रविवार, २८ जून, २०२६

City of Joy: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १०

मुंबई कोलकाता flight सकाळी ९.४५ चे होते. मी सकाळी ६ वाजताच घर सोडले. एअरपोर्टला लवकर जाऊन तिथे नाष्टा करावा लागणार होता. संजय आणि मनोजही अगदी वेळेवर पोचले. एकदा सामान चेक इन केले की आम्ही मोकळेच होतो.


मी, संजय आणि मनोज चेक इन च्या रांगेत उभे राहिलो. माझ्या डोळ्यासमोरून मागील वर्षीचा प्रसंग तरळला. माझी एक हँडबॅग ट्रॉली मध्ये राहिली होती. आम्ही कोलकाता येथे पोचल्यावर आम्ही कंप्लेंट केली होती. तेव्हा आम्हाला सांगितले होते की ती bag मिळाली आहे. परत आल्यावर मला पोलिस कंप्लेंट करायला लावली होती. त्यानंतर त्यांनी मला CCTV कॅमेरामध्ये ती बॅग सुरक्षा रक्षकांनी जमा केल्याचेही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्याच दालनात दाखवले होते. मात्र ती बॅग नंतर वस्तू परत करणाऱ्या काउंटरला गेलीच नव्हती. सुदैवाने माझा GOPRO कॅमेरा मला त्यांनी परत केला होता. मात्र सायकलचे LIGHTS, इतर काही ACCESSORIES, माझा एक HOTPOT हे सगळे गमवावे लागले होते.


असो, आता मात्र आम्ही काळजी घेत होतो. चेक इन झाल्यावर आम्ही लाउंजकडे वळलो. मी कार्ड स्वाइप करून lounge access मिळवला. माझ्याकडे आणखी दोन कार्ड होती. पण त्यावर lounge access मिळणार नाही असे कळले. त्या दोघांकडे कार्ड नव्हते. मी तर स्वाइप केले होते. अखेर मी आतमध्ये नाष्टा करून येईन तोपर्यंत ते बाहेर नाष्टा करतील असे ठरले. लाउंज आमच्या गेटसमोरच होते. 


आम्ही नाष्टा करून गेट समोर जाऊन बसलो. थोड्याच वेळात विमान आले. आपापल्या सीटवर जाऊन बसलो आणि डोळे मिटले. शांतपणा जाणवत होता. लवकर उठल्याने झोप येत होती. तसेही flight मध्ये बसल्यावर मला थोड्या वेळात झोप लागतेच. कोलकात्याचे आकाश निरभ्र होते. मागच्या वर्षी डॉ केळकरांकडे मुक्काम केला होता. ते आता चिंचवडला राहायला आले होते. आम्ही एअरपोर्ट बाहेर आलो. तिथे मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी एकजण भेटायला येणार होता. तो जवळपास १०० किमी दुरून येणार होता. अर्धा पाऊण तास वाट पाहिल्यावर तो आला. आमचे काम झाल्यावर मी संदीपला फोन केला. त्याने लोकेशन पाठवल्या वर आम्ही कॅब बुक केली.

City of Joy म्हणजेच कोलकाता शहर पाहायला आम्ही उत्सुक होतो. कोलकाता शहर ओळखीचे वाटत होते. संदीप बेलूर मठाजवळ राहत असल्याचे समजल्याने मी खुष होतो. मागच्या वर्षी बेलूर मठानेही आमची रहायची सोय केली होती, मात्र वेळे अभावी आम्हाला तिथे जाता आले नव्हते. आता मात्र हा योग जुळून येणार होता.


कॅब बेलूर येथे पोचली. संदीपचे घर एका अरुंद बोळात होते. कॅब ड्रायव्हर स्वभावाने चांगला होता. जेमतेम एक गाडी जाऊ शकेल इतपतच रुंदी असावी. आम्ही त्या बोळात संदीपचे घर शोधू लागलो. तिथे चौकशी करत असताना समोरून एक उंच, सडपातळ माणूस आम्हाला हात करत होता. आम्ही त्याच्या जवळ गेलो. त्याने आम्हाला ओळखले होते. त्याने ओळख करून दिली...मी संदीप...!

शनिवार, २७ जून, २०२६

सरकार दा: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग ९

 Couchsurfing, Warmshower ह्या साईट्स द्वारे फिरस्त्यांना बऱ्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था उपलब्ध होते. कित्येक ठिकाणी तर आपली व्यवस्था करून देण्यासाठी यजमानच अधिक उत्सुक असतात. 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजे एक जग एक कुटूंब आहे ह्या उक्तीनुसार ह्या साईट्सवर उपलब्ध असणारे यजमान फिरस्त्यांची सोय करून देत असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने सोय करत असतो. काहीजण वेगळ्या खोलीची सोय करतात, तर काहीजण सामाईक खोलीची सोय करतात. काही ठिकाणी फक्त निवासाची सोय होऊ शकते तर काही ठिकाणी जेवणाचीही सोय होऊ शकते. काही ठिकाणी फक्त एका वेळी एकच व्यक्तीची सोय होऊ शकते, काही ठिकाणी कुटुंबाची व्यवस्था होऊ शकते. अर्थात प्रत्येकाने आपापल्या प्रोफाइल मध्ये आपण कितीजणांची आणि कोणती व्यवस्था करू शकतो, त्यांच्या ठिकाणापासून प्रवासाची साधने, मार्केट अशी महत्वाची ठिकाणे उपलब्ध आहेत का ह्याची माहितीही दिलेली असते.

