शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

विश्वामित्रीचा पाहुणचार: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख १०

जागतिक शास्त्रिय निधर्मी सौर दिनांक: भारतीय सौर ४ पौष १९४१
यूरोप खंड आणि ख्रिस्ती धर्मावर आधारित अशास्त्रीय सौर दिनांक: २५ डिसेंबर २०१९

मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावणारी नर्मदा भरुचजवळ खंबातच्या आखातास मिळते. अंकलेश्वर शहर नर्मदेच्या दक्षिण काठावर आहे, तर भरूच शहर नर्मदा नदीच्या उत्तर काठावर वसले आहे. ही दोन शहरे शालिवाहन शक १८०३ (ख्रिस्ती वर्ष १८८१) मध्ये बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाद्वारे जोडली गेली आहेत.

पौराणिक कथेनुसार भरुच शहर आज जिथे स्थित आहे तिथे प्रत्यक्ष लक्ष्मीचा रहिवास होता. लक्ष्मीने तात्पुरता निवास करण्यासाठी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगु ऋषी ह्यांना इथे वास्तव्याला परवानगी दिली. भृगु ऋषींच्या नावावरून ह्या शहराचे भृगूकच्छ असे नाव पडले.

भरुचचा ज्ञात इतिहास ८००० वर्षांचा आहे. भरुच शहर हे सलग रहिवास असलेले भारतातील काशी (वाराणशी) पाठोपाठ दुसरे स्थान आहे.  ख्रिस्तपूर्व काळापासूनही भरुच शहर रोमन, ग्रीक, पर्शियन, इत्यादी पश्चिमात्यांनाही ज्ञात होते.
चंद्रगुप्त विक्रमादित्य, गुप्त घराण्यातील इतर राजे ह्यांनी पाचव्या शतकापर्यंत, तर नंतर गुर्जर राजांनी ७ व्या शतकापर्यंत येथे राज्य केले. ८ वे शतक ते १३ वे शतक राजपूत राज्यांनी येथे राज्य केले. सोळंकी राजवटीतील राजा सिद्धराज जयसिंह ह्याने भरुच भोवती तट उभे करून भक्कम दरवाजा बांधला. त्याला मलबारी दरवाजा म्हणत. त्यालाच नंतर काटोपोर दरवाजा व नंतर झाडेश्वरी दरवाजा असे म्हणत. चंगेजखानाने १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात राज्य केल्यानंतर मुघलराज हुमायून ने येथे राज्य केले. मराठा साम्राज्यही येथे काही काळ होतेच.

अश्या सर्वात मोठा इतिहास असलेल्या भरुच शहरातील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या आवारात राहण्याची तसेच पोटोबाचीही उत्तम सोय झाली होती. 

रात्री जेवण झाल्यावर निशाराणीही लगेच प्रसन्न झाली. तसेही दिवसभर पाय मारून झाल्यावर इतर कोणत्याही विवंचना मनाला न शिवू देता निशाराणी मोहिनी घालतेच. त्यातच इतक्या प्रसन्न आणि मनमोहक वातावरणामुळे रात्री जेवण करून बिछान्यावर पडताच तिने गारुड केले. शांत झोप झाल्यामुळे सगळे सायकलस्वार ताजेतवाने झाले. अस्मादिकांनी बाहेर येऊन फुजीला सज्ज केले आणि पटांगणात फेऱ्या मारत इतरांची वाट पाहू लागले. फेऱ्या मारताना सहजपणे बाजूला उभ्या असणाऱ्या अश्वशक्तीधारी चारचाकींकडे लक्ष गेले. तेथे पाच सहा चारचाकी उभ्या होत्या. त्या सगळ्या चारचाकींनी धारण केलेल्या पाटीवर MH ही अक्षरे झळकत होती. पुढील आकडे मात्र वेगवेगळे होते. महाराष्ट्र राज्यातून आलेल्या वाहनांना पाहून कुतूहल जागे झाले. मात्र त्या वाहनांचे मालक आणि चालक यापैकी कोणीही तिथे नव्हते. 

हळूहळू पटांगणात इतर सगळे सायकलस्वार जमले. आपापल्या सायकलींच्या विजेऱ्या सुरू करत त्यांनी स्वामीनारायण मंदिरातील पटांगणातुन महामार्ग गाठला. आता फुजीसह इतर सर्व सायकलींच्या चाकांना त्या गुळगुळीत हमरस्त्याची सवय झाली होती. त्यामुळे अल्पावधीतच सगळी मनुष्यशक्तीधारी वाहने वेग पकडू लागली. सातही स्वार एकमेकांच्या साथीने दौडत होते. वातावरणात किंचित सुखद  गारवा होता. उजव्या बाजूला तेजोनिधी क्षितिजावर येत होता. पूर्व दिशेला गुलाबी रंग चढत होता. निसर्गाच्या कॅनव्हासवरील ते चित्र विलोभनीय होते.



