सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

पेडल रिपब्लिक

'पेडल रिपब्लिक' ...
राष्ट्रीय दिनांक २४ अग्रहायण १९४१

राष्ट्रीय कॅलेंडरचा ९ वा महिना- 'अग्रहायण'ची अखेर जवळ आली होती. तेजोनिधी अतिदक्षिणेकडे झेपावत होता. आजचा वारही त्याच्याच नावावर बेतलेला... रविवार!

डोंबिवली शहरातील सायकलपटूंचा एक समूह नेहमीप्रमाणेच भास्कराने जागे व्हायच्या आतच दौड घेण्यास सज्ज झाला होता. डोंबिवली शहरातील चार रास्ता ...या नियोजित ठिकाणी जमा झालेले सायकलपटू आज विशेष उत्साहात होते. सगळ्यांनी एका रांगेत दौड सुरू केली. पाहता पाहता टिळक पुतळा, पेंढरकर महाविद्यालय पार करत फौज कल्याण शीळ रस्त्याला लागली.  प्रत्येक सायकलस्वाराने शिरस्त्राण परिधान केले होते. तसेच प्रत्येक सायकलनेही अग्रभागी दिवा परिधान केला होता. शिस्तबद्ध सायकलिंगसाठी हा गट प्रयत्नशील होता, .. नव्हे ती तर ह्या गटात सामील होण्याची प्रमुख अट होती. अन्यथा कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, अशी सक्त ताकीद गटनायक सौमित्र सामंत नेहमीच देत असे.

सामंत पेट्रोल पंपापाशी पोचल्यावर सगळ्यांनी थोडा विसावा घेतला. काही सदस्य चार रास्ता ऐवजी सामंत पेट्रोल पंपापाशीच येणार होते, तेही आता सामील झाले. सगळ्यांचा उत्साह पाहताच रवीराजानेही धुक्याची चादर दूर केली होती.

लयबद्ध पद्धतीने एका पाठोपाठ एक सर्व सायकलस्वार शीळ फाटा येथे पोचले. लगेचच त्यांनी डावीकडे मोर्चा वळवला. आजचे नियोजित ठिकाण आता जवळ येत होते. पनवेलकडे जाणारा हा महामार्ग नेहमीच गजबजलेला असे. काही सदस्य थोडे पुढे गेले होते. मात्र खारघरकडे जाणाऱ्या फाट्यापाशी ते सदस्य इतर सदस्यांसाठी थांबले होते. सगळेजण पुन्हा एकत्र भेटल्यावर तो समूह खारघरच्या सेंट्रल पार्कच्या दिशेने जाऊ लागला. दुतर्फा रुंद आणि स्वच्छ रस्ता पाहताना सगळ्या सायकलींचा उत्साह आणखीच वाढत होता. प्रभातफेरीसाठी निघालेले आबालवृद्ध त्या प्रशस्त रस्त्यावर दिसत होते. ह्या मोकळ्या रस्त्यावर आणि मोकळ्या हवेचा अनुभव विलक्षण सुखावत होता. प्रत्येकजण तेथे आपापल्या गतीने पुढे सरकत होता.
थोड्याच अवधीत खारघरचे सेंट्रल पार्क आले.
एकाशेजारी एक अश्या रांगेत सगळ्या सायकली हारीने उभ्या केल्यावर सगळेजण त्या विस्तीर्ण पार्कमध्ये शिरले. डोळे विस्फारतील अशी हिरवळ नजरेस पडत होती. पार्कमध्ये बऱ्यापैकी गर्दी असली तरी त्याच्या एकंदर क्षेत्रफळामुळे कोठेही गर्दी होत नव्हती. एका ठिकाणी काही स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. शेजारीच विस्तीर्ण प्रेक्षागृह होते. सायकलपटूंचा समूह त्या प्रेक्षागृहाच्या अत्यंत उंचीवर गेला.




सभोवताली दिसणारे दृश्य मनात साठवून सगळेजण चार पायऱ्या खाली उतरले.



आणि मग सगळ्यांचाच उत्साह अगदीच टिपेला गेला. ज्या क्षणाची सर्व सदस्य वाट पाहत होते , तो क्षण जवळ आला होता. आपल्या कवेत धरलेली गुंडाळी बाहुबली मेघेश हळूहळू उलगडत होता. त्या ठिकाणी व्यायामासाठी आलेले इतर लोकही कुतूहलाने थांबून बाहुबलीकडे पाहत होते. मेघेशने हळूहळू आपले दोन्ही हात दोन विरुद्ध बाजूला लांबवत नेले....अन टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला...
बहुबलीच्या दोन्ही बाहूंमध्ये उलगडलेल्या त्या फलकावर अक्षरे झळकत होती....

'Experience the road little differently...

PEDAL REPUBLIC'





शिस्तबद्ध सायकलिंगचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ह्या सायकलसमूहाने एक पेडल पुढे मारले होते...
'पेडल रिपब्लिक' ह्या गटाच्या घोषणाफलकाचे उदघाटन खारघर येथील विशाल अश्या सेंट्रल पार्कमध्ये शेकडो उपस्थितांच्या साक्षीने झाले होते.



गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

नेवाळी येथील अमृतपान

आदित्य वेगाने दक्षिणेकडे झेपावत होता. दक्षिण गोलार्धातील टोकाला भोज्या करून माघारी फिरण्यासाठी तो आतुर झाला होता. ज्या दिवशी आदित्य दक्षिणेच्या टोकाला पोहोचणार आहे, त्या दिवशी वसुंधरेला सगळ्यात छोटा दिवस आणि सगळ्यात मोठी रात्र अनुभवता येईल. तर त्याच्या पुढील दिवशी आदित्य दिशा बदलून उत्तरेच्या दिशेने वळेल. त्याचमुळे जगातील एकमेव शास्त्रीय सौर कॅलेंडर म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरचा १० महिना पौष सुरू होईल.

त्या दिवशी श्विन आणि स्कॉटसुद्धा उत्तरेकडे झेपावतील. तो दिवस आता जवळ येत होता. त्यामुळे दोघांचा सरावही नियमितपणे सुरू असणे आवश्यक होते. सुदैवाने आज स्कॉटलाही सकाळी वेळ मिळाला होता, त्यामुळे दोघांना एकत्र फेरफटका मारता येणार होता. आदल्याच दिवशी डोंबिवली येथील 'बाईकपोर्ट' या दवाखान्यातून श्री इम्रान लांजेकर या तज्ञ डॉक्टरने आरोग्यचाचणी केल्यावर स्कॉटला डिस्चार्ज मिळाला होता.

आदित्य त्याची प्रभा पसरवण्याअगोदरच श्विन आणि स्कॉट घरातून निघाले. मात्र एव्हाना ब्रह्ममुहूर्त उलटून गेला होता. ब्रह्म मुहूर्त म्हणजे ‘निर्मात्याचा काळ’. ही अशी वेळ आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वत:ला पुन्हा नव्याने घडवू शकता. तुम्ही स्वत:च ब्रह्मण (निर्माता) बनू शकता आणि स्वत:ला हवे त्या प्रकारे घडवू शकता. आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल साधारणपणे रात्री ३.३० ते पहाटे ५.३०- ६.०० चा काळ.

श्विन स्कॉट घरातून निघाल्यावर महानगरपालिकेने रस्त्यावर लावलेले दिवे थोड्याच वेळात बंद झाले. श्विन आणि स्कॉटने डोंबिवली विद्युतरथस्थानक ओलांडले आणि चार रास्ता येथे पोहोचले. 'पेडल रिपब्लिक' चे सदस्य आवटीकाका, सौमित्र सामंत, मेघेश कुलकर्णी तिथे थांबले होते. डोंबिवली सायकल क्लब सदस्यांचे केवळ रविवारच्या प्रभातफेरीवर समाधान होत नव्हते. त्यांची भूक वाढली होती. त्यामुळेच काही सदस्यांनी दररोज नियमित आणि शिस्तबद्ध सायकलप्रभातफेरीला सुरुवात केली होती. अर्थातच ह्यातील काही सदस्य ह्या अगोदरही वैयक्तिकरित्या नियमित सायकलप्रभातफेरी करत होते. मात्र आता त्याला सामूहिक आणि शिस्तबद्धता स्वरूप आले होते. श्विन स्कॉटला पाहताच चार रास्ता येथे थांबलेल्या पेडल रिपब्लिकच्या सदस्यांनीही टाच मारली. मात्र पुढे चार रास्ता ते टिळक पुतळा या अंतरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे वेग मंदावला होता.

मात्र सगळेजण एका लयीत जात होते. कल्याण शीळ महामार्ग गाठल्यावर सगळ्यांनी वेग घेतला. वाटेत नयना आघारकरही सामील झाल्या होत्या. स्कॉटने आता आघाडी घेतली होती. मानपाडेश्वर मंदिर येईपर्यंत मात्र आदित्य त्याच्या दुलईतून बाहेर आला होता. अद्याप त्याचे दर्शन झाले नसले तरी त्याची उपस्थिती जाणवू लागली होती. पेडल रिपब्लिकचे सदस्य आणि श्विन स्कॉट ह्यांना वेग वाढवण्यासाठी एवढे पुरेसे होते. स्कॉट काटई नाक्याला डावीकडे वळणार इतक्यात मागून मल्हार फाळके हा डोंबिवली सायकल क्लबचा किशोरवयीन सायकल पटू वेगाने शीळ फाट्याच्या दिशेने पुढे गेला. स्कॉटने मात्र नेवाळी फाट्याची दिशा पकडली. रस्त्याला वर्दळ फारशी नव्हती आणि रस्ताही रुंद होता. शिवाय रस्त्याच्या मधोमध असलेला दुभाजक चुकार वाहनांना अटकाव करत होता.