आमच्या मोहिमेसाठी Warmshower ह्या फक्त सायकलिस्ट साठी सोय पाहणाऱ्या माध्यमाद्वारे मला संपर्क मिळाले नाहीत. मात्र couchsurfing हया सगळ्यांसाठी सोय होऊ शकणाऱ्या साइटवर मात्र काही ठिकाणी संपर्क उपलब्ध झाले होते. मोहिमेच्या महिनाभर आधी कोलकाता येथून सरकार दा ह्यांनी मला सोय होईल असे कळवले. सरकार दा ह्यांनी कळवले की ते कोलकात्याहून इतर काहीजण आमच्याबरोबर येऊ शकतील का हे पाहत आहेत. त्यांनी असेही कळवले की ते स्वतः कोलकाता येथील खूप मोठे पत्रकार आहेत. बंगालमध्ये त्यांचा संपर्क दांडगा आहे. ते आमच्या मोहिमेची बंगालमधील सगळी जबाबदारी घ्यायलाही उत्सुक असल्याचे, नव्हे घेत असल्याचे त्यांनी कळवले. मी थोडा आश्चर्यचकित झालो आणि थोड्या काळजीतही पडलो. मी सुरू करत असलेल्या मोहिमेची जबाबदारी घेण्याच्या निमित्ताने सरकार दा काही स्वतःचा अजेंडा तर राबवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत ना असे वाटू लागले. कारण कोलकाता येथे राहण्याच्या सोयीव्यतिरिक्त मला काहीही नको असताना हा माणूस अचानक संपूर्ण मोहिमेची जबाबदारी का घेतोय, त्याचबरोबर आमच्या तीन जणांच्या मोहिमेत आणखी काही सायकलपटू सामील होतील असे स्वतःच का ठरवतोय हे कळेना.

तरी मी कोलकाता येथे आधी त्यांना भेटून त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू असे ठरवले. माझ्या बरोबर आणखी दोघेजण आहेत हे त्यांना कळवले होतेच. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला. त्यांनी मी कुठे आहे असे विचारले. मी मुंबईतच असल्याचे त्यांना सांगीतल्यावर त्यांनी मी अजून कोलकत्याला का आलो नाही असे विचारले. मी त्यांना आमच्या मोहिमेला अजून महिना बाकी असल्याची आठवण करून देताच ते गोंधळले. त्यांचा चांगलाच गैरसमज झाला होता. वास्तविक मी couchsurfing साइटवर माझा पूर्ण कार्यक्रम प्रत्येक दिनांकानुसार त्यांना कळवला होता.

आमच्या मोहिमेच्या काही दिवस आधी मी परत त्यांचा अंदाज घेतला. तेव्हा त्यांनी सांगितले की मनोज आणि संजय ह्यांनी सुद्धा त्यांना couchsurfing वरून विनंती पाठवायला हवी. मात्र ते दोघेही अजून couchsurfing वर नव्हते. मग मी त्यांना couchsurfing वर login करायला लावून सरकार दा ह्यांना request पाठवायला सांगितली. दोघांनीही त्यानुसार request पाठवली. मात्र सरकार दा मला सांगत होते ना त्यांना दोघांकडून request आली आहे, ना ते दोघे अजून couchsurfing वर त्यांना दिसत आहेत. मला प्रथम जरी सरकारदा ह्यांना भेटण्याविषयी उत्सुकता वाटत होती तरी आता मी अधिकच गोंधळात पडलो होतो. सरकार दा ह्यांचा सूर प्रथमपासून आत्मप्रौढीचा वाटत होताच पण आता थोडासा अडेलतट्टू किंवा दुराग्रहीही वाटत होता.

अर्थात गंधार ने संदीप चटर्जी ह्यांचा संपर्क दिला होताच. त्यांनीही आमची व्यवस्था करण्याविषयी कळवले होते. सरकार दा ह्यांच्या थोड्याशा गोंधळात टाकणाऱ्या स्वभावामुळे मी संदीपकडेच मुक्काम करण्याचे निश्चित केले.

बुधवार, २४ जून, २०२६

कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ८

मोहिमेची पूर्वतयारी मनाप्रमाणे पूर्ण होत आली होती. आता सायकल आणि सायकलस्वार ह्यांच्या कोलकाता येथे प्रयाणाचीच प्रतीक्षा होती. मात्र कोलकातापर्यंतचा प्रवास वेगवेगळा होणार होता. सायकली झुकझुकगाडीने जाणार होत्या तर सायकल स्वार त्यानंतर दोन दिवसांनी वायुमार्गाने कोलकाता येथे पोचणार होते.

सायकली CST येथील पार्सल ऑफिस मध्ये जमा करायच्या होत्या. मला आणि संजयला ते ऑफिस, तेथील कारभार, परिस्थिती आता ओळखीची झाली होती. मनोज हा मूळ दादरकर. त्याचे एक घर दादरला होतेच. त्यामुळे तो त्याच्या सायकलसह आधीच दादरला पोचला होता. तर संजयने पुण्याहून ठाण्याला सायकल आणून ठेवली होती. मी आणि संजय त्याला दादर येथे भेटून मग तिघांनी एकत्र CST ला सायकली चालवत जायचे ठरवले. आमच्या सायकली व्यवस्थित पॅक करण्यासाठी मदत करायला मी सुमितला सांगितले होतेच. सुमितने अगदी तत्परतेने होकार कळवला होता. 

