रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

ब्रिंदाबन vs ब्रिंदाबन : कोलकाता चेन्नई सायकलप्रवास




एलुरु गावातून आम्ही साधारणपणे सात वाजता सायकल चालवायला सुरुवात केली. गावातून मुख्य महामार्गाला जायला थोडा वेळ लागला. तोपर्यंतचा रस्ता अरुंद असला तरी कमी वाहतुकीचा आणि चढउतार फार नसलेला आणि खड्डेरहित होता. वातावरणही छान होते. आज अंतर साधारण १४० किमी होते. त्यामुळे मी प्रथमपासूनच सरासरी वेग कायम राखण्याचे ठरवले होते. आनंद, संजय आणि विक्रम हे तिघे कायम एकत्र असणार होते.

सुरुवातीचे चाळीस किमी अंतर कापून झाल्यावर मी नाष्टा करण्यासाठी थांबलो. एव्हाना साडेनऊचा सुमार झाला होता. माझ्या पाठोपाठच विक्रम आला. इथे दक्षिणात्य पदार्थ फारच छान मिळत होते. माझ्या मनातील घड्याळ सुरू होते. दोन तासात चाळीस किमी त्यानंतर अर्धा तास थांबा घेतला. तर सरासरी वेग २० किमी प्रतितासाहून १६ किमी प्रतितास इतका कमी होणार होता. दिवसभरात १४० किमी अंतर कापायचे होते. त्यामुळे उरलेले १०० किमी अंतर कापायला साधारण साडेचार वाजले असते. 


माझा नाष्टा होत असताना संजय आणि आनंदही पोचले. त्यांचाही नाष्टा झाला. मात्र एव्हाना दहाच काय साडेदहा वाजून गेले होते. मी सगळ्यांना आपण अर्धा तास मागे पडलो आहोत ते आता cover करावे लागतील असे सांगून पुन्हा एकदा सायकलवायला सुरुवात केली. आनंदला वाटेत विजयवाडा येथे decathlon चे दुकान असल्याचे माहित होते. त्यामुळे त्याला तिथेही जायचे होते. विजयवाडा शहर हे आंध्र प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर जवळपास दोन हजार वर्षांपासून वसलेले आहे. विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिराचा इतिहास आख्यायिका आणि पौराणिक कथांनी भरलेला आहे. प्रमुख देवता, देवी कनक दुर्गा, स्वयंभू असल्याचे मानले जाते. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या इंद्रकीलाद्री टेकडीवर स्थित आहे.



शहरात प्रवेश करत असतानाच शहरातील गर्दीचा अंदाज येत होता. कोलकाता चेन्नई महामार्ग शहरातूनच जात होता. माझ्या सायकलची चाल चांगलीच मंदावली होती. महामार्ग इतका गजबजलेला होता की बऱ्याचदा सायकलवरून पायउतार व्हावे लागत होते. त्यातच सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिस इमाने इतबारे काम करत होते. त्यामुळे चालण्याची गतीही सायकलपेक्षा जास्त वाटत होती. अश्याच गजबजलेल्या ठिकाणी रस्त्याच्या डावीकडे decathlon दुकान दिसले. ते तिघेही नजरेच्या टप्प्यात दिसत नव्हते. दुकानात शिरल्यास वेळ मोडला जाणार हे निश्चित होते. त्यामुळे मी दुकानाकडे दुर्लक्ष केले. सूर्यही डोक्यावर आला होता. त्यामुळे लवकरात लवकर ह्या गर्दीतून बाहेर पडून वेग वाढवणे आवश्यक होते. पुढेही सिग्नल यंत्रणा कार्यरत होतीच. जवळपास अर्धा तास त्या वाहतुकीत अडकल्यानंतर मी विजयवाडा शहराच्या बाहेर पडत होतो. बाहेर पडल्यावर नदीवर एक लांबलचक पूल दिसत होता. नदीचे पात्र खूप लांबवर पसरले होते. पलीकडचा किनारा स्पष्ट दिसतही नव्हता. मात्र पात्राचा किमान पाऊणपट भाग कोरडाच दिसत होता. एवढ्या प्रचंड पात्रात अक्षरशः वाळवंट पसरल्यासारखे वाटत होते. नदीचे रखरखीत पात्र पाहून फार वाईट वाटत होते.

