झोप आणि भूक ह्या खऱ्या मूलभूत गरजा आहेत ह्याचा साक्षात्कार आम्हाला आज होत होता. सकाळी शांत झोप झाल्यामुळेच आम्ही ताजेतवाने झालो होतो. आणि आता भूक भागल्यामुळेच पुन्हा एकदा पुढील चढाईसाठी सज्ज झालो होतो. सकाळपासून आम्हाला येणाऱ्या अनुभवांमुळे सायकल चालवणे कमी आणि थांबे किंवा विश्रांतीच जास्त झाली होती. त्यामुळे आता सलग लांब पल्ल्याचे सायकलवणे करण्याला पर्याय उरला नव्हता.
आनंदच्या आणि माझ्या सायकलची शुश्रुषा व्यवस्थित झाल्यामुळे त्या दोघीही आता छान साथ देऊ लागल्या होत्या. मी, संजय आणि आनंदने आता मात्र चांगला वेग घेतला. खरतर आमचे जेवण होऊन आम्ही पुन्हा सायकलवणे सुरू करेपर्यंत चार वाजले होते. मुंबईकरांची ती तर चहाची वेळ! पण आम्ही नेमके जेवण आटोपले होते.
तिघांनीही आता छान लय साधली होती. मात्र हे काय? तासाभरातच सुर्य अस्ताला जात असल्याच्या खुणा दिसू लागल्या. मात्र आजची राहण्याची कोणतीही सोय झाली नव्हती. खरगपूर येथे हॉटेल मिळू शकेल असे वाटत होतेच. शिवाय तिथे रामकृष्ण मठही होता. वेळ पडल्यास त्यांनाही विनंती केली असती. मात्र खरगपूरला जाऊन हॉटेल शोधण्यासाठी तिथे उजेडात पोचणे आवश्यक होते. आता ती शक्यता धूसर झाली होती. त्यामुळे मी गुगलबाबांच्या मदतीने वाटेत कुठे हॉटेल मिळू शकेल ह्याची चाचपणी केली. वास्तविक खरगपूर च्या साधारण १५- २० किमी आधी चेन्नईकडे जाणारा महामार्ग वळतो. त्यामुळे खरगपूरला न जाता तिथेच एखादे हॉटेल मिळाले तर हवे होते.
आम्ही देबरा गावाजवळ पोहोचलो. साधारण सलग ४० किमी अंतर पार झाले होते. संध्याछाया केव्हाच लोपल्या होत्या. गाव तसे फारच छोटेसे. साधारण २५०० लोकवस्ती. एक चहाचे दुकान मात्र हमरस्त्याला लागून होते. चहा तर हवाच होता. आम्ही चहा घेत असतानाच आजूबाजूचे लोक कुतुहलाने आमची चौकशी करत होते. खरगपूर शहरातील एक युवक कामावरून कोलकात्याच्या दिशेकडून खरगपूरला त्याच्या दुचाकीवरून परत जात होता. तोही आम्हाला सामील झाला. त्याने आम्हाला सांगितले की साधारण २० किमी वर तुम्हाला राहायला चांगले हॉटेल मिळेल. त्यामुळे आम्हाला नक्कीच हायसे वाटले. त्याने आम्हाला चहाचे पैसेही देऊ दिले नाहीत.
एव्हाना चांगलाच अंधार पडला होता. आम्ही सायकलींचे दिवे सुरू केले. संजयने आता आघाडी घेतली. मी मध्ये राहिलो आणि आनंद मागे होता. आनंद थोडा मागे राहत असल्याने मी वेग कमी केला. एक नियम मी ठरवला होता. पुढील सायकलपटू पुढे निघून गेला तरी त्याला गाठायचा प्रयत्न न करता मागील सायकलपटूला साथ करायची. ह्याचे कारण पुढील सायकलपटूला काही झाले तरी आपण मागून जाणारच असतो. मात्र मागील सायकलपटूला काही झाले तर कळणारही नाही. संजय थोड्याच वेळात दिसेनासा झाला.
