शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

साठा उत्तराची कहाणी

रविवार दिनांक २९ अग्रहायण १९४२
अशास्त्रीय, युरोपियन ख्रिस्ती दिनांक २० डिसेंबर २०२०


आज पहाटे जरा लवकरच जाग आली. उठल्याबरोबर मी फुजीकडे गेलो. तिचे टायर फुरफुरत होते. आज सुट्टी असल्यामुळे थोडे फार लांब जायला मिळणार याची तिला खात्री होती. मी पेडल रिपब्लिक समूहावर पाहिले. त्यातील सदस्य आज पिसे डॅम येथे जाणार होते. मला आज 175 किलोमीटर चे लक्ष्य करायचे होते. पेडल रिपब्लिक या गटातील सदस्यांबरोबर पिसे डॅम ला जाऊन पुढे नाशिकच्या दिशेने जाऊन आजचे लक्ष्य लक्ष पार करायचे मी ठरवले. नेहमीप्रमाणेच घरून निघेपर्यंत मला उशीर झाला होता. पेडल रिपब्लिकचे सदस्‍य त्यांच्या नियोजित वेळेनुसार पुढे गेले होते. रविराज त्यांची सहस्त्र किरणे धरित्रीवर पसरवू लागल्यानंतर फुजी बाहेर निघाली. गेल्या रविवारी द्विशतकी धाव घेतल्यावर श्विनला आरामाची आणि शुश्रूषेची गरज होती. त्यामुळे सध्या फुजीचेच राज्य होते. फुजीवर स्वार होऊन मी पिसे डॅमला पोचलो तेव्हा कल्याणहुन आलेले चार-पाच सायकलपटू दिसले. त्यांच्याशी ओळख करत गप्पागोष्टी करत असताना माझी नजर मात्र पेडल रिपब्लिकच्या सदस्यांना शोधत होती. पेडल रिपब्लिक समूहातील कोणीही सदस्य तिथे दिसत नव्हता. मग मी डॉक्टर राहुल घाटवळ यांना भ्रमणध्वनी लावला तेव्हा कळले की ते आदल्या रात्री 175 किलोमीटर सायकल चालवून घरी सकाळीच पोचले होते. हे रात्रीचे सायकलवणे त्यांना पुरणार नाही असे वाटल्याने, लगेच पिसे डॅम ला ही जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र वाटेत रहदारीमुळे त्यांचा एक दीड तास वाढला. त्यामुळे त्यांनी पिसे डॅम चा बेत रद्द केला. 

घाटवळ पिसे डॅम ला आले नसल्याचे कळताच मी प्रसादला फोन केला. त्याने सांगितले की सगळेजण तिथे नदीपाशी गेले आहेत. त्यामुळे मी कल्याणमधील आलेल्या सदस्यांबरोबर बोलत असतानाच सुमित मोकल तिथे आला त्यानेही प्रसादला फोन केला होता सुमितला नदीकडे जायचा रस्ता माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.  त्यामुळे मी त्याच्या पाठोपाठ जाऊ लागलो. कल्याणचे सायकलपटू सुद्धा आमच्या बरोबरच येत होते. रस्ता बराचसा खराब होता. आम्हाला पेडल रिपब्लिकचे सदस्य कोठेच दिसेना. थोड्या वेळातच प्रसादचा फोन आला. तेव्हा समजले कि आम्ही रस्ता चुकलो होतो आणि थोडे फार पुढे गेलो होतो.

 पेडल रिपब्लिक च्या सदस्यांची भेट झाल्यावर रमेश काकांचे  अभिनंदन केले. २१ दिवस सायकलमोहिमेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. सगळेजण चहासाठी थांबले. चहा आणि वडापाव खाऊन झाल्यावर सगळ्यांचा जठराग्नी आणखीच जागृत झाला.  लगेचच काहीजणांनी मिसळची फरमाईश केली. 




मला 175 किलोमीटरचे लक्ष्य डोळ्यासमोर दिसू लागले. त्यामुळे अधिक वेळ न दवडता मी सगळ्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. सावर्डे नाक्याला उजवे वळण घेऊन पडघा टोलनाका गाठला. आता ठाणे नाशिक महामार्ग सुरू झाला होता. त्यामुळे आता वेगात जाता येईल अशी खात्री होती. मात्र लगेच टोलनाक्याला वाहनांची मोठी रांग लागलेली दिसली. फुजी एमटीबी श्रेणीतली नसली तरी बाजूच्या कच्च्या रस्त्यावरून पुढे जाणे भाग होते. फुजीने वाहनांच्या रांगेतून वाट काढत सुटका करून घेतली. मग मात्र फुजीला वेग मिळाला. महामार्ग असल्यामुळे रस्ता चांगला होता.

थोडे पुढे जाताच काही अंतरावर एक संत्रे वाला दिसला मोठ-मोठी रसाळ संत्री पाहून मोह पडला. संत्रे वाल्याकडून एक किलो संत्री घेऊन पाठीवरील सॅकचे वजन वाढवून घेतले. शहापूर मागे टाकून फुजी पुढे निघाली तेव्हा घड्याळ बाबा दहा वाजल्याचे सांगत होते. भुकेची जाणीव होऊ लागली होती. इतक्यातच महामार्गाच्या मध्यभागी एक छोटेसे देऊळ दिसले. जवळ जाऊन पाहताच त्या देवळाभोवतीची स्वच्छता नजरेस आली. 






