायिक थिएटर, हातीबागनचे स्टार थिएटर १८८३ मध्ये बांधले गेले. नंतर १९४० च्या दशकात ग्रुप थिएटर्सच्या आगमनाने, व्यावसायिक थिएटरची क्रेझ खूप कमी झाली.

कोलकात्याच्या ग्रुप थिएटर्समध्ये असा कोणताही नफा कमावण्याचा अजेंडा नसून, मुख्यतः सामाजिक संदेश हायलाइट करण्यावर भर दिला जातो.  म्हणून, त्यांनी २० व्या शतकातील कोलकाता येथे सामाजिक सुधारणेत महत्त्वाची भूमिका बजावली.

हावडा ब्रिज, जो आता कोलकात्याच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे, १९४३ मध्ये कार्यान्वित झाला. १८७४ मध्ये बनवलेल्या पोंटून पुलाच्या जागी हावडा ब्रिज देखील अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.  जगातील सर्वात मोठ्या कॅन्टिलिव्हर ब्रिजमध्येही त्याची ओळख आहे.  हावडा ब्रिजचे खडे असलेले स्टील्स दिवसा विस्तारतात आणि रात्री आकुंचन पावतात.  जोरदार वाऱ्यामुळेही पूल थोडा वाकतो.


हा पूल बांधण्याचा उद्देश दुसऱ्या महायुद्धात जपानी हल्ल्यांना तोंड देणे हा होता. युद्धादरम्यान सैन्य आणि पुरवठ्याच्या हालचाली सुलभ करून त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  जपानी विमानांनी १९४२- ४४ दरम्यान कोलकात्यावर बॉम्बफेक करून हावडा ब्रिज आणि बंदर नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  ब्रिटीशांनी फुगे उभारून प्रत्युत्तर दिले, बॉम्बर्सना लक्ष्यांवर मारा करण्यासाठी कमी उड्डाण करण्यापासून रोखले.

कोलकाता हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील राजधानीचा जिल्हा आहे, ज्याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.  क्षेत्रफळाच्या दृष्टीने, हे पश्चिम बंगालमधील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात लहान आहे परंतु लोकसंख्येची सर्वाधिक घनता आहे.

कोलकात्याच्या दक्षिण किनाऱ्यामध्ये बेहाला, जादवपूर, गरिया आणि नरेंद्रपूर यांचा समावेश होतो.  या भागात अनेक शैक्षणिक संस्था, शॉपिंग मॉल्स आहेत आणि हा शहराचा तुलनेने नवीन भाग आहे जिथे विस्तार चालू आहे.

दक्षिण कोलकाता हा शहराचा उच्च दर्जाचा, पॉश भाग आहे.  यात गरियाहाट, ढाकुरिया, बल्लीगंगे, भवानीपूर, अलीपूर, न्यू अलीपूर, रास बिहारी, कालीघाट आणि टॉलीगंगे यांचा समावेश होतो.  विविध पॉश मॉल्स, उच्च पॉश निवासी संकुल, फॅन्सी रेस्टॉरंट्स आणि बरेच काही आहेत.

उत्तर कोलकाता हे शहराचे जुने क्षेत्र आहे. अरुंद छोट्या गल्ल्या आणि शेकडो जुन्या इमारतींनी वर्चस्व असलेला जिल्हा.  त्यात श्याम बाजार, शोभा बाजार, प्रसिद्ध कॉलेज स्ट्रीट परिसर आणि इतर अनेकांचा समावेश आहे.  इंडियन कॉफी हाऊस, कलकत्ता युनिव्हर्सिटी, कोलकाता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी आणि इतर असंख्य हेरिटेज थिएटर्स ही इथे जाणून घेण्यासारखी काही ठिकाणे आहेत.

कोलकात्याच्या उत्तरेकडील किनारी काशीपूर, दमडम, बेलघोरिया, खर्डा इत्यादींचा समावेश होतो जेथे ज्यूट, कागद, कापूस आणि इतर रसायनांचे असंख्य कारखाने आहेत.  दक्षिणेश्वर काली मंदिर आणि विवेकानंद सेतू आणि निवेदिता सेतू हे दुहेरी पूल यासारखी आकर्षणे या भागात आहेत.

पूर्व कोलकाता हे असेच एक क्षेत्र आहे जे झपाट्याने विकसित होत आहे, विशेषत: आयटी क्षेत्र आणि अनेक मॉल्सचे घर.  यात सॉल्ट लेक सिटी, न्यू टाऊन, लेक टाउन आणि ईएम बायपासचा समावेश आहे.  इको पार्क, मदर्स वॅक्स म्युझियम यासारखी काही आकर्षणे न्यू टाउनमध्ये आहेत.

हावडा आणि हुगळीचा शहरी भाग या सर्वांची वैयक्तिक ओळख असून ते कोलकाता महानगराचा भाग आहेत.  त्याचप्रमाणे हावडा शहर हे कोलकाता शहराचे जुळे शहर आहे.  नबन्ना, संत्रागाची, बेलूर, बल्ली, सेरामपूर, भदेश्वर, चिनसुरा, हुगळी इत्यादी ठिकाणे कोलकाता मेट्रोपॉलिटन एरिया अंतर्गत येतात.

कोलकाता शहराचा हा मनोरंजक इतिहास आणि शहराचे आधुनिक स्वरूप सायकलींच्या चाकांना आवाहन करत होते... माझ्या कानात आवाज येत होता... Kolkata is calling

मंगळवार, १८ मार्च, २०२५

साहेबांचे कोलकाता (कोलकाता भाग २): कोलकाता चेन्नई सायकल सफर




 पश्चिम बंगालची राजधानी असलेले कोलकाता हे शहर पहिले मेट्रो शहर म्हणून ओळखले जाते आणि भारतातील सर्वोच्च वारसा असलेल्या शहरांमध्ये देखील ओळखले जाते. पण कोलकात्याचा इतिहास भारतीय इतिहासातील दोन महत्त्वाच्या  घटनांमुळे लक्षणीय आहे.  प्रथम, बंगालचा नवाब आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील संघर्ष ज्याने भारतात वसाहतवादी शासन सुरू केले.  आणि दुसरे म्हणजे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील शहरातील नेत्यांची निर्णायक भूमिका.