मी डोंबवलीहून घरून निघून ऐरोली मुलुंड लिंक रस्त्याने पूर्व द्रुतगती मार्गावर संजयला भेटायचे ठरवले होते. मात्र माझा सूर्य थोडा उशिरानेच उगवला. त्यामुळे मी शीळ फाट्याहून वाशिमार्गे जातो असे कळवले. माझा आयरोलीचा वळसा वाचला तर आम्ही वेळेची थोडी कसर भरून काढू शकत होते. मोहिमेच्या कल्पनेने फुजी खूष होतीच. त्यामुळे ती मला चांगली साथ देत होती. आम्ही लवकरच संजयला आणि मग पुढे दादर येथे मनोजला भेटलो. संजय ठाण्याहून सायकल चालवत आला होता.

आमच्या रपेटीची मनोजला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्याने लगेचच क्षुधाशांतीबद्दल विचारले. पोटात कावळे ओरडायला लागले होतेच. त्यामुळे मी आणि संजयने वेळ न दवडता होकार दिला. मनोज दादरकर असल्याने त्याला तेथील चांगलीच माहिती होती. मनोज आम्हाला घेऊन दादर TT circle जवळील ' जोशी बुढाकाका माहीम हलवावाला ' कडे वळला. आम्ही थोडे थांबूनच दुकानाकडे पाहिले. वेळ मारून नेता येईल इतपत चांगले खाद्यपदार्थ तिथे मिळतील असे आम्हाला वाटत होते. आम्ही दुकानात शिरल्यावर तेथील खाद्यपदार्थ विचारत थोडा अंदाज घेत होतो. दुकानदार अतिशय आपुलकीने विचारत होता. तिथे बरेच पदार्थ दिसत होते. दुकानदाराने मात्र अतिशय नम्रपणे मात्र आग्रहाने वेगवेगळे पदार्थ घ्यायला सुचवत होता. त्याचे नाव होते निर्भय! 


त्याचा प्रसन्न चेहरा, मैत्रीपूर्ण वागणूक आणि शांत स्वभाव ह्यामुळे आम्ही त्याच्या सूचनेनुसार आम्ही एकेक प्रकार चाखून पाहू लागलो. सगळेच पदार्थ उत्तम प्रतीचे असल्याची खात्रीच झाली. तेथील मिठाया तर अप्रतिम होत्या. दुकानाकडे बाहेरून बघताना आम्ही केवळ वेळ मारून नेण्याचा विचार करत होतो. मात्र आम्हाला चक्क मेजवानीचा लाभ मिळत होता. निर्भयला आमच्या मोहिमेची माहीत देत आणि त्याचे विशेष आभार मानत आम्ही CST कडे निघालो.





पार्सल ऑफिसचे सोपस्कार पार पाडत असताना सुमितही तिथे आलाच. मग तर आम्ही अगदीच निर्धास्त झालो. सुमितने सांगितलेले पॅकिंग मटेरियल मी घेऊन गेलो होतोच. सुमितने आता सायकलींचा ताबा घेतला. तीनही सायकली व्यवस्थित सजवून आम्ही त्यांना पार्सल ऑफिस मध्ये जमा केले. त्यानंतर आम्ही थोडे निवांत झालो. अर्थातच माझी पावले त्यानंतर ' शिवाला ' कडे वळली. संजय आणि सुमितला ते माहित होतेच. ' शिवाला ' च्या बिर्याणीने मला तीन दशकांपूर्वी दोन वर्षे पोसले होते. आजही ' शिवाला 'ची चव रसनेची तृप्ती करत होती. मी जर काही मिस करत होतो तर ते होते तीन दशकांपूर्वी तेथील गल्ल्यावर मिळत असलेले मसाला पान. गेली अनेक वर्षे त्यांंनी ती प्रथा बंद केली होती. 

अखेरीस तिथे पान न घेताच आम्ही फोर्ट मार्केटला गेलो. तिथे थोडी राहिलेली खरेदी करत मी आमच्या मोहिमेची पूर्वतयारी पूर्णत्वाला गेल्याची खात्री करून घेतली.


(LUGGAGE V/S PARCEL
जेव्हा आपण ट्रेनने जाणार असतो आणि आपल्याच गाडीने आपल्या सायकली न्यायच्या असतात तेव्हा त्या रेल्वेच्या दृष्टीने LUGGAGE मध्ये असतात. त्यासाठी आपल्याला आपल्या गाडीच्या वेळेच्या बऱ्याच आधी जावे लागते. मुख्य म्हणजे आपले पक्के reservation आधी करावे लागते. ते reservation तिकीट दाखवून त्यानुसार सायकली luggage बोगीतून आपल्या गाडीनेच प्रवास करतात. 