मोकळा खड्डेविरहीत रस्ता, शांत वातावरण, गुलाबी क्षितिज ह्यांचा आनंद घेत तासाभराच्या अवधीतच १९ किमी अंतर पार झाले होते. आता अर्थातच पृथ्वीवरील अमृताची निकड भासू लागली होती. चहा मिळाल्यावर ह्या संपूर्ण आनंदाची परमावधी लाभणे शक्य होते. 
चहापान झाल्यावर पुन्हा तासाभराची दौड झाली. क्षुधाशांतीचीही गरज होतीच. त्यामुळे पुन्हा एक थांबा घेत उदरभरण केले....आणि अचानक लक्षात आले की माझ्या मावशीचा भ्रमणध्वनी सापडत नाहीये. एक शक्यता अशी होती की त्या भ्रमणध्वनीला स्वामीनारायण मंदिराचे विश्रामगृह आवडले असावे. ज्या सद्गृहस्थांनी आमची तेथे राहायची सोय केली होती, त्यांना देवधरांनी ताबडतोब भ्रमणध्वनी करून खात्री करायला सांगितले. त्यांना विश्रामगृहात जाऊन खात्री करेपर्यंत वेळ जाणार होता. शिवाय एव्हाना चर्चेमध्येही बराच वेळ गेला होता. त्यामुळे स्वामीनारायण मंदीर येथून परत निरोप येईपर्यंत न थांबता सर्व सायकलस्वारांनी पुढे जायचे आणि गौतमने निरोप येईपर्यंत आहे तेथेच थांबायचे असे ठरले. जर स्वामीनारायण मंदिरातील विश्रामगृहात भ्रमणध्वनी सापडला तर गौतम त्याच्या टेम्पोसह परत मागे जाऊन पुन्हा आम्हाला बडोदा येथे गाठू शकत होता.

सगळे सायकलस्वार बडोद्याच्या दिशेने वेगात निघाले. बडोदा शहर ज्या विश्वामित्री नदीच्या काठावर वसले आहे ती विश्वामित्री नदीसुद्धा नर्मदेप्रमाणेच खंभातच्या आखतासच मिळते. बडोद्याच्या वेशीपाशी पोहोचताच ३-४ वर्षांपूर्वी अस्मादिक आणि नयना आघारकर यांनी विजयादशमीच्या दिवशी बडोदा येथे केलेल्या सायकलस्वारीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळेस माझी शालेय मैत्रीण वैशाली आणि तिचे पती संदीप भोसले ह्यांच्या घरी आमचा पाहुणचार झाला होता. अर्थात त्या वेळेस बडोदा येथेच आमची सायकलसफर संपूर्ण झाली होती, तर ह्यावेळी थेट जम्मूपर्यंत जायचे होते. अगदी आजच्या दिवशीही मुक्काम बडोद्याच्या बराच पुढे होता. त्यामुळे वैशाली आणि संदीप ह्यांना वाटेतच भेटायचे ठरले होते. संदीपच्या दिलखुलास स्वभावाचा अनुभव मागील वेळेस आला होताच.  

आम्हाला अहमदाबाद येथे सामील होणाऱ्या सायकलपटूंपैकी आसाभाई पटेल यांचे स्नेही श्री गद्रे हेही आम्हाला बडोदा येथे भेटून आम्हाला बडोद्याहून पुढील जाणारा खुष्कीचा मार्ग दाखवणार होते. तसेच आमच्या अहमदाबाद चमूतील श्री रसिकभाई पटेल ह्यांची भाचीही आमच्या आगमनाची प्रतीक्षा करत होती. वैशाली, संदीप आणि गद्रे ह्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे सल्ला मसलत करत आम्ही बडोद्यामध्ये शिरलो. शहरातील मकरपूरा पोलीस स्टेशनच्या चौकात सर्वजण आमची वाट पाहत होते. आम्ही तेथे पोहोचताच एकच जल्लोष सुरू झाला. त्या चौकातच एकमेकांची खुशाली विचारत सर्वजण रमले होते.