सकाळच्या सुखद हवेत नेवाळी फाटा येथे पोचले तेव्हा सगळेजण उत्साहात होते. नेवाळी गावाची लोकसंख्या जेमतेम २५०० च्या आसपास. मात्र कल्याण श्रीमलंगगड रस्ता आणि काटई नाका ते बदलापूर/कर्जत पाइपलाइन रस्ता जेथे एकमेकांना छेद देतात, त्या नेवाळी फाट्याचा परिसर कायम गजबजलेला असतो. डोंबिवली, पालवा, कल्याण,  अंबरनाथ, बदलापूर या सगळ्या शहरातील सायकलपटू नेवाळी फाटा येथे नियमितपणे फेरी मारत असतात. पेडल रिपब्लिक चे सदस्य आणि श्विन स्कॉट येथे अमृतपानाच्या निमित्ताने खडा विसावा घेऊ लागले.





पेडल रिपब्लिकचे अधिकृत छायाचित्रकार आवटीकाका यांनी उपस्थितांना भ्रमणध्वनीद्वारे छायाचित्रबद्ध केले. खरंतर गप्पा चांगल्याच रंगत होत्या. मात्र घड्याळबाबांच्या पुढे कोणाचे काय चालणार! त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपले काय सुरूच ठेवले होते. अखेरीस त्यांना मान देत सगळ्यांनी पुन्हा एकदा टाच मारत परतीचा मार्ग धरला.



रविवार, ८ डिसेंबर, २०१९

उपसंहार: अष्टविनायक यात्रा

श्री गजानन म्हणजेच गणपती हा बुद्धीचा अधिष्ठाता! भारतात विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. प्रत्येक गावात गणपतीचे मंदिर असणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीन मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.
पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे गणपती डाव्या सोंडेचे आहेत.

अस्मादिक गेल्या २२ वर्षात साधारण दर दोन तीन वर्षात अष्टविनायक यात्रा करत आहेत. अर्थात त्यामागे तेथील मूर्ती म्हणजेच देव असा अर्थ कधीच मनात नव्हता/ नाही. किंबहुना हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक अणू रेणू हाच ईश्वर ही माझी धारणा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून गांधीजींच्या भाषेत सांगायचे तर 'सत्य हाच ईश्वर...म्हणजेच जे अस्तित्वात आहे तोच ईश्वर' हे मान्य केल्यास ईश्वराच्या अस्तित्वाविषयी शंका राहत नाही. मात्र जर निसर्गातील प्रत्येक कण हाच ईश्वर आहे हे मान्य केले तर कोणत्याही देवळात आणि तेही ठराविक आठ ठिकाणी स्थापलेल्या मूर्तीचे दर्शन घ्यायला का जावे?

खरं सांगायचं तर मानवी कल्पनेच्या पलीकडील कोणतीतरी शक्ती जगात आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्या शक्तीला अभिवादन करण्यासाठी प्रतीक म्हणून मूर्तिपूजा! आणि मग निव्वळ दैनंदिन कामकाजातून पूर्णपणे मुक्त होऊन निव्वळ त्या प्रतिकाशी समरस होता यावे यासाठी ठराविक स्थानी जाऊन तेथील स्थापन केलेल्या प्रतीकाचे म्हणजे मूर्तीचे दर्शन! अस्मादिकांना अष्टविनायक दर्शन करत असताना ना धार्मिक श्रद्धा प्रवृत्त करत होती ना वैज्ञानिक श्रद्धा विरोध करत होती.  मात्र एक वेगळ्या प्रकारचे, शब्दात मांडता येणार नाही असे समाधान अष्टविनायक यात्रे द्वारा नक्कीच मिळत होते. 

स्कॉट आणि श्विनचे सायकलिंग ४-५ महिने थांबले होते. ते पुन्हा सुरू करण्यासाठी समोर ध्येय हवे होते. तसेच स्कॉटवर वैशाखात ओढवलेल्या संकटातुन सुटका झाल्यावर नैसर्गिक शक्ती म्हणजेच ईश्वराला नमनही करायचे होते. म्हणून अष्टविनायक सायकल यात्रा करण्याचे मनात आले. तो विचार जितक्या झटकन मनात आला, तितक्याच झटकन त्यावर शिक्कामोर्तबही झाले. अस्मादिकांनी यापूर्वी एकदा सायकलने तर इतर अनेक वेळा प्रदूषणकारी वाहनाने अष्टविनायक यात्रा केली होती. नियोजित पुणे जम्मू सायकल यात्रेची पूर्वतयारी किंवा रंगीत तालीम म्हणूनही यावेळी अष्टविनायक यात्रा सायकलने करायचे ठरवले होते. मुख्य म्हणजे वैशाखातील अपघातानंतर बंद झालेले सायकलिंग सुरू झाल्यावर स्कॉटला लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी आत्मविश्वासही मिळवायचा होता.

श्विन स्कॉट बरोबर राजीव दुधालकर हेही अष्टविनायक यात्रेसाठी सामील होण्यास तयार झाले. सराव करू न शकल्याने त्यांनी आदल्या दिवशी अष्टविनायक यात्रेस येण्यास असमर्थता दाखवली. तेव्हा 'तुम्हाला जमेल' असे आश्वस्थ करत श्विनने त्यांना  तयार केले. मनाच्या निग्रहाच्या जोरावर त्यांनी पहिल्या दिवशी महड आणि पाली पर्यंत साथ दिली. राजीव प्रमाणेच विलास म्हणजेच गजानन वैद्य यालाही पालीपर्यंत येण्यास श्विनने तयार केले. पाली म्हणजे ह्या गजाननाचे (विलासचे) श्रद्धास्थान! त्यामुळे त्यालाही मोह आवरता आला नाही. पाली येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यावर दुसऱ्या दिवशी विलास आणि राजीव माघारी परतले. त्यानंतरही संपूर्ण यात्रेत श्विन आणि स्कॉट हे कधीच एकटे राहिले नाहीत. जेव्हा जेव्हा विघ्न आले तेव्हा तेव्हा कोणाना कोणाच्या स्वरूपात विघ्नहर्ताही उपस्थित होऊन ते विघ्न दूर करत होता.

गर्दीच्या रस्त्यातून मार्ग दाखवणारा सुभाष माने श्विनस्कॉटसाठी  स्वतःच्या घराच्या ५-६ किमी लांबवर घोडा सायकलवर दौडत होता. तसेच नगरसेवा टाइम्सचे शिवराम कांबळे, नाथाभाऊ उंद्रे पाटील हे तर घरातीलच सदस्य झाले होते. नाथाभाऊ घरातील वडीलधारे वाटू लागले. प्रत्यक्ष भेट न होताही मोरगावचे ढोले भाऊ हे मनाने इतके जवळ आले की ते आमच्या सोबतच मोरगावला आहेत असा विश्वास निर्माण झाला. सिद्धटेकहुन परतताना केडगाव चौफुला येथील इंद्रप्रस्थ लॉजमालकाला फोन केला तेव्हा त्याने केलेले मार्गदर्शन व्यावसायिक लॉजमालकापेक्षा एखाद्या आप्ताने केलेले मार्गदर्शनच होते. हक्काने आणि आग्रहाने चहा पाजणाऱ्या शिवाजीराव थोरातांना परके कसे मानायचे? आमच्याप्रमाणेच सायकलवरून अष्टविनायक यात्रेस निघालेले अटलास (उपेंद्र परब) आणि हिरो हॉक (हितेश कापडोस्कर) हे तर आमच्यापासून वेगळे होऊच शकत नाहीत. स्वागत करण्यासाठी विलासप्रमाणेच गोवेलीपर्यंत येणारे तुषार, दीपक आणि अजय याखेरीज या यात्रेत मदत करणारे, हक्काने आग्रह करणारे, सल्ला देणारे , मार्गदर्शन करणारे, कौतुक करणारे, शाबासकी देणारे अनेक ज्ञात, अज्ञात आप्त यांच्याशी जुळलेले बंध हे कशाचे निदर्शक आहे? भारतीय संस्कृती मध्ये भेट होताच कोरडे 'हाय हॅलो' न करता नमस्कार करण्याची पद्धत रूढ झाली. याचे कारण येथे अस्तित्वात असलेली निसर्गातील प्रत्येक अणुरेणुला ईश्वरी अंश मानण्याची संस्कृती. अष्टविनायक यात्रेदरम्यान आपणहून पुढे आलेले हे हात याच संस्कृतीचे फलित आहे.

अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने करताना मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेऊन यात्रा सुरू करून इतर सात गणपतींचे दर्शन झाल्यावर पुन्हा मोरगावच्या गणपतीचे दर्शन घ्यावे हा संकेत आहे. मात्र हिंदू धर्म हा कठोर नसून प्रवाही आणि पाण्यासारखा निर्मळ असल्याने मोरगावच्या गणपतीचे दर्शन पहिल्यांदा घेणे शक्य नसल्यास ज्या गणपतीचे दर्शन प्रथम घेतले त्या गणपतीचे दर्शन पुन्हा शेवटी घेतले तरीही आडकाठी नाही. श्विन आणि स्कॉट महडला पोचण्याच्याही आधी त्यांना दर्शन झाले होते ते श्री गजानन वैद्यचे! वैद्यांच्या घरातीलच हा गजानन! यात्रा सुरू करताना साथ देणारा हा गजानन लेण्याद्रीहून परतताना पुन्हा गोवेलीजवळ श्विन स्कॉटला साथ द्यायला आला होता. त्यामुळे या यात्रेत ज्या गजाननाचे दर्शन सर्वप्रथम झाले होते त्याच गजाननाचे दर्शन श्विन स्कॉटला शेवटीही झाले होतेच. भारतीय संस्कृती प्रमाणे त्याच्यातही ईश्वरी अंश होताच की.