मात्र जेव्हा आपण प्रवास करणार नसतो, फक्त सायकली गाडीने पाठवायच्या असतात तेव्हा रेल्वेच्या दृष्टीने त्या पार्सल सेवेचा भाग असतात. पार्सल केलेल्या सायकली त्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशीही पाठवल्या जाऊ शकतात. त्या कोणत्या गाडीने पाठवल्या जातील ह्याबद्दल आपल्याला त्या पार्सल ऑफिसमध्ये जमा करताना कळत नाही. मात्र जेव्हा त्या एखाद्या गाडीत ठेवल्या जातात तेव्हा आपल्याला रेल्वेकडून मेसेज येतो. तसेच त्या गंतव्यस्थानी उतरल्यावरही आपल्याला मेसेज येतो. त्या उतरवल्यावर विशिष्ट वेळेत आपण त्या रेल्वेकडून न घेतल्यास आपल्याला जादा चार्ज लागू होतो)

शनिवार, १३ जून, २०२६

जर्सी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर: भाग ७

संघभावना ही माझ्यासाठी नेहमीच महत्वाची ठरली आहे. आपण एखाद्या खेळात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात आपण एकल सादरीकरण करत असतो त्यावेळी सर्वस्व पणाला लावत असूही मात्र जेव्हा आपण तेच सादरीकरण जर एखाद्या गटामार्फत किंवा संघ म्हणून करतो तेव्हा ते अधिक प्रभावीपणे करत असतो. म्हणूनच cycle2work अथवा सराव करताना  जरी मला एकल सायकलिंग करावे लागत असले तरी जेव्हा दीर्घ दिवसांची सायकल मोहीम असेल तेव्हा मी गटाने सायकल सफर करणे पसंत करतो.

संघभावना अधिक बळकट होण्यासाठी एकमेकांची साथ, सामंजस्य, पूरक गुण जसे आवश्यक असतात तसेच आणखी एक गोष्ट मला महत्वाची वाटते.... जर्सी! जेव्हा गटातील सर्वजण एकसारखी जर्सी घालून एखादी गोष्ट साध्य करत असतात त्यावेळी ते सर्वजण अधिक जबाबदारीने, कसोशीने आणि वैयक्तिक क्षमतेपेक्षाही अधिक क्षमतेने आपले साध्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आम्ही जरी तीनच सायकलस्वार सफरीसाठी जाणार असलो तरी मला आमच्यासाठी एक जर्सी हवी होतीच.

मागच्या वर्षी मुंबईतील पांडुरंग निकम ह्यांनी आम्हा तीनजणांसाठी जर्सी बनवून दिली होती. ती आम्हाला खूपच आवडली होती. मी त्यांना ह्याही वर्षी अगदी भाद्रपदातील गणपती उत्सवापासूनच जर्सी देण्याबद्दल सांगितले होते. मात्र गणपती मंडळाची कामे झाल्यावर त्यांचा कामगार जो गावाला जाऊन बसला तो दिवाळी संपली तरी आला नाही. त्यांनी खरतर मला आधीच त्याची कल्पना दिली होती की तो कधी येईल ह्याचा भरवसा नाहीये. मात्र मला आशा होती की तो येईल आणि आम्हाला जर्सी बनवून देईल. आमचा मोहिमेचा दिवस मात्र जवळ जवळ येत होता. मला सुट्टी घेऊन मुंबई गाठून जर्सी बनवून घेणे शक्य नव्हते. संजय आता पुण्याला राहत असल्याने त्यांनाही शक्य नव्हते, तर मनोज कर्जतला असल्याने त्यालाही शक्य नव्हते. मी ठाणे डोंबिवलीमध्ये शोधमोहीम सुरू ठेवली. मात्र सगळीकडून नकारघंटा येत होती. जर्सी हा विषय इतका अवघड ठरेल असे आधी वाटले नव्हते. 

समाजमाध्यमावरील एका व्यावसायिक गटावर मी विनंती करताच मला सूचना आली की तुम्ही ऑनलाईन जर्सी मागवा त्यावर तुम्हाला हवे तसे मी प्रिंट करून देईन. मला कल्पना पटली. मी अमेझॉन, फ्लिपकार्ट, Decathlon वर शोधमोहीम सुरू केली. मला पाहिजे तशी सायकल जर्सी सापडली. अखेरीस आमची सायकल जर्सी मोहिमेच्या साधारण आठवडाभर आधी मला हवी तशी tagline जर्सी वर प्रिंट करून हातात पडली.

कोलकाता गुवाहाटी सायकलसफर: भाग ६

 कोलकाता ते गुवाहाटी हे अंतर हजार किमीपेक्षा जास्त होते. दरदिवशी साधारण १०० किमी असा अंदाज केला तर १० दिवस सायकल प्रवास अपेक्षित होता. मात्र मला वाटेत शांतिनिकेतन येथे जायचे होते. ते आमच्या मार्गात नव्हते. वाटेतील ठिकाणच्या राहण्याची व्यवस्था पाहण्यासाठी मी couchsurfing आणि warmshower ह्या दोन्ही साईट्सवर माझी प्रस्तावित राईड टाकली. वाटेतील तीनचार ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते अश्या प्रतिक्रिया आल्या. 