सभामंडम नव्हताच, फक्त गाभारा आणि सभोवती लक्ख झाडलेले छोटेसे आवार. जवळपास कोणीच नव्हते. फुजीला आवारात उभे करून मी मी पाठीवरील सॅकमधून नाश्त्याचा डबा काढला. नाश्ता करत असताना त्या सुबक मंदिराभोवतीचे स्वच्छ आवार पाहून मन प्रसन्न होत होते. तेथून पाय निघत नव्हता. मात्र पुढील लक्ष्याची जाणीव तिथे फार वेळ थांबू देत नव्हती. मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेऊन मी पुढे निघालो. 

आटगाव- खर्डी पार करून आता कसारा जवळ येऊ लागला होता.



 Strava अजून पुढे जायला सांगत होता. कसारा मागे टाकून घाट सुरू झाला. फुजीला घाट चढण्यात मजा वाटू लागली.  थोडे पुढे जाताच इगतपुरी चे फलक दिसू लागले. मध्यान्ह उलटली होती. Stravaने 90 किलोमीटर अंतर पार करण्याचे सूचित केले की परत फिरायचे असे ठरवून फुजी घाट चढू लागली.



 घाटातील चढ फार तीव्रतेचा नसल्याने फुजी आरामात पुढे जात होती.  इगतपुरी साधारण 12 किलोमीटर लांब राहिले तेव्हा मात्र strava ने परत फिरायची परवानगी दिली. खरतर घाट पूर्ण चढुन इगतपुरी गाठण्याचा मोह होत होता. मात्र येथून परत घरी पोचेपर्यंत आजचे लक्ष्य पूर्ण होणार होते. त्यामुळे अधिक हव्यास न धरता मी फुजीचे हँडल वळवलेे.   
परत फिरल्याबरोबर घाट उतार सुरू झाला. त्यामुळे फुजीला लगेचच वेग मिळाला. फुजीने परतीच्या मार्गात कसारा पार केले. नाष्टा करून अडीच तास झाले असावेत. पुन्हा भुकेची जाणीव होत होती. ओठही कोरडे पडत होते. मात्र सावली मिळेल अशी जागा दिसेना. समोर एक चढ दिसत होता. फुजीने आस्ते कदम चाल केली. चढ पार होताच रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मंदिर दिसले. 






हेही मंदिर लहानच होते. दोन तीन पायऱ्या चढून गाभाऱ्यात प्रवेश करता येत होता. त्या पायऱ्यांवर एक म्हातारी बसली होती. मंदिराशेजारी पिण्याच्या पाण्याची टाकी होती. तहान आणि भूक दोन्हीची मागणी पूर्ण होणार याचा अंदाज आल्याने मी फुजीला थांबवले. मी पिण्याच्या पाण्याच्या टाकीकडे जाऊ लागलो तोच मागून म्हातारीचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. 
ती काय म्हणते आहे काहीच कळत नव्हते. मी टाकीचा नळ सोडून बघितले तर त्याला पाणी येत नव्हते. माझ्यापाठोपाठ म्हातारी तिथे आली आणि नळाला पाणी नसल्याचे सांगू लागली. मी शांतपणे मंदिराच्या पायर्‍यांकडे वळलो आणि म्हातारी मंदिराच्या मागील बाजूस निघून गेली. 

तेथील पायर्‍यांवर बसून मी संत्रे बाहेर काढले. संत्रे सोलत असतानाच मंंदिरामागून काही काट्याकुटाक्या गोळा करून म्हातारी पुन्हा पायऱ्यांवर येऊन बसली. त्याबरोबर मी म्हातारीलाही संत्र घेणार का असे विचारले. ऐकले न ऐकल्यासारखे करून म्हातारी समोरील आवार बसल्या बसल्या सावरू लागली. माझे संत्रे खाणे मी सुरू ठेवले. थोड्या वेळात म्हातारी पुन्हा पायऱ्यांवर बसली. मी पुन्हा संत्र घेणार का विचारताच मात्र म्हातारीने संत्र घेतले. म्हातारी खूष झाली होती. लगेचच माझी चौकशी करून तिने तिच्या घरच्या कहाण्या सांगायला सुरुवात केली. घरी दोन मुले आहेत मात्र ते मंदिराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मलाच मंदिराकडे पहावे लागते असे ती सांगत होती. कसारा जवळच्या तुकारामनगरहून ती मंदिरापाशी येते, स्वच्छता ठेवते आणि देवळाभोवती राखण करत दिवसभर थांबते. तिचा त्रागा सुरूच होता. सुना आणि मुले काहीच काम करत नाहीत, लग्न झाल्यावर मुले सुनांच्या नादी लागली अशी कर्मकहाणी सांगू लागली. म्हातारी चांगलीच बोलण्याच्या मूडमध्ये आली होती. 

इतक्यात एक टेम्पो तिथे आला. बसल्या जागेवरूनच त्यातील इसमाने एक नाणे मंदिरासमोर फेकले. त्याबरोबर म्हातारी त्या टेम्पोमधील इसमावर तोंडसुख घेऊ लागली. बहुधा तिला सांगायचं असावं, 'आज भी मै फेके हुये पैसे नही उठाती'.
टेम्पो मात्र केव्हांच पसार झाला होता. म्हातारी काय बोलत होती काहीच कळत नव्हते. टेम्पो लांब गेल्याचे पाहताच ती पुन्हा तिच्या मुला सुनांच्या मुद्द्याकडे वळली.