बंगालचा मुघल सुभेदार इब्राहिम खान (१६८९-१६९७) याच्या काळातही ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंट्सनी इथे पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मुघल सैन्याने बऱ्याच वेळा इंग्रज व्यापाऱ्यांना मारहाण करून बंगालमधून हाकलून दिले. महाराष्ट्रातील विसापूरजवळील ईस्ट कंपनीच्या जहाजांमुळे मक्का यात्रेला त्रास होत होता.  औरंगजेबाने इब्राहिम खानला ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमध्ये परत येण्याची परवानगी दिली.  त्यामुळे इब्राहिम खानने कंपनी एजंट जॉब चारनॉकला बंगालला परत येण्यास सांगितले.  पण जॉब चारनॉकने तोंडी स्वीकृती देऊनही, लेखी फर्मान (ऑर्डर) मागितला.  मौखिक स्वीकृतीच्या आधारावर जॉब चार्नॉक १६९० मध्ये ३० इंग्रज सैनिकांसह सुतानुती येथे पोहोचला. मुघल सम्राटाच्या फर्मानला काही महिने लागले. ईस्ट इंडिया कंपनीला अखेरीस १६९१ मध्ये ३००० रुपयांच्या वार्षिक कराच्या बदल्यात मुघल फर्मान मिळाले 

 चार्नॉकने भागीरथी-हुगली नदीच्या पूर्वेकडील प्रदेश (गंगा नदीची दुय्यम शाखा) व्यापारासाठी निवडला. दुर्दैवाने, जॉब चारनॉकचा मृत्यू १६९२ मध्ये झाला. पण तो मरण पावण्यापूर्वी, कलकत्त्याच्या पायाभरणीच्या दिशेने सर्व हालचाली सुरू झाल्या.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १६९८ मध्ये सुतानुती, गोविंदापूर आणि कालिकाता ही तीन गावे स्थानिक जमीनदार सबर्णा चौधरी यांच्याकडून विकत घेतली. कंपनीने तीन गावांचा विकास केला आणि १६९९ मध्ये या प्रदेशाला कलकत्ता प्रेसीडेंसी सिटी म्हणून घोषित केले.

ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्या कारखान्यांच्या संरक्षणासाठी कलकत्ता येथे किल्ला बांधायचा होता.  पण इब्राहिम खान अशी विनंती मान्य करायला अजिबात तयार नव्हता. १६९५ मध्ये अफगाण सेनापती रहीम खानने हुगळी शहर ताब्यात घेतले.  शत्रूंनी वेढलेल्या, ईस्ट इंडिया कंपनीने इब्राहिम खानला कारखान्यांच्या संरक्षणासाठी तटबंदीची परवानगी देण्याची विनंती केली.  परिस्थितीला कंटाळून अखेर इब्राहिम खानने कलकत्ता येथे किल्ला बांधण्याची परवानगी दिली.

जरी तटबंदीचे अनुदान केवळ कारखान्याच्या संरक्षणाच्या अधीन होते. मात्र कंपनीने त्या आदेशाचा गैरवापर करून त्यांना हवे तसे किल्ला बांधायला सुरुवात केली.  कंपनीने १६९६ पर्यंत फोर्ट विल्यमचे बांधकाम पूर्ण केले आणि ब्रिटीश राजा विल्यम III च्या नावावरून किल्ल्याचे नाव दिले.

१७५६ च्या ब्लॅक होल ट्रॅजेडीने हे शहर जगामध्ये बदनाम झाले. २० जून रोजी बंगालचा नवाब सिराज उद-दौला याने फोर्ट विल्यम ताब्यात घेतला. संध्याकाळपर्यंत, नवाबी सैन्याने जिवंत ब्रिटिश सैनिकांना 18 फूट X 14 फूट गडद कोठडीत ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सेल उघडला गेला तेव्हा १४६ पैकी फक्त २३ सैनिक जिवंत होते. उरलेले सर्व सैनिक रात्रभर अत्यंत गुदमरल्यामुळे मरण पावले.

आणखी एका नोंदीनुसार फक्त ६४ कैद्यांना ब्लॅक होल चेंबरमध्ये पाठवण्यात आले होते. कलकत्त्याच्या ब्लॅक होल हत्याकांडातून फक्त २१ सैनिक वाचले.

 नवाब सिराज-उद-दौलाने कलकत्त्याचे नाव बदलून अलीनगर असे ठेवले, त्याचे आजोबा आणि पूर्ववर्ती नवाब अलीवर्दी खान. अशा प्रकारे अलीनगर आधुनिक काळातील कोलकाता किंवा ब्रिटिश कलकत्ताचे दुसरे जुने नाव बनले. परंतु रॉबर्ट क्लाइव्हने नवाब सिराज उद-दौलाकडून शहर परत मिळवून देईपर्यंत हे नाव फारच कमी काळ टिकले.

 ईस्ट इंडिया कंपनीने नियुक्त केलेला रॉबर्ट क्लाइव्ह फोर्ट विल्यम पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कलकत्त्यात आला. अफगाण आणि ब्रिटीश या दोन महाकाय सैन्यापासून अलीनगरचे रक्षण करण्याची गुंतागुंत नवाब सिराजलाही कळली. ९ फेब्रुवारी १७५७ रोजी नवाब सिराज उद-दौलाने ईस्ट इंडिया कंपनीसोबत अलीनगरचा तह केला. अलीनगरच्या तहात, नवाबाने १७१७ मध्ये मुघल सम्राट फारुखसियारने काढलेल्या फर्मानाच्या सर्व अटी पूर्ण करण्याचे मान्य केले.

१७७२ मध्ये कलकत्ता ब्रिटिश भारताची राजधानी बनली. अर्थातच कोलकाता शहराला भारतातील अनेक आधुनिक गोष्टींची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान मिळाला.

 कंपनीला भारतातील ट्रेडिंग ऑपरेशन्स एकत्रित करण्याची गरज वाटली. त्यामुळे त्यांना प्रशासकीय कार्यालय हवे होते. कंपनीने अनेक कनिष्ठ लिपिकांची नियुक्ती केली, ज्यांना तत्कालीन लेखक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कलकत्त्याच्या पहिल्या प्रशासकीय इमारतीला लेखकांची इमारत असे नाव मिळाले.

जेम्स ऑगस्टस हिकी, ह्या आयरिश गृहस्थाने, १७८० मध्ये पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले. सर जेम्स यांनी ब्रिटिश कलकत्ता येथे हिकीचे बंगाल गॅझेट, भारतातील पहिले वृत्तपत्र मुद्रणालय स्थापन केले. गंमत म्हणजे, हिकीच्या बंगाल गॅझेटने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारी अधिकारी आणि धोरणांवर टीका केली. हिकीच्या बंगाल गॅझेटने एका अहवालात गव्हर्नर-जनरल वॉरन हेस्टिंग्स यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ईस्ट इंडिया कंपनीने १७८२ मध्ये वृत्तपत्रांचे प्रकार आणि प्रिंटिंग प्रेस ताब्यात घेतले.

सर विल्यम जोन्स यांनी १७८४ मध्ये बंगालच्या एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. एशियाटिक सोसायटीने जगभरातील अनेक विद्वानांना अनेक भारतीय आणि परदेशी भाषांवर काम करण्याची संधी दिली. सोसायटी आणि सर जोन्स यांनी विविध इंडो-युरोपियन भाषांवरील अनेक भारतीय विद्वानांशी मिसळून काम करण्यास सुरुवात केली. कालीघाटच्या हिंदू पंडितांनीही समाजाशी मिसळून काम केले. परिणामी, पाश्चात्य संस्कृती भारतीय हिंदू संस्कृतींमध्ये विलीन होऊ लागल्या. त्यामुळे कलकत्त्याच्या बौद्धिक जीवनाला मोठी चालना मिळाली.