 आमच्या मोहिमेदरम्यान फार घाट नसावेत असा माझा अंदाज होता. मात्र रस्त्याची कामे कुठे सुरू आहेत का, रस्ता कितपत प्रशस्त आहे, रहदारी किती असते, रस्ता नेमका कोणत्या अवस्थेत आहे ह्याची माहिती नव्हती. Couchsurfing द्वारे एकाने मला सोय होईल असे कळवले. मात्र त्याच्या उत्तरात मला मी न विचारताच रस्ते खराब आहेत, वाटेत कामे सुरू आहेत, रस्त्यांची स्थिती भयानक आहे... आपण जरूर या, रहायची व्यवस्था होईल असे नागपुरी लहेज्यात कळवले होते. अर्थात रस्ता कितीही खराब असला तरी मी, संजय आणि मनोज ते निभावून नेणार होतोच.


संजय आणि मनोज सफरीदरम्यान साथ द्यायला तयार होतेच. दोघांचा सरावही उत्तम सुरू होता. मनोज तर नवरात्री दरम्यान मुंबईहून कच्छ पर्यंत सायकल प्रवास करून आला होता. त्यामुळे त्याची वैयक्तिक तयारी आमच्यापेक्षा उत्तम झाली होती. त्यामुळे मी त्या दोघांना अशा भयानक प्रतिक्रियेबद्दल सांगितलेही नाही. मात्र जिथे जिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकत आहे त्याची माहिती त्यांना दिली. 


शांतिनिकेतन येथे मला मुक्काम करायचाच होता. मी शांतिनिकेतन विषयी गुगलबाबांना माहिती विचारली. माझी कल्पना आणि प्रत्यक्षातील शांतिनिकेतन ह्यामध्ये बराच फरक असल्याचे लक्षात आले. मला वाटत होते की शांतिनिकेतन म्हणजे एखादे विद्यापीठ असावे. त्यांचे एक कॅम्पस असेल. तिथे आपण जाऊ, तेथील लोकांना भेटू, विद्यापीठाची माहिती घेऊ. मात्र गुगल बाबा आणि गंधार ह्यांनी सांगितल्याप्रमाणे शांतिनिकेतन हे तर एखाद्या शहराप्रमाणे आहे. केवळ ५ विद्यार्थ्यांसह रवींद्रनाथ टागोरांनी सुरू केलेल्या शांतिनिकेतन मध्ये सध्या शेकडो नव्हे, सहस्त्र नव्हे तर तब्बल सहा सहस्रहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे गुगलबाबा सांगत होते. अश्या ठिकाणी राहण्याची सोय नक्की होईल असा विश्वास मला वाटत होता. इतरही दोन तीन ठिकाणी राहण्याची सोय होत असल्याचे समजले होतेच. त्यामुळे मोहिमेच्या पूर्वेकडील तयारीबाबत मी समाधानी होतो. 


मात्र मोहीम सुरू होण्याअगोदर येथे मुंबईतही काही पूर्वतयारी करायची होती.

शुक्रवार, १२ जून, २०२६

कोलकाता गुवाहाटी सायकलसफर: भाग ५

 'तुम्हाला lecture घेता येईल का?' सुरभीचा संदेश आला होता. मी थोडासा गोंधळातच पडलो. मी तिला उत्तर दिले की आपण उद्या फोनवर बोलू. दुसऱ्या दिवशी फोन केला तेव्हा तिने सांगितले की पर्यावरण दक्षता मंडळाच्या मार्फत मला lecture द्यावे लागेल. मला तर असा काहीच अनुभव नव्हता. पण सुरभीने मला आश्वस्त केले. मग मी ह्या प्रयोगासाठी तयार झालो. लेक्चर online असणार होते. अखेर ते धाडस केलेच. माझा विषय अर्थातच '' श्विनसफारी " हा होता.


लेक्चर online द्यायचे होते. सुरभीने मला प्राथमिक माहिती दिली, माझी ओळख करून दिली आणि माझे लेक्चर सुरू झाले. थोडेसे मुद्दे मी कागदावर लिहून आणले असले तरी कॅमेराकडे पाहत, समोर कोणीही व्यक्ती दिसत नसताना कसे बोलता येईल ह्याचे मला दडपण आले होतेच. मात्र पहिल्या वाक्यातच लय सापडली. विषय आवडीचा होता. त्यामुळे लेक्चर माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगले झाले. नंतर प्रश्नोत्तरेही झाली. 


लेक्चरमध्ये मी आमच्या प्रस्तावित कोलकाता गुवाहाटी सायकल सफरीचा उल्लेख केला होताच. त्यानंतर गप्पा मारता मारता मी सुरभी आणि श्री विद्याधर वालावलकर ह्यांनाही कोलकाता, गुवाहाटी आणि मार्गातील ठिकाणी काही व्यक्तींचा संपर्क होऊ शकतो का ह्याबद्दल विचारणा केली. दोघांनीही मला लगेचच आश्वस्त केले. 


दरम्यान गंधारने कोलकाता येथील सायकलपटू श्री संदीप चटर्जी ह्यांचा संपर्क क्रमांक दिला. मातृभाषेतील शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सायकलवरून भारत भ्रमण करत असताना गंधार संदीपकडे राहिला होता. सुरभीने गुवाहाटी येथील श्री रवींद्र हणमत्तेकर ह्यांचा संपर्क क्रमांक दिला. गंधारने देखील रविंद्रजींकडे मुक्काम केला होता. त्यानेही रवींद्र हणमत्तेकर ह्यांचा संपर्क क्रमांक दिला. मी संदीप आणि रवींद्र ह्या दोघांशी संपर्क साधताच दोघांनीही आमची व्यवस्था होऊ शकेल ह्याची खात्री दिली. आमच्या सायकल सफरीचा आरंभ आणि सांगता होणार असलेल्या ठिकाणची आमची व्यवस्था झाली होती. आता मार्गातील इतर ठिकाणांच्या व्यवस्थेचा अंदाजही घ्यायचा होता.