आता मात्र काढता पाय घेणे गरजेचे वाटू लागले. माझे संत्र खाणेही संपले होते. म्हातारीचा निरोप घेऊन मी मी तेथून निघालो. रस्ता उताराचाच होता. त्यामुळे पुन्हा लगेच वेग मिळाला. सूर्यनारायण डोक्यावर आल्यामुळे पुन्हा पुन्हा तहान मात्र लागू लागली होती. थोड्या थोड्या वेळाने पाणी पित मी पुढे जात होतो. पुन्हा एकदा खर्डी मागे टाकले. दीड-दोन चा सुमार झाला होता. ऊन चांगलेच लागू लागले. थोडावेळ आराम करून मग पुढे जावे, असा विचार मनात येऊ लागला. सकाळी ज्या मंदिरात नाष्टा केला होता, त्या मंदिराच्या आवारात थोडावेळ आडवे पडता येईल असा विचार करून मी पुढे सरकू लागलो. मात्र आता ओठ सारखे सुकू लागले. थोड्या वेळाने पाणी पीत मी जात असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला नीरा केंद्र दिसले. त्याबरोबर वेगात असलेल्या फुजिला थांबवून मी रस्ता ओलांडला. दोन निरा घशावाटे उतरल्यावर बरे वाटले. मंदिरापाशी जाऊन पुन्हा निरा प्यावी असा विचार करून दोन निरा बांधूनही घेतल्या. फुजी पुन्हा पुढे जाऊ लागली. आडगाव पार करून गेल्यावर थोड्या अंतरावर रस्त्याच्या मधोमध असलेले मंदिर पुन्हा दिसले. 



त्याबरोबर मी मंदिराकडे गेलो. माझ्याआधीच एक माणूस पहुडलेला दिसला. फुजिला बाजूला उभे करून मीदेखील आडवा झालो. हेल्मेट डोक्याखाली घेतले. पाचेक मिनिटे पाठीला आराम मिळाल्यावर मी पुन्हा ताजातवाना झालो. सॅकमधील संत्रे काढून सोलत असतानाच तिथे असलेला इसम जागा झाला. आमची नजरानजर होताच त्याने खुणेनेच प्यायला पाणी हवे असल्याचे सांगितले. मी माझ्या जवळील बाटली देऊ केली. पाणी पिऊन झाल्यावर तो पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला. मी माझे संत्रे खाणे सुरूच ठेवले. थोड्या वेळात तो बोलू लागला. तो भिवंडीपासून चालत आला होता. मला आश्चर्यच वाटले. तो पदयात्रा करत शिर्डीला जाणाऱ्या वाटसरूपैकी वाटत नव्हता. त्याला तो कुठे जाणार असे विचारताच नाशिकला जाणार असल्याचे त्याने सांगितले. पाठोपाठ भाऊ येत असून ती त्याची वाट पाहत आहे असे तो म्हणाला. माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य पाहून त्याने सांगितले तो घरून भांडून निघाला होता. त्याचा भाऊ स्वयंचलित दुचाकी घेऊन येत होता. त्याचीच वाट पहात तो मंदीरापाशी थांबला होता. त्याच्याजवळ एक छोटी पिशवी दिसत होती. घरून भांडून निघाल्यामुळे इतक्या वेळात त्याने काही खाल्ले असेल का असा विचार मनात येऊ लागला. माझ्या जवळील नीरा त्याला देण्याचा विचार करत असतानाच त्याने एक बिडी बाहेर काढुन शिलगावली. त्याचे मंदिराच्या आवारात बिडी  ओढणे मला अजिबातच आवडले नव्हते. मात्र देव सर्वत्रच आहे या भूमिकेतून त्याने कोठेही बीडी ओढली तरी ती मंदिरात ओढल्यासारखे होते. दोन झुरके मारून झाल्यावर तो पुढे बोलू लागला त्याने सांगितले की त्याला चिलीम ओढण्याचाही छंद होता. हे ऐकताच त्याला निरा न देण्याचा माझा निर्णय मला अधिकच पटला. काहीही न बोलता मी आणखी एक संत्रे काढून ते फस्त केले. 

दोन छोट्या मंदिरात भेटलेल्या दोन व्यक्ती. जवळपास एकाच क्षेत्रात राहणाऱ्या, साधारण एकाच आर्थिक स्थितीत असलेल्या. मात्र दोघांमध्ये किती फरक होता. म्हातारी बडबडी होती, त्रासिक होती मात्र प्रेमळ होती. तर हा स्वभावाने शांत, मात्र नाना छंदाच्या नादी लागलेला. मात्र एक होते दोघांनाही भूक होती मन मोकळे करण्याची! त्रयस्थासमोर लोक किती सहजपणे मोकळी होतात! आपल्या माणसांना गमावण्याची भीती त्रयस्थांबरोबर बोलताना नसते. ह्यामुळेच तसे घडत असावे. (आपल्या माणसांना जपण्यासाठी त्यांच्याशी खोटं वागणं योग्य की वाईटपणा घेऊन का होईना त्यांच्याशी खरं वागणं योग्य?).

असो, दोन संत्री पोटात जाताच मी चांगलाच ताजातवाना झालो. त्यासरशी पुन्हा फुजीवर स्वार होऊन मी शहापूरच्या दिशेने निघालो. शहापूर पार झाले न झाले तोच तीन-चार सायकलस्वार डाव्या बाजूला दिसले. त्यांच्या तोंडावर मास्क असल्यामुळे आणि फुजी थोडी पुढे असल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. मात्र त्यातील एकाने एस ओ एस (saveoursahyadri मोहिमेचा) चा टी-शर्ट घातलेला होता. त्यामुळे तो ओळखीचा असावा असे वाटले. इतक्यात मागचा सायकल स्वार माझ्याशी बोलत जवळ येऊ लागला. आवाज ऐकताच तो विलास असल्याचे लक्षात आले. आता उरलेले अंतर आरामात आणि मजेत पार होणार याची खात्री वाटली. विलास इतर सायकलपटूंशी ओळख करून देत असतानाच  सायकलचे हँडल एकदम खाली गेले. त्यामुळे मी थांबलो. विलास आणि त्याचे मित्र पुढे निघाले. मला प्रथम काही कळलेच नाही. त्यामुळे मी विलासला फोन लावला. त्याला माझा कॉल कळला नाही. मी हँडलकडे पाहिले तेव्हा लक्षात आले की हँडलचा एक स्क्रू सैल झाला होता.

