रविवार, ३१ मे, २०२०

'रब तो हमारे साथ है' -पुणे जम्मू सायकलसफर भाग ४ लेख ६

जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार दिनांक: १५ पौष १९४१


यूरोप खंडातील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित, अशास्त्रीय आणि धेडगुजरी सौर कँलेडर म्हणजेच ग्रेगोरीयन कँलेडर नुसार दिनांक : ५ जानेवारी २०२०


सतलज नदीजवळ वसलेल्या फिरोझपूर शहराची लोकसंख्या साधारण सव्वा लाखाच्या आसपास! तुघलक राजवटीतील सुलतान फिरोजशहा ह्याने १४ व्या शतकात हे शहर वसवले. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर फिरोजपुर हे सीमेजवळचे महत्वाचे शहर झाले आहे. त्यामुळेच काल संध्याकाळी हुसैनिवाला सिमारेषेपाशी आम्हाला सैन्याची कवायत पाहता आली होती. ह्या शांत शहरात काल झोपही गाढ लागली होती.

मात्र सवयीप्रमाणे आज पहाटे ५ वाजताच जाग आली. आमचे आटपुन होईपर्यंत चहा नाश्ताही हजर झाला होता. वास्तविक दीडेक तास रपेट झाल्याशिवाय नाष्टा करणे श्विनला पसंत नव्हते आणि त्यातही चहाबरोबर नाष्टा .. ही तर कल्पनाच सहन होत नव्हती. चहा हा चहा आहे, त्याच्याबरोबर नाष्टा करणे म्हणजे चहाचा अपमानच. शिवाय पहिल्या चहाबरोबर नाष्टा म्हणजे तर घोर अपमानच! पण कसे कोण जाणे आज चहाबरोबर आलेले सँडविच आपोआप स्वाहा झाले.

ह्याचदरम्यान सोहन सोधी, गुरुमुखसिंग आणि हरबीर संधू हेही हजर झाले होते. गंधारमुळे सोहन सोधींशी परिचय झाला होताच. अतिशय साधा, शांत आणि सगळ्यांशी चटकन मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्याविषयी लगेचच आपलेपणा वाटू लागला होता. काल संध्याकाळपासूनची आमची सर्व व्यवस्था सोधींनी आपणहून आणि काळजीपूर्वक पाहिली होती. 'काम करो रब मिलही जायेगा' ही त्यांची धारणा होती.



हरबीर संधू आणि गुरुमुखसिंग हे देखील अतिशय साध्या आणि शांत स्वभावाचे! सोहन सोधींप्रमाणेच त्यांनीही आम्हाला अतिशय आपुलकीची वागणूक दिली होती. भल्या पहाटे आम्हाला पुढील मार्गात साथ करायला सोधींबरोबरच हे दोघेही आले होते.




ह्या त्रयीमुळे आमचा उत्साह नक्कीच वाढला होता. सूर्यनारायण अद्याप समाधीवस्थेतून जागा झाला नसला तरी आम्ही पुढील मार्गक्रमण करायला सिद्ध झालो होतो. अर्थातच नेहमीप्रमाणे कपड्यांचे चार थर, कागदांचे तीन थर आम्ही लपेटून घेतले होतेच. सायकलच्या हाताळ्याला लावलेल्या विजेऱ्या आम्हाला प्रकाश देणार होत्याच शिवाय फिरोजपुर येथील तीन मित्र आम्हाला दिशाही दाखवणार होते. त्यांच्याच जोरावर आम्ही तिमिरावर मात करणार होतो.


सोधींनी आम्हाला कालच सावध केले होते की हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आज दुपारी ३ -३.३० नंतर पावसाची शक्यता होती. त्यामुळे आम्हाला त्याआधी अमृतसरला पोचायला हवे होते. मुंबईत तर हवामान खात्याने पाऊस पडणार असा अंदाज दिला की पाऊस अजिबात पडणार नाही याची खात्री असते. मात्र सोधी हवामान खात्याच्या सुचनेशी पूर्ण सहमत होते.

देवधरांनी रात्री त्यांना भेटायला आलेल्या शाळेतील विश्वस्तांना आम्ही सकाळी शाळेत येऊ असे सांगितले होते. सोधींनी लगेचच काल रात्रीच पावसाच्या शक्यतेबरोबर हेही सांगितले होते की त्या शाळेत जायचे असेल तर अंतरही साधारण १५ किमीने वाढेल. वाटेत कोणालाही भेटायला स्पष्ट शब्दात नकार देणाऱ्या देवधरांना त्यांच्या स्नेहयाला मात्र 'नाही' म्हणता आले नव्हते. श्विनच्या सायकलसफरीचा मूळ उद्देशच नवीन ओळखी करून घेणे, संपर्क वाढवणे हा असतो. म्हणूनच तर काल लुधियानातून अनोळखी फोन येताच अंतर किती आहे ह्याचा अंदाज नसतानाही श्विनने तिथे जाता येईल का हा विचार केला होता. त्यामुळे अर्थातच ह्या शाळेत जायला श्विनची आडकाठी नव्हतीच.

अखेरीस आम्ही अमृतसरकडे जाणारा थेट रस्ता सोडून सतीयावाला बायपास जवळील विवेकानंद वर्ल्ड स्कुल या शाळेच्या दिशेने निघालो. पूर्ण अंधारातच आम्ही जात असल्याने आजूबाजूचा निसर्ग आम्हाला पाहता आला नाही. मात्र शाळा शहराबाहेर रहदरीपासून लांब अश्या शांत ठिकाणी असल्याचे मात्र जाणवत होते. शाळेचे आवार प्रशस्त आणि आखीव होते. तेथे पोचताच आमचे आपुलकीने स्वागत करण्यात आले. रवीराजांनी हजेरी लावली नसली तरी आज त्यांचाच वार म्हणजे रविवार होता. अर्थात त्यामुळे शाळेत विद्यार्थी मात्र नव्हते.

आमचे प्रेमपूर्वक स्वागत झाल्यावर आम्हाला एका दालनात नेण्यात आले. एका लांबलचक मेजाभोवती आम्ही सर्व सायकलस्वार, आमचे फिरोजपुर येथील सायकलमित्र आणि शाळेतील मान्यवर बसल्यावर आम्हाला शाळेविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. चहा बिस्किटांचाही समाचार घेण्यात आला. वातावरण अतिशय भारलेले होते. विद्यार्थ्यांबरोबर आमची भेट न घडल्याने तेथील विश्वस्तांना खंत वाटत होती. सर्व सायकलपटूंना शुभेच्छा देण्यात आल्या. सगळेच वक्ते अगदी मनापासून बोलत होते.











सभागृहातून बाहेर येऊन आम्ही पुन्हा शाळेच्या आवारात आलो. फुजी आणि तिच्या मैत्रिणी आमच्या प्रतिक्षेतच तिथे उभ्या होत्या. आम्ही त्यांच्याजवळ गेलो. इतक्यात शाळेच्या विश्वस्तांनी त्या शाळेत असणाऱ्या एका अनोख्या गोष्टीकडे आमचे लक्ष वेधले. तिथे एका बाजूला प्राथमिक शाळेतील मुलांसाठी चक्क सायकल मार्ग होता. अर्थातच आम्हालाही त्या मार्गावरून जाण्याचा मोह आवरला नाही. त्या चक्राकार मार्गावर सायकलवताना शाळेच्या ह्या उपक्रमामुळे शाळेत भेट दिल्याबद्दल आम्हाला निश्चितच आनंद झाला. शाळेच्या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणासाठी आठवड्यातून अर्ध्या तासाच्या केवळ २ तासिका असण्याच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद वर्ल्ड स्कुलचा हा उपक्रम नक्कीच वाखाणण्याजोगा होता.