मी आणि आनंदने आता हॉटेल शोधायला सुरुवात केली. एवढ्या महत्वाच्या महामार्गावर हॉटेल दिसतच नव्हते. एक साधारणसे हॉटेल दिसल्यावर आम्ही तिथे शिरलो. राहण्याची व्यवस्था विचारल्यावर त्यांनी लगेचच होकार दिला. आम्ही संजयला परत मागे येण्यासाठी फोन करणार इतक्यात त्या स्वागत कक्षातील इसमाने महत्वाची माहिती दिली. तो म्हणाला तुम्हाला जी रूम मिळणार आहे तिथे रात्री १२- २ वाजेपर्यंत आवाज येत राहतील. आम्हाला काही कळेना. तो पुढे म्हणाला रात्री छतावरून आवाज येत राहतील. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. त्याने पुढे पुस्ती जोडली. इथे रात्री नाचण्याचे कार्यक्रम असतात. त्यांच्या पायांचे आणि संगीताचे आवाज येत राहतील. हे सगळे सांगताना माझ्या बाजूला आनंद उभा होता. तो आता निवृत्त झाला असला तरी त्याचे पद कळल्यावर तो हॉटेलवाला हे सांगू शकला असता का ह्याचे मला कोडे पडले होते.
त्या इसमाचे स्पष्ट माहिती दिल्याबद्दल आभार मानून आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात संजयचा फोन आला. पूर्ण अंधार होता आणि जवळपास खुण सांगता येईल असे काहीही ठिकाण नव्हते. त्यामुळे तो आणि आम्ही ह्यांच्या मध्ये किती अंतर पडले होते हे सांगता येत नव्हते. मी संजयला आहे तिथेच थांब असे सांगितले आणि पुढे जाण्यासाठी सज्ज झालो. आनंदला सांगितले चल सुरू करूया. अंधारात मागे आनंदच्या सायकलचा दिवा दिसत होता. मात्र त्याची सायकल सुरू होताना दिसत नव्हती. मी हाका मारून पाहिल्या तर प्रत्युत्तरच मिळेना. मग मात्र मी फुजीला रस्त्याच्या कडेला थांबवून आनंदच्या सायकलकडे गेलो. पाहतो तर ती बिचारी एकटीच तिथे उभी होती. त्यावरील स्वार गायब झाला होता. अंधारात काहीच कळत नव्हते. एक फुटावरीलही काही दिसत नव्हते. अखेर मी थोडा मागे गेलो तर आनंद फोनवरून संजयशी बोलत होता. मी त्याला निघायची घाई करू लागलो. तर तो म्हणाला संजय आपल्या मागे आहे. आपण थांबूया तो येईपर्यंत. मी म्हटले हे शक्यच होणार नाही. तो रस्ता सोडून कुठे वळला असेल तरच आपण त्याला मागे टाकू शकलो असतो. आम्ही उभे होतो त्या हमरस्त्याच्या पलीकडे एक छोटेसे हॉटेल होते. त्याच्या नावावरून एका स्थानिकाने संजयला आम्ही मागे असल्याचे सांगितले असे आनंद म्हणू लागला. मी पाहिले तर ते अगदीच छोटे हॉटेल होते आणि नाव अगदीच सर्वसाधारण होते. मी ह्यावर ठाम होतो की संजय मागे राहू शकत नाही कारण आम्हीच बऱ्यापैकी मागे होतो शिवाय वाटेत एका हॉटेलमध्ये चौकशी साठीही थांबलो होतो. संजय मात्र न थांबता पुढे गेला होता. तरीही आनंद पुढे यायलाच तयार नव्हता. मी संजयला त्याचे लोकेशन पाठवायला सांगितले. आनंदचे म्हणणे होते की आपण स्थानिकांवर विश्वास ठेवायला हवा. मात्र ते हॉटेल इतके छोटे होते की तेवढ्या माहितीवर ते स्थानिक लोक योग्य माहिती देऊ शकतील ह्याची मला खात्री वाटत नव्हती. अशा नावाची दोनचार इतर हॉटेल इथे असली तर! शिवाय संजय मागे राहण्यासाठी कोणतीच शक्यता नव्हती. ह्या सगळ्या गोंधळात वेळ मात्र वाया चालला होता. शेवटी मी आनंदला म्हटले आता पूर्ण रात्र रस्त्यावर काढायची वेळ येईल. मला हे नक्की माहीत आहे की संजय आपल्या पुढेच आहे. संजयलाही मी सांगितले तू आमच्या मागे असणे अशक्य आहे त्यामुळे आहे तिथेच थांब. शेवटी अर्धा तास तिथे गेल्यावर आनंद पुढे यायला तयार झाला. जेमतेम २-४ किमी अंतरावर पुढे संजय दिसला. आता मात्र मी पुढे राहिलो. कारण संजय पुढे असताना मागे वळून बघत नव्हता आणि पुन्हा अश्या गोंधळात वेळ घालवायला माझी तयारी नव्हती. मात्र लगेचच मला संजयची अडचण लक्षात आली. अंधारात मान वळवून बघणे शक्य नव्हते. मात्र मी आता अगदी कमी वेगात जात ते दोघेही मागे आहेत ह्याची थोड्या अंतरात थांबून खात्री करत जाऊ लागलो.
चेन्नईकडे जाताना खरगपूरच्या आधी २० किमी अंतरावर एक फाटा फुटतो तिथे एक हॉटेल आम्हाला दिसले. अक्षरशः वाळवंटात मृगजळ दिसावे अशी माझी अवस्था झाली होती. कोलकाता पासून असे मोठे हॉटेल दिसले नव्हते. ग्रीनलँड टॉवर ह्या हॉटेलपाशी जाताच ते थोडे महागडे हॉटेल असल्याचे जाणवले.
मी थोडी घासाघीस केली. त्यांना आमची मोहीम आणि मोहिमेचा उद्देश सांगितला. आनंद आणि संजय हॉटेलच्या आवारातच यायला तयार नव्हते. शेवटी मीच बाहेर गेलो आणि त्यांना भाडे सांगितले. आनंदने ते भाडे ऐकताच नकार दिला. तो म्हणाला आपण जवळपास राहायची दुसरी काही व्यवस्था होते का ते पाहू. मी त्याला म्हटले आत्ताच रात्रीचे ९ वाजून गेले आहेत. हे ठिकाण मुंबईच्या १ तास पुढे आहे. म्हणजे मुंबईच्या दृष्टीने रात्रीचे १० वाजले आहेत. आज आपण जवळपास सव्वाशे किमी अंतर पार केले आहे हे खरं. मात्र आजचे राहिलेले ३० किमी उद्या भरून काढायचे तर उद्या १८० किमी अंतर पार करावे लागेल. त्यासाठी पहाटे ६ ला निघावे लागेल. ह्या सगळ्याच्या विचार करता आपल्याला ताबडतोब विश्रांती आणि झोप घेण्याची गरज आहे. शिवाय इथे आसपास कोणतेही हॉटेल सापडण्याची शक्यता नाही. अखेरीस आनंद तिथे राहायला तयार झाला.
आम्ही रूम मध्ये विसावलो आणि मी दिवसभरातील 'काय आप्पा ' वरील संदेश पाहू लागलो. मोनिकाचा संदेश आला होता की माझी मुंबई एअरपोर्टला हरवलेली बॅग सापडली आहे... दिवसभरातील शीण पूर्णपणे उतरला. त्या आनंदात रात्रीचे जेवण माझ्याकडून असल्याचे जाहीर केले. अखेर म्हणतात ना ज्याचा शेवट गोड ते सगळेच गोड... तशीच आजच्या दिवसाची सांगता नक्कीच चांगली झाली होती. पहिला मुक्काम आरामदायी आणि आनंदाचा होता.