तो घट्ट करून मी जाऊ लागलो. तोपर्यंत विलास आणि त्याचे सहकारी पुढे गेले होते. मी पुम्हा 'एकला चालो रे' चा मंत्र जपत पुढे जाऊ लागलो. पडघा गाव जवळ आले तोच विलासचा फोन आला. त्याने सांगितले की तो आणि त्याचे मित्र पडघा टोल नाकापाशी माझी वाट पाहत थांबले आहेत.  मीही पडघ्यापर्यंत पोहोचलो होतोच. त्याला तसे सांगून पाचेक मिनिटात मी पडघा टोलपाशी त्यांना भेटलो. एका चहास्टॉलपाशी ते माझी वाट पाहत होते. चहाबिस्किटे समोर येत त्यांचा फडशा पाडत असताना आमच्या गप्पा रंगत होत्या. विलास, सुशांत करंदीकर, राम ह्यांच्याचबरोबर आणखी एक सायकल स्वार होता. सुशांत आज 97 वा किल्ला सायकलवरून भेट देऊन परतत होत होता. तर त्याच्याबरोबर गेलेल्या विलासची ही माहुली गडावरील आजची एकशे अकरावी भेट होती. पडघा नाक्यावरून आम्ही सावडेमार्गे कल्याणकडे जाण्याचे ठरवले. सुशांत मी आणि विलास आमच्या गप्पा रंगत होत्या. सुशांतने सायकलवरून मनाली लेह खार्दुंगला केले होतेच. शिवाय तीन वेळा स्वयंचलित दुचाकीनेही त्याने मनाली खार्दुंग ला केले होते. तो स्वतः अशा सहली आयोजितही करतो असल्याचे समजले. 




थोड्या वेळातच आधारवाडी येथे पोहोचत मी आणि विलासने इतरांचा निरोप घेतला. मी गणित मांडले तर माझे ध्येय गाठायला घरी जाईपर्यंत २-३ किमी कमी पडतील असे वाटत होते. हे समजताच विलास मला घेऊन थोड्या लांबच्या मार्गाने घरी गेला जेणेकरून मला माझे लक्ष्य पूर्ण करता यावे. 

डोंबिवलीमध्ये शिरताना 21days camapign मधील दुसरा विजेता प्रवीण दाभाडेच्या दुकानात शिरलो. तो आणि त्याची सायकलबरोबर मला आणि फुजीला फोटो काढायचा होता. मात्र त्याची सायकल त्याने दुरुस्तीला पाठवली होती. पण माझी इच्छा समजताच त्याने भ्रमणध्वनी करून त्याची सायकल ज्याच्याबरोबर दुरुस्तीला पाठवली होती त्याला आहे त्या स्थितीत परत आणायला सांगितली. दरम्यान माझे १७५ किमीचे लक्ष्य पूर्ण झाले. त्याचदरम्यान प्रवीणने बोलता बोलता आणखी दोघांना सायकल चालवायला प्रवृत्त केले. 




ध्येय पूर्ण झाल्यामुळे आनंद साजरा करायला मी आणि प्रवीण चहा पिण्यासाठी गेलो. हे ठिकाण डॉ राहुल घाटवळांनी दाखवलेले होते.




चहा घेत असताना तिथे आणखी तीन सायकलस्वार आले. तिघेही मूळ चेंबूरकर पण आता डोंबिवलीकर झालेले. ते होते राजेश कयाळ आणि त्याचे दोन मित्र. तिघांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जम बसवला होता. बालपणाची त्यांची मैत्री अजूनही घट्ट होतीच... कदाचित सायकलप्रेम ही त्यांची सामाईक आवडही त्याला कारणीभूत असावी. प्रवीण आणि मी त्या तिघांबरोबर गप्पांमध्ये इतके रंगून गेलो की जणू आम्हीही त्यांचे बालपणीचे मित्रच होतो... अर्थात समव्यसनी जमले की वेळेचे भान ते काय राहणार?




एकंदरीत आजचा दिवस ह्या भेटींमुळे संस्मरणीय तर झाला होताच शिवाय ह्या भेटींमुळेच आजची सायकलसफरही सुफल संपूर्ण झाली होती.


शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

शतक, द्विशतक आणि द्विसहस्रक

 भारतीय राष्ट्रीय दिनांक: अग्रहायण ७, १९४२

युरोपीयन आणि धार्मिक कॅलेंडर वर्ष २०२० च्या 'सातवा महिना' ह्या नावाच्या (septem म्हणजे 7) महिना अखेर पर्यंत श्विनचे सायकलवणे जवळपास बंदच होते. २०२० ह्या ग्रेगोरीयन वर्षाच्या नवव्या महिना अखेर जेमतेम २५० किमी सायकलवणे झाले असावे..