सन १८१४ मध्ये, कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीने भारतीय संग्रहालयाची स्थापना केली, हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने संग्रहालय आहे. डॅनिश वनस्पतिशास्त्रज्ञ नॅथॅनियल वॉलिच हे संग्रहालयाचे मुख्य क्युरेटर होते. भारतातील पहिले संग्रहालयामध्ये दुर्मिळ पुरातन वस्तू, चिलखत आणि दागिन्यांच्या सहभाग केला गेला. प्राण्यांचे जीवाश्म, सांगाडे आणि ममी हे संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण ठरले. कोलकात्याच्या भारतीय संग्रहालयात अनेक ब्रिटिश आणि मुघल चित्रांसह दुर्मिळ चित्रांचा मोठा संग्रह आहे.

 कलकत्त्याचे हिंदू कॉलेज (प्रेसिडेन्सी विद्यापीठ) हे आशियातील पहिले आधुनिक उच्च शिक्षण केंद्र होते. राजा राम मोहन रॉय आणि डेव्हिड हेअर यांनी १८१७ मध्ये कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजची स्थापना केली. या कॉलेजचा सुरुवातीला कलकत्त्याच्या हिंदू कुटुंबांना इंग्रजी आणि इतर युरोपियन साहित्यात शिक्षण देण्याचा हेतू होता. कलकत्त्यातील हिंदू समाजाने हिंदू महाविद्यालयाच्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावली. १८५५ मध्ये, कलकत्त्याचे हिंदू कॉलेज एक सरकारी संस्था बनले आणि त्याचे नाव प्रेसिडेन्सी कॉलेज असे ठेवण्यात आले. इंग्रजी, बंगाली, संस्कृत, इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कायदा, वाणिज्य आणि अभियांत्रिकी या विषयांचा समावेश होता.

ब्रिटिश भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी १८३५ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली. कलकत्ता मेडिकल कॉलेज ही भारतातील पहिली इंग्रजी माध्यमाची आणि आशियातील पाश्चात्य वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणारी दुसरी संस्था बनली. संस्थेने शरीरशास्त्र, शरीरविज्ञान आणि पॅथॉलॉजीचे गहन अभ्यासक्रम सुरू केले. पण त्याच वेळी, पाश्चिमात्य वैद्यक अभ्यासक्रमांमुळे स्वदेशी वैद्यकीय शिक्षणाचा अंत झाला. त्यामुळे भारतीय अभ्यासक आणि राष्ट्रवादी यांनी टीका केली.

कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना १८६२ मध्ये उच्च न्यायालय कायदा, १८६१ अंतर्गत करण्यात आली. कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील पहिले उच्च न्यायालय होते आणि व्हिक्टोरियन काळातील तीन चार्टर्ड उच्च न्यायालयांपैकी एक होते. 

 ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर बांधले. हे महत्त्व ओळखून ब्रिटीश सरकारने १८६६ मध्ये रिव्हर ट्रस्टची स्थापना केली. पण पोर्ट ट्रस्ट चालवण्यासाठी योग्य कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज सरकारला लवकरच जाणवली. त्यामुळे ब्रिटिश सरकारने रिव्हर ट्रस्ट बरखास्त करून पुन्हा प्रशासन हाती घेतले. अखेर १८७० मध्ये कलकत्ता बंदर कायदा पास झाला. त्यानंतर कलकत्ता बंदर आयुक्त कार्यालय बांधण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धात कलकत्ता बंदराची भूमिका महत्त्वाची होती. युद्धादरम्यान जपान्यांनी कलकत्ता बंदरावर दोनदा बॉम्ब टाकले.

 २४ फेब्रुवारी १८७३ रोजी पहिली घोडा ओढलेली ट्राम कलकत्त्याच्या रस्त्यावर धावली. 


पहिला ट्राम मार्ग सियालदाह आणि आर्मेनियन घाट स्ट्रीट दरम्यान 2.4 मैल (3.9 किमी) होता. पण ब्रिटिश सरकारने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये ही सेवा बंद केली. सात वर्षांनंतर, कलकत्ता ट्रामवेज कंपनीची स्थापना आणि १८८० मध्ये लंडनमध्ये नोंदणी करण्यात आली. सियालदाह, आर्मेनियन घाट, बोबझार स्ट्रीट, डलहौसी स्क्वेअर आणि स्ट्रँड रोडमध्ये मीटर-गेज घोड्याने काढलेले ट्राम ट्रॅक टाकण्यात आले. व्हाइसरॉय लॉर्ड रिपन यांनी १ नोव्हेंबर १८८० रोजी मार्गांचे उद्घाटन केले. १९०० मध्ये ट्रामवेचे विद्युतीकरण सुरू झाले. २७ मार्च १९०२ रोजी पहिली इलेक्ट्रिक ट्राम कार कलकत्ता येथे एस्प्लेनेड आणि किडरपोर दरम्यान धावली.


आनंदाचे शहर (कोलकाता भाग १): कोलकाता चेन्नई सायकल सफर

 




कोलकाता... हे नाव ऐकल्याबरोबर आठवण येते ती साहित्यिक आणि स्वातंत्र्यसेनानी ह्यांची. स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, बिपिनचंद्र पाल, सुभाषबाबू... नावे तरी किती घ्यावीत. बंगालची भूमी म्हणूनच पावन भूमी म्हटली पाहिजे. अमेरिकेपर्यंत हिंदुत्वाची पताका फडकविणारे स्वामी विवेकानंद आणि जपानमध्ये राहून भारतभूमीच्या स्वातंत्र्य चळवळीची ज्वाला तेवत ठेवणारे रासबिहारी बोस ह्याच बंगालच्या भूमीतील. देश, देव आणि धर्म ह्यांच्या प्रती निष्ठा राखणे हे जणू अभिमन्यूप्रमाणे मातेच्या उदरातच येथील बालकांना शिकवले जात असावे.

कला, संगीत, साहित्य आणि नाट्य या सांस्कृतिक क्षेत्रातही हे शहर आघाडीवर आहे. १८व्या आणि २०व्या शतकाच्या भारताच्या इतिहासादरम्यान कोलकाता हे साहित्याचे केंद्र होते.  या शहराने अनेक लेखक आणि कवींना जन्म दिला आहे ज्यांना बंगालचे पुनर्जागरण किंवा बंगाली पुनर्जागरण म्हणून ओळखले जाते. बंकिमचंद्र हे त्यांच्या कादंबऱ्या आणि साहित्यासाठी प्रसिद्ध होते.  बंगाली साहित्यावरील प्रभावासाठी त्यांना "साहित्य सम्राट" (साहित्यचा राजा) म्हणून ओळखले गेले.

रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या कविता, कादंबरी आणि साहित्याने बंगाली कला आणि साहित्यावर प्रचंड प्रभाव टाकला. १९१३ मध्ये, रवींद्रनाथ टागोर हे पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले गीतकार बनले. स्वामी विवेकानंद यांनी आपले जीवन युवकांना सामाजिक सेवा आणि चारित्र्य निर्मितीसाठी शिकवण्यात आणि मार्गदर्शन करण्यात समर्पित केले.  त्यांच्या व्याख्यानांनी आणि भाषणांनी जगभरातील अनेक तरुणांना प्रेरणा दिली.  अनेक भारतीय तरुण देशसेवेसाठी पुढे आले.