गणितासारख्या विषयांद्वारे केवळ मानसिक व्यायाम घडवण्याबरोबर विवेकानंद शाळेत पाहिलेल्या अश्या अभिनव उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायामाचीही लहानपणापासून सवय लावली तर निरोगी नागरिक घडविण्यास नक्कीच हातभार लागू शकतो. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी हॉकीचा जादूगार ध्यानचंद ह्याच्या जन्मदिवसानिमित्त 'सशक्त भारत (फिट इंडिया) हा संदेश देताना म्हटले होते की 'फिट इंडिया हे जन आंदोलन झाले पाहिजे'. फिट इंडिया हे राष्ट्रीय ध्येय व आकांक्षा झाली पाहिजे. त्यांनी सांगितले होते की जरी ह्याची सुरुवात सरकारने केली असली तरी नागरिकांनी स्वतः ह्याचे नेतृत्व केले पाहिजे आणि हे आंदोलन यशस्वी केले पाहिजे. ह्याच संदेशामुळे प्रेरित होऊन आमच्या पुणे जम्मू सायकलसफरीचा उद्देशही सशक्त भारत (फिट इंडिया) ह्या संदेशाचा प्रसार करणे हाच होता. त्यामुळेच विवेकानंद शाळेच्या ह्या अनोख्या उपक्रमामुळे आम्ही प्रभावित झालो होतो. खरंतर रोज तीन तासाच्या मानसिक व्यायामच्या आधी तेवढाच वेळ रोज शारीरिक व्यायामही शाळा कॉलेजमध्ये घडला तर सशक्त भारताचे स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल.

आम्ही विवेकानंद शाळेतून निघालो तेव्हा साधारण ८.३० चा सुमार झाला होता. तिमिरावर अजून तेजोनिधीने पूर्ण वर्चस्व मात्र मिळवले नव्हते. अंधुक उजेडातच आमची पुढील वाटचाल सुरू झाली. सोधी, हरबीर आणि गुरुमुखसिंग आम्हाला मार्गदर्शन करत होते. रस्ता मोकळाच होता. सायकलयात्री धीम्या गतीने पण ठामपणे जात होते. काही वेळातच आमचा रस्ता एका महामार्गाला काटकोनात भिडला. झिरा गावाजवळ आम्ही पोचलो होतो.  समोर जाणारा रस्ता झिरा गावाकडे जात होता. साधारण ४०-४५ किमी अंतर पार झाले होते. आता पुन्हा एकदा जठराग्नी जागृत झाला होता. सगळेजण तडक सहाय्य वाहनात ठेवलेल्या मेव्याकडे वळले. आमची फिरोजपुर येथील मित्रमंडळी आता परत जाणार होती.


रात्री झोपेचा वेळ वगळला तर फिरोजपूर येथिल मंडळींचा सहवास आम्हाला जेमतेम १०-१२ तासांचा. मात्र या कालावधीत त्यांनी आम्हाला जे सोनेरी क्षण अनुभवायला दिले होते ते हृदयाच्या कप्प्यात कायमसाठी जपले जाणार होते. सोधी, हरबीर, गुरुमुख ह्यांनी आमची जी काळजी घेतली त्यामुळे सादुलशहर, अबोहारप्रमाणेच फिरोजपुर येथेही आमचे घट्ट नाते निर्माण झाले होते.

सोधीजी, जो आपली काळजी करतो तोच ईश्वर. रब वोही तो है... जो लोगोंका खयाल रखता है. वह तो हमारे साथही सफर कर रहा है. बस उसका नाम और रूप बदलता रहता है.  कभी वो डॉ जितेंद्र होता है, कभी हरजित, कभी सोहन सोधी, कभी हरबीर तो कभी गुरुमुखसिंग!

शुक्रवार, २९ मे, २०२०

सोनेरी क्षण: पुणे जम्मू सायकलसफर भाग ४ लेख ५

जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार: दिनांक १४ पौष १९४१


यूरोप खंडातील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित, अशास्त्रीय आणि धेडगुजरी सौर कँलेडर म्हणजेच ग्रेगोरीयन कँलेडर नुसार दिनांक : ४ जानेवारी २०२०

 परगटसाहिब गुरुद्वारासाहिब येथील लंगरमधील व्यवस्था अतिशय नेटकी होती. एका मोठ्या सभागृहात रांगेत बसून जेवणाची सोय केलेली होती. जेवण झाल्यावर आपापले ताट, वाटी, भांडे उचलून बाहेर घेऊन जायचे आणि राखेने धुवून परत ठेवायचे. साबणाच्या द्रवाच्या हिशेबात मी थोडीशी राख घेतली आणि ताट धुवू लागलो. एक सरदारणीने ते पाहिले आणि लगेच माझ्याजवळ आली. अन् काहीतरी पुटपुटत पटकन माझ्या हातातील ताट घेऊन तिने त्या ताटाला भरपूर राख फासली आणि ताट लख्ख केले. ती काय बोलत होती ते तिच्या बोलण्यातून काहीच कळले नसले तरी कृतीतून कळले होते. त्यामुळे मी वाटी आणि भांड्यालाही राखेने पूर्ण मढवून काढले आणि वाटी, भांडे स्वच्छ केले. इथे १० लिंबाची शक्ती उपलब्ध नव्हती हे कळायला मला थोडा वेळच लागला होता. राखेने भांडी धुवायची भारतातील प्राचीन कला महानगरांमध्ये लोप पावली तरी गुरुद्वारामध्ये मात्र टिकून होती.

गुरुद्वारामधून आम्ही निघालो तेव्हा डोळ्यासमोर एकच लक्ष्य होते- लवकरात लवकर फिरोजपुरला पोचून तेथील सैन्याची कवायत पाहणे. आम्ही निघालो तेव्हा जेमतेम २ वाजले होते आणि २७ किमी अंतर बाकी होते. त्यामुळे ते सहजशक्यही वाटत होते.   



मग अधिक वेळ न दवडता आम्ही ते अंतर न थांबता एकाच दमात गाठले. शहरामध्ये शिरण्याआधी दोन रस्ते फुटले होते. मग आम्ही आमचे फिरोजपुर येथील यजमान सोहन सोधी ह्यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही शहरात शिरलो. एका मोठ्या चौकात सोधी आणि इतर काहीजण आमची वाट पाहत होते. एव्हाना ३.३० वाजले होते.