मात्र प्रकाश पटवर्धन, विनायक आणि रुपकुमार लालसंगी ह्यांच्या सगळ्यांच्या सातत्यामुळे श्विन बेचैन झाली होती. ऑक्टोबर मध्ये कसेबसे हजार किमी श्विनने पूर्ण केले. मात्र ह्या दरम्यान अप्पा आणि महाडिक काका ह्यांनी श्विनला उकसावण्याचे काम केले.

दरम्यान श्विनने पुन्हा cycle2work सुरु केले. दरवेळी हिवाळ्यात श्विन नाशिक बायपास ऐवजी मुंब्रा शहर शीळ फाटा मार्गाने cycle 2work करते. यंदा होत  असलेल्या अभुतपुर्व वाहतूककोंडीमुळे श्विनने नाशिक बायपास वरून पिंपलास कोण मार्ग घेण्यास सुरूवात केली. मात्र कोन गावातील खड्ड्यांमुळे प्रथम श्विन आणि दोन तीन दिवसात तिची जागा घेणारी फुजी पंक्चर झाल्यावर मात्र रोजच्या ६४ किमी cycle2work ऐवजी cycleb4work आणि cycleafterwork करत रोज सरासरी ६७ किमी पार करत नोव्हेंबरमध्ये २००० किमी अंतर कापण्याचे लक्ष्य श्विनने ठेवले.


आज ४ वेळा डॉक्टरकडे जायचे होते (फिझिओ, दंत वैद्य, दोन वेळा रक्तशर्करा) त्यामुळे सलग राइड करणे शक्य नव्हते. पण श्विनचा मात्र आज शतक पूर्ण करण्याचा अट्टाहास होता.

अखेरीस ४ वेळा डॉक्टरच्या भेटीमधील मोकळ्या वेळांमध्ये तीन छोट्या खेळी (१४+१५+१०) करत श्विनने आव्हान कायम ठेवले. चारही वेळा वैद्यकीय भेटी झाल्या तेव्हा दुपारचे ४.४५ वाजले होते आणि शतक ६१ किमी लांब होते. श्विनने सावध सुरुवात करत नेवाळी फाटा गाठला तोपर्यंत आणखी १७ किमी झाले होते, मात्र सूर्याने कारभार आटोपता घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे श्विन तडक माघारी वळून ९० फुटी रस्त्याला पोचली. तोपर्यंत शेवटच्या फेरीतील ३०-३२ किमी पार झाले होते, तर आजच्या शतकासाठी जवळपास तेवढेच अंतर बाकी होते. जठराग्नी जागृत झाला होता. मात्र श्विनने किमान ५० किमी झाल्याशिवाय इंधन भरण्यास थांबायला मनाई केली. ९० फुटी रस्त्याला परतीचा प्रवास केला तर ३.५ किमी अंतर पार होते. त्याच्या प्रत्येक फेरीनंतर श्विन पुढील फेरीचा वायदा करू लागली. मात्र फेरी संपली की परत तीच टेप.... पुढच्या फेरीनंतर थांबू. 

अखेरीस ५२ किमी अंतर पार झाले. येथून घरी जाईपर्यंत आणखी ९ किमी पूर्ण होणार होते. तेव्हा श्विनने मला क्षुधाशांती साठी थांबायची परवानगी दिली. मात्र आता थेट घरीच जायचे असल्याने मी श्विनला थांबण्यास नकार दिला. श्विनही खुशीत निघाली, कारण तिची ही ६१ किमीची खेळी विनाथांबा पूर्ण होणार होती. 

श्विन त्याच आनंदात घरी पोचली तेव्हा आजचे शतक तर पूर्ण झालेच त्याचबरोबर २८ दिवसातच महिन्याचे २००० किमीचे लक्ष्य पार झाले होते आणि २०२० ह्या वर्षातील २०० तास सायकलवणेही पूर्ण झाले होते.

दिवसातील शतकी खेळी, महिन्यातील दोन सहस्त्रक आणि वर्षातील दोनशे तास असा अनोखा योग मात्र आज जुळून आला.

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

त्रिवेणी योग




सुर्यनारायण दक्षिण गोलार्धात प्रवेश करून दीड महिना झाला होता. अर्थातच त्यामुळे तो जरा उशिरानेच धारित्रीला भेटायला येऊ लागला होता. धरित्री त्याची वाट पाहत असायची, पण त्याचे येणे रोज अधिकाधिक उशिराने होऊ लागले होते. त्यानंतरही त्याची लगबग सुरू असायची. धारित्रीचे मन भरायच्या आतच तो परतीची वाट धरू लागला होता.


आज तर खर म्हणजे त्याचाच वार... रविवार! मात्र आजही तो उशिरानेच जागा झाला. उशिराने जागा झालेल्या सुर्यनारायणाचा अंदाज घेत श्विनने डोळे किलकिले केले. Innerwheel club of Dombivli East (IWCDE) तर्फे आज सायकलपटूंसाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. तसेच Bergamont च्या tourde100 चा आज २१ वा दिवस म्हणजे दुसऱ्या टप्याचा पहिला दिवस होता. दुसऱ्या टप्यातील अनेक आव्हानामधील सर्वात कठीण आव्हान होते एका दिवसात १२५ किमी अंतर पार करणे.  ह्यानंतरच्या रविवारी दीपावली होती, तर त्या पुढच्या रविवारसाठी असे आव्हान शिल्लक ठेवण्यापेक्षा आजच १२८ किमी अंतर पार केले तर मागच्या आठवड्याप्रमाणेच आठवड्याच्या शेवटच्या ३ दिवसात ३०० किमी अंतर पार करता येणार होते.


IWCDE ची मोहीम, Begamont च्या tourde100 मधील दुसऱ्या टप्याची सुरुवात आणि लागोपाठ दुसऱ्या आठवड्याअखेरीस तीन दिवसात ३०० किमी हे तीन योग एकत्र साधण्याचे श्विनने ठरवले.


IWCDE गणेशमंदिरापासून सकाळी ६.१५ ला सुरुवात करणार होते. तर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत Pedal Te public (PR) ची फेरीही ६.१५ ला च गणेशमंदिरापासून सुरू होणार होती.


मात्र आजही श्विनला एवढ्या लवकर निघता येणार नव्हतेच. श्विन तयार होईपर्यंत ८.१५ वाजले होते. सूर्यनारायण येऊन बराच वेळ लोटला होता. श्विनने आपल्याबरोबर पाणी आणि नाश्त्याची बेगमी केली होतीच. एवढे अंतर पार करायचे असले तरी मध्यान्हीच्या सुमारास घरीही परतायचे होते. एकमार्गी कर्जत पर्यंत जाऊन परतताना काही अडथळे येऊन उशीर होण्याची अंधुकशी संधीही ठेवायची नव्हती. त्यामुळे जास्तीत जास्त वांगणी पर्यंत जाऊन घरी परतायचे आणि जेवण करून पुन्हा उर्वरित फेरी पूर्ण करायची असा मनसुबा श्विन रचत होती. काटई नाक्यापाशी डावे वळण घेत बदलापूर पाइपलाइन महामार्गाला लागल्यावर श्विनची हिम्मत पुन्हा वाढू लागली. सकाळी वांगणी ऐवजी नेरळला जाऊन यायचे विचार मनात घोळू लागले. बदलापूर वांगणी दरम्यान पोचल्यावर श्विन थेट कर्जत गाठण्याची शक्यता असल्याने मी दुसरा काही पर्याय आहे का याचा विचार करू लागलो.


इतक्यात बारवी डॅम चा पर्याय आठवला. अर्थात तो बऱ्यापैकी लांब असल्याने तिथपर्यंत न जाता अर्ध्या रस्त्यातून परतायचे ठरवले. बारवी डॅम साठी महामार्ग सोडून श्विनने डावे वळण घेतले. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक विस्तीर्ण तळे आणि बाजूला शिवमंदिर दिसले. दृश्य खूपच विलोभनीय होते. परतताना येथेच नाष्टा करायचे ठरवून श्विनने टाच मारली.


लगेचच चढउताराचा खेळ सुरू झाला. रस्ता थोडा अरुंदही होता. रस्त्याचा अंदाज घेत आणि मजा घेत श्विन पुढे सरकत होती. इतक्यात रस्त्याच्या डाव्या बाजूला एक अरुंद चढण चढून येणारे दोन सायकलस्वार दिसले. पुढे असलेल्या Sahir Shaikh ला श्विन ने लगेच ओळखले. त्याला हाक मारून श्विन उजवीकडे वळणाऱ्या रुंद रस्त्याला लागली... बहुतेक इथेच घात झाला. थोड्याच वेळात एक छोटा घाट उतरून श्विन एका गावात पोचली. श्विन रस्ता चुकली होती. तिथे बारवी डॅम कडे जाणाऱ्या रस्त्याची चौकशी केली. तर रस्ता गुंतागुंतीचा तर वाटलाच शिवाय खराबही दिसत होता. वेळ महत्वाचा असल्याने श्विनने तेथूनच परत फिरायचे ठरवले. वाटेत शिवमंदिरापाशी ठरवल्याप्रमाणे नाष्टा केला. तळे पूर्ण भरलेले असताना काठाशी असलेला निष्पर्ण वृक्ष मात्र अस्वस्थ करत होता. तळ्यापाशी असून त्याच्या निष्पर्ण अवस्थेबद्दल खिन्नता बाळगायची की निष्पर्ण झाला तरी तळ्याच्या काठाने तो ताठ उभा आहे याबद्दल आनंद वाटावा हे कोडे श्विनला पडले. तळ्याच्या काठाशी व्यायामासाठी जवळपास १५ प्रकाराची उपकरणे रांगेत ठेवलेली होती. आयुष्याची सकाळ अनुभवत असलेल्या बालवयातील व्यायामपटू शेजारीच आयुष्याची संध्याकाळ रमणीय करत एक आजोबाही त्या उपकरणांचा आनंद घेत होते. कदाचित ह्याच उत्साहाकडे पाहत तो निष्पर्ण वृक्षही ताठ मानेने उभा असावा.






तेथून निघायला मन तयार होत नव्हते, पण त्याचे मन मोडून मी श्विनवर आरूढ झालो. वाटेत आनंदनगर MIDC जवळ एक युवक हातात सायकल घेऊन जात असलेला दिसला. त्याची चौकशी करताच त्याचा पुढील गियर १ क्रमांकावर अडकला असल्याचे लक्षात आले. त्याचा खटकाही दाबता येत नव्हता. तो ही डोंबिवलीचाच होता. त्याला अश्वस्थ करून मी पुढे जाऊ लागताच त्याच्याबरोबरच पुढे जाण्याचा आग्रह करू लागला. त्याचे मित्र पुढे गेले होते आणि त्याला रस्ता माहीत नव्हता. मी त्याला पुढे जाऊन परत मागे येतो असे सांगून पुढे निघालो. थोड्याच अंतरावर त्याचे मित्र वाट पाहत उभे असल्याचे दिसले. त्यांची चौकशी करेपर्यंत मागचा सायकलस्वार तेथे आलाच. त्यांची भेट झाल्यावर, सगळ्यांना एकत्र राहायला सांगून श्विन पुढे निघाली.