कोलकात्याची संस्कृती कोलकातामधील संगीत, कला, संग्रहालये, सण आणि जीवनशैलीशी संबंधित आहे.

दुर्गा पूजा, कोलकाताचा जगप्रसिद्ध उत्सव पूर्वी कोलकात्याच्या श्रीमंत आणि राजघराण्यांमध्ये मर्यादित होता.  पण १९ व्या शतकाच्या मध्यात बंगालच्या आवडत्या उत्सवाला त्याचे सर्वात प्रसिद्ध सांप्रदायिक स्वरूप प्राप्त झाले.  कोलकात्याची पहिली सार्वजनिक दुर्गा पूजा किंवा बारोवारी दुर्गा पूजा १९१० मध्ये आदिगंगेच्या बलराम बोस घाटावर झाली.  कालीघाट आणि भवानीपूर येथील स्थानिकांनी संयुक्तपणे प्रयत्न केले.

संस्कृती, कला, इतिहास, साहित्य, खाद्यपदार्थ, सण आणि उत्सवांबद्दलचा लोकांचा उत्साह शब्दांच्या पलिकडचा आहे. दुर्गापूजेच्याप्रसंगी येथील लोकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. कोलकात्याची दुर्गा पूजा देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी आणि तो पाहण्यासाठी लोक लांबून येतात. 

 डॉमिनिक लॅपियर नावाच्या प्रसिद्ध लेखकाने कोलकाता शहरावर एक कादंबरी लिहिली असून त्यांनी आपल्या कादंबरीला सिटी ऑफ जॉय असे नाव दिले आहे. १९९२ मध्ये या कादंबरीवर आधारित चित्रपटही तयार करण्यात आला होता. या चित्रपटात ओम पुरी, शबाना आझमी आणि पॅड्रिक वाजे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

कोलकाता शहर मिठाईसाठी प्रसिद्ध आहे, विशेषत: मिष्टी डोई (गोड दही) आणि रोसोगोल्ला हे येथील विशेष प्रसिद्ध पदार्थ. येथील खाद्यसंस्कृती शतकानुशतके या प्रदेशात स्थायिक झालेल्या विविध समुदायांद्वारे प्रभावित चवींचे मिश्रण प्रतिबिंबित करते.

गरिबी आणि शहरी समस्यांसह समस्या असूनही, कोलकातामध्ये एक वेगळेच चैतन्य आहे. येथील लोक मैत्रीपूर्ण आणि विनम्र आहेत. सहसा कला, राजकारण आणि तत्त्वज्ञानावर सार्वजनिक प्रवचनांमध्ये गुंतलेले असतात. हा बौद्धिक आवेश कोलकाताला मुंबई किंवा बेंगळुरू ह्या औद्योगिक सारख्या शहरांपेक्षा खूप वेगळेपणा देतो.

वास्तविक कोलकाता हे मुंबईनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकाताने कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या पिढ्या वाढवल्या आहेत. हे विशाल शहर प्रेक्षणीय स्थळे, रेस्टॉरंट, नाइटलाइफ आणि निवास सूचीचे केंद्र मानले जाऊ शकते. कोलकाता हे पूर्व भारतातील प्रमुख शहरी केंद्र आहे आणि अनेक वाणिज्य, वाहतूक आणि उत्पादन व्यवसायांचे केंद्र आहे.

 मात्र कोलकात्यातील जीवन इतर शहरांपेक्षा संथ गतीने चालत असल्याचे दिसते. येथील जीवन त्याच्या स्वत: च्या गतीने चालते आणि कायमची छाप सोडते. वारसा, संगीत, साहित्य आणि कला यांनी समृद्ध असलेल्या विविधतेच्या तालाने त्याचे रस्ते रंगत असतात. सामुदायिक मेळावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर शहरात अधिक लक्ष केंद्रित केले जाते. अश्या कार्यक्रमांमुळे रहिवाशांना एकमेकांशी जवळीक निर्माण होण्यास, तो टिकवण्यास संधी मिळते. प्रत्येकाला स्थानिक तसेच अभ्यागतांसाठी आपलेपणा वाटतो.

समृद्ध इतिहास, संस्कृती आणि बौद्धिक उर्जेने भरलेल्या ह्या शहरात जुन्या जगाचे आकर्षण आणि आधुनिक लवचिकतेचे अनोखे मिश्रण दिसून येते.  

वास्तविक आजच्या कोलकाता प्रदेशातील वस्ती मौर्य युगापासून (300 BCE) अस्तित्वात आहे असे आढळून आले आहे. १५ व्या शतकातील कालिकाता (कोलकात्याचे जुने नाव) चे सर्वात जुने माहितीपट उपलब्ध आहेत. "कोलकाता" किंवा "कलिकाता" या नावाच्या खुणा मुघल सम्राट अकबराच्या काळापासून इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आढळतात.

कलकत्ता हे नाव इंग्रजांनी दिले होते, परंतु स्थानिक बंगाली लोक या शहराला कालिकाता म्हणून ओळखत होते. कालिकाता नावाच्या उत्पत्तीबद्दल स्पष्ट करणारे अनेक सिद्धांत आहेत.  एका सिद्धांतानुसार हे नाव हिंदू देवी कालीपासून आले होते.  या सिद्धांतानुसार, त्या ठिकाणाचे मूळ नाव ‘कलीक्षेत्र’ किंवा कालीभूमी असे होते.  तथापि, बरेच तज्ञ या सिद्धांताशी सहमत नाहीत.

दुसऱ्या सिद्धांतानुसार कालिकता हे नाव काली आणि काता या दोन शब्दांचे मिश्रण होते.  काली म्हणजे चुना आणि काटा म्हणजे जळलेले कवच.  बऱ्याच तज्ञांच्या मते, त्यावेळच्या शेल-लाइम उत्पादनाच्या अनेक युनिट्समुळे या प्रदेशाला हे नाव पडले असावे.

...

सोमवार, १७ मार्च, २०२५

पूर्वतयारी भाग १५: कोलकाता चेन्नई सायकल सफर

आमचे विमान पहाटेचे होते. आनंद गोरेगावला राहत असल्याने त्याच्या घरून विमानतळ जास्त जवळ होते. त्याने मला आणि संजयला आदल्या रात्री त्याच्या घरी यायचे आमंत्रण दिले. मी आणि संजयने अगदी आनंदाने ते स्वीकारले.

मला माझे सामान घेऊन बँकेत जायचे होते. फुजी तर आधीच रवाना झाली होती. मात्र श्विन हजर होतीच. शेवटचे दोन तीन दिवस श्विनवरच सराव सुरू होता. अप्पांनी दिलेले पॅनियर्स मी श्विनवर लादले. त्या पॅनियर्स मध्ये माझे सगळे सामान ठेवले होते. मी कोलकाता येथे जाताना श्विनला नेणार नव्हतो. ती बँकेत तशीच ठेवणेही योग्य नव्हते. त्यामुळे माझी सहकारी कांचन हिला मी विचारून घेतले होते की ती श्विनला घरी घेऊन जाऊ शकेल का? पूर्वी एकदा Cycle2work करत फुजीला नेले असता कांचनने उत्साहाने फुजीला फिरवले होते. त्यामुळे कांचन श्विनला व्यवस्थित नेईल ह्याची खात्री होतीच. मात्र मी कांचनला एक अटही घातली होती की श्विनला फिरती ठेवले पाहिजे. तिनेही आनंदाने ती अट स्वीकारली होती. अर्थातच त्यामुळेच मी ऑफिसला जाताना श्विनला नेण्यासाठी सज्ज झालो.

फुजीवर सामान लादलेले पॅनियर्स लावल्यावर प्रथमच स्वार होत होतो. दोन्ही बाजूला पेनियर्स आणि शिवाय कॅरीयरवर माझी सॅक होतीच. सुरुवातीला अरुंद रस्त्यावरून थोडा जपूनच सुरुवात केली. नाशिक ठाणे महामार्गावर लागल्यावर थोडा पुढे गेल्यावर चौपदरी रस्ता दुपदरी रस्ता मध्ये रूपांतरित होत होता. नेमके त्याच ठिकाणी एका बाजूचे पॅनियर्स झटकन खाली आले. सुदैवाने ते बांधले असल्याने रस्त्यावर पडले नाही मात्र हेलकावू लागले. इथे महामार्ग दुपदरी असल्याने सायकल बाजूला घ्यायलाही जागा नव्हती आणि रहदारीमुळे तिथेच थांबताही येत नव्हते. थोड्याशा जागेत उभे राहून कसेबसे ते पॅनियर्स पुन्हा अडकवले. मग मात्र परत काही अडचण न येता थेट ऑफिस गाठले. 


कांचन जणू माझी वाटच पाहत होती. श्विन वरील पॅनियर्स काढून श्विन कांचनच्या हवाली केली. ऑफिसमधील आमचा लाडका कॅमेरामन राहुल माने देखील हजर होता. त्याने लगेचच त्याची कारागिरी पार पाडली.



संध्याकाळी संजय आणि मी आनंदच्या घरी मुक्कामासाठी गेलो तर तिथे आनंदचे मित्र आणि मैत्रीण आम्हा तिघांना शुभेच्छा देण्यासाठी हजरच होते. आनंदचे शेजारीही आम्हाला येऊन भेटले. त्यांनीही आम्हाला शुभेच्छा दिल्या. आमची मोहीम ऐकून आनंदचे शेजारी इतके उत्साहित होते की त्यांनी आनंदला एक हवा भरण्याचा एक ऑटो पंप भेट दिला होता. गप्पा मारण्यात झोपायला उशीर झाला होता आणि पहाटेही लवकर उठायचे होते. मात्र थोडा वेळ अगदी शांत झोप लागली. पहाटे ओला करून आम्ही विमानतळावर पोहोचलो.





सगळे सोपस्कार आटोपून विमानात स्थानापन्न झालो. लगेचच उरलेली झोप पूर्ण करण्यासाठी तिघांनीही पुन्हा एकदा निद्रादेवीची आराधना केली. बंद केलेल्या डोळ्यासमोर कोलकाता तरळत होते.....




रविवार, १६ मार्च, २०२५

पूर्वतयारी भाग १४: कोलकाता चेन्नई सायकलसफर

कोलकाता येथे जाण्याचा दिवस जवळ येत होता. द्विशतकी सराव परीक्षा चांगलीच अवघड ठरली होती. घरी पोचेपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजले होते. दुसऱ्याच दिवशी सायकल रेल्वेने पाठवायच्या होत्या. मी घरी पोचेपर्यंत संजय आणि आनंद ह्यांनी बरेच मेसेज पाठवलेले होते. घरी पोचत असतानाच त्यांचे कॉलही येत होते. मी मात्र त्यांना थोडा वेळ मागितला.

सायकल रेल्वेने पाठवण्यासाठी मदत करायला सुमित येणार होता. त्याने सांगितलेले साहित्य मी येता येता वाटेत घेतले होते. घरी गेल्यावर संजय आणि आनंदला सुमित येणार असल्याचे कळवले. खरतर सुमितची night shift होती. ती करून तो आमच्यासाठी CST स्टेशनला येणार होता.  CST ला गेल्यावर फुजीला सजवायचे असल्याने आम्ही सायकल चालवतच CST ला जाण्याचे ठरवले. पुन्हा एकदा मी आणि संजय आधी वाटेत भेटायचे ठरवले. फुजीबरोबर तिला सजवायचे साहित्य पाठीवर घेत अस्मादिकांची स्वारी निघाली तेव्हा भास्कराचार्य अवतरले होतेच. आजही ठरल्यापेक्षा थोडा उशीर झाला होता. शीळ फाटा, महापे ऐरोली मार्गे मी पूर्व द्रुतगती मार्ग गाठला. संजयजी माझी वाटच पाहत होते. खरतर आता भूक लागली होतीच. मात्र आम्ही कूच करायला सुरुवात केली. 

सुमितला night shift वरून घरी यायला उशीर झाला असल्याचे त्याने कळवले. पूर्व द्रुतगती मार्गावर सायकल चालवायला मजा येत होती. घाटकोपर पार केले खरे मात्र पुढे महामुंबईतील वाहतूक व्यवस्थेने मात्र आमच्या चाकांना चांगलाच लगाम घातला. मिळेल तशी वाट काढत आम्ही गोगलगायीच्या गतीने जाऊ लागलो. दादर TT येथे आनंद आमची वाट पाहत होता. आम्ही तिथे पोचताच आम्हाला ' आनंद ' होईल असा प्रश्न त्याने विचारला.... चहा घेणार का! माझी चहाची आवड माहीत असल्याने त्याने चहाकेंद्र हेरूनच थांबा घेतला होता. उदरभरण करणेही आवश्यक होते. मात्र तिथे अन्य काही दिसत नव्हते. त्यामुळे डबल चहा आणि बिस्कीट ढोसून आम्ही परत पुढे निघालो. एकदा CST गाठून सायकल रेल्वेच्या हवाली केल्या की मगच उदरभरण करू असे ठरवले. पुन्हा एकदा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा सामना करत CST गाठले. 



आनंदचा एक मित्र CST येथे रेल्वेमध्येच कामाला होता. तो आम्हाला मार्गदर्शन करायला येणार असे समजले. आनंद आणि त्याची फोनाफोनी होईपर्यंत मी सुमितचा अंदाज घेतला. आनंद आणि त्याचा मित्र पार्सल ऑफिसला चौकशी करायला गेले तोच हेमंत जाधवने आम्हाला पाहिले. तोही CST येथे रेल्वेमध्ये कामाला होताच शिवाय अतिशय चांगला सायकलपटू, मार्गदर्शकही होता. रेल्वेने सायकल पाठवायची ठरले तेव्हा सर्वप्रथम मी त्यालाच फोन करून सल्ला घेतला होता. त्याला आमच्या मोहिमेची कल्पना होतीच. इतक्यात सुमितही तेथे पोचला. आमच्या मोहिमेत तीन सदस्य होते आणि आम्हाला सहकार्य करायला हे आणखी तीनजण हजर होते. हेमंत देखील आमच्या बरोबर पार्सल ऑफिसला आला. पार्सल ऑफिस लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या शेवटच्या फलाटाच्या अगदी शेवटच्या टोकाला होते.