गुरुवार, ११ जून, २०२६

कोलकाता गुवाहाटी सायकलसफर: भाग ४

 कोणतीही मोहीम यशस्वी करायची असेल तर त्याची पूर्वतयारी ही खूप महत्वाची असते. आपण एखादी वार्षिक परीक्षा देण्यासाठी वर्षभर अभ्यास करणे अपेक्षित असते तसेच काहीसे मोहिमेच्या पूर्वतयारीबाबतही आहे. सफर जेवढी मोठी तेवढीच पूर्वतयारी जास्त अभ्यासपूर्ण हवी.


सफर सुरू होण्याआधी ती आपल्या मनात आकार घेणे गरजेचे असते. नियमित सराव, आवश्यक साधनसामुग्री, संपर्क व्यवस्था, प्रस्तावित ठिकाणे आणि मार्ग ह्यांची सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक माहिती आणि त्यातील अचूकतेची पारख हे सगळे मोहिमेच्या पूर्वतयारीचाच भाग. 


नियमित सराव तर सुरू होताच. साधनसामुग्री मध्ये  सायकल संबंधित साधनसामुग्री आणि सायकलस्वारांची साधनसामुग्री दोन्ही महत्वाची. अर्थातच त्याचीही सूची केली तर मर्यादित मात्र आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी बरोबर असल्याची खात्री होऊ शकते.  (सूचक यादी ह्या भागात अखेरीस देत आहे)


मुंबई, पुणे येथील सुहृद मार्गदर्शक जमेल ती मदत करतील ह्याची खात्री होतीच. मात्र त्याच बरोबर कोलकाता, गुवाहाटी तसेच वाटेतील इतर ठिकाणे येथे काही व्यक्तींचा संपर्क होऊ शकतो का ह्याची चाचपणी मी सुरू केली. 


अनुभवी सायकलपटू तसेच सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते ज्यांचा बंगाल, आसाम येथे संपर्क असू शकतो अश्यांना मी विचारणा करत होतो. तसेच couchsurfing, warmshower अश्या फिरस्त्यांना एकमेकांना संपर्क साधू देणाऱ्या सोशल साईट्स वरही सातत्याने माझी चाचपणी सुरू झाली होती. 


ज्या भागात आपण भेट देणार आहोत तेथील समाज जीवन, त्यांचे आदर्श, तेथील इतिहास आपल्याला माहिती असेल तर आपण त्यांच्याशी जुळवून घेऊ शकतो. ह्या बाबींची माहिती घेऊन त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवली तर तेथील लोक आपल्याला स्वीकारू शकतात. तेथील संस्कृतीचा मान आपण ठेवला तर त्या भागातील लोकांनाही आपल्याबद्दल आपुलकी वाटू शकते. अर्थातच ही सगळी माहिती हासुद्धा आपल्या मोहिमेच्या पूर्वतयारीचाच भाग असतो. 


त्या भागातील रस्ते कोणत्या दर्जाचे आहेत, तेथील भागात चढ उतार किती प्रमाणात आणि किती तीव्रतेचे आहेत हे माहित असेल तर आपल्याला त्याप्रमाणे आणि त्या प्रमाणात सराव करता येऊ शकतो. मोहिमेचे यशापयश प्रत्यक्ष मोहीम सुरू असतानाच्या घटनांवर अवलंबून असते तेवढेच आपल्या पूर्वतयारीवरही अवलंबून असते.

------- 

* सायकल सफर करण्यासाठी सूचक गोष्टींची यादी:

१) Cycle Ride:-

-Head Lamp

-Tail lamp(LED)

-Cycle bell,

- Mirror, (if required and if u r used to)

-Gloves

-Goggles

-Two bottles of water

-Two cotton scarf

-Basic medicine

-Electoral sachet,

-Dryfruits/ Dryfruit laddoos (or similar energetic food as per own choice.)

-Mini sack / sling bag

-Camera/Gopro, if necessary

-Used shoes (new shoes not recommended)

-Padded cycling shorts

&

In the baggage:-

-Tooth brush / paste

-Soap / Shampoo

-Body wash

-Sun screen lotion, if required

-Odomos / mosquito coil

-Kailas Jeevan

-Mobile charger

-Two T-shirts

-Two track pants

-Undergarments

-Two pair of socks

-Slippers

-1 plate + Glass+ spoon

-Spare batteries – for torch, tail lamp LED

-Sleeping bag (if available) or two bed sheets

-Hangers to dry clothes

-One fresh dress for return travel

Cycle Accessories:

-Repairing Kit,

-2 spare tubes,

Cycle cleaning:-

-Old tooth brush

-1mx1m - Piece of cotton cloth

बुधवार, १० जून, २०२६

. कोलकाता गुवाहाटी सायकलसफर: भाग ३

 कोलकाता गुवाहाटी ह्या मार्गात भेटणारी माणसे, निसर्ग ह्याबद्दल जाणवत असलेले कुतूहल अधिकाधिक वाढत असतानाच मी मोहिमेत सहभागी होण्यासाठी इतर साायकलपटूंना आवाहन करू लागलो. संजय दात्त्ये हे नाव तर मोहीम ठरण्याआधीपासूनच नक्की झाले होते. आनंद (राजू) पाटील मात्र आमच्या मोहिमेच्या आसपास दुसऱ्या एका मोठ्या मोहिमेत सहभागी होणार असल्याने आमच्या मोहिमेत सहभागी होऊ शकणार नव्हता.