खरंतर एव्हाना जठराग्नी भडकू लागला होता, मात्र एकमेकांना भेटल्याच्या आनंदात, गप्पांमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष होत होते. बडोदेकरही आमचा पाहुणचार नक्की कुठे करायचा ह्याचा खल करत होते. आम्ही यावेळी वैशालीच्या घरी जाऊ शकलो नाही याचे तिला आणि संदीपला जेवढे वाईट वाटत होते तेवढेच मलाही वाईट वाटत होते. मात्र घड्याळबाबा आमच्या मानगुटीवर बसले होते. घरी पाहुणचार नाही करता आला तरी तो व्यवस्थित झाला पाहिजे ह्यावर बडोदेकर ठाम होते. 
आमच्यासाठी काय करू आणि काय नको असे संदीपला झाले होते. पाहुणचारात काहीही कमी पडू नये यासाठी तो कायम सजग होता. आमच्या तोंडून उच्चार व्हायचा अवकाश तो मदत करायला तत्पर होता. गौतम मागे राहिला आहे हे ऐकताच संदीप गौतमला आणायला थेट बडोद्याच्या वेशीपर्यंत जायला तयार होता.

मात्र इतक्यात आमच्या क्षुधाशांतीची व्यवस्था करण्याबद्दल चर्चा सुरू झाली. सर्व बडोदेकरांचे एकमत होऊन आम्हा सर्व सायकलस्वारांची वरात बडोदेकरांबरोबर जवळच्याच एका सुप्रसिद्ध खाद्यपदार्थगृहाकडे निघाली. थोड्याच वेळात 'भाईलाल शिवलाल' ह्या क्षुधाशांतिगृहात शिरलो. दुकानाबाहेर सगळ्या सायकली हारीने उभ्या करून सर्व स्वार दुकानात शिरले. दुकानदाराने सगळ्या सायकलस्वारांचे स्वागत केले. दुकानात तर विविध पदार्थांची उपलब्धता होती. आम्हाला कोणत्या पदार्थांची मेजवानी द्यायची यावर बडोदेकरांनी थोडासा खल केला. 

सगळेच पदार्थ अतिशय ताजे दिसत होते. अखेरीस आम्हाला बाहेरील गोल मेजाभोवती कोंडाळे करून उभे राहायला सांगून मधील मेजावर खाद्यपदार्थ येऊ लागले.


समोर येणारी मेजवानी पाहताच सर्व सायकलस्वार त्यावर तुटून पडले. हातातोंडाची लढाई सुरू झाली. मेजावर मधोमध आलेल्या त्या खाद्यपदार्थांभोवती सर्व सायकलस्वारांनी घेराव घातला होता. क्षणाक्षणाला समोरील थाळी रिकामी होत होती. मात्र लगेचच त्याची जागा दुसरी थाळी घेत होती. खरतर अजून आजचा टप्पा पूर्ण झाला नव्हता, जेमतेम ७० किमी अंतरच पार झाले होते. अजून जवळपास निम्मे अंतर बाकी असल्याने थोडा संयम ठेवणे भाग होते. मात्र समोर येणारे पदार्थ त्या अंतराची काळजी दूर ठेवत होते. जठराग्नी शांत झाला तरी रसनेची तृप्ती होत नव्हती. मात्र विश्वामित्री काठावरील बडोदेकर रहिवाश्यांच्या पाहुणचारामुळे सगळ्या सायकलस्वारांचे मन तृप्त झाले होते.







सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

स्वामीनारायणाच्या छायेत: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख ९

जागतिक निधर्मी कॅलेंडर नुसार दिनांक अर्थात भारतीय राष्ट्रीय दिनांक: ३ पौष १९४१

युरोप खंड आणि ख्रिस्ती धर्म ह्यावर आधारीत अशास्त्रीय कॅलेंडरनुसार दिनांक: २४ डिसेंबर २०१९


निद्रादेवीच्या मोहपाशातून सगळ्या सायकलस्वारांनी भल्या पहाटेच सुटका करून घेतली. करसनभाई तर भल्या पहाटे ६ वाजताच हॉटेलमध्ये हजर झाले होते. उजाडायला बराच वेळ असल्याने सर्व सायकलींच्या हाताळ्यावर विजेऱ्या लावल्या गेल्या. हमरस्त्यालगतच हॉटेल असल्याने शहरांतर्गत अरुंद रस्त्या ऐवजी आम्ही थेट हमरस्त्यालाच लागणार होतो.