आनंदच्या मित्राने पार्सल ऑफिस मध्ये आमची सोय लावून दिली. कागदपत्रांची बाजू हेमंत पाहत होताच. आता सायकलला व्यवस्थित आवरण घालून त्या रेल्वेच्या हवाली केल्या की आम्ही मोकळे होणार होतो. आनंदचा मित्र आणि हेमंत परत निघाल्यावर सुमितने सायकलींचा ताबा घेतला.



 प्रत्येक सायकलचे महत्वाचे भाग आच्छादले जातील ह्यासाठी तो कसोशीने पाहत होता. सुमित एक टेक्निशियन म्हणून आमच्याबरोबर असावा अशी माझी इच्छा होती. तो बरोबर असला तर सहाय्य वाहनाची गरज भासणार नाही असा माझा ठाम विश्वास होता. सध्यातरी त्याची मदत सायकल पाठवण्यापुरती मर्यादित होती. आनंद त्याचा खारीचा वाटा उचलत होता. मी मात्र ' मदत न करणे ' हीच माझी मदत असेल असे समजून फक्त लागेल तसे साहित्य पुरवणे इतकेच पाहत होतो. पोटातील कावळे कोकलून त्यांचा आवाज बसला होता. मनाप्रमाणे PACKING झाल्यावर आम्ही सायकली रेल्वे कर्मचारी शाहरुख ह्याच्या सुपूर्द केल्या. तोच गाडीमध्ये सायकल नेवून ठेवणार होता. त्यालाही थोडे खुश केले. हे सगळे होईपर्यंत सुमारे साडेतीन वाजले असावेत.


शाहरुखकडे सोपवून फुजीचा निरोप घेतला. पुढील तीन दिवस सरावासाठी माझी लाडकी श्विन होतीच. तीन दिवसांनी मात्र कोलकातापासून चेन्नईपर्यंत फुजीचीच साथ मिळणार होती.

एव्हाना भूक चांगलीच कडाडली होती. पोटातील कावळ्यांना ओरडण्याचेही त्राण उरले नव्हते. मात्र मी संधी हेरली... CST समोरील हॉटेल शिवाला माझे आवडते ठिकाण. बऱ्याच वर्षांनी CST समोरील शिवाला हॉटेल मध्ये खाण्याचा योग मला लाभला होता. शिवाला मध्ये काउंटरवर पूर्वी पान बनवून ठेवलेले असायचे. ते अतिशय सुरेख असायचे. त्यामुळे ३२- ३३ वर्षांपूर्वी मी येथला नियमित सदस्य होतो. CST ची संगत सुटल्यावर ' शिवाला ' ही लांब राहिले होते. सायकली शाहरुखच्या हवाली केल्यावर मात्र सुमित, आनंद आणि संजय ह्यांना घेऊन आज पुन्हा शिवालातील भोजनाचा आनंद घेतला. आता प्रतीक्षा होती आम्हा तिघांच्या प्रयाणाची...

शुक्रवार, १४ मार्च, २०२५

पूर्वतयारी भाग १३: सूर्यपरीक्षा (कोलकाता चेन्नई सायकल सफर)

कोलकाता येथील मोर्चेबांधणी तर झाली होती. आमचा मार्ग आता पक्का होत असला तरी त्यातील टप्प्याचे गणित सोडवता येत नव्हते. पहिल्या तीन दिवशी सरासरी १६० किमी अंतर पार केले तर कोणार्क, पुरी येथून समाधानाने परत महामार्गाला लागता येईल असे दिसत होते. दरम्यान विवेक करमरकरने त्याच्या मित्राच्या मदतीने भुवनेश्वर येथे राहण्याची सोय होत असल्याचे सांगितले. मात्र तसे केल्यास आमचे गणित बदलून नंतर एखाद्या दिवशी १८०- २०० किमी सायकल चालवणे आवश्यक ठरणार होते.

आम्ही विमानाने ८ तारखेला कोलकाता येथे जाणार होतो. मात्र त्यासाठी आधी सायकल तर कोलकाता पर्यंत पोचवायला हव्या होत्या. आम्ही ट्रेन ने त्या सायकली ५ डिसेंबरला पाठवायचे ठरवले. म्हणजे सायकली ७ डिसेंबरला कोलकाता येथे पोचल्या असत्या.

सायकल पाठवण्याच्या आधी मी स्वतःची पुन्हा सराव परीक्षा घेण्याचे ठरवले. सूर्योदय ते सूर्यास्त ह्या वेळात डोंबिवलीहून पालीला गणपतीचे दर्शन घेऊन परत घरी पोचायचे असे ठरवले. संजय आणि आनंद हे मात्र येऊ शकणार नव्हते. सूर्य नेमका त्या(ही)दिवशी मी उठायच्या बऱ्याच आधी उगवला. घड्याळातील काटेही सकाळी बहुधा खूप वेगात धावले होते. मी फुजीला घेऊन निघालो तोपर्यंत जवळपास ८.०० वाजले होते. एक वाजेपर्यंत जिथे असेन तिथे पोचून परत फिरायचे मी ठरवले होते. तरच सूर्यास्तापर्यंत घरी परतू शकतो असे दिसत होते. त्यावेळेपर्यंत पालीला पोचायचे तर सरासरी वेग साधारण २० चा आवश्यक होता. फुजीने कोणतीही तक्रार न करता तो वेग घेतला. दरम्यान मध्यंतरी अप्पांकडूून पानियार आणले होते. तेही फुजीला लावले होते. 

फुजी दौडत होती. पनवेल, पळस्पे फाटा मागे पडले... ' दोस्ती चाय ' कडेही मी दुर्लक्ष केले कारण डोळ्यासमोर सूर्य आणि घड्याळ धावत होते. अर्धशतकी अंतर कापल्यावर एक मोठ्या झाडाच्या सावलीत थांबा घेतला. तिथे उदरात इंधन भरून पुन्हा धाव घेतली. खोपोलीपुढे जात असताना सूर्य तळपत होता. वाटेत दिसणारे नीरा केंद्र खुणावत होते. जीभ, ओठ कोरडे पडले होते. मात्र काम, काळ, वेग हे शाळेत पंख्याखाली बसून सोडवलेले गणित इथे प्रत्यक्ष अनुभवात सोडवणे कठीण होत होते. शाळेतील गणितात ह्या त्रैराशिकाशिवाय तहान, भूक, ऊन, पाऊस, थंडी ह्या आणि इतर गोष्टींचा विचार नसतो. निराकेंद्राकडे न पाहता मी पुढे निघालो. मात्र उन्हाचा तडाखा फारच जाणवू लागला तसा फुजीला रस्त्याच्या कडेला लावले. पाणी पिऊन ओठ आणि जीभ सुखावले. पाण्याने चेहरा धुतला, पाठीच्या कण्यावरून पाण्याची धार सोडली. पाचदहा मिनिटे गेल्यावर पुन्हा ताजातवाना झालो. मात्र ह्या गडबडीत काळाच्या तुलनेत काम आणि वेग मागे पडले. फुजीने पुन्हा वेग घेतला.

मी गणित थोडे बदलून अर्ध्या तासाचा अवधी वाढवला. मात्र तरीही दीड वाजेपर्यंत फुजी पेडली गावापर्यंत पोचू शकली. सूर्य जणू कोपला होता. तो अक्षरशः आग ओकत होता. पाली अजूनही ११ किमी दूर होते. पाली गणपतीची बहुधा आजही मला दर्शन देण्याची इच्छा नव्हती. भुकेची जाणीव होत होतीच. काळाच्या आकडेमोडित भुकेची वेळही धरावी लागणार होती. त्यामुळे मी पेडलीहून परत फिरायचे ठरवले. एव्हाना जवळपास ९२ किमी अंतर पार झाले होते. पेडलीहून मी मागे फिरलो. एका बस स्टॉपच्या सावलीत पद्धतशीर डबे काढले. 

दरम्यान आप्पांचे खुशाली विचारणारे मेसेज आले होते. त्यांना उत्तर धाडत माझा थकवा पळून गेला असे वाटत होते. मी परतीच्या प्रवासाला लागलो. मात्र उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला. दर पाच दहा मिनिटांनी तहान लागू लागली. मी कधीही थंड पाणी पित नाही. मात्र वाटेत थंड पाण्याची बाटली घेतली. त्या पाण्याने चेहरा धुतला. पाठीवरच्या कण्यावरही थंड पाणी ओतले. थोडे पुढे गेलो पण परत परत तहान लागत होती. आता मात्र नीरा प्राशन केले. दर दहा मिनिटांनी दोन दोन घोट पाणी पित कसाबसा खोपोली पार करून खोपोली पनवेल महामार्गाला लागलो.

थोड्या अंतरावर चहाकेंद्र दिसले. तिथे चहा बिस्किटे खाल्ली मात्र तरी हुशारी येईना. तिथे थोडी मोकळी जागा होती. तिथे जमिनीवर आडवा पडलो. बरोबर दोन तीन प्रकारचे लाडू होते ते खाऊन पुन्हा चहा घेतला. पुन्हा एकदा चेहरा आणि पाठीवर पाण्याचा प्रयोग केला. एव्हाना चार साडेचार झाले असावेत. असे वाटत होते की सरळ एखादे वाहन पकडून त्यात सायकल टाकून घरी जावे. आता सूर्यास्तापर्यंत घरच काय पनवेलही गाठता येईल का ह्याची शंका वाटू लागली.

जवळपास पाऊण तास विश्रांती झाल्यावर मात्र नाईलाज झाल्यासारखा उठलो आणि फुजीचे पेडल दाबले. फुजी आता सहजपणे जाऊ लागली होती. सूर्यदेवही परतीच्या वाटेला लागला होता. त्याचा त्रागा ओसरला होता. सूर्यास्ताच्या सुमारास पनवेल गाठले होते. मात्र फुजी आता थांबायला तयार नव्हती. उन्हाचा तडाखा थांबल्यामुळे पुन्हा एकदा एनर्जी लेव्हल वाढली होती. त्यामुळे फुजीने कोणताही थांबा न घेता घर गाठले.

घरी परत पोचेपर्यंत ठरवल्याप्रमाणे २०० किमी अंतर पार झाले होते. ह्यासाठी साधारण १२ तास सायकल चालवावी लागली होती. मात्र सूर्याने घेतलेल्या परीक्षेमुळे पाली गणपतीचे दर्शन घेण्याची सलग दुसरी संधी हुकली होती.

रविवार, २ मार्च, २०२५

पूर्वतयारी भाग १२: चिलिका लेकची हुलकावणी: कोलकाता चेन्नई सायकलसफर


बेलूर मठ येथील व्यवस्थापनाने हिरवा कंदील दाखवल्याने मला निश्चितच समाधान वाटत होते. त्याचवेळी मनात आले की ही मोहीम कोलकाता येथील रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठापासून सुरू होत आहे तर त्याचा समारोप चेन्नई येथील रामकृष्ण मठ येथे करता आला तर....!

चेन्नई येथील रामकृष्ण मठ व्यवस्थापनाला मेल केल्यावर त्यांचे आलेले उत्तर भावनांनी ओथंबलेले होते. त्यांना आमची मोहीम खूप कौतुकास्पद वाटत होती. खरतर फिट इंडिया ही संकल्पना विवेकानंदांच्या सुदृढ भारत ह्या संकल्पनेशी मिळतीजुळतीच होती. विवेकानंदांनी नेहमीच युवकांना देश सुदृढ रहावा ह्याविषयी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला. आपला देश सुरक्षित ठेवणे ही त्यांची प्राथमिकता होती. अर्थातच विवेकानंदांचे कार्य पुढे नेणाऱ्या रामकृष्ण मठाच्या चेन्नई व्यवस्थापनाने आमची कल्पना चांगलीच उचलून धरली. पश्चिमी देशांचा दौरा केल्यानंतर चेन्नई येथे विवेकानंद जिथे राहिले होते त्या विवेकानंद हाऊस येथे आमच्या मोहिमेचा समारोप करावा अशी सूचना त्यांनी केलीच. शिवाय माझ्या विनंतीप्रमाणे आमची तीन दिवस राहण्याची व्यवस्थाही करत असल्याचेही त्यांनी कळवले. 

Sponsorship मागण्यामागचा माझा हेतू खरतर आता सफल झाला होता. त्यामागे मला आर्थिक मदतीपेक्षा वेगवेगळ्या संस्थांशी जोडले जावे हाच हेतू होता. तो आता पूर्ण होत होता. कोलकाता व चेन्नई येथील रामकृष्ण मठ येथे व्यवस्था होत असल्याचे निश्चित झाल्यावर मी वाटेत संस्थेच्या इतर ठिकाणांनाही विचारणा केली. 

दरम्यान तौपालीचा मेसेज आला की तिला बाहेरगावी जावे लागणार असल्याने तिच्या घरी माझी व्यवस्था होऊ शकणार नाही. मात्र त्याचवेळी तिने हेही कळवले की तिने तिच्या एका मित्राकडे आमची राहण्याची व्यवस्था केली आहे. मी तिला गमतीने म्हटले आमची राहण्याची व्यवस्था तर तू केलीस पण आम्हाला आता तू देत असलेल्या बंगाली मेजवानीचा आस्वाद घेता येणार नाही. तिने लगेचच उत्तर दिले तिचा मित्र आम्हाला बंगाली पदार्थांची मेजवानी नक्कीच देईल.