          श्विन आणि स्कॉटने केलेला अष्टविनायक मार्ग



               सर्वसाधारण दृष्टिकोनातील नकाशा


                           भूप्रदेशीय नकाशा


                         उपग्रहीय नकाशा  





सोमवार, २ डिसेंबर, २०१९

स्वगृही परत: अष्टविनायक सायकलयात्रा लेख ९

सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील नैसर्गिक बेचक्यात मुरबाड तालुका वसलेला आहे. मुरबाड जवळील म्हसा येथील म्हसोबाच्या पौष पौर्णिमेला भरणाऱ्या जत्रेला दोनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. सिद्धगड, पिकॉक हिल, बारवी धरण ह्यांच्या सान्निध्यात असलेल्या ह्या परिसरात निसर्गाची उधळण मुक्त हस्ते होत असते. अहमदनगरकडून मुरबाडमार्गे कल्याणकडे जाणारा राज्य महामार्ग २२२ हा दुहेरी रस्ता चांगल्या स्थितीत आहे.

लेण्याद्रीहून निघून माळशेजमार्गे  मुरबाड गाठत श्विन स्कॉट ह्याच राज्य महामार्गावरून कल्याणच्या दिशेने निघाले होते. मात्र श्विनला पुन्हा एकदा मामनोलीजवळ एका विचित्र योगायोगाला सामोरे जावे लागले. याआधी केलेल्या अष्टविनायक सायकल यात्रेप्रमाणेच याही अष्टविनायक सायकलयात्रेदरम्यान श्विनच्या मागील चाकाच्या रबरी नळीला मामनोलीजवळ छिद्र पडले होते. स्कॉट थोडी पुढे गेली होती. एव्हाना संध्याछाया पडू लागल्या होत्या. त्यामुळे श्विनने स्कॉटला थांबण्याचा इशारा न देण्याचा निर्णय घेतला. विलास वैद्य ह्याला मात्र भ्रमणध्वनीद्वारे झाल्या प्रकाराची कल्पना दिली. श्विनकडे हवा भरण्याचे दोन पंप होते. त्यातील मोठ्या पंपाला नळी असली तरी त्याचा दांडा निखळला असल्याने त्या पंपाचा उपयोग नव्हता. हवा भरण्यासाठी दुसरा छोटा पंप हा रबरी नळी मध्ये थोडीशी हवा भरायला उपयोगी असला तरी छिद्र पडलेल्या रबरी नळीत पुन्हा पूर्ण हवा भरण्यास मात्र पुरेसा नव्हता.

सुदैवाने रबरी नळीला छिद्र पडले असले तरी त्यातील हवा पूर्णपणे गेली नव्हती. त्यामुळे श्विनने तसेच पुढे जायचे ठरवले. मात्र त्या आधी श्विनच्या मागील चाकावरील धावकावरील सामान अस्मादिकांच्या पाठीवर आले. मामनोलीला सायकलचा शल्यविशारद मिळाला नाही तरी गोवेली येथे मिळू शकेल असे श्विनला वाटत होते. तसेच विलास वैद्यसुद्धा गोवेली येथे येणार होताच. त्यामुळे असलेल्या हवेच्या जोरावर जास्तीत जास्त पुढे जायचे ठरवून श्विनने दौड सुरू केली. मामनोली ते गोवेली हे अंतर जेमतेम ६ किमीचे. मात्र २-३ किमी अंतरातच हवा अगदीच कमी होऊ लागल्याची जाणीव झाल्यामुळे श्विनने पायउतार होत चालत जायला सुरुवात केली. आता मात्र अंधार पडायला सुरुवात झाल्यामुळे श्विन सावधपणे जात होता. सुदैवाने थोड्याच वेळात दुचाकीवरून विलास वैद्य येत होता. त्याने वाटेत गोवेली येथे स्कॉटला थांबायला सांगितले होते. 

विलासकडेही पंप नव्हता. गोवेलीला जाऊन सायकलशल्यविशारद शोधण्यासाठी विलास परत निघाला. थोड्या वेळात श्विनही चालत गोवेलीला पोचला. विलासला शल्यविशारद सापडला नसला तरी तेथील एका दुकानात त्याला सायकलचा पंप मात्र मिळाला होता. त्या दुकानाच्या ओसरीतच ठाण मांडून विलासने श्विनची नळी बदलून राखीव नळी चाकाला बसवली.

एव्हाना श्विन स्कॉटचा जठराग्नी चांगलाच जागृत झाला होता. तसेच मागे राहिलेले अटलास आणि हिरो हॉक अजून आले नव्हते. गोवेली येथे त्यांचा निरोप घेण्याचे ठरले होते. कारण शहाड नंतर त्यांचा मार्ग वेगळा होता आणि तेथील गर्दीत त्यांचा निरोप घेण्यासाठी थांबणे अवघड होते. त्यामुळे गोवेली येथे क्षुधाशांती करण्याचे श्विन स्कॉट आणि विलासने ठरवले.

पुढे रायते येथे तुषार पवार, दीपक जाधव आणि अजय कार्ले हे अश्वमेध प्रतिष्ठानचे उत्साही कार्यकर्ते श्विन स्कॉटच्या स्वागताला थांबले होते. मात्र श्विन स्कॉट गोवेली येथे थोडावेळ थांबणार असल्याचे समजताच ते तिघेही थेट गोवेली येथे आले. ह्या जुन्या सवंगड्यांची भेट होताच श्विनचा दिवसभराचा शीण निघून गेला. अश्वमेध प्रतिष्ठानच्या ह्याच सवंगड्यांच्या पाठिंब्यामुळे व सहकार्यामुळे श्विनने 'सह्याद्री वाचवा' ह्या संदेशासह नवापूर ते महाबळेश्वर ही सह्याद्रीच्या डोंगरखोऱ्यातील सायकलयात्रेत सहभाग घेतला होता.

थोड्या वेळात अटलास आणि हिरो हॉकही तेथे येऊन पोचले. त्यांचे स्वागत करण्यास त्यांचीही मित्रमंडळी उल्हासनगरहून आली होती. सगळ्यांची एकमेकांशी भेट होताच त्या क्षुधाशांतिगृहात एकच जल्लोष सुरू झाला.


एव्हाना रोज काळोखाआधी दिवसाचा प्रवास पूर्ण करण्याचा आटापिटा करणारा श्विन आज मात्र निर्धास्त होता. कोणाचाही पाय निघत नव्हता. गेले ६ दिवस थोडे पुढे का होईना पण एकमेकांच्या साथीने जाणाऱ्या अटलास, हिरो हॉक यांचा निरोप घेण्याची श्विन स्कॉटची वेळ आली होती. 'पुन्हा भेटूया' चा गजर करतच त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

तेजोनिधी मावळल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अर्थात आता श्विन स्कॉटला साथ करण्यासाठी दुचाकीवरून विलास वैद्य होताच. शिवाय तुषार, अजय आणि त्याच्या दीपक हेसुद्धा रायते येथे न थांबता त्यांनी थेट शहाड पर्यंत साथ दिली. शहाडच्या पुढेमात्र पथदिवे असल्याने अंधाराचे भय नव्हते. त्यामुळे शहाड येथे तुषार आणि त्याच्या सहकाऱ्यांचा निरोप घेत श्विन स्कॉट विलास सह पुढे निघाले.

कल्याण येथेही एक अवलिया श्विन स्कॉटची वाट पाहत होता. त्या अवलियाने 'टाकाऊ तुन टिकाऊ' ह्या संकल्पनेसह अनेक प्रकारच्या सायकलींची निर्मिती केली होती. तो होता दुर्गेश झिपरे! दुर्गेशच्या सायकल प्रसूतिगृहात तीन जणांनी चालवायची सायकल, ९० अंशाचे आकार असलेली काटकोनी सायकल, मोटरसायकलचा भास होणारी 'रॉकी' सायकल, पुढील चाक छोटे आणि मागील चाक मोठे अशी अनोखी सायकल अश्या वेगवेगळ्या सायकलींनी जन्म घेतला होता. अश्या ह्या हरहुन्नरी कलाकाराची भेट हा श्विन स्कॉटच्या अष्टविनायक सायकलयात्रेचा उत्तम समारोप होता.

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

गिरिजात्मज आणि गणेशखिंडीतील गणेश: अष्टविनायक सायकल यात्रा लेख ७

'वा, चहा मस्तच आहे. अजून एक बिनासाखरेचा चहा द्या', श्विनने फर्माईश केली. पहाटे ५.३० चा सुमार असावा. अजून फटफटलेले नव्हते. शांत झोप झाल्यावर श्विनला चहा हवाच होता. ओझरच्या भक्तनिवास ४ मधून बाहेर पडून उजव्या हाताला वळून शंभरेक पावलावर उघडे असलेल्या चहाकेंद्रावर श्विन एकटाच गेला होता.

समोरच्या बाकावर एक ग्रामस्थ बसलेले होते. ते चहाकेंद्र त्यांचे नित्याचेच ठिकाण असावे. सहजपणे विषय काढत त्यांनी गप्पांना सुरुवात केली. शोलेतील बसंतीचेच हे खरे वंशज असावेत. सुदैवाने श्विनला मध्येच तोंड उघडायला त्यांनी संधी दिली. त्या संधीचा लाभ घेत श्विनने पोबारा केला. भक्तनिवासात स्कॉटची आवराआवर झालीच होती. दोघेही भक्तनिवासाच्या प्रांगणात आल्यावर पाठोपाठ अटलास आणि हिरो हॉक सुद्धा हजर झाले. सगळ्यांच्या रबरी नळीतील हवेचा दाब तपासल्यावर भक्तनिवासाचा निरोप  घेण्यासाठी चौघेही सज्ज झाले. इतक्यात आजूबाजूच्या भक्तगणांनी त्यांच्याबरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी घेरले. त्यांच्यासह छायाचित्र काढून झाल्यावर श्विन- स्कॉट -अटलास -हिरो हॉक या चौकडीलाही त्यांनी छायाचित्रबद्ध केले.