नदीचे पात्र जसे कोरडे पडले होते तसाच माझा घसाही कोरडा पडला होता. मी सायकल बाजूला लावून पाणी प्यायलो. तहान भागल्यानंतर पुन्हा ताज्या दमाने सुरुवात केली. साधारण १०० किमी अंतरावर जेवायला थांबायचे ठरवले होते. मात्र उकाडा आणि लागलेली भूक ह्यांच्यामुळे मी जेमतेम ८०/८२ किमी अंतरावरच जेवण घ्यायला थांबलो. तिथे एक छानसे हॉटेल दिसत होते. जेवण अस्सल दाक्षिणात्य पद्धतीचे म्हणजे फक्त भाताचेच होते. परत पुढे किती अंतरावर जेवायला मिळेल ह्याची काहीच शाश्वती नव्हती. त्यामुळे मी जेवायला थांबलेले लोकेशन इतरांना कळवून मी सायकल थांबवली. जेवण छान रुचकर होते. जेवण करून जवळपास अर्धा एक तास वाट पाहिल्यावर मात्र मी पुढे जाण्याचे ठरवले. कारण अजून जवळपास ५०-६० किमी अंतर बाकी होते आणि दुपारचे अडीच वाजून गेले होते. गेल्या दोन दिवसात आलेले अनुभव विचारात घेता सूर्यास्तापूर्वी गंतव्यस्थानी पोचणे किती आवश्यक आहे हे पुरेसे स्पष्ट झाले होते.

मी आणखी दीड तासाने चहासाठी थांबेन असा तिघांना निरोप देऊन पुन्हा सायकलवायला सुरुवात केली. थोडे पुढे जातोय न जातोय तोच मला समोरच्या बाजूने पाचसहा जण चालत येत असलेले दिसले. त्यांच्यात एक म्हातारे गृहस्थ होते. ज्यांनी धोतर घातले होते, कपाळाला टिळा आणि डोक्याला मुंडासे होते. बरोबर एक बाई होत्या त्यांनी पाचवारी साडी घातलेली होती. इतर चारजण मागे येत होते. त्यांना पाहताच मला ते महाराष्ट्रातून आले असावेत अशी शंका आली. ते जवळ येताच मी त्यांना नमस्कार करत सायकल थांबवली. त्यांची चौकशी करताच समजले की ते औंढ्या नागनाथ येथील रहिवासी आहेत. बाबा दरवर्षी पंढरपूर वारी करत असतात..आता ते औंढ्यानागनाथ येथून श्रीशैल्यम येथे आले होते. तेथून विजयवाडाला जाऊन परत औंढ्यानागनाथ येथे परतणार होते. हा सगळा प्रवास ते पायी करत होते. ही संपूर्ण मोहीम अंदाजे तीन महिन्यांची होती. त्यापैकी निम्मा प्रवास झाला होता. आमचा सायकलप्रवास त्यांच्या पायी प्रवासापुढे अगदीच नगण्य होता. बाबांना मी विचारले माझ्याकडे काही लाडू आहेत ते जर मी तुम्हाला दिले तर तुम्ही ते स्वीकाराल का! त्यांनी हो म्हणताच माझ्याकडे असलेला लाडूचा एक डबा मी त्यांना दिला. त्यांना शुभेच्छा देऊन मी माझा प्रवास पुन्हा सुरू केला.


साधारण सव्वातीनला आनंदचा संदेश आला की त्यांनी १०० किमी अंतर पार केले आहे. मात्र त्यांनी अजून जेवण केले नव्हते. ते आता जेवण्यासाठी थांबणार होते. मला कळेना मी माझे जेवण करून एक तास थांबलो होतो. तरीही ते तिघे आले नव्हते आणि जेवणासाठीही थांबले नव्हते. मग त्यांचा इतका वेळ गेला कुठे. बरं त्यांना विचारलं तर दोघेही उत्तर काहीच देत नव्हते.