मागच्या मोहिमेत सामील होऊ इच्छिणारा मात्र वेळ न जुळल्यामुळे सामील होऊ न शकलेल्या एका सायकल मित्राला मी संदेश पाठवला.... मनोज चौघुले!

मनोजनेही फार विचार न करता तो कोलकाता गुवाहाटी सायकल मोहिमेत सहभागी होत असल्याचे मला कळवले. मनोज सध्या कर्जत जवळ राहत होता. मी डोंबिवली येथे तर संजय पुण्याला. कोणत्याही मोहिमेची पूर्वतयारी करताना एकत्र सराव करणे खूप महत्वाचे असते. एकमेकांची बलस्थाने, कच्चे दुवे समजणे, एकमेकांशी जुळवून घेणे... संघ तयार होण्यासाठी एकत्र सराव आवश्यक असतोच. आम्हा तिघांना ते फारच अवघड होते. सराव तर लांबच पण भेट होणेही सोपे किंवा सोयीचे नव्हते.

संजय आणि मी अनेक राईड एकत्र केल्या होत्या. अगदी रविवार सकाळच्या छोट्या राईड पासून कोलकाता चेन्नई ह्या जवळपास १७०० किमी राईड पर्यंत अनेक राईड ला संजय आणि मी एकत्र होतो. त्यामुळे संजयबद्दल अंदाज होताच.

मनोजशी तर अजून कधीही प्रत्यक्ष भेटही झाली नव्हती. आमची ओळख केवळ समाजमाध्यमांद्वारेच झाली होती. त्याच्याबरोबर राईड करण्याचा योग आला नसला तरी त्याच्या सायकल सफरींबद्दल ऐकले होते.

आम्हाला एकत्र सराव करता आला नाही तरी एकदा एकत्र भेटून प्रस्तावित सायकल सफरीबद्दल चर्चा करायसाठी भेटायचे ठरले. मनोजने त्याच्या कर्जतच्या घरी भेटीला येण्यासाठी निमंत्रण दिले. मी आणि संजय लगेचच तयार झालो. कर्जत येथे मनोजने आमची उत्तम सरबराई केली. एकत्र सराव करता येणार नसला तरी एकमेकांबद्दल पुरेशी खात्री आणि विश्वास ह्या भेटीमुळे वाटत होता.

मंगळवार, ९ जून, २०२६

कोलकाता गुवाहाटी सायकल सफर : भाग २

 कोलकाता... गेल्या वर्षी पाहिलेले कोलकाता... आता आमचे स्वागत कसे करेल... आतापर्यंत न पाहिलेले गुवाहाटी शहर आम्हाला आपलेसे करेल का..! वाटेतील निसर्ग, माणसे, संस्कृती कशी असतील ह्या सगळ्याची उत्सुकता वाटत होती. 


सिटी ऑफ जॉय' म्हणजेच कोलकाता शहराबद्दल एक आकर्षण मनात होतेच. महाराष्ट्राप्रमाणेच बंगालमध्येही साहित्य, कला क्षेत्रापासून पासून स्वातंत्र्यसैनिकांची थोर परंपरा आहे. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, मेघनाद सहा अश्या विविध क्षेत्रातील अग्रणींची ही भूमी. ' लालबालपाल ' ह्या त्रिमूर्तीपैकी पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल ह्यांचीही ही भूमी. अर्थातच फिट इंडिया मोहीमे अंतर्गत पुढील टप्पा कोलकाता येथून सुरू करायचा असल्याने उत्सुकता, आनंद आणि रोमांच ह्यांनी मन भरले होते.

कोलकाता शहर आता अनोळखी राहिले नव्हते. मात्र त्याविषयीची उत्सुकता आता अधिकच वाढली होती. शहरातील अवाढव्य रेल्वे स्थानक आता ओळखीचे झाले होते. तेथील पार्सल ऑफिसही परिचयाचे झाले होते. शहरातील रस्ते, निसर्ग, माणसे आपलीशी वाटत होती. खरे पाहता मागील वर्षीच्या अनुभवामुळे कोलकाता शहराविषयीचे कुतूहल अधिक वाढले होते.


कोलकाता प्रमाणेच बंगालचा इतर भाग पहायची जिज्ञासा होतीच. विशेषतः शांतिनिकेतन बद्दल बऱ्याच वर्षांपासून उत्सुकता होती. भारताचे राष्ट्रगान ज्यांनी लिहिले आहे त्या रवींद्रनाथ टागोर ह्यांच्याबद्दल मनात आदर होताच. त्यांनी सुरू केलेल्या शांतिनिकेतनला भेट देण्याची, तेथील जीवन समजून घेण्याची विशेष उत्सुकता होती. येथील शिक्षणपद्धतीविषयी जाणून घ्यायचे होते. मनात अनेक प्रश्न होते. त्याची उत्तरे शोधायची होती. 


कोलकाता, शांतिनिकेतन ह्यापलिकडील बंगालही जाणून घ्यायचा होता. कोलकाता चेन्नई मोहीम करताना बंगालमध्ये मुक्काम फार झालाच नव्हता. आता गुवाहाटीच्या दिशेने जाताना मात्र बंगालचा भाग अनुभवता येणार होता. शहरेच नव्हे तर बंगालमधील खेड्यातील अंतरंग पाहता येणार होते. बंगाली पदार्थातील गोडवा तेथील लोकांच्या स्वभावातही आहे का ह्याचाही अनुभव घ्यायचा होता.


कोलकाता... नव्हे बंगाल ची साद ऐकू येऊ लागली होती.

रविवार, ७ जून, २०२६

उपोद्गघात: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर

 भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे....'

ही प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये प्रत्येकाने हजारो वेळा म्हटलेली आहे... प्रतिज्ञे मधील ह्या ओळी अगदी मुखोद्गतही झाल्या असतील. भारतीयत्वाचे वैशिष्ट्य  सरोजिनी नायडू ह्यांनी अतिशय कमी शब्दात मात्र परिपूर्णपणे सांगताना म्हटले होते, 'भारतीयत्व म्हणजे विविधतेत एकता!'

अश्या ह्या देशातील विविध संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्याच्या उर्मी माझ्या मनात रुजल्या होत्याच. खरे म्हटले तर आपल्या प्रत्येकातच एक भटक्या दडलेला असतो. 'भटकंती' म्हणजे बाहेरील जगाचा आणि स्वतःच्या आतील शांततेचा शोध घेण्याची एक मुक्त प्रक्रिया आहे. आपला देश पहावा, देशातील वेगवेगळ्या संस्कृती अनुभवाव्या ही इच्छा तर होतीच. सायकलवरून फिरताना स्थानिक लोकांशी आपण सहजपणे जोडले जातो ह्याचा अनुभव होताच. त्यामुळे गेली काही वर्ष सायकल चालवत असताना सायकलवरूनच देश फिरावा असे वाटू लागले होते. भटकंती ही कोणत्याही उद्दिष्टविनाही असू शकते. 

२०१९ च्या क्रीडादिना पर्यंत तरी माझ्या सायकलवरून देशभर फिरण्याला केवळ भटकंती करणे हाच उद्देश असावा. मात्र पंतप्रधानांनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी क्रीडादिनानिमित्त 'फिट इंडिया' ही संकल्पना मांडली आणि म्हटले की जरी ही संकल्पना सरकारने मांडली असली तरी ती नागरिकांनी पुढे न्यायची आहे. इतका निस्वार्थी, निर्मळ विचार लगेचच पटला.


स्वतः सुदृढ राहत असताना इतरांनाही त्यासाठी उद्युक्त करणे हा विचार मनाला भिडला होता. त्याहीपलीकडे 'फिट इंडिया ' ही एक चळवळ व्हावी ही इच्छा देखील किती निर्मळ! अश्या ह्या चळवळीचा भाग व्हावे...त्यात खारीचा वाट उचलावा असे मला मनापासून वाटले. ती संकल्पना मी पुढे कशी नेऊ शकतो ह्याचे उत्तर तर आधीपासूनच तयार होते.... खरतर आधी हा प्रश्नच समोर आला नव्हता..म्हणून कदाचित मला ते उत्तर दिसत नव्हते. देशभर सायकल सफर करताना ' फिट इंडिया ' हा संदेश देणे नक्कीच संयुक्तिक ठरणार होते. तशी सुरुवात करूनही झाली होतीच. २०१९ मध्ये पुणे जम्मू, २०२२ मध्ये कन्याकुमारी चेन्नई, २०२४ मध्ये कोलकाता चेन्नई अश्या ' फिट इंडिया ' संकल्पनेअंतर्गत तीन मोहिमा झाल्या होत्याच. 

कोलकाता चेन्नई मोहीम सुरू असतानाच ह्या संकल्पनेमधील पुढील टप्पा कोलकाता गुवाहाटी मनात योजना घेत होता. कोलकात्याहून चेन्नईकडे म्हणजे दक्षिणेकडे सायकल चालवत असताना मन मात्र कोलकात्याच्या उत्तरेला असलेल्या गुवाहाटीकडे जाणाऱ्या रस्त्याचा अंदाज घेऊ लागले होते.

कोलकाता चेन्नई मोहीम सुरू होतानाच पुढील कोलकाता गुवाहाटी ह्या सायकल मोहमेचे सुतोवाच मी केले होतेच. भारताची उत्तर, पश्चिम, दक्षिण सीमारेषा सायकलक्रांत करत असताना पूर्व सीमारेषेबद्दल कुतूहलाची विशेष भावना होती. मागील वर्षी कोलकाता येथून सायकल मोहीम सुरू करत असताना कोलकाता शहराची उत्सुकता आणखीच वाढली होती. कोलकाता गुवाहाटी प्रवास हा मुख्यतः बंगालमधून तर अखेरीस आसाम मधून होणार होता. पूर्वोत्तर सात राज्यांची चाहूल ह्या मोहिमेद्वारे लागणार होती.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...