छायाचित्राचे सत्र झाल्यावर चौघेही भक्तनिवासातून एका लयीत बाहेर पडले. अद्याप रविराज पूर्ण जागे न झाल्याने प्रकाश धुसरच होता. ओझरच्या बाहेर पडल्यावर तर पुढील वाट पूर्णपणे धुक्यात हरवली होती. अटलास आणि हिरो हॉक पुढे होते. मात्र तेही धुक्यात दिसेनासे झाले. श्विन स्कॉटचा वेग मंदावला होता. मात्र सातत्य टिकून होते. डोळे फाडून फाडून बघत असताना श्विनला एक आठवण आली. एकदा श्विन आणि नयना आघरकर यांनी डोंबिवली नेरळ जायचे ठरवले होते. सकाळी ६.३०-७ वाजता दोघे निघाले होते. धुक्यामुळे काहीही दिसत नव्हते. त्यामुळे अतिशय संथगतीने दोघे जात होते. अखेरीस नयना आघारकरांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. दोघेही परत फिरले पण श्विनचे समाधान झाले नव्हते. म्हणून श्विनने किमान अंबरनाथपर्यंत जायचे ठरवले. पुन्हा एकदा नेवाळी फाटा पार केला, तेव्हा ९ वाजले होते. अजूनही डोळ्यासमोर काहिही दिसत नव्हते. श्विनने डोळ्यावरील चष्मा सरकावत चष्मा काढून समोर पाहिले, तर सगळे काही स्वच्छ दिसत होते. चष्म्यावर मात्र धुक्यात दवबिंदू जमा झाले होते. त्या चष्म्यामुळेच अजूनही समोरचे दिसत नव्हते.
त्या आठवणींनी श्विनने एकदा चष्मा सरकावून पाहिला, मात्र आजमात्र अजूनही धुके पसरलेले होतेच. त्यामुळे श्विनसाठी संथ गती शिवाय पर्याय नव्हता. ओझर ते लेण्याद्री पल्ला फारतर १२ किमी. मात्र आता घड्याळ बाबा वेगात धावत होते. साधारण अर्ध्या तासाने सगळे लख्ख दिसू लागले तेव्हा रवीमहाराज बऱ्याच उंचावर पोचले होते.
अटलास आणि हिरो हॉकसुद्धा जवळच होते. अटलासच्या रबरी नळीतील हवेचा दाब थोडा कमी होता. त्यामुळे पुरेशी हवा भरून झाल्यावर अटलास, हिरो हॉक आणि श्विन निघाले. तोपर्यंत स्कॉट पुढे गेली होती. आता अटलास, हिरो हॉक आणि श्विन यांनीही वेग वाढवला. लेण्याद्रीकडे उजवे वळण आले तोपर्यंत स्कॉटला तिघांनीही गाठले.


सगळ्यांनी ते वळण घेत लेण्याद्रीच्या दिशेने दौड सुरू केली. थोड्याच अवधीत चढ सुरू झाला. आता मात्र एकामागोमाग एकजण पुन्हा धीम्या गतीने जाऊ लागले. डाव्या हाताला असलेले भक्तनिवास पाहिल्यावर श्विनने तिकडे मोर्चा वळवला. पाठोपाठ अटलास, हिरो हॉक आणि स्कॉटही तेथे गेले. चौघांनाही भक्तनिवासात दावणीला बांधून त्या चौघांचे स्वार आता पायउतार होऊन लेण्याद्रीच्या डोंगराच्या पायऱ्यांकडे वळले.
लेण्याद्रीच्या डोंगरावर चढत असताना वाटेत बऱ्याचदा माकडे हातातील वस्तू खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याकडील सर्व सामान भक्तनिवासाच्या आवारात दावणीला बांधलेल्या श्विन, अटलास आणि हिरो हॉक यांच्याकडे सोपवूनच सर्व स्वार लेण्याद्रीच्या तिकीट खिडकीपाशी पोचले. तरीही काही सामान शर्टच्या मागील खिश्यात ठेवलेले होते, ते सामान त्या तिकीट खिडकीत जमा केले. आम्ही सर्वजण सकाळी ८ च्या आत चढण सुरू केल्यामुळे लेण्याद्रीदर्शनाचे तिकीट काढावे लागले नाही.

पायऱ्या चढत असताना अस्मादिकांनी घातलेल्या डोंबिवली सायकल क्लबचा शर्ट, सायकलचे हातमोजे आणि डोक्यावरील संरक्षक कवच यामुळे इतर भाविकांना उत्सुकता निर्माण होत होती. अर्थात इतर तिघांकडेही अशीच काही आयुधे होतीच. सायकलिंग करून गड किल्ले चढले की पाय जरा मोकळे होतात हा अनुभव अस्मादिकांनी डोंबिवली ते कर्नाळा सायकलिंग करून कर्नाळा सर केला तेव्हा आला होताच. आत्ताही अस्मादिक तोच आनंद अनुभवत होते.

एकाच दमात लेण्याद्रीचा डोंगर सर केल्यावर सगळे सायकलस्वार गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी गुंफेत शिरले.
अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती आहे जो गिरी म्हणजे डोंगरावर स्थित आहे.
मुळातील बौद्ध विहार असलेल्या गुंफामालिकेतील सातवी गुंफा आता गणेशमंदिर म्हणून मान्यताप्राप्त पावली आहे. येथे एकंदर २६ गुंफा असून त्यांना पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने क्रमांक दिले आहेत. ह्या गुंफा दक्षिणाभिमुख आहेत. ६ आणि १४ क्रमांकाची गुंफा चैत्यगृह अथवा देवळाच्या स्वरूपात असून इतर गुंफा ह्या विहार अर्थात मठवासी साधू/ भिक्षु यांच्या वास्तव्यासाठी आहेत. सर्व गुंफा पहिले ते तिसऱ्या शतकातील असून गणेशमंदिरही पहिल्या शतकातील आहे. ह्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी २८३ पायऱ्या चढाव्या लागतात ज्या गणपतीने इंद्रियांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक समजले जातात. गणेशमंदिर म्हणून मान्यता पावलेली ही गुंफा अश्या पद्धतीने बांधली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य उगवत राहील तोपर्यंत प्रकाश आत येत राहील. मंदिर दक्षिणाभिमुख असून गणपती मात्र उत्तराभिमुख आहे, ज्यामुळे गणपतीचे मुख पर्वताच्या विरुद्ध दिशेला आहे असे मानले जाते. पेशव्यांनी गणेशाचे मुख शोधण्याचा असफल प्रयत्नही करून पाहिला होता.

गिरिजात्मजाचे दर्शन घेतल्यावर सगळे सायकलपटू शांतपणे सभामंडपामध्ये बसले. तेथील शांत वातावरणात गणेशाची प्रार्थना करत सगळेजण उल्हसित झाले होते. सायकल पटू सभामंडपाबाहेर पडताच इतर भाविकांनी त्यांना घेरले. त्या भाविकांना सायकलपटूंसह छायाचित्र काढून घ्यायचे होते. सगळ्या सायकलपटूंनी सर्व इच्छुक भविकांबरोबर छायाचित्र काढू दिले.




लेण्याद्रीच्या डोंगरावरून आसपासचा परिसरच नव्हे तर आकाशही विलोभनीय दिसत होते.



ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून सगळे सायकलपटू लेण्याद्रीचा डोंगर उतरू लागले.


सर्व पायऱ्या उतरून सायकलपटू पायथ्याशी असलेल्या क्षुधाशांतिगृहकडे मोर्चा वळवला. येथील जेवण श्विनला नेहमीच आवडे, त्यामुळे अष्टविनायकयात्रा करत असताना किमान एक रात्र लेण्याद्री येथे मुक्काम करण्यास श्विन नेहमीच उत्सुक असे. यावेळी रात्री मुक्काम न करता आल्याने जेवणाची तहान केवळ सकाळच्या नाश्त्यावर भागवावी लागणार होती. थोड्याच वेळात हातातोंडाची लढाई सुरू झाली. मनसोक्त नाष्टा झाल्यावर आजूबाजूच्या दुकानात फेरफटका मारून भक्तनिवासाशेजारील श्विन स्कॉटला आम्ही बंधमुक्त केले.

श्विन आणि स्कॉट थोडे आधी निघाले. मात्र अटलास आणि हिरो हॉक गिरिजात्मजाच्या पायथ्याशी आणखी काही काळ थांबले. माळशेज घाट उतरेपर्यंत तरी श्विन, स्कॉट थोडे पुढे राहतील आणि अटलास, हिरो हॉक मागे राहतील असे चौघांनी ठरवले होते. त्या दृष्टीने श्विन स्कॉट पुढे निघाले होते. लेण्याद्री डोंगरातील उताराचा रस्ता श्विन स्कॉट उजवीकडे वळले. रस्ता कमी वर्दळीचा आणि रुंद तसेच सुंदर होता. दोघांनी वेग घेतला आणि काही काळातच गणेशखिंडीचा चढ सुरू झाला. सुरुवातीला रस्ता चांगल्या अवस्थेत होता आणि चढ कमी तीव्रतेचा होता. मात्र एका चढणीपाठोपाठ दुसरी त्यानंतर तिसरी अश्या अनेक चढणी लागत असल्याने श्विन स्कॉटचा वेग बऱ्यापैकी मंदावला. पुढे पुढे रस्ताही खराब अवस्थेत होता.