मी थोड्या वेळातच चहासाठी थांबलो. कदाचित इथे मी थोडा वेळ घालवला तर त्यांनी मला गाठले असते. आमचे आजचे राहण्याचे ठिकाण चिलकालूरिपेट माझ्या थांब्यापासून जेमतेम २० किमी म्हणजे तास सव्वा तासाच्या अंतरावर होते. म्हणजे मी पाच साडेपाच पर्यंत हॉटेलमध्ये पोचू शकत होतो. मात्र आंध्र पोलिसांनी अजून तरी काहीच कळवले नव्हते. मी चहा घेऊन पुन्हा अर्धा तास घालवला. तरीही तिघांचा पत्ता नव्हता. अखेर मी थेट चिलकालुरीपेट येथे जाऊन हॉटेल शोधायचे ठरवले. ह्या गावच्या नावाचा उच्चार करताना बराच गोंधळ होत होता...चिलकालुरिपेट की चिकलारूलीपेट! अखेर एके ठिकाणी देवनागरी लिपी मध्ये गावाचे नाव दिसल्यावर उलगडा झाला.







चिलकालुरीपेट शहरासाठी साधारण ८ किमी अगोदर महामार्गाच्या डावीकडे वळलेला रस्ता होता. मी शहरात पोचलो. आंध्र पोलिसांकडून अजूनही नक्की काही कळत नव्हते. मग मी गुगलवर इतर हॉटेल्स शोधायचे ठरवले. मात्र आनंदने कळवले की आंध्र पोलिस सोय नक्कीच करणार आहेत. एका चौकात मी थांबून राहिलो. शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्याबद्दल कुतूहल वाटत होते. ते थांबून माझी चौकशी करत होते. माझी मोहीम ऐकून तेही उत्साहित होत होते. मात्र त्यांच्यापैकी एकालाही हिंदीचा गंधही नव्हता. मला मात्र आश्चर्य वाटत होते. बंगाल, ओरिसा, आंध्र, तमिळनाडू, केरळ ह्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिकांना हिंदी भाषा येत नव्हती तरी ती भाषा महाराष्ट्रात का थोपवली जात आहे. 


मी जवळपास तासभर ह्या विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारल्या मोबाईलवर चेस खेळला. त्यानंतर आंध्र पोलिसांकडून आजची व्यवस्था कोणत्या हॉटेलमध्ये केली आहे त्याचा निरोप आला. मी जिथे उभा होतो त्याच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये ब्रिंदाबन हॉटेलमध्ये आमची सोय झाली होती. हे कळताच मला हायसे वाटले. ती इमारत चार मजली होती. मात्र खालच्या मजल्यावर कुठेच राहण्यासाठी हॉटेल दिसत नव्हते. तिथे एक शॉपिंग complex होता. मी त्या शॉपिंग complex मध्ये शिरलो. तर आतमध्ये मला जे नाव सांगितले होते त्याच नावाचे हॉटेल ब्रिंदाबन दिसले जिथे फक्त जेवण्याची सोय होती. पण राहण्याची सोय नव्हती. मी तिथे रिसेप्शनवर विचारले की ह्याच नावाचे इतर कोणते हॉटेल इथे आहे का जिथे राहण्याची सोय आहे. तेव्हा त्यांनी नाही म्हणून सांगितले. मला आंध्र पोलिसांकडून हॉटेलचा नंबर मिळाला त्या नंबरवर फोन केला असता त्यांनी सांगितले की तुम्ही बिल्डिंगसमोरच थांबा आमचा माणूस तुम्हाला घ्यायला येतो आहे. लगेचच एक माणूस माझ्याकडे आला. त्याने बिल्डिंगच्या मागच्या बाजूला मला नेले तिथे खाली पार्किंग मध्ये सायकल ठेवायला सांगितले आणि तिथेच असलेल्या लिफ्टने चौथ्या मजल्यावर नेले. तिथे आमची राहण्याची सोय असलेले हॉटेल ब्रिंदाबन होते. मी त्यांना तळमजल्यावर मला का चुकीचे सांगितले गेले हे विचारले तर तेव्हा समजले की त्या दोनही व्यवस्थापनांचा एकमेकांशी संबंध नव्हता. आणि तळमजल्यावरील हॉटेलचे व्यवस्थापन मुद्दाम ह्या हॉटेलची माहिती देत नाहीत. थोड्या वेळाने माझे तीनही साथीदारसुद्धा आले. तळमजल्यावरील हॉटेल मध्ये जेवणाचे टाळत आम्ही जेवण्यासाठी आसपास दुसरे हॉटेल शोधले. त्यांनी त्यांच्या आडमुठ्या आणि त्रासदायक वागणुकीमुळे ग्राहक मात्र घालवले होते.



 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...