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी दीड वर्ष सायकलवरून भारत भ्रमण करणाऱ्या डोंबिवलीकर गंधार कुलकर्णीने सोधींचा संपर्क आम्हाला दिला होता. त्या चौकात आम्ही पोहोचताच आमचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. येथेही आम्हाला सिरोपा बांधण्यात आले. चौकाशेजारीच असलेल्या एका बंगल्यामध्ये आम्हाला नेण्यात आले. अबोहरप्रमाणेच येथेही आम्ही पूर्णपणे यजमानांच्या ताब्यात गेलो होतो. बंगल्यातील आवारात आमचे स्वागत आणि कौतुक झाल्यावर यजमान मंडळींची ओळख सुरू झाली... आणि आम्ही उडालोच. आमचे स्वागत ज्या बंगल्यात होत होते तो प्रत्यक्ष जिल्ह्याच्या डे. कमिशनरचा बंगला होता आणि प्रत्यक्ष जिल्हा डे. कमिशनर आमचे स्वागत करत होते. आम्ही खरोखरच भारावून गेलो होतो. एक आठवण भेटही आम्हाला देण्यात आली.





मात्र आमचा पाहुणचार एवढ्यावरच मर्यादित नव्हता. तर हुसैनिवाला येथील सीमारेषेवर होणारी कवायत आम्हाला पाहता यावी याचीही खबरदारी आमच्या यजमानांनी घेतली होती. फुजी आणि तिच्या मैत्रिणींना डे. कमिशनर बंगल्यामध्ये राहण्याची व्यवस्था करून सायकलस्वारांना हुसैनिवाला सीमारेषेपर्यंत जाण्यासाठी चारचाकी स्वयंचलित गाड्यांचीही सोय करण्यात आली होती. गाड्या अतिशय आरामदायक होत्या. सोधी आणि इतर काहीजण आमच्याबरोबर होतेच. फिरोजपुरपासून हुसैनिवाला सीमारेषा जेमतेम १०-१२ किमी अंतरावर होती. सतलज नदीवरील पूल ओलांडून आम्ही हुसैनिवाला सीमारेषेजवळ पोचलो. 







लगेचच आम्ही प्रेक्षागृहात पोचलो. आम्ही तेथे पोहोचताच कवायतही सुरू झाली. भारत आणि पाकिस्तानचे सैनिक आवेशपूर्ण सादरीकरण करत होते. कवायत सुरू होण्यापूर्वीच धर्मावर आधारित घोषणा देऊ नयेत अश्या सूचना करण्यात आल्या होत्या. सैनिक जेवढ्या आवेशाने सादरीकरण करत होते तेवढ्याच उत्साहाने भारत आणि पाकिस्तानचे नागरिकही घोषणा देत आपापल्या सैनिकांचे कौतुक करत होते आणि त्यांचा उत्साहही वाढवत होते. दुसरे महायुद्ध संपल्यावर मुस्लिमांसाठी वेगळे राष्ट्र हवे ह्या मागणीचा जोर वाढला होता. त्यावेळी उर्दू कवी असगर सोदाई ह्याने दिलेली 'पाकिस्तानका मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह' (अल्लाहखेरीज इतर कोणताही देव नाही) ही घोषणा पाकिस्तानचे प्रेक्षक बेधडकपणे देत होते. ही घोषणा धर्मावर आधारित नव्हती?
भारतीय प्रेक्षकही तेवढ्याच जोराने 'वंदे मातरम' चा जयघोष करत पाकिस्तानी प्रेक्षकांना प्रत्युत्तर देत होते. सगळे वातावरण जादूमय झाले होते. खरतरं पुणे जम्मू सायकलसफरीदरम्यानचा हा उत्कर्षबिंदू होता.

ही कवायत पाहिल्यावर आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. मात्र अजूनही उत्कंठावर्धक क्षण आमची वाट पाहत होते. सोधी आणि त्यांच्या मित्रमंडळींपाठोपाठ आम्ही यंत्रवत जात होतो. पुढे जाताच आम्ही पोचलो ते युद्ध स्मारकाजवळ!

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे अंतिम संस्कार झाले ते हे ठिकाण! फाळणीदरम्यान हे गाव पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या दबावामुळे भारत सरकारने १९६१ साली फजिल्का जवळील १२ गावांच्या बदल्यात हे ठिकाण पाकिस्ताननकडून घेतले. बटूकेश्वर दत्त आणि भगतसिंगांच्या मातोश्री विद्यावती यांचाही अंतिम संस्कार येथेच झाला होता.

स्वातंत्रलढ्यातील ह्या तीन तेजस्वी वीरांना आदरांजली देण्यासाठी एक ज्योत येथे आज तेवत आहे. ह्याच ठिकाणाहून फिरोजपुरहुन आज पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कसूर- पेशावर कडे जाणारा रेल्वेमार्ग पूर्वी अस्तित्वात होता. मात्र भारत पाकिस्तानच्या युद्धांमध्ये हा रेल्वेमार्ग उध्वस्त झाला. शहिद दिनानिमित्त दरवर्षातून एकदा फिरोजपुरहून येथे एक विशेष गाडी मात्र चालवली जाते.











हुसैनिवाला येथील कवायत, शहिद स्मारक येथील भेट ह्यामुळे वातावरण अगदी मंतरलेले होते. त्या आठवणी सोबत घेऊनच आम्ही पुन्हा डे. कमिशनरच्या बंगल्याकडे परतलो. फुजी आणि तिच्या मैत्रिणी तिथे आमची वाट पाहत होत्या.


फुजी आणि तिच्या मैत्रिणींची डे. कमिशनर बंगल्यामध्ये चांगली सोय झाली होती. त्यामुळेच खरतरं आम्ही निर्धास्तपणे त्यांना तिथे ठेवून हुसैनिवाला येथे जाऊ शकलो होतो. कमिशनर बंगल्यावर पोचल्यावर मात्र मी लगोलग फुजीला जवळ घेतले. श्विन आजही टेम्पोमध्ये होती. सगळेजण पाठोपाठच तिथे पोचले आणि लगेचच आपापल्या मैत्रिणींना घेऊन आजचे वास्तव्यस्थान असलेल्या हॉटेल जनक येथे पोचलो. हॉटेलमध्ये पोचल्यावरही आम्हाला थोडे शिथिलगात्र होता यावे म्हणून सोधींनी थोडी मोकळीक दिली खरी.. मात्र इतक्यात देवधर ह्यांची बहीण आणि एकादशीच्या अश्याच एका ओळखीतून आमचे कौतुक करण्यासाठी काहीजण येऊन पोचले. देवधर आणि मी त्यांना सामोरे गेलो. देवधरांच्या ओळखीतील गृहस्थ एका शाळेमध्ये ट्रस्टी होते. हॉटेलमध्येच आमचे आदरातिथ्य करण्यात त्यांचे समाधान होत नव्हते. त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी अमृतसरला जाताना त्यांच्या शाळेत येण्याचे आग्रहाने निमंत्रण दिले. त्यांचे अगत्य आम्हाला जाणवत होते. त्यांची विनंती मोडणे आम्हाला अवघड जात होते. देवधरांनी त्यांना दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन जाण्याचे आश्वासन दिल्यावरच त्यांनी आमचा निरोप घेतला.