पेंढारकर महाविद्यालयापाशी 'शांताराम सरबत' येथे लिंबूपाणी घेऊन श्विन घरी परतली तेव्हा ८० किमी अंतर पार झाले होते. जेवण करून १०-१५ मिनिटे विश्रांती घेऊन श्विन पुन्हा निघाली तेव्हा घड्याळ बाबा २.३० वाजल्याची खूण करत होते. श्विनने बरोबर एका छोट्या बाटलीत कोकम सरबत घेतले. ९० फिट रस्त्यावरून उजवे वळण घेत प्रथम कल्याण शीळ महारस्ता आणि पुढे काटई नाक्यापाशी डावे वळण घेत श्विन पुन्हा बदलापूर पाइपलाइन रस्त्याला लागली. बारवी डॅम च्या वळणापर्यंत जाऊन कोकम सरबतचे दोन घोट घेऊन श्विनने परतीचा रस्ता धरला. नेवाळी फाटा, काटई नाका मार्गे पेंढारकर महाविद्यालयापाशी येईपर्यंत bergamont च्या tourde100 च्या दुसऱ्या टप्यातील आव्हानांपैकी सगळ्यात कठीण आव्हान असलेले १२५ किमी चे आव्हान पूर्ण झाले होते. तर घरी परतेपर्यंत १३०  किमी अंतर पार होत लागोपाठ दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या तीन दिवसात ३०० किमी अंतरही पूर्ण झाले होते. हा अंदाज आल्यामुळे घरी जातानाच घेतलेले सीताफळ आईस्क्रीम खाऊनच आजचा जुळून आलेला त्रिवेणी योग साजरा केला.

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

पहिले पाऊल




पृथ्वीप्रदक्षिणा करण्यासाठी कशाची आवश्यकता असते....? फक्त पहिले पाऊल उचलण्याची! खरोखरच, इतर पाऊले म्हणजे केवळ पुनरावृत्ती असते. 

श्विन घरातच अडकली होती. त्याला आता जवळपास ६ महिने होत आले होते. अर्थात ह्या कालावधीदरम्यान एक दिवस श्विन बाहेर पडली होती, त्यालाही तीन महिने झाले होते. खरतर पहाटे लवकर उठावं लागू नये म्हणूनच तर श्विन गेली ९ वर्ष ६०-६२ किमीचा cycle2work प्रवास करत होती. आणि रस्त्यांच्या कामामुळे ते करणे अशक्य झाल्यामुळे श्विनचे बाहेर पडणेच थांबले होते. त्यातच ऑफिसला जाण्यासाठी आधी बस पकडण्यासाठी रोज अर्धातास पायी प्रवास आणि मग २-२.५ तास ऑफिसपर्यंत बस प्रवास तसेच संध्याकाळी असाच उलट प्रवास असा दिवसभरात साधारण ६ तासांचा प्रवास केल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून बाहेर पडणे श्विनला जीवावर येई.

इतर सायकलमित्रांच्या नियमित सायकलसफरी श्विनला घायाळ करत होत्या. प्रकाश पटवर्धन, रुपेशकुमार लालसंगी, विनायक वैद्य, मिलिंद तुंगारे ह्यांच्या सफरी आणि त्यादरम्यानची छायाचित्र पाहून तर श्विन चांगलीच अस्वस्थ होत होती. विशेषतः विनायकच्या लेखनामुळे तर अस्वस्थता चांगलीच वाढत होती. त्यातच घरातच शेजारी उभी राहणारी ट्रेक तर गेले सहाही महिने रोज ५० किमी रपेट करत होती. श्विन मात्र त्यामुळे चांगलीच कुढत होती. माझी तर श्विनकडे पाहण्याचीही हिम्मत होत नव्हती. गच्चीतील झाडांना रोज पाणी घालायला जाताना मी श्विनकडे चुकूनही बघत नसलो, तरी श्विनची क्रुद्ध नजर मला न बघताही कळत होती.

दरम्यान घरी थोडे फर्निचरचे कामही सुरू झाले होते. त्याची जबाबदारी नेहमीप्रमाणेच कॉलेजमधील माझा मित्र प्रवीण दाभाडे ह्याच्यावर सोपवली होती. त्याच्याकडे काम करणारा घनश्याम मला ओळखत होता. तोच कामाला येत असल्याने मीही निर्धास्त होतो. मात्र ह्या कामामुळे आता एकाच खोलीत कोंडून घ्यावे लागते होते. योगायोगाने मी सतीश आंबेरकरांचे 'दोन चाक झपाटलेली' वाचायला सुरुवात केली. त्यातील मुखपृष्ठापासूनच मन खाऊ लागले होते. आंबेरकरांचा प्रत्येक शब्द सृजनाचे काम करत होता. मनातील आळस झटकून कृतिशील झाल्याशिवाय सृजन गप्प बसणार नव्हता. सकारात्मक विचार सृजनशिलतेला पोषक असतात. आंबेरकर प्रत्येक वाक्यागणिक मनावर गारुड करू लागले होते. मी श्विनला नजरेआड ठेवले तरी पुस्तकातील शब्द मला अस्वस्थ करत होते.

घनश्याम गेले आठवडाभर येत होता. त्याने काल अचानक विचारले इतक्यात तळेगावला सायकलने जाऊन आलात की नाही. त्याला नाही म्हणून सहजपणे सांगितले खरे. पण आधीच पुरेपूर इंधन भरले होते त्यात काडी मात्र पडली होती.