कोलकाता येथील मोर्चेबांधणी झाली होती. त्याचबरोबर एकूण अंतर पार करण्याचे टप्पे ठरवताना रोजचे अंतर आणि राहण्याची ठिकाणेही/ शहरेही निश्चित करायची होती. वाटेत लागणारी मुख्य शहरे लक्षात घेत मांडणी करत असताना मोहिमेचा चौथा दिवस थोडा लक्षणीय ठरणार होता असे दिसत होते. पहिल्या तीन दिवसाचे अंतर जास्त ठेवले तर त्या दिवशी कोणार्क, पुरी येथील मंदिर पाहण्यास योग्य वेळ देता येणार होता. तसेच तिथून पुढे सातपाडा येथून जन्हिकुडा येथे बोटीने चिलिका लेक ओलांडून पुढे पुन्हा महामार्गाला जावे लागणार होते. हा जलप्रवास नक्कीच अविस्मरणीय असणार होता. ह्या जलप्रवासाविषयी काही व्हिडिओ पाहिले तर ते चांगलेच रोमांचक होते. त्यामुळे त्या प्रवासाची उत्सुकता जाणवू लागली होती. जन्हिकुडा येथून महामार्ग अंदाजे ६० किमी लांब होता. तोपर्यंत राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही असे समजत होते. त्यामुळे सकाळची फेरीबोट पकडून पुढे सायकल चालवणे इष्ट होते.

दरम्यान आमच्या मोहिमेविषयी विशाखापट्टणम येथील सायकल समूहावरही बातमी पोचली होती. तेथील एका सायकलपटूचा फोन आला. त्यालाही विशाखापट्टणम येथून आमच्या मोहिमेत सहभागी व्हायचे होते. हा तर अनपेक्षित लाभ होता. स्थानिक सायकलपटू मोहिमेत असेल तर आम्हाला मार्गाचे योग्य मार्गदर्शनही मिळणार होते. मी त्याला आनंदाने मोहिमेत सामील करून घेतले. मात्र त्याने एक बातमी दिली की सातपाडा ते जन्हिकुडा येथील बोट हिवाळ्याच्या दिवसात फक्त दुपारी असते. त्यामुळे आम्हाला बोटीच्या मार्गाऐवजी पुरी येथून सातपाडा येथे न जाता चिलिका लेकच्या बाजूने महामार्गानेच दक्षिणेकडे जावे लागणार होते. त्याचवेळी त्याने आम्हाला वाटेत एक नितांतसुंदर आणि निसर्गसंपन्न असे एक ठिकाण वाटेत राहण्याविषयी सुचवले... ते म्हणजे.. बाळूगाव.

आमची सफर सुरू होण्याअगोदरच आमचा मार्ग बदलावा लागत असल्याची सूचना मिळाली होती. चिलीका लेक मधून प्रवास करण्याच्या रोमांचक प्रवासाला आम्हाला मुकावे लागणार होते. 

शनिवार, १ मार्च, २०२५

पूर्वतयारी भाग ११: तिन्ही घरचा पाहुणा: कोलकाता चेन्नई सायकलसफर

सायकलने भारतभ्रमण करत असताना केवळ विविध ठिकाणे पाहणे एवढाच मूलभूत हेतू नाही. तर अश्या मोहिमा करत असताना वेगवेगळ्या व्यक्ती, संस्था ह्यांच्याशीही संबंध जोडले जावे हाही हेतू असतो. चिंचवड - पुणे येथील काही मित्रांनी रामकृष्ण मठाच्या सहाय्याने काही वर्षांपूर्वी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल सफर केली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर मी तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमामध्ये राहिलो होतो. तलासरी येथून त्या मित्रांबरोबर डोंबिवली येथे सायकलने येताना वाटेत सकवार येथील रामकृष्ण मठ येथे भेट दिली होती. तेव्हा रामकृष्ण मठाच्या कार्याविषयी उत्सुकताही निर्माण झाली होती.

पुढे तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य पाहणारे श्री वसंत भुसारा ह्यांच्याशी नियमित संपर्क सुरू झाला. पुणे जम्मू सायकलसफर करत असताना पुन्हा एकदा तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्र येथे राहण्याचा योग आला होता. तर कन्याकुमारी चेन्नई मोहीम करत असताना वनवासी कल्याण आश्रमाचे त्रिवेंद्रम येथील पदाधिकारी परिचित झाले होते. 

कन्याकुमारी चेन्नई सायकल मोहिमेचा शुभारंभ विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथून करत असताना तेथेही एक रात्र मुक्काम झाला होता. विवेकानंदांच्या कार्याविषयी कुतूहल वाटू लागले होते. विवेकानंदांचे चरित्र वाचत असताना लक्षात आले की रामकृष्ण मठ/ मिशनची सुरुवात विवेकानंदांनीच केली होती. कोलकाता येथील बेलूर मठ हे रामकृष्ण मठ/ मिशनचे मुख्यालय आहे. सन १८९७ मध्ये विवेकानंद ह्यांनीच बेलूर मठाची स्थापना केली होती.

ह्या सर्व गोष्टींची जाणीव होताच मी आमची मोहीम कोलकाता येथील बेलूर मठ येथून सुरू करण्याचे ठरवले. बेलूर मठ येथे email पाठवून आमची मोहीम बेलूर मठापासून सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. बेलूर मठाच्या व्यवस्थापनाने अतिशय आनंदाने आमची विनंती मान्य केली. इतकेच नव्हे तर आमची तिथे राहण्याची सोय होईल असेही कळवले होते. शिवाय आमची मोहीम कधी सुरू होणार, त्यावेळी आणखी कोणी उपस्थित असणार आहे का, अशी विचारणाही केली. आमच्या मोहिमेविषयी त्यांनाही कुतूहल वाटत होते.

खरतर श्री केळकर ह्यांना संपर्क होण्याअगोदरच आमची सर्व व्यवस्था होण्याची खात्री बेलूर मठ येथील व्यवस्थापनाने दिली होती. बेलूर मठ येथे भेट दिल्यास, तिथे मुक्काम केल्यास विवेकानंदांच्या कार्याविषयी रामकृष्ण मठ/ मिशन विषयी प्रत्यक्ष माहिती घेता आली असती. रामकृष्ण मिशनच्या कामकाजाविषयी कुतूहल होतेच. त्यामुळेच आमच्या मोहिमेचा शुभारंभ बेलूर मठ येथूनच सुरू करण्याचे मी ठरवले होते.

. ....खरतर मी बेलूर मठ येथे मी राहण्याविषयी नव्हे फक्त मोहिमेचा शुभारंभ करण्याची परवानगी मागितली होती, केळकरांनाही मी त्यांच्याकडे राहायला येण्याविषयी नव्हे तर कोलकाता येथे पोचल्यावर सायकल दुरुस्ती आणि सहाय्य वाहन ह्या संदर्भात मदत मागितली होती. मात्र दोन्हीकडून स्वतःहून आमची राहण्याचीही सोय केली असल्याचे कळवले होते. तौपालीने आमच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती.

तीनही ठिकाणी राहण्याची व्यवस्था होत असल्याची खात्री झाली होती. एकंदरीत कोलकाता येथे पोचल्यावर मुक्कामाचा प्रश्न सुटला होता... किंबहुना आता नक्की कोणाला होकार द्यायचा आणि कोणाला नकार द्यायचा.. तोही कसा...हा उलट प्रश्न मला पडला होता. मी अजून कोणताही निर्णय घेतला नव्हता......घेऊ शकत नव्हतो.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...