रात्रीचे जेवण होईपर्यंत आम्ही पूर्णपणे थकलो होतो. सगळेजण आपापल्या खोलीत गेले. इतक्यात श्री अय्यर यांचे मित्र श्री बक्षी ह्यांचा मुलगा श्री अय्यर ह्यांना भेटायला आला. त्याला पाहताच श्री अय्यर पुन्हा उत्साहात आले. त्यांना किती बोलू आणि किती नको असे होत होते. मी, देवधर, बक्षी आणि सोधी फक्त श्रवणभक्ती करत होतो. आमची स्थिती सोधींना कळली होती तशीच बक्षीच्याही लक्षात आली होती. मात्र अय्यरांना थांबवणे आमच्या कोणाच्याही आवाक्यात नव्हते. देवधर आणि मी तर केव्हाही खाली पडू अश्याच स्थितीत होतो. प्रत्येक क्षण आता युगासारखा वाटत होतं. मात्र अय्यर बोलताना आम्हाला संधीही देत नव्हते. त्यानंतर अय्यरांचा एकपात्री प्रयोग संपून बक्षी व सोधींचा निरोप घेत आम्ही रूमवर परतलो तेव्हा निद्रादेवीने क्षणार्धात आमचा ताबा घेतला.

शनिवार, २३ मे, २०२०

पंढरीची चुकलेली वारी:पुणे जम्मू सायकलसफर :भाग ४ - लेख ४

जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार: दिनांक १४ पौष १९४१


यूरोप खंडातील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित, अशास्त्रीय आणि धेडगुजरी सौर कँलेडर म्हणजेच ग्रेगोरीयन कँलेडर नुसार दिनांक : ४ जानेवारी २०२०

जेमतेम ५०००० च्या आसपास लोकसंख्या असलेले फजिल्का जिल्ह्यातील जलालाबाद हे शहर दोन शतकांपूर्वी मामदोतच्या नवाबाचे राजधानीचे ठिकाण होते. तीन वर्षांपूर्वी पहिला आंतरराष्ट्रीय कबड्डी सामना जलालाबाद येथेच खेळला गेला होता. सध्याचा उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू शुभमन गिल हाही जलालाबाद येथीलच.

जलालाबाद येथील चौकात त्या मजूर संघाच्या अनोळखी सदस्यांनी आमचे स्वागत आणि आदरातिथ्य केल्यावर आम्ही पुढे निघालो. मात्र त्यावेळी त्या सदस्यांनी आम्हाला दुपारच्या जेवणासाठी एका गुरुद्वारातील लंगरमध्ये जाण्यास आवर्जून सांगीतले होते. ते लोक इतक्या पोटतिडकीने सांगत होते की जणू आम्हाला जेवण देणे हे त्यांचेच कर्तव्य होते. आम्हाला केवळ चहा बिस्किटे देऊन त्यांचे समाधान झाले नव्हतेच. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीही त्या लंगरचा लाभ घेण्यासाठी उत्सुक होतो.

त्या मजूर संघाच्या सदस्यांनी साधारण २०-२५ किमी अंतरावर लंगर असल्याचे सांगितले होते. तास सव्वा तासाची दौड झाल्यावर सगळ्यांची गती मंदावली होती. एकादशी आणि निरूपमा भावे ह्या आघाडीवर होत्या. मात्र त्यांचीही गती मंदावली होती. जलालाबाद येथून सगळ्यात शेवटी सुरुवात करणाऱ्या फुजीने त्यांना गाठले. सगळेजण मंदावल्यावर फुजीने आघाडी घेतली. थोडा अंदाज घेत फुजीने एका गुरुद्वारासमोर थांबा घेतला आणि तेथे चौकशी केली. एकादशी आणि निरूपमा भावे बरोबरच होत्या. जलालाबाद येथे आम्हाला सांगितलेला गुरूद्वारा तोच होता. हे कळताच सगळ्यांनाच हायसे वाटले.




 लोधारण गावाजवळील ह्या परगटसाहिब गुरुद्वारासाहिब येथे लंगरमध्ये आमची व्यवस्था होणार होती. सगळे सायकलपटू थोडे निर्धास्त झाले. भूक तर लागली होतीच. आम्ही गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत माझी मावशी म्हणजे निरूपमा भावे हिला एक अनोळखी फोन आला. तो माणूस लुधियानाहून बोलत होता. आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे पाहूणचारासाठी यावे ह्यासाठी तो अक्षरशः गयावया करत होता. अबोहार येथील प्रसारमाध्यमांनी आमच्याविषयी दिलेली माहिती लुधियानालाही पोचली होती.

खरतर पुणे जम्मू सायकलसफर ठरली तेव्हाच सायकलच्या भारतातील ह्या पंढरीला जाता यावे असे श्विनला वाटत होते. तमाम भारतीयांना सायकलचे वेड लावणारे ओमप्रकाश मुंजाल ह्यांचे हे गाव. ओमप्रकाशजींनी १९४४ साली त्यांच्या भावांबरोबर अमृतसर येथे सायकलचे सुटे भाग विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे ते लुधियानाला स्थायिक झाले. पण केवळ सुटे भाग विकण्यापेक्षा आपणच सायकल का तयार करू नये ह्या ध्यासाने त्यांना घेरले. आणि १९५६ साली सायकल निर्मितीसाठी त्यांनी 'हिरो सायकल्स' ची स्थापना केली. सायकलनिर्मितीच्या ध्यासाने त्यांना इतके झपाटले होते की सुरुवातीच्या काळात आपल्या बंधूशेजारी उभे राहून दाढी करतानाही ते व्यावसायिक चर्चा करत असत आणि निर्णयही घेत असत. ओमप्रकाशजी केवळ व्यावसायिक नव्हते तर माणूस म्हणूनही ते महान होते. कंपनीचा व्यवसाय व पसारा वाढल्यावरही दूरदूरच्या गावातून आलेला एखादा विक्रेता जेव्हा लुधियानाला भेट देत असे तेव्हा त्याच्या स्वागताला ओमप्रकाशजी स्वतः जात असत. म्हणूनच १९५६ साली वर्षभरात ६३९ सायकलचे उत्पादन करणारी हिरो सायकल सात दशकांनंतर दररोज १९००० सायकलचे उत्पादन करू लागली होती. स्थापनेनंतर अवघ्या तीन दशकात म्हणजे १९८६ साली जगातील सर्वोधिक सायकलींचे उत्पादन करणारी कंपनी म्हणून हिरो सायकल्सचे नाव गिनीज बुक मध्येही नोंदले गेले होते.

२०१५ साली पत्नीचे निधन झाल्यावर सायकलचा भारतातील हा महर्षी खचून गेला. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच त्यांनीही जगाचा निरोप घेतला. १३ ऑगस्ट २०१५ ला त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा ८७ वा वाढदिवस फक्त १३ दिवस लांब होता. अर्थातच आता लुधियानाला जाऊन ह्या ऋषितुल्य माणसाची भेट होणे शक्य नव्हते.

 अस्मादिकांची पहिली सायकलही 'हिरो'च होती. तिने अस्मादिकांना तब्बल २०-२२ वर्ष साथ दिली होती. ओ पी उर्फ ओमप्रकाशजींना भेटता आले नाही तरी किमान त्यांचा कारखाना पाहता यावा, मुंजाळ कुटुंबातील व्यक्तींना प्रत्यक्ष भेटता यावे ही सुप्त इच्छा अस्मादिकांना होतीच.