आजही मी अंमळ उशिरा उठलो आणि आरामात आवरलं. ८-८.३० झाले होते. गच्चीतील झाडांना पाणी घालताना श्विनकडे निग्रहाने पाहिले. ती चांगलीच रुसली होती. तिने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मी समजलो. गपचूप घरात जाऊन पाणी आणि कोलीन घेऊन आलो आणि श्विनकडे गेलो. तिने आश्चर्यानेच माझ्याकडे पाहिले. मी तिला स्वच्छ केले. काहीही न बोलता हवेचा दाब पाहिला. हवा कमी होतीच. लगेच श्विनला उचलून दिवाणखान्यात आणले आणि हवा भरली. आता मात्र श्विन जरा खुलली. हो, अजून तिला माझ्यावर विश्वास नव्हताच. पण मग मी लगेचच श्विनच्या हँडलला पाऊच अडकवला. तेव्हा मात्र श्विन निर्धास्त झाली. मीही लगेचच तयार झालो. डोंबिवली सायकल क्लबची जर्सी, सायकलवण्यासाठी घेतलेली विशेष विजार, डोके आणि तोंडावरील सुरक्षाकवच आणि सायकलवण्यासाठीचे विशेष हातमोजे घालण्याचा योग बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे मीही थोडा उत्साहित झालो. तसाही मी लवकर उठण्याबाबत आळशी असल्याने बऱ्याचदा ७-८ वाजल्यानंतर निघून शतकी सफारी करत असे. त्यामुळे आजही ८.३० वाजता निघालो तरी काही फिकीर नव्हतीच.

मात्र बरेच दिवस सायकलवले नसल्याने आज जेमतेम १० किमी अंतर पार करून घरी यायचे असे ठरवले होते. जास्त पुढे जायचा मोह नको म्हणून पाण्याची बाटलीही घेतली नव्हती. तसेही एकमार्गी घर ते ऑफिस ३२ किमी सायकलवताना मला पाण्याची आवश्यकता लागत नसेच. डोंबिवली मधील खड्डे आणि खड्डयाना जोडणारे डांबराचे तुकडे पार करत मी पेंढरकर महाविद्यालयामार्गे कल्याण शीळ महामार्गाला लागलो. महारस्ता असल्याने हा रस्ता गुळगुळीत असेल अश्या भ्रमात राहू नका. नुकतीच ह्या रस्त्याच्या दुरावस्थेची नोंद गिनीज बुक मध्ये जाण्याची शक्यता आहे. महारस्ता असल्याने इथे महाखड्डे मात्र होते. खरतर एव्हाना मी ठरवल्याप्रमाणे एकतर्फी ५ किमी अंतर पार झाले होते. घरी जाईपर्यंत १० किमीपेक्षा जास्तच अंतर होणार होते. मात्र श्विन रंगात आली होती. तिने मला म्हटले आलो त्याच मार्गाने परत फिरण्यापेक्षा मानपाडा रस्त्याने परत जाऊ. मलाही काही विशेष वाटले नाही. मी तात्काळ होकार दिला. मात्र मानपाडा रस्त्याला वळण्याऐवजी श्विन तशीच सरळ जाऊ लागली. मी तिला चुचकारले, पण तिने लक्ष असल्याचेच दाखवले नाही. मी पुन्हा विचार केला कदाचित ती काटई नाक्याला जाऊन परत फिरेल. 

तिथे तर श्विनने आणखीच वेग घेतला. मला म्हणाली आज सुट्टीचा दिवस आहे तर पालवाला नेहमीइतकी गर्दी आहे का ते पाहून परत येऊ. गेल्या सहा महिन्यातील तिचा राग जाणार असेल तर आणखी दोनेक किमी जायला माझीही हरकत नव्हती. पालवाचा चौक पूर्णपणे रिकामा असल्याचे पाहताच श्विन सुसाट निघाली. आधी खिडकाळी, मग कोकणरत्न असे म्हणत म्हणत श्विन थेट शीळ फाट्याला पोचली. मग मात्र मी तिचे हँडल थेट १८० अंशात वळवले. आता मात्र श्विनही काही कांगावा करू शकत नव्हती. एव्हाना आम्ही न थांबता आलो होतो. छायाचित्रणासाठीही थांबलो नव्हतो. परतीच्या प्रवासात मात्र नेहमीप्रमाणे चहासाठी नाही तरी छायाचित्रणासाठी कोकणरत्नला क्षणभर थांबलो. वाटेत Track&trail मध्ये रवी रहाणेचीही गाठ घेतली. रवी, साहिर शेख ह्यांच्यामुळेच कल्याण डोंबिवलीकरांना आधुनिक सायकली उपलब्ध झाल्या आहेत.



श्विनची सफरीची भूक भागत होती, मात्र माझ्या जठरातील अग्नी आता प्रदीप्त होऊ लागला होता. पुन्हा पेंढरकर महाविद्यालयापाशी पोचल्यावर मात्र पोटापेक्षा पोटऱ्याच अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागल्या. बऱ्याच दिवसांनी नव्याने सुरुवात करत असताना मी नेहमीच १०-१५ किमी पासून सुरुवात करत असे. पण आंबेरकरांच्या शब्दांनी केलेल्या जादूमुळे आज टाकलेले पहिले पाऊल थेट ३४ किमीचे ठरले होते.



बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

सायकलपर्यटनाचा प्रणेता




पर्यटन करण सगळ्यांनाच आवडत. त्यासाठी किती सामुग्री आवश्यक आहे बरं! खरतर आपलं भाग्य आणि एक नकाशा ही सामुग्री आपल्याला जिथे जायचंय त्या ठिकाणी नेण्यास पुरेशी असते.
























फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...