सगळेजण सुरुवात करेपर्यंत ६.४५ चा सुमार झाला होता. आजचे अंतर फारच कमी होते. रस्ता सुंदर असल्यामुळे सूर्यप्रकाश नसला तरी विजेऱ्यांच्या प्रकाशात सगळे स्वार झोकात आणि लयीत जाऊ लागले. एकामागोमाग जात असल्यामुळे अंधाराचा त्रास जाणवत नव्हता. सगळ्यांच्या मागे आमच्या संरक्षक वाहनाबरोबर .. टेम्पोबरोबर गौतम होताच.

तासाभरातच २१ किमी चा पल्ला पार झाला होता. कालच्या दिवसात सायकलींची तब्बेत बिघडली नसली तरी, सायकलस्वारांची तब्बेत मात्र एकापाठोपाठ बिघडू लागली होती. एव्हाना ४ जणांना पचनशक्ती धोका देत असल्याची लक्षण दिसत होती.

मात्र उदरभरण करणेही आवश्यक होतेच. इडलीसांभारवर ताव मारून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. एव्हाना निरुपमा भावे, अय्यरकाका यांनी संरक्षक वाहनाचा लाभ घेतला होता. जम्मू अजून दूर असल्यामुळे आरोग्य सांभाळणे आवश्यक होतेच. मी आणि देवधर मात्र पोटाच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करत सायकलींवर स्वार झालो होतो. मी पहाटे हॉटेलमधून  निघतानाच दोन गोळ्या घेतल्या होत्या. 'आजीबाईंच्या बटव्याची' महती अश्यावेळी नक्कीच पटते.

इडलीचा खुराक खाऊन मनुष्यशक्तीच्या इंधनाचा साठा वाढला होता. त्या इंधनाच्या जोरावर सायकलींचा वेग वाढत होता. शक्यतो श्विन/फुजी वाटेत येणारा उड्डाणपूल सोडत नाहीत. सायकलींच्या गियरचा खरा फायदा चढणीच्या वेळेसच होत असतो. बऱ्याच जणांना गियर आणि अक्सीलरेटर यामधील फरक कळत नाही. अक्सीलरेटरचा उपयोग वेग वाढवण्यासाठी होत असतो. अश्वशक्तीवर चालणाऱ्या प्रदूषणकारी दुचाकी, तीचाकी, चारचाकी आणि बहुचाकी वाहनांना अक्सीलरेटर असला तरी सायकलींना मात्र अक्सीलरेटर नसतो.

मात्र चढ चढताना यंत्रावर अतिरिक्त ताण येऊन गाडी बंद पडू नये यासाठी गियर कमी करावे लागतात, त्याचप्रमाणे सायकलच्या साखळीवर व सायकलचालकाच्या पायावर अधिक ताण येऊ नये याकरता सायकलचे गियरही कमी करावे लागतात. सायकलचे गियर कमी केले की साखळी दट्ट्या बदलत छोट्या अंतरावरील दट्ट्यांवर सरकते. त्यामुळे पाय मारताना कमी जोर लावावा लागतो आणि साखळीवर ताण न येता सायकल पुढे सरकत राहते. जोर कमी लावावा लागल्यामुळे सायकलच्या साखळीप्रमाणेच सायकलस्वाराच्या पायावरही कमी ताण येेतो. त्यामुळे चढ चढतानाही सायकल व सायकलस्वार दोघेही ताजेतवाने राहतात.

उड्डाणपूल चढताना याच युक्तीचा वापर करत चढ पार करायचा आणि उतार सुरू झाल्यावर पुन्हा गियर वाढवत वेग घ्यायचा ही नीती श्विन/ फुजीला आवडत असे. मात्र इतर सायकलस्वार चढ चढण्याच्या मानसिक दडपणामुळे उड्डाणपूला ऐवजी बाजूचा रस्ता निवडत असत.

असाच एक उड्डाणपूल आला असता पुढील सर्व सायकलस्वार बाजूच्या रस्त्याने जाऊ लागले. फुजीही उड्डाणपुलाऐवजी त्यांच्या मागे बाजूच्या रस्त्याने जाऊ लागली. साधारण अर्धापाऊण किमी अंतर गेल्यावर मात्र त्या रस्त्याला अडसर असल्याचे लक्षात आले. अखेरीस सर्व स्वार पायउतार झाले आणि शेजारील पायवाटेवरून पुढे निघाले. ती पायवाट उड्डाणपुलाला समांतर जात होती. ती पार केली तेव्हा उड्डाणपुल पार करून आमची वाट पहात थांबलेला गौतम आमच्या संरक्षक वाहनासमवेत थांबलेला दिसला.