काही ठिकाणी तर कोणतीही दुचाकी घसरू शकेल इतका रस्ता खराब झाला होता. श्विन आणि स्कॉटने नेटाने गणेशखिंड सर केली. गणेशखिंड सर करून तेथील गणेशाचे दर्शन घेऊन श्विन स्कॉटची वाट पाहत होता. सभोवार पाहता सुंदर वातावरण होते. स्कॉटही थोड्या वेळात तेथे पोचली. खिंड पार केल्याबद्दल स्कॉटला आनंद झाला होता. गणेशमंदिराजवळ येऊन दोघांनी मंदिरातही श्री गणेशाचे दर्शन घेतले. तेथील वारा अंगावर घेऊन दोघेही प्रसन्न झाले होते. श्विन स्कॉटने चिक्की खाऊन आपला आनंद साजरा केला. एवढ्यात दुचाकीवरून दोनजण मंदिरापाशी येऊन दर्शन घेऊ लागले. श्विन स्कॉटने त्यांनाही चिक्की देऊन आनंदात सहभागी करून घेतले.
हा आनंदोत्सव साजरा करत दोघेही गणेशखिंडीवरून सभोवार पाहू लागले.


गणेशखिंड सर केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. अंगावर येणाऱ्या वाऱ्यासह दोघेही ते समाधान आणि आनंद व्यक्त करत तेथे रेंगाळले तेव्हा दिवसभरातील उरलेल्या ११० किमी अंतराच्या ताणाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता.



रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

विघ्नहर्ता- अष्टविनायक सायकल यात्रा लेख ६

'इंद्रप्रस्थ'च्या पहिल्या मजल्यावर आम्हाला वास्तव्य करायला मिळाले होते. व्यवस्थापनाने त्याच मजल्यावरील सज्जा मध्ये श्विन आणि स्कॉट यांचीही व्यवस्था केली होती. त्या सज्जासमोर मोकळी जागा होती तेथे इंद्रप्रस्थमधील कर्मचारीवर्ग निद्रिस्त झाला होता. पहाटे श्विन स्कॉट यांना दावणीतून सोडवून त्या कर्मचारीवर्गामधूनच आणावे लागले.

श्विन स्कॉट सज्ज झाले तेव्हा भास्कराचार्य डोळे किलकिले करू पाहत होते. मात्र अद्याप त्यांनी पूर्णपणे डोळे उघडले नव्हते. त्यामुळे पुरेसा प्रकाश नव्हता. रस्ता अरुंद असला तरी व्यवस्थित डांबरीकरण झालेला होता. त्यामुळे श्विन स्कॉटने संथ गतीने दौड सुरू केली. केडगावजवळील रुळांवरील उड्डाणपूल ओलांडून पूढे जात असताना थोडेफार धुके असले तरी पुढे मात्र पुरेसा प्रकाश होता. श्विन आणि स्कॉट पहाटेच्या वेळेचा फायदा घेत १५-२० किमी अंतर पार करून चहा घेण्याच्या विचारात होते. मात्र साधारण १० किमी अंतरावर असताना श्विनला चहाचे फक्कड ठिकाण दिसले. श्विनने मागून येणाऱ्या स्कॉटला तेथे थांबण्याची खुण केली. मात्र इतक्यात एक प्रशिक्षित श्वान स्कॉटच्या दिशेने धावत ओरडू लागला. स्कॉट थांबली तरी त्या श्वानाने त्याचे ओरडणे सुरूच ठेवले. अखेरीस श्विन ने मागे येऊन स्कॉटला पुढे जायला सांगितले. दोघेही पुढे गेल्यावरही तो श्वान मात्र ओरडायचे थांबत नव्हता.

श्विन आणि स्कॉटने चहाची फर्माईश केली. चहाचे ते स्थानक अतिशय स्वच्छ होते. चहा आल्याबरोबर त्याची चव श्विनला तृप्त करून गेली. ती चव नेहमीसारखी नव्हती. तो गुळाचा चहा होता. श्विनला ती चव इतकी आवडली की यापुढे मिळेल तेव्हा गुळाचाच चहा प्यायचे श्विनने मनाशी नक्की केले. इतका झकास चहा मिळाल्यावर दोघेही ताज्या दमाने पुढे मार्गक्रमण करू लागले. रस्ता अरुंद असला तरी फारशी वर्दळ नव्हती, त्यामुळे स्वतःचेच राज्य असल्याप्रमाणे दोघेही निवांतपणे जात होते.

थोड्या वेळातच आंधळगावजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला 'माय ऊर्जा' चे केंद्र दिसले. साधारण तीन वर्षांपूर्वी श्विनने डोंबिवली सायकल क्लबचे सदस्य श्री अय्यर यांच्याबरोबर अष्टविनायक सायकल यात्रा केली होती. त्यावेळी दौंडहून सकाळी सुरुवात करून मध्यान्हीच्या वेळी याच 'माय ऊर्जा' केंद्रातील अप्रतिम लस्सी पिऊन श्विनने उदरभरण केले होते. ती लस्सी आवडल्यामूळे त्यावेळी आणखी एक लस्सीचे पाकीट श्विनने आपल्याबरोबर घेऊन ठेवले होते. पुणे येथील कुतवळ फूड्स प्रा लि या कंपनीने 'ऊर्जा' या व्यापारी चिन्हासह दूध आणि दुग्धोत्पान्न पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. मध्यान्हीच्या वेळेस त्या दिवशी त्या लस्सीने श्विनला खरोखरच चांगली ऊर्जा मिळवून दिली होती.

श्विन त्या आठवणीनी सुखावून गेली. 'माय ऊर्जा' च्या केंद्रातून पुन्हा एकदा लस्सी घेण्याची श्विनला इच्छा होती. खरतर या वेळी श्विन स्कॉट सकाळच्या वेळेस तेथून जात होते. तसेच नुकताच चहा झाला होता आणि आता लस्सीपेक्षा नाश्त्याची गरज होती. श्विनचा हा प्रश्न 'माय ऊर्जा' केंद्राने परस्परच सोडवून टाकला, कारण ते केंद्र बंदच होते. श्विन आणि स्कॉट येथून अर्थातच पुढे निघाले.

दोघेही क्षुधाशांती गृह शोधत असतानाच अंबले गावाजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूसच एक छोटेसे खोपट दिसले. यापुढेही फार काही पर्याय मिळतील असे श्विनला वाटत नव्हते. त्यामुळे श्विन स्कॉट तेथे शिरले. ते खाद्य केंद्र बहुधा एक कुटुंबच चालवत होते. नाश्त्यासाठी पोहे मिळतील हे कळल्यावर दोघांनाही समाधान वाटले. पोहे तयार आहेत असे सांगूनही पोहे मेजापर्यंत येत नव्हते. 'तयार आहे' असे सांगितलेले पोहे अजून फोडणीला टाकायचे होते. पोहे बऱ्याच वेळाने आले तोपर्यंत श्विन आणि स्कॉटची पुरेशी विश्रांती झाली होती. समोर आलेल्या पोह्यांची चव घेताच या केंद्रात थांबल्याचा आनंद श्विन स्कॉटला झाला. पोहे उत्कृष्ट होतेच शिवाय त्याचे प्रमाणही पुरेसे होते. पोहे खाऊन श्विन आणि स्कॉट तृप्त मनाने बाहेर पडले.
कर्डे गावामध्ये शिरेपर्यंत स्कॉट थोडी मागे राहिली होती. त्यामुळे श्विनने स्कॉटची वाट पाहण्यासाठी एक थांबा घेतला. इतक्यात उल्हासनगरची जोडगोळी श्री उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर यांची पुन्हा गाठ पडली. श्विन स्कॉटच्या जोडीला आता उपेंद्रची अटलास आणि हितेशची हिरो हॉक कायम राहणार होते. आता चौघेही एकामागोमाग जाऊ लागले. पुढे गेल्यावर एक डावे वळण घेत पाइपलाइनच्या बाजुने रांजणगाव येथे जाण्यासाठी एक जवळचा रस्ता असल्याचे श्विनला मागील अनुभवामुळे माहीत होते.
कर्डे गावाजवळ ते डावे वळण घेत श्विन, स्कॉट, अटलास आणि हिरो हॉक पाइपलाइन रस्त्याला लागले. तो रस्ता फारच अरुंद होता. तेथून वर्दळ कमी असली तरी एखादे मोठे वाहन आले तरी रस्ताची रुंदी कमी पडत होती. अटलास आणि हिरो हॉक थोड्याच वेळात पुढे निघून गेले. श्विन स्कॉट काही अंतर मागे राहिले होते खरे, पण काही वेळातच अटलास आणि हिरो हॉक उदरभरण करण्यास थांबले. पोहे खाल्यामुळे श्विन आणि स्कॉट अगोदरच तृप्त झाले होते. त्यामुळे त्या दोघांनी आता आघाडी घेतली. कारेगाव येथे पोचताच पुणे नगर हमरस्ता लागला. या गुळगुळीत आणि प्रशस्त रस्त्यावर श्विनने चांगलाच वेग घेतला. मात्र रस्ता चढ उताराचा होता. मात्र रांजणगाव फार लांब नव्हते. थोड्याच वेळात श्विन स्कॉट महागणपतीच्या प्रवेशद्वाराशी पोचले.


श्रीमहागणपतीचे दर्शन अतिशय सुखद होते. तेथील आवारात श्विन आणि स्कॉट पुन्हा एकदा ताजेतवाने झाले.


दर्शनानंतर दोघेही पुढील प्रवासासाठी तयार होणार इतक्यात अटलास आणि हिरो हॉक तेथे आले. त्यांना सांगून श्विन आणि स्कॉट मलठण मार्गे ओझर, लेण्याद्रीच्या दिशेने निघाले. एव्हाना मध्यान्ह उलटून गेली होती आणि ओझरपर्यंत जवळपास ७० किमी तर ओझर मार्गे लेण्याद्री पर्यंतचे जवळपास ८२ किमी अंतर बाकी होते. काम, काळ, वेग या अंकगणिताचा विचार करता आता वाटेत थांबण्यासाठी अतिरिक्त वेळ हाताशी नव्हता.
श्विन स्कॉटने सुरुवात करताच एक उंच चढाव सामोरा आला. तो शांतपणे सर करून दोघेही पुढे निघाले. मलठण येत असताना श्विन स्कॉटला उदरभरण करण्याची आठवण झाली. इतक्यात अटलास आणि हिरो हॉकही तेथे पोचले. श्विन आणि स्कॉटच्या अष्टविनायक सायकल यात्रेची बातमी पुढारी वर्तमानपत्रात छापून आली होती. ती मलठण येथे वाचावयास मिळाली.

श्विन स्कॉट यांनी अटलास आणि हिरो हॉक यांना नाश्त्याचे निमंत्रण दिले. मात्र त्या दोघांचे रांजणगाव येथे उदरभरण झाले होते, त्यामुळे त्यांनी पुढे जायचे ठरवले. तेथील हॉटेल द्वारकाच्या व्यवस्थापकाने श्विन स्कॉटचे यथोचित आदरातिथ्य केले. जणू काही त्यांच्या घरी गेलेलो आम्ही त्यांचे आप्तच होतो. इतकेच नव्हे तर शेजारील मेजावर बसलेल्या दोघा ग्राहकांनीही श्विन स्कॉटची आपुलकीने चौकशी केली आणि मार्गदर्शनही केले. अश्या तऱ्हेने मिळालेल्या ह्या वागणुकीने श्विन स्कॉट भारावून गेले.

तेथून पुन्हा कूच करताना दोघेही अतिशय समाधानी होते. मलठण कवठे रांजनी हा मार्ग तसा कंटाळवाणाच! रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोकळे रान, मनुष्यवस्ती विरळीच. मात्र ह्याच रस्त्याला श्विनला एक उमद्या मनाचा माणूस भेटला. त्याचे नाव शिवाजीराव थोरात! पांढराशुभ्र सदरा, पांढरी पडत असलेली खुरटी दाढी, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळाला टिळा आणि डोळ्यावर गॉगल.. अश्या पेहरावात गडी दुचाकी चालवत होता. अटलास आणि हिरो हॉक बरेच पुढे गेले होते, तर स्कॉट मागे राहिली होती. शिवाजीराव श्विनला समांतर गाडी चालवू लागले. 'तुम्ही मगाशी रांजणगावला होतात ना. मी तुम्हाला तिथे पाहिले', शिवाजीराव श्विनला म्हणाले. तोच धागा पकडून दोघेही एकमेकांना समांतर राहत गप्पा मारू लागले. स्कॉट मागे राहिली असली तरी, शिवाजीरावांना आपल्यासाठी वेग कमी करायला लागत आहे हे पाहून श्विनने त्यांच्यासाठी वेग वाढवला. गप्पा रंगत होत्या, त्याबरोबर दोघांचा वेगही वाढत होता. मात्र त्यामुळे मागे राहिलेल्या स्कॉटमधील अंतर आणखी वाढेल हे लक्षात घेत श्विनने त्यांना तसे सांगितले. 'तुम्हाला चहा पाजायचा आहे, मी पुढे थांबतो. तुम्ही या, असे सांगून शिवाजीराव पुढे गेले. स्कॉट येईपर्यंत श्विनने वेग कमी केला. त्यानंतर दोघेही पुढे निघाले. थोड्याच वेळात शिवाजीराव, अटलास आणि हिरो हॉक एका चहाकेंद्रावर बसले दिसले. श्विनला त्यांनी हाक मारली. शिवाजीरावांनी चौघांनाही चहा पाजला.


शिवाजीराव हे शाळेत असताना त्यांच्या भागातील नेत्याच्या बरोबर एकाच बाकावरील सहाध्यायी होते. विशेष म्हणजे त्या लोकनेत्याचेही नाव शिवाजीरावच. थोडक्यात शाळेत असताना एकाच बाकावर दोन शिवाजी बसत होते.

चहापान झाल्यावर पुढील दौड पुन्हा सुरू झाली. श्विन स्कॉट सातत्याने जात असताना अटलास आणि हिरो हॉक यांनी पुन्हा एकदा उदरभरण करण्यासाठी थांबा घेतला. रांजनी गाव जवळ आल्यावर श्विन स्कॉट पुन्हा एकदा मार्गाची चौकशी करत असताना मागाहून आवाज आला,' बरोबर आहे, तिथेच वळा,' शिवाजीराव पुन्हा मागाहून दुचाकीवरून येत सांगत होते.

श्विन स्कॉट त्याप्रमाणे पुढे निघाले. नारायणगाव येताच पुन्हा एकदा बऱ्यापैकी रुंद रस्ता लागला. तेथून चौकशी करत करत श्विन स्कॉट ओझर कडे जाणाऱ्या रस्त्याला लागले तोपर्यंत अदित्यनारायण पश्चिमेकडे झुकू लागला होता. श्विन स्कॉट च्या उजव्या बाजूला लांबवर सावल्या पडू लागल्या होत्या.



रस्ता तर अतिशय सुरेख होता. दोघांचाही वेग वाढला. ओझर जवळ येत असल्याचे समजल्यानेही दोघेही निर्धास्त झाले होते. समोरच्या क्षितिजावर मनोहारी दृश्य दोघांचे मन रिझवत होते.

थोड्या वेळातच दोघेही एका फाट्यावर पोचले तेथून डावीकडे लेण्याद्री तर उजवीकडे ओझर वसलेले होते.



दोघांनी उजवीकडे वळण घेतले. मात्र आता खडबडीत रस्ता सुरू झाला होता. मात्र ओझरला पोचल्याचा आनंद त्या खडबडीत रस्त्यालाही हिरावून घेता येत नव्हता.
ओझर येथे एक भव्य कमानीने श्विन स्कॉटचे स्वागत केले.


ओझर येथे मंदिराच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने जात श्विन स्कॉट मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोचले. तेथील फुलविक्रेत्याला सांगून श्विन स्कॉट यांना दावणीला बांधून आम्ही विघ्नेश्वराचे दर्शन घेतले. विघ्नेश्वराचे दर्शन नेहमीच मन प्रसन्न करते. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला प्रशस्त ओवरी असून भक्कम तटबंदीही आहे. गणेशाची मूर्तीही पूर्वाभिमुख असून त्याच्या बरोबर रिद्धी आणि सिद्धीही आहेत.
पोर्तुगीजांवर विजय मिळवत वसईचा किल्ला जिंकल्यावर चिमाजी आप्पा यांनी ओझर गणपतीच्या मंदिराचे नूतनीकरण करून मंदिराला सोन्याचा कळस चढवला.

श्विन स्कॉट विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन समोरील मोकळ्या जागेत येताच इतर भक्त त्यांची चौकशी करू लागले.

एव्हाना अंधार पडू लागला होता. ओझर येथे पोचताना वाटेत चौकशी केली असता ओझरपासून लेण्याद्री पर्यंतचा रस्ता चांगला असून पथदिवेही आहेत असे समजले होते. अंधार पडू लागला तरी संध्याकाळचे जेमतेम ६ वाजत असल्याने पुढे लेण्याद्री पर्यंत जायचा दोघांचा निर्धार होता.

मात्र दुपारी मलठण येथे इडली सांभार चा समाचार घेतल्यावर ओझरपर्यंतचे ५५ किमी अंतर पार करताना चहा घेतला असला तरी खाणे झाले नव्हते. त्यामुळे ओझर येथे नाष्टा करून मगच लेण्याद्रीला जायचे दोघांनी ठरवले. क्षुधाशांती करून तेथील कर्मचाऱ्याला लेण्याद्रीचा रस्ता विचारताच 'अंधारात त्या रस्त्याने जाऊ नका, वाटेत वाघ आहेत', असे त्याने सांगितले. ते ऐकल्यावर ओझर मंदिराच्या प्रसादाचे कार्यालय तसेच रस्त्यावरील विक्रेती बाई यांनाही विचारून पाहिले. मात्र सगळ्यांनीच श्विन स्कॉटला वाटेत वाघ असल्यामुळे अंधारात त्या रस्त्याने जाऊ नका असेच सांगितले. तिथे मिळालेल्या सल्ल्यानुसार दोघांनी भक्तनिवास ४ येथे खोली घेतली. भक्तनिवास तर उत्तम होतेच शिवाय तेथील कर्मचारीही मदतीसाठी तत्पर होते. स्कॉट आराम करत असताना श्विन चहासाठी बाहेर पडला. मंदिरासमोरील चहाकेंद्रातही गुळाचा चहा मिळाल्याने श्विनची स्वारी खुश झाली. तेथूनच श्विनने अटलास आणि हिरो हॉक यांची भ्रमणध्वनीद्वारे चौकशी केली. ते दोघेही ओझर येथे पोचल्याचे त्यांनी कळवताच श्विनने त्यांना मंदिराशीच यायला सांगून त्यांची व्यवस्था भक्तनिवास ४ मध्येच करायला स्कॉटला सांगितले.
अटलास आणि हिरो हॉक यांनी विघ्नेश्वराचे दर्शन घेतल्यावर श्विन त्यांना भक्तनिवास ४ येथे घेऊन गेला. चौघांचीही थोडी विश्रांती झाल्यावर मग प्रसादाचे जेवण घेण्यासाठी सगळेजण निघाले. तेथील शिस्त, स्वच्छता वाखाणण्यासारखी होती.
ओझर येथील वातावरणात चौघेही ताजेतवाने झाले होते. मात्र दिवसभराच्या प्रवासामुळे चौघांवरही निद्रादेवी लगेचच प्रसन्न झाली.

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

आंधळी कोशिंबीर - अष्टविनायक सायकल यात्रा लेख ५

अष्टविनायक यात्रेदरम्यान सर्व गणपतींचे दर्शन झाल्यावर पुन्हा प्रथम गणपतीचे दर्शन घेतले तर अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. शास्त्रोक्त पद्धतीने ही यात्रा करत असताना ज्या गणपतीचे सर्वप्रथम तसेच सर्वात शेवटी दर्शन घ्यायचे तो गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर! सिंधू ह्या दैत्याचा वध करणारा हा मयुरेश्वर! माघी चतुर्थी तसेच भाद्रपद चतुर्थी या दिवशी चिंचवड येथून गणेशाची पालखी मयुरेश्वराच्या देवळात येते.

हे मंदिर नेमके कधी बांधले याचा कालावधी निश्चित नसला तरी मोरया गोसावी यांचा मात्र या मंदिराशी थेट संबंध आहे. पेशव्यांच्या काळात या देवालयाची भरभराट झाली. मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावर समर्थ रामदासांना 'सुखकर्ता दुखहर्ता' ही आरती स्फुरली.
मंदिर उंच दगडी भिंतीने संरक्षित आहे. ती भिंत चारही कोपऱ्यातील मिनारांनी जोडलेली आहे. ते मिनार मंदिराच्या स्थापत्यकलेवरील मुस्लिम प्रभावाची साक्ष देत आहेत. काही काळ एक मुस्लिम सरदार या मंदिराचा आश्रयदाता आणि संरक्षक होता. या मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वार एकेका युगाचे प्रतिनिधित्व करतात. पूर्वेच्या प्रवेशद्वारावरील बल्लाळविनायकासमवेत राम आणि सीता 'धर्माचे' प्रतीक आहेत आणि सृष्टीचा रक्षणकर्ता विष्णूचे मूर्त स्वरूप आहेत. दक्षिण प्रवेशद्वाराकडील विघ्नेश शिव आणि पार्वतीसह 'अर्थ' म्हणजेच संपत्ती आणि कीर्तीचे प्रतीक असून सृष्टीचे विसर्जन करणाऱ्या शिवाचे मूर्त स्वरूप आहेत. पश्चिमेकडील चिंतामणी हा कामदेव आणि रती सह असून 'काम' म्हणजेच अभिलाषा, प्रेम, कामुक आनंदाचे प्रतीक असून निराकार ब्राह्मणाचे मूर्त स्वरूप आहे. तर उत्तरेकडील महागणपतीसह वराह आणि त्याची पत्नी महीसह 'मोक्ष' चे प्रतीक आहे जो ब्राह्मणाचे मूर्त स्वरूप आहे.
मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून चौकोनी आवारात दोन दीपमाळा आहेत.


मोरगाव येथे श्विन स्कॉट पोचले तेव्हा बऱ्यापैकी अंधार झाला होता. तेथील चिंचोळ्या बोळातून त्या अंधारात मुख्य रस्ता शोधणे कठीणच होते. मोरगाव येथे श्री ढोले भाऊ यांनी श्विन आणि स्कॉटची भक्तनिवासात सोय केलेली होती. भक्तनिवासात थोडी विश्रांती घेऊन आणि स्नान करून दोघेही मयुरेश्वराच्या दर्शनाला निघाले. शांत वातावरणात दोघांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले.






मंदीरामध्ये काही काळ प्रसन्न वातावरणाचा लाभ घेऊन श्विन आणि स्कॉट क्षुधाशांतिगृह शोधू लागले.  जवळपास मोजकीच क्षुधाशांतिगृह दिसत होती. खरतर अद्याप ८-८.३० चा च सुमार झाला होता. मात्र मुख्य रस्त्यावरही सामसूम झाली होती. थोडा फेरफटका मारून श्विन स्कॉटने एक क्षुधाशांतिगृह निवडले. तेथील जेवण खरोखरीच रुचकर होते. त्यानंतर दोघेही भक्तनिवासात जाऊन निश्चीन्तपणे निद्रादेवीच्या स्वाधीन झाले. मात्र दरम्यान श्विनच्या डोक्यात पूढील ४ दिवसांचा पल्ला ३ च दिवसात कसा पार पाडता येईल याचे नियोजन होत होते.

दुसऱ्या दिवशी दोघांनाही पहाटेच जाग आली. जवळपास चहापान करत असता मोरगाव कडून केडगाव चौफुलाकडे जाणारा रस्ता दोघांनी विचारून घेतला. भक्तनिवास मंदिराच्या शेजारीच होते. मोरगाव सोडण्याअगोदर श्विन स्कॉट पुन्हा मंदिराकडे वळले.



पहाटेच्या प्रकाशात मंदिर अतिशय सुंदर दिसत होते. मंदिराचे दर्शन घेऊन श्विन स्कॉटने कूच केले. सुरुवातीचा रस्ता अतिशय चिंचोळा होता. त्यामुळे दोघेही थोडे गोंधळात पडले होते. मात्र तो चिंचोळा रस्ता संपून सुपेच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागल्यावर मात्र दोघे निर्धास्थ झाले. रस्ता फारसा रुंद नव्हता. दोघांनीही संथ गतीने जाणेच पसंत केले. 

काही काळातच डाव्या हाताला मयुरेश्वर अभयारण्य लागले.







अभयारण्यात जाण्यास मज्जाव असल्याचा फलक तेथे होताच. तसेच श्विन स्कॉटलाही अभयारण्यापेक्षा सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची ओढ लागली होती. दोघेही अभयारण्य मागे सोडून पूढे जाऊ लागले. रस्ता थोडासा ओबडधोबड आणि अरुंद असल्याने वेग वाढवता येत नव्हता. तरी दोघेही सातत्याने पुढे जात होते.
साधारण सकाळचे ९ वाजण्याच्या सुमारास दोघेही केडगाव चौफुला येथे पोचले. श्विनच्या डोक्यात रात्री शिजलेल्या योजनेप्रमाणे पुढील ४ दिवसांचा प्रवास ३ च दिवसात पूर्ण करायचा असल्यास आज सिद्धटेकला जाऊन न थांबता परत मागे केडगाव चौफुला येथे येणे गरजेचे होते. त्यामुळे दोघांनी केडगावला पोचताच प्रथम रात्री राहण्याची सोय होईल का ते पाहिले. सुदैवाने पहिल्याच ठिकाणी त्यांना राहण्याची उत्तम सोय होत असल्याचे समजले. त्या इंद्रप्रस्थ लॉज मध्ये आगाऊ रक्कम देऊन दोघांनी रात्री राहण्याची सोय नक्की केली.

केडगाव येथे नाष्टा करायला न थांबता दोघेही पुढे पाटस येथील टोलनाक्याला पोचले. तेथील क्षुधाशांतिगृहात मनाजोगता नाष्टा झाल्यावर दोघांनी दौंड शहराकडे मोर्चा वळवला. नाष्टा होईपर्यंत सकाळी १० चा सुमार झाला असावा.

पाटस येथील टोळ नाक्या पासून अवघ्या १३ किमी वर दौंड शहर तर तेथून पुढे जेमतेम २० किमी वर सिद्धटेक. म्हणजे पाटस टोळ पासून सिद्धटेकला जाऊन येऊन अंतर होते ६६ किमी. तर त्यांनंतर पुन्हा केडगाव येथिल इंद्रप्रस्थ लॉज फक्त १० किमी अंतरावर. श्विन स्कॉटच्या अंदाजाप्रमाणे सिद्धिविनायकाच्या दर्शन आणि ७६ किमी अंतराचा प्रवास यास साधारण ६-७ तास पुरेसे होते. मात्र यापुढे मात्र वेगळेच विधिलिखित ठरले होते.

दौंडकडे दौड सुरू झाली खरी पण रस्त्याची अवस्था पाहता ती दौड दुडकी ठरत होती. येथील हमरस्ता पाहता डोंबिवली शहरातील रस्ताही सुंदर वाटू लागला होता. फुटाफुटाला पडलेले खड्डे श्विन आणि विशेषतः स्कॉटची परीक्षाच पाहत होते. श्विन स्कॉट मधले अंतर वाढत होते, त्यामुळे श्विन थोड्या थोड्या अंतरावर स्कॉटसाठी थांबत असे.

स्कॉटची वाट पाहण्यासाठी विश्रांती घेण्यास श्विनला मिळालेले एक आसन



रस्ता खड्याखड्यांनी जोडलेला आहे असेच वाटत होते. श्विन पुढे जाऊन थांबत असल्याने श्विनला थोड्या थोड्या वेळाने विश्रांती मिळत होती. स्कॉटला मात्र वेग कायम राखता येत नसल्याने विश्रांतीसाठी न थांबता मार्गक्रमण करावे लागत होते. मजल दरमजल करत दोघेही दौंड च्या वेशीवर पोचले. चहापानाच्या निमित्ताने विश्रांती घेऊन झाल्यावर दोघांनी दौंडहुन सिद्धटेकच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. यापुढचा रस्ता पाहता प्रवास आणखीच बिकट होणार याची प्रचिती लगेचच येऊ लागली.

मध्यान्हीचा समय झाल्यामुळे सूर्यदेव डोक्यावर आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती फुलली होती. रस्त्यावरील खड्यांची महिरप अधिक फुलत होती. श्विन आणि स्कॉट अथकपणे पुढे सरकत होते. सिद्धटेक जवळ येत असताना एक अनोखे दृश्य श्विनला दिसले


बाजूच्या शेतात अनेक ट्रॅक्टर हारीने उभे होते. ते दृश्य पाहून श्विनने पुन्हा टाच मारली खरी, पण.. श्विनच्या वाहकावर रबरी नळीने बांधलेली सॅक आता धावकावर स्थिर राहायला तयार नव्हती. पाटस-दौंड- सिद्धटेक या रस्त्यावरील प्रवास त्या सॅकलाही मानवेनासा झाला होता. तिने आता अस्मादिकांच्या खांद्यावरूनच प्रवास करण्याचा हट्ट धरला. दोघांचेही सामान त्याच सॅकमध्ये होते. पण आता श्विनचा नाईलाज तर होताच मात्र दिलासादायक बाब म्हणजे सिद्धटेक आता जवळ होते. काही काळातच श्विन सिद्धटेकच्या वेशीवर पोचून स्कॉटची वाट पाहू लागली. शेजारीच सिद्धटेक येथील प्रसिद्ध झुणका भाकरी केंद्राची झोपडी होती. त्यातून श्विनला झुणका भाकरीविषयी विचारणा झाली. श्विन मात्र स्कॉटच्या प्रतीक्षेत होती. इतक्यात 'शशांक....' अशी हाक ऐकू आली. महड येथे भेटलेली उल्हासनगरची जोडगोळी उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर तेथे ... त्याच झोपडीत आराम करत होती. हितेश श्विनच्या स्वागताला पुढे आल्याबरोबर श्विनने खांद्यावरील सॅक हितेशच्या हवाली केली. इतक्यात स्कॉटही तेथे पोचली.
सॅक हितेशकडे दिल्यावर श्विन आणि स्कॉट सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोचले. सिद्धिविनायकाच्या पुजाऱ्याला दोघेही सायकलने अष्टविनायक दर्शन करत आहेत हे समजताच त्याने श्विन स्कॉटच्या मागणीप्रमाणे देवाचे हार सायकलकरीता दिले. श्विन आणि स्कॉटने ते हार परिधान करताच दोघांचा रुबाब आणखीच वाढला.



सिद्धटेक येथे आलेल्या भक्त गणांना श्विन आणि स्कॉटविषयी उत्सुकता वाटत होती. काहीजणांना श्विन आणि स्कॉट बरोबर छायाचित्र काढून घ्यायचे होते. श्विन स्कॉटने आनंदाने छायाचित्र काढू दिले. बरेच जण श्विनची चौकशी करत होते. त्याचदरम्यान डोंबिवली सायकल क्लबमधील श्री आवटीकाकांचे एक मित्र श्री दामले भेटले. श्री दामले सध्या पुणेकर असले तरी पूर्वी ते डोंबिवलीकर होते. मंदिरात थोडावेळ थांबून तेथे भेटणाऱ्या सिद्धिविनायकाच्या भक्तांशी गप्पा मारून श्विन स्कॉट पुन्हा निघाले. सिद्धिविनायकाचे मंदिर अतिशय सुंदर दिसत होते.



श्विन आणि स्कॉटला एव्हाना चांगलीच भूक लागली होती. उपेंद्र आणि हितेश थांबलेल्या झोपडीत गेल्यावर श्विन स्कॉटने जेवणाची फर्माईश केली. गरमागरम भाकरी, झुणका, वांग्याचे भरीत बरोबर कांदा, मिरचीचा ठेचा असा फक्कड बेत पाहून भरपेट जेऊन तेथेच ताणून द्यावी असा विचार येत होता. मात्र एव्हाना दुपारचे दोन वाजून गेले होते. श्विन स्कॉटला परत केडगाव चौफुल्याला जायचे होते तर हितेश आणि उपेंद्र मात्र दुसरा रस्ता पकडणार होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा रांजणगाव येथे भेटायचे ठरवून श्विन स्कॉटने त्यांचा निरोप घेतला.




आता पुन्हा एकदा सिद्धटेक दौंड पाटस या रस्त्याने जायचे होते. प्रत्येक पावला पावलाला श्विन आणि स्कॉटची परीक्षा घेतली जात होती. श्विन आणि स्कॉट चांगलेच तावून सुलाखून निघत होते.दोघेही MTB अर्थात माऊंटन बाइक श्रेणीतील  असल्याने त्यांचा निभाव लागत होता. मात्र दौंड अवघ्या ३-४  किमी वर असताना श्विनच्या रबरी  नळीतील हवा कमी होऊ लागल्याचे जाणवू लागले. धावकावरील सॅकचे वजन आणि रस्त्यातील खड्डे यामध्ये श्विनच्या मागच्या चाकातील रबरी नळीला छिद्र पडले होते. श्विन स्कॉटने रस्त्यात ठाण मांडून ते छिद्र शोधण्याचा प्रयत्न केला. ते छिद्र अतिशय सूक्ष्म होते.  केवळ डोळ्यांना किंवा कानांना ते छिद्र जाणवत नव्हते. श्विन स्कॉटला तेथे रस्त्यावर बसून रबरी नळीचे काम करताना पाहून एक दुचाकीस्वारही तेथे थांबला. त्याने सिद्धटेककडे जातानाही श्विन स्कॉटला पाहिले होते. त्यालाही श्विन स्कॉटच्या अष्टविनायक सायकलयात्रेविषयी उत्सुकता वाटत होतीच. तो आणि त्याचा साथीदार श्विन स्कॉटला मदत करू लागले. मात्र त्यांनाही ते छिद्र सापडले नाही. अखेरीस श्विनने पायउतार होत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. स्कॉट पुढे जाऊन चौकशी करू लागली. चौकशी करता जवळच मोठ्या गाड्यांच्या टायरचे काम करणारा कारागिर जवळ असल्याचे समजले. तो सायकलचे काम करणारा नसला तरी श्विनकडे सर्व साहित्य होते. श्विन स्कॉटची अष्टविनायक यात्रा लक्षात घेता त्या कारागिराने तत्परतेने मदत केली.

एव्हाना संध्याकाळ होऊ लागली होती. दौंड शहर सोडता सोडता दोघांनी चहा बिस्किटांचा समाचार घेतला. आता त्या फुटक्या रस्त्यावरूनही जलदीने जायचा दोघे प्रयत्न करू लागले. अंधार पडायच्या आत पाटस गाठण्यासाठी दोघेही आटापिटा करू लागले. मात्र तेजोनिधीने अर्ध्या रस्त्यातच श्विन स्कॉटची साथ सोडली. श्विन स्कॉटचे दिवे अपुरे पडत होते. अंधाराचे साम्राज्य चांगलेच पसरले. तरी पाटस टोल जवळ येत असल्याचे चिन्ह दिसत नव्हते. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही अश्या मिट्ट काळोखात दोघेही बेभानपणे पुढे सरकत होते. किती वेळ जातोय हे कळत नव्हते मात्र पाटस टोल नाका मात्र अजूनही येत नव्हता. प्रत्येक क्षण हा युगासारखा वाटू लागला होता आणि प्रत्येक पुढील पेडल मारताना अधिकाधिक धडकी भरत होती. अंधाराच्या साम्राज्यात स्कॉट किती मागे आहे हेही श्विनला कळू शकत नव्हते. अरुंद रस्ता आणि अंधार यामुळे मागे राहिलेल्या स्कॉटसाठी वाटेत कुठे थांबताही येत नव्हते. स्कॉटनेही जोर लावला होताच. थोडं थोड्या वेळाने पाटस टोळ आला असे वाटत होते, मात्र ते मृगजळाप्रमाणे होते.

बराच अवधी गेल्यावर अखेरीस पाटस नाका आला. तेव्हा मात्र श्विन स्कॉटच्या जीवात जीव आला. दोघांनी लगोलग तेथे भरपेट नाष्टा करून घेतला. श्विनने केडगाव चौफुला येथील इंद्रप्रस्थ लॉजमध्ये भ्रमणध्वनी करून एकूण प्रकारची कल्पना दिली. तेथील लॉजच्या व्यवस्थापक मालकाने पाटसपासून केडगाव चौफुला पर्यंत सेवा रस्ता असून सेवा रस्त्यानेच या असे निक्षून सांगत श्विन स्कॉट ला आश्वस्तही केले. त्यावेळी ते बोलही फार आधार देणारे ठरले. सकाळी साधारण १० वाजता ज्या पाटस टोल हुन सिद्धटेककडे जाऊन त्याच पाटस टोलनाक्याला परत आले तोपर्यंतचे ६६ किमी अंतर पार करेपर्यंत संध्याकाळचे ७.३०- ८ वाजले होते. ६६ किमीचे अंतर हे साधारणपणे सिद्धिविनायकाच्या दर्शनासह ५- ६ तासात कापले जायला हवे त्यासाठी तब्बल ९.३०- १० तास लागले होते.

मात्र इंद्रप्रस्थलॉजच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे पाटस हुन केडगाव चौफुलयापर्यंत सेवा रस्ता होता. मुख्य म्हणजे तो खड्डेविराहित होता. त्यामुळे पाटस हुन इंद्रप्रस्थ लॉजपर्यंत मात्र श्विन स्कॉट विनासायास पोचले.




फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...