त्यामुळे लुधियाना आपल्या वाटेपासून लांब असल्याचे माहीत असूनही अस्मादिकांनी त्या फोनकर्त्याला विचारले, 'आम्ही लुधियानाला आलो तर मुंजाल कुटुंबाशी आम्हाला भेट घेता येईल का'. समोरील माणसाने तत्परतेने ' मी नक्कीच प्रयत्न करतो असे उत्तर दिले'. सगळ्यांना इतके लांब जाता येणे शक्य नव्हते. तरी फुजीला येथेच टेम्पोत टाकून येथूनच बसने लुधियानाला जाऊन रात्रीपर्यंत फिरोजपुरला पोचावे किंवा फिरोजपुरला गेल्यावर रातोरात मावशीसह लुधियानाला जाऊन दुसऱ्या दिवशी परत यावे असा विचार अस्मादिकांच्या मनात थैमान घालू लागला होता. पंजाबमध्ये जाऊन लुधियानाला न जाणे म्हणजे पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन न घेण्यासारखेच अस्मादिकांना वाटत होते. खरतर त्यावेळी लुधियाना किती लांब आहे ह्याचा अंदाजही नव्हता. फोनकर्त्याला,' विचार करून कळवतो असे सांगून अस्मादिकांनी फोन ठेवला.

लंगरमधील भोजनाने सगळ्यांचाच अंतरात्मा तृप्त झाला. त्यामुळे सगळ्यांनीच पुढे फिरोजपुरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. आता फिरोजपुर फार लांब राहिले नव्हते. जेवण करून निघेपर्यंत जेमतेम २ वाजले होते आणि फक्त २५-३० किमीचा पल्ला बाकी होता. मात्र फिरोजपुरला लवकर पोहोचून एका महत्वाच्या कार्यक्रमाला हजर राहण्याचीही ईच्छा होती. अमृतसर जवळील अट्टारी सिमारेषेजवळ होणाऱ्या सैन्याच्या कवायतीप्रमाणे फिरोजपुरजवळील हुसैनिवाला सीमारेषेवरही सैन्याची कवायत होत असल्याची बातमी आम्हाला कळली होती. मुख्य म्हणजे अट्टारी पेक्षा हुसैनिवाला येथे होणारी कवायत व्यवस्थित पाहता येते असेही समजले होते. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष फिरोजपुरकडे लागले होते. तरीही घड्याळबाबा मात्र आज आरामात जात असल्यामुळे फार तातडी करण्याची गरज नव्हती.

अर्थातच ह्यादरम्यान लुधियानामधील फोनविषयी मात्र विस्मरण झाले. प्रत्यक्ष विठ्ठल नसला तरी पंढरीचे महत्व कमी होत नाही, पंढरीची पुण्याई कमी होत नाही. त्याचप्रमाणे ओमप्रकाशजी नसले तरी लुधियानाचे सायकलजगतातील महत्व कमी झाले नव्हते. आम्ही मात्र ह्यावेळी कळत नकळत पंढरीच्या वारीला मुकलो होतो.

बुधवार, २० मे, २०२०

नाते शब्दांपलिकडचे:पुणे जम्मू सायकलसफर :भाग ४ - लेख ३

जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार: दिनांक १४ पौष १९४१

यूरोप खंडातील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित, अशास्त्रीय आणि धेडगुजरी सौर कँलेडर म्हणजेच ग्रेगोरीयन कँलेडर नुसार दिनांक : ४ जानेवारी २०२०




अबोहार शहर साधारण दोन- सव्वा दोन लाख लोकवस्तीचे आणि किन्नू ह्या फळाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. किन्नूच्या एकूण उत्पादनातील निम्म्यापेक्षा जास्त उत्पादन अबोहार येथेच होते. किन्नूच्या एकेका झाडाला हजारभर फळं येणं तर अगदीच साधारण बाब होती. काल डॉ जितेंद्रबरोबर येताना आम्ही त्याचा अनुभव घेतला होताच. त्यानंतर हरजितसिंगच्या तावडीतून रात्री सुटका झाल्यावर निद्रादेवी आम्हावर चांगलीच प्रसन्न झाली होती. त्यामुळे पहाटे आम्ही ताजेतवाने झालो होतोच. नभाला लाली यायला मात्र अद्याप बराच वेळ होता. आम्ही मात्र सायकलवर मांड टाकायला उत्सुक होतो.



आम्ही तयार होत असताना हरजित आणि त्याचे साथीदार हजर झाले होतेच. कालचा दिवस आमच्याबरोबर घालवून पुन्हा पहाटे आम्हाला मार्गदर्शन करायला हजर झालेल्या हरजितला पाहून उत्साह म्हणजे काय ह्याची प्रचिती येत होती. हरजित आणि त्याच्या साथीदारांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही मार्गक्रमण सुरू केले. गेले काही दिवस राजस्थानच्या छोट्या छोट्या गावातून पहाटे धुक्याचा सामना करावा लागला होता. मात्र आज येथील पथदिवे आणि हरजितचे पथक ह्यांच्या साहाय्याने आम्ही दिवसाची सुरुवात करत असल्याने आम्ही सुरक्षित आणि समाधानी होतो. अर्थात धुके नसले तरी अद्याप तिमिराचेच राज्य होते. त्यामुळे आम्ही रांगेत एका पाठोपाठ जात होतो. थंडी आता सवयीची झाली होती. प्रदूषणकारी वाहनाने काही तासात लांबचा पल्ला गाठून हवामान बदलाचा होणारा त्रास आम्हाला जाणवू शकत नव्हता. मनुष्यशक्तीधारी वाहनाने शरीराला हवामान बदल सहन करण्यासाठी मुबलक वेळ आम्हाला मिळाला होता.

अर्थात त्याबरोबर कपड्यांचे चार थर आणि कपड्यांच्या प्रत्येक दोन थरांमध्ये कागदाचे थर असे एकंदर ७ थर आम्ही अंगावर चढवले होतेच. हरजितच्या नेतृत्वाखाली आम्ही धीम्या गतीने मात्र न थांबता सायकलची पायपट्टी (pedal) गोलाकार फिरवत होतो. थोड्या वेळातच एका पेट्रोल पंपाच्या आवारात हरजित शिरला. थोडेसे गोंधळून आम्हीही त्याच्या मागे तिथे गेलो. अंधार असल्यामुळे फार लांबचे दिसत नव्हते. पेट्रोलपंपाचे आवार बरेच मोठे होते. त्याच्या मागच्या बाजूनेही एक रस्ता जात होता. तो रस्ता ओलांडून हरजित थांबला. त्याच्या सायकलशेजारी फुजी आणि तिच्या मैत्रिणी उभ्या राहिल्या. खरतर आम्हाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण आला होता. तिथे रस्त्यापासून किंचित आतल्या बाजूला एक खोपट दिसत होते...होय, तिथे चहा होता. अर्थातच आम्ही तिथे विसाव्यासाठी थांबलो.



चहा तर चांगला होताच. तिथे आमच्या गप्पा सुरु असताना मावशीचा (निरूपमा भावे) कागदोपत्री वाढदिवस काल झाला असला तरी खरा वाढदिवस आजच असल्याचे मी सांगत होतो. आम्ही खरे तर आमच्या गप्पांमध्येच दंग होतो. इतक्यात हरजितने सांगितले की त्या चहाकेंद्राचा मालक मावशीला आतमध्ये बोलावत होता. मावशीबरोबर आम्ही दोघेतिघही तेथे गेलो. तर त्या चहावाल्याने वाढदिवसानिमित्त मावशीला एक पेन भेटीदाखल दिले. आम्ही सगळेच अगदीच भारावून गेलो होतो. पुणे विद्यापीठात गणिताची प्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या प्राध्यापिकेला आणखी कोणती गोष्ट अमूल्य असणार? हरजितसिंग किंवा अबोहार येथे भेटलेली मंडळी आणि आम्ही सायकलच्या बंधाने बांधले गेलो होतो. पण तो चहावाला....! हे बंध कोणते होते? पंजाब केवळ धनधान्याच्याच नव्हे तर मनाच्या श्रीमंतीनेही किती समृद्ध होता!

हरजितसिंगचा आता निरोप घ्यायची वेळ आली होती. त्याला आज सुट्टी नव्हती. त्याला शाळेमध्ये अध्यापनाचे काम करायला जायचे होते. तरीही वेळ काढून इथपर्यंत तो आमच्याबरोबर आला होता. त्याचा निरोप घेणे आम्हाला सोपे नव्हते. त्यामुळे चहाच्या निमित्ताने घेतलेला थांबा आम्हाला पथ्यावर पडला होता. अर्थात तो परत जाणार असला तरी दोन शिलेदार त्याने आमच्याबरोबर पुढे पाठवले होते. दोघेही विशीतील युवक होते.

त्यांच्या बरोबर जात आम्हीही वेग आणि सातत्य राखत होतो. वाटेत पुन्हा एकदा चहासाठी थांबा घेतला. पण तो केवळ निमित्तमात्र होता. फार वेळ न थांबता आम्ही पुढे कूच केले. मोकळा रस्ता मिळाल्याने फुजीही फुरफुरत होती. दोघा युवकांसह आघाडी घेत फुजी आणि अय्यरकाका वेगात जात होते. थोड्या वेळातच फाजिल्का हे जिल्ह्याचे ठिकाण आले.  अबोहार शहर ह्याच जिल्ह्यात होते. फाजिल्का येथे एक चौक पाहून तेथे आम्ही थांबलो. अबोहरपासून आमच्याबरोबर आलेले दोघेही युवक इथून परत फिरणार होते. चौकातील चहाकेन्द्र पाहून आम्ही तिकडे मोर्चा वळवला. चहाची फर्माईश करेपर्यंत इतर सायकलपटू एकापाठोपाठ हजर झाले. चहाकेंद्राजवळ एक मंदिर होते. तेथील स्वच्छता वाखाणण्यासारखी होती.


फाजिल्का येथिल ह्या चौकातून सरळ पुढे फिरोजपुर- अमृतसरकडे जाणारा रस्ता होता. तर डावीकडे रस्तामार्गे अवघ्या १२-१४ किमी वर पाकिस्तानची सीमा होती. हवाईमार्गाने तर हे अंतर जेमतेम ७-८ किमी असावे. फजिल्काची लोकसंख्या जेमतेम लाखभर असली तरी हे जिल्ह्याचे ठिकाण तर आहेच शिवाय तुर्कमेनिस्तान येथून सुरू होणाऱ्या ट्रान्स अफगाणिस्तान पाइपलाइन (TAPI) ह्या प्रकल्पाचे हे अंतिम ठिकाणही आहे.

फजिल्का येथे चहापान केल्यावर आम्ही अबोहरहून आमच्याबरोबर येथपर्यंत आलेल्या दपिंदर आणि त्याच्या मित्राचा निरोप घेतला. दपिंदर चांगलाच गोरगोमटा तर होताच. तो लक्षात राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याला पाहून मी आणि नयना आघारकर ह्यांना डोंबिवली सायकल क्लबचा सदस्य रचितची आठवण येत होती.


दपिंदर आणि त्याच्या मित्राचा निरोप घेऊन आम्ही फिरोजपुरच्या दिशेने जाऊ लागलो. पंजाबमध्ये प्रवेश केल्यापासून पुणेरी पलटण थोडी मागे राहू लागली होती. तर डोंबिवली अहमदाबादकर आघाडीवर होते. रस्ता मोकळा असला तरी अरुंद होता. आजूबाजूला मात्र लांबवर पसरलेली शेती होती. ते हिरवे वैभव डोळ्यात मावत नव्हते. साधारण तासाभराने आम्ही थांबा घेतला. येथून फिरोजपुरच्या वाटेवरील जलालाबाद हे शहर १८ किमी लांब असल्याचे दर्शवणारा दगड  दिसत होता. सगळेजण विश्रांती घेत असता फुजी (श्विन)ने सहजपणे गुगलनकाशावर नजर फिरवली. डाव्या हाताला हवाईमार्गाने केवळ ३-४ किमी अंतरावर पाकिस्तानची सीमा असल्याचे दिसत होते. खरतर फजिल्कापासून आम्ही पाकिस्तानच्या सिमारेषेला समांतरच जात होतो. त्यात हे अंतर सर्वात कमी असल्याचे दिसत होते.




त्या ठिकाणी सगळेच सैलावले होते. जवळपास ४५-५० किमी अंतर पार झाले असले तरी ७२ किमी अंतर बाकी असल्याचे गुगलकाका सांगत होते. मात्र दपिंदर आणि त्याच्या मित्राच्या वेगाने पाय दामटवल्याने वेळेच्या बाबतीत आम्ही निर्धास्त होतो. मनसोक्त थांबा घेतल्यावर सगळे सायकलस्वार पुन्हा सज्ज झाले. अबोहार, फजिल्का प्रमाणेच इथुनही निघताना फुजीने पुन्हा एकदा पिछाडी सांभाळली. रसिकभाई, मोहित ह्यांच्याबरोबर जाताना फुजीचा उत्साहही वाढत होता. जलालाबाद शहर सुरू झाल्यावर थोडं गजबज वाढली होती. वाटेत एका नाक्यावर पुढे गेलेले सायकलस्वार थांबले होते.... नव्हे त्यांना वाटेत एका गटाने थांबवले होते. फजिल्का येथे चहा घेतल्यानंतर ३४ किमी अंतर म्हणजे जवळपास दोन- अडीच तास अवधी गेला होता. त्यामुळे फुजीलाही पुन्हा एकदा चहाची गरज वाटत होतीच. फुजी चहाच्या विवंचनेत असताना समोरील सायकलस्वारांना का थांबवले गेले आहे हेच आधी कळेना. मात्र तिथे जाताच उलगडा झाला.

अबोहार येथे भेटलेल्या प्रसारमाध्यमांची ती कमाल होती. अबोहार येथे 'दैनिक अजित'च्या पत्रकाराने आमची महिती व मुलाखत घेतली होती. ती बातमी आजच्या अंकात छापली होती. जलालाबाद येथील त्या चौकात एका संघटनेचे कार्यालय होते. बहुधा कोणत्या तरी मजूर संघटनेचे कार्यालय होते. त्यांनी 'दैनिक अजित' मध्ये आमच्या सायकलसफरीबद्दल आलेली बातमी वाचली होती. आमचा पुढील रस्ता त्या चौकातून जाणार हे त्यांना माहीत होते. त्यामुळे एकाच पेहरावातील सायकलपटू एकापाठोपाठ येताना दिसताच त्यांनी आम्हाला थांबवले होते. त्यांच्याकडून चहा नाष्टा घेतल्याशिवाय आम्हाला सोडायला ते तयार नव्हते. त्यांना आमच्याबरोबर छायाचित्रही काढून घ्यायचे होते. पुणेकर चहासाठी फार उत्सुक नसायचे. त्यांना त्यापेक्षा त्यांनी कायम जवळ बाळगलेले उत्तेजक पेयच हवे असायचे. त्यामुळे ह्या लोकांनी अडवल्यावर पुणेकर थोडे अस्वस्थ झाले. श्विन(फुजी)चा तर सायकलसफरीसाठीचा मुख्य उद्देशच निरनिराळ्या प्रांतातील लोकांना भेटणे, त्यांच्यात मिसळणे हा असायचा. किंबहुना सर्व स्तरातील लोकांना एका पातळीवर आणणारे सायकल हे एक साधन आहे हेच तर श्विनचे म्हणणे असायचे. त्यामुळे फुजी(श्विन) मात्र त्या संघटनेतील लोकांबरोबर गप्पा मारण्यात रंगला होता.


सकाळी मावशीला पेन भेट देणारा चहावाला, जलालाबाद येथे भेटलेले हे मजुर... ह्यांचे आमच्याशी कोणते नाते होते. हे आपुलकीचे, स्नेहाचे बंध...आमच्यावर ते गाजवत असलेला प्रेमळ अधिकार..हे केवळ आणि केवळ सायकलमुळेच तर शक्य होते. खरोखरच हे नाते शब्दांपलिकडचे होते.

बुधवार, १३ मे, २०२०

जादुगार हरजितसिंग: पुणे जम्मू सायकल सफर - भाग ४ लेख २

भारतीय राष्ट्रीय दिनांक पौष १३, शके १९४१
ग्रेगोरीयन दिनांक ३ जानेवारी २०२०

अबोहार येथे स्वागत झाल्यावर सगळ्या सायकलपटूंचा थकवा पळून गेला. आजचा प्रवास संपल्याची जाणिव झाल्याने सगळेच सैलावले होते. दैनिक अजित आणि इतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींंना मुलाखत देऊन झाल्यावर आम्ही विश्रांतीसाठी हॉटेल सेननाईटकडे वळलो. हरजितसिंगने आमच्यासाठी या हॉटेलची निवड केली होती.

हरजितसिंग आणि त्याचे साथीदार आमच्या बरोबर हॉटेलपर्यंत आले. मात्र त्यावेळी आम्हाला हे लक्षात आले नव्हते की त्याने आमचा ताबा घेतला आहे. हरजितसिंग म्हणजे सळसळता ऊत्साह होता. आम्ही रोज जेमतेम १२५ किमी पार करत होतो. पण हरजितसिंग २००-२५० किमी अंतरही सहज पार करत असे. मँरेथॉन असो वा BRM.. किती पदके त्याने मिळवली होती, हे त्यालाही सांगता आले नसते. पाहताक्षणी त्याची जादू समोरच्यावर पडली नाही तरच नवल. तो एका शाळेत शिक्षक आहे म्हटल्यावर मला तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा हेवा वाटू लागला. शिक्षक जर एवढा उत्साही असेल तर शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नंदनवनच असणार. .

हरजितसिंग

हरजितसिंगने मिळवलेली मेडल्स

आम्ही हॉटेलवर पोचलो तेव्हा आमचे सगळे यजमानही आमच्याबरोबर तिथे आले होतेच. आमच्या गप्पा चांगल्याच रंगत होत्या. सुर्य कधी अस्ताला गेला समजलेही नाही. एखाद्या लग्नसमारंभात बऱ्याच दिवसांनी सगळे नातेवाईक एकत्र जमल्याप्रमाणेच ऊत्साही वातावरण झाले होते. साधारण ७-७.१५ वाजता आमचा लवाजमा हरजितसिंग आणि त्याच्या मित्रांच्या चारचाकीतून निघाला. एक छानश्या हॉटेलमध्ये आम्ही पोहोचलो. सगळेजण मेजापाशी विसावले आणि ...

'NIRUPAMA' असा लिहीलेला केक तिथे हजर झाला. माझी मावशी - डॉ निरूपमा भावे- हिचा आज वाढदिवस असल्याची बातमी हरजितसिंगला कधी आणि कशी लागली हे कळले नाही. पण आम्ही भेटल्यानंतर अवघ्या चार तासात त्याने जमवलेला एकंदर जामानिमा पाहता आम्ही मात्र थक्क झालो होतो.



आणि मग मात्र सुरू झाला आनंदोत्सव!


केक गट्टम होताच इतर खाद्यपदार्थ मेजावर येऊ लागले. सगळेजण मनसोक्त आडवा हात मारत होते. हरजितसिंग आणि त्याचे मित्रमंडळ मात्र सगळ्यांंवर लक्ष ठेवून होते. अक्षरशः धुमाकूळ सुरु होता. जेवण तर तुडुंब झाले होते. त्यावर हरजितसिंग आईसक्रीम, स्वीट डिश विचारु लागला. श्विनने त्याला एक ग्लास दुध मागवायला सांगितले. मात्र त्यावर नकार देत तो म्हणाला, दुध इथे नाही तर दुसरीकडे पिऊ या. श्विनला आश्चर्य वाटले, फक्त दुध प्यायला परत दुसरीकडे कशाला?

पण यजमान हरजितसिंग होता. आमचा लवाजमा परत चारचाकींंमध्ये बसला. थोड्याच वेळात आम्ही एका मिष्टान्न भांडारापाशी पोहोचलो.


आत शिरताक्षणी ते एक प्रशस्त मिठाईचे दुकान असल्याचे जाणवत होते. त्या दुकानाच्या कोपऱ्यात एक जिना अंग चोरून लपला होता. आम्ही त्या जिन्याने वर गेलो आणि पाहतो तर.. एक विशाल दालन तिथे दिसत होते. आम्ही १५-२० जण त्या दालनाच्या एका अंगाला सहज मावलो होतो. हरजितसिंगने सगळ्यांसाठी दुध मागवले. थोड्या वेळातच समोर हाताच्या पंजाएवढ्या मडक्यामध्ये आटीव दुध आले. आधीचेच जेवण जिरले नसताना हे सैन्य पोटामध्ये आक्रमण करायला सज्ज झाले होते. बरं, ते पिताही येत नव्हते, तर चक्क खावे लागत होते इतके आटवलेले होते.



आटिव दुधाचे ते आव्हान पचवल्यावर आम्ही पुन्हा हॉटेल सेननाईट येथे परतलो तोपर्यंत डोळे चांगलेच जड झाले होते. दुपारी साधारण चारच्या सुमारास हरजितसिंगशी ओळख झाली होती, तेव्हाच आमच्या नकळत आम्ही १० वाजता झोपणार आहोत हे त्याने माहिती करुन घेतले होते. आता रात्रीचे ९.३० वाजले होते. या साडेपाच तासात त्याने आमच्यावर अक्षरशः जादू केली होती. आमचा निरोप घेताना तो म्हणालाच,'आपने मुझे दस बजेतकका वक्त दिया था, आपके ३० मिनीट मेरे पास बाकी रहेंगे'.

हरजितसिंग, ३० मिनिटेच काय.. आमचे तर मनच तुझ्याकडे बाकी राहिले आहे.

शुक्रवार, ८ मे, २०२०

सत श्री अकाल: पुणे जम्मू सायकल सफर- भाग ४ लेख १

भारतीय राष्ट्रीय दिनांक पौष १३, शके १९४१
ग्रेगोरीयन दिनांक ३ जानेवारी २०२०



पंजाब... नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो दिलदारपणा! हा गुण इथल्या मातीतच असावा. पण या मातीला गूण मिळाला असावा इथल्या नद्यांच्या खळखळत्या प्रवाहामुळे. सिंधू नदिच्या ५ उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बिआस आणि सतलज यांच्या नावावरून म्हणजेच पंजनाद नदीमुळे या प्रदेशास पंजाब नाव पडले.

पंजाब मधून वाहणाऱ्या पाच नद्यांपैकी सगळ्यात मोठी नदी सतलज! मानस सरोवराजवळ तिबेट मधील राक्षसताल सरोवरातून सतलजचा उगम होतो. हिचे मुळ नाव शताद्री. तिबेटमध्ये तिला लांग्केन झांंग्बो (हत्ती नदी) असे म्हणतात. पश्चिम-उत्तर पश्चिमेस २६० किमी अंतर वाहिल्यावर सतलज शिप्की ला येथे भारतात शिरते. हिमाचल प्रदेशात साधारण पश्चिम-आग्नेयेस दिशेत ३६० किमी वाहल्यावर तिचा संगम हिमाचल प्रदेशात उगम पावलेल्या बियास (व्यास) नदीशी होतो. याच दिशेत १५ किमी वाहून सतलज पाकिस्तानमध्ये शिरते. 

रावी नदी आणि काश्मीर खोऱ्यातील झेलम नदी या चिनाबला मिळतात. 

पुढे पाकिस्तान मधील बहावलपुर जिल्ह्यातील उच (उच शरीफ) या शहराच्या उत्तरेला १५-१६ किमी अंतरावर सतलज आणि चिनाब ह्या नद्यांचा संगम होतो. अशा रीतीने पाच नद्यांच्या क्रमिक संगमामुळे निर्माण झालेली नदी पंजनाद नदी या नावाने ओळखली जाते. येथून १०० किमी पश्चिमेस बहावलपूर शहराजवळ ही नदी सिंधू नदीस मिळते.

या नद्यांंमुळे पंजाब प्रांत समृद्ध आहे. खर तर राजस्थान राज्याची सीमा जवळ येत असतानाच ही समृद्धी लक्षात येऊ लागली होती.



राजस्थानमधील सादुलशहरापासुन पंजाबची सीमा जेमतेम ७-८ किमी. तर सीमेपासून आजचे गंतव्यस्थान असलेले अबोहर शहर २२ किमी दूर होते. डॉ जितेंद्र यांचा संचार दोन्ही शहरात होता. आजही ते आम्हाला मार्गदर्शन करत अबोहारपर्यंत येणार होते.

डॉ जितेंद्रच्या पाठोपाठ सगळेजण वेगाने जात असताना अचानक त्यांनी लगाम खेचला आणि थांबले. पाठोपाठ आम्हीही थांबलो. डॉक्टर जितेंद्र रस्त्याच्या डावीकडे असलेले फाटक उघडून आत जाऊ लागले. आम्हाला वाटले कदाचित वाटेत त्यांंचे किंवा त्यांच्या परीचितांचे घर असेल. त्यांंना भेटून डॉक्टर परत निघतील. पण डॉक्टरांनी आमच्या सायकली तिथेच ठेवून फाटकाच्या आत बोलावले. तिथे मोकळे आवार होते. पुढे सरळ रेषेत साधारण १५-२० फूट अंतरावर एक घर होते. मात्र डॉक्टरांनी आम्ही ज्या फाटकातुन आत आलो होतो तेथेच उजवीकडे असलेल्या आणखी एका फाटकातुन आत नेले. ओहोहो, तिथे साधारण १५ फुट उंच झाडाच्या रांगाच रांगा पसरलेल्या होत्या. त्या झाडावर अगदी ५ फूट उंचीपासुन संत्र्यांसारखे दिसणारी फळे लगडलेली होती. डॉक्टर जितेंद्रने त्या फळाचे नाव 'किनू' असे असल्याचे सांगितले. त्या बागेत आम्ही जेवढे आत शिरत होतो तिथून पूढे किनूच्या रांगाच रांगा दिसत होत्या. डॉक्टर जितेंद्र ह्यांंचा हा रोजचा यायचा रस्ता होता. खरेतर त्यांंची तेथील घरात ओळख नव्हती. मात्र आम्हाला ती बाग दाखवण्यासाठी त्यांनी घरमालकाला विचारुन त्या बागेत नेले होते. त्या घरमालकाने ती बाग... म्हणजे बागेतील फळं विकलेली होती. त्यामुळे बागेतील फळ तोडण्याचा अधिकार त्यालाही नव्हता. अर्थातच आम्ही त्या फळांना हात लावू शकलो, तरी तोडू किंवा खाऊ शकत नव्हतो. अखेरीस किनूच्या राज्यातून नेत्रसुखावरच समाधान मानुन आम्ही बाहेर पडलो. घरमालकाने आम्हाला चहा नाश्त्यासाठी आग्रह केला. मात्र किनूची सर त्याला आली नसती. शिवाय अबोहरला आमच्या स्वागतासाठी काही जण थांबले होते. त्यामुळे आम्ही केवळ पाणी घेत त्या कुटुंबाचा निरोप घेतला.








किनूच्या बागेतून निघाल्यावर लगेचच आम्ही अबोहार येथे पोहोचलो. हनुमानगढ बायपासजवळ बाबा दिपसिंग गुरूद्वाराचे व्यवस्थापन मंडळ, पेडल क्लब अबोहारचे सदस्य आणि विविध प्रसारवाहिन्यांचे प्रतिनिधी सायकलपटूंच्या आगमनाची वाट पहात होते. पेडल क्लबचे हरजितसिंग हजारा, नवनीत अरोरा सागर, जगजितसिंग, नीरजकुमार, दीपेंद्र ढिल्लों, यांच्यासह रिणवा, ज्ञानी दर्शन सिंग आणि परमिंदरसिंग खालसा ह्यांंनी सायकलपटूंचे जोरदार स्वागत केले. गुरूद्वारातर्फे सर्व सायकलपटूंना सिरोपा बांधून त्यांंचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी 'जो बोले सो निहाल सत श्री अकाल' या घोषणेला सगळ्या सायकलपटूंनी दाद दिली. सिरोपा मिळणे हे अत्यंत मानाचे समजले जाते.

निरनिराळ्या प्रसारमाध्यमांंच्या प्रतिनिधींंना सायकलपटू मनमोकळेपणाने मुलाखत देत होते. त्याचवेळी खाद्यपदार्थ आणि पेय यांंचाही आस्वाद घेतला जात होता. खरतरं ह्या स्वागतसमारंभामूळे सायकलवर मांड टाकूनही सायकलपटू पुर्णपणे शिथिलगात्र झाले होते.










(जो बोले सो निहाल सत श्री अकाल' याचा अर्थ: जी व्यक्ती असे म्हणते की ईश्वर हेच.अंन्तिम सत्य आहे त्या व्यक्तीवर ईश्वराचा आशीर्वाद कायम राहतो)

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...