थोड्या वेळातच अंकलेश्वरकडे जाणारा रस्ता दृष्टीस पडला. मुख्य हमरस्ता उजवीकडे वळत होता, तर अंकलेश्वरकडे जाणारा अरुंद रस्ता डावीकडे जात होता. तो पाहताच नयना आघारकर यांच्याबरोबर तीन चार वर्षांपूर्वी डोंबिवली बरोडा सायकल यात्रेदरम्यान अंकलेश्वर मधून जातानाचा रस्ता आठवला. त्या आठवणीप्रमाणे फुजीने आघाडी घेत अंकलेश्वर शहराचा मार्ग निवडला. शहरातील रस्त्यामध्ये बरीच रहदारी होती. वाटेत दुरुस्तीची कामेही सुरू होती. ते अडथळे पार करत आमचा चमू पुढे निघाला. साधारण एक किमी अंतरानंतर मात्र आम्ही शहराबाहेर पडलो. पुढे मात्र अगदीच तुरळक रहदारी होती.


थोड्या वेळातच नर्मदा नदीवरील पूल समोर दिसू लागला. हा पूल अतिशय अरुंद होता. त्यामुळे रहदारी तुरळक असली तरी एक दिशेने एकावेळी एकच वाहन जाऊ शकत असल्याने पाठोपाठच्या वाहनांमध्ये अंतर राहू शकत नव्हते. पूल दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद केला होता. नर्मदा नदीच्या पात्राची रुंदी चांगलीच जाणवत होती. ही नदी पार करत असताना एक अनामिक सुख जाणवत होते. पुलापालिकडॆ गेल्यावर सगळे सायकलस्वार पुन्हा पुलाकडे वळून थांबले. येथे छायाचित्र काढण्याचा मोह कोणालाच आवरला नाही.






तेथून पुढे भरुच रेल्वेस्थानकाजवळून उजवीकडे वळून सर्व सायकलस्वार मार्ग काढू लागले.


आमची भरुच येथील व्यवस्था पाहणारा इसम आणि आमच्या चमुमध्ये समजुतीचा घोटाळा झाल्यामुळे थोडा उलटसुलट फेरा मात्र पडला. मात्र अखेरीस त्यांनी आम्हास गाठले आणि आजच्या मुक्कामाचे ठिकाण  स्वामीनारायण मंदिर  (BAPS SWAMINARAYAN MANDIR) गाठले. एव्हाना दुपारचे जेमतेम २ वाजले होते.

स्वामीनारायण मंदिराचा परिसर बराच मोठा आणि चित्तवेधक होता. अतिशय सुंदर मंदिर आणि त्याच्या एका बाजूला तीन मजली राहण्याची व्यवस्था होती. त्याशेजारीच उदरभरणाची उत्तम सोय होती. परिसरातील झुडुपांनाही वेगवेगळे सुंदर आकार दिले होते. त्याच आवारातच पुस्तके आणि भेटवस्तूंचे प्रदर्शन व विक्री दालन होते.














परिसर पाहत असताना दिवसभर केलेला सायकलप्रवासही विसरायला झाला. त्या सुंदर परिसराने अक्षरशः मोहिनीच घातली होती. विश्रांती, भूक ह्यांचाही विसर पडला होता.

विश्रांती झाल्यावर सगळे सायकलस्वार नर्मदा नदीकाठी असलेल्या निळकंठेश्वर मंदिराकडे जाण्यास सिद्ध होत होते. देवधर आणि मी एकाच खोलीमध्ये होतो. त्यामुळे आम्ही दोघांनी एकावेळी बाहेर पडणे स्वाभाविक होते. मात्र मला काहीही न कळवता ते बाहेर पडले. मी थोडावेळ खोली मध्ये त्यांची वाट पाहून बाहेर आलो. समोर अय्यरकाका दिसले. त्यांनाही काहीच माहीत नव्हते. मी आणि अय्यरकाका त्यांना शोधू लागलो. पण देवधर, गौतम आणि महिला मंडळाचा काहीच पत्ता लागेना. अखेर फोन लावल्यावर कळले की ते सर्वजण पुढे निघून गेले आहेत. त्यांना पुढे जायचे असले तरी मागे राहिलेल्यांना तसे किमान कळवणे ही तसदीही त्यांनी घेतली नव्हती. मी आणि अय्यरकाका मात्र इतर सर्वांना शोधत मंदिराच्या परिसरातच अडकलो होतो. अश्या बेजबाबदारपणा आणि बेफिकीरीचा अनुभव ह्याआधी केलेल्या कोणत्याही सायकलसफरीत आला नव्हता. अय्यरकाकांना भराभर चालता येणे शक्य नव्हते. अखेरीस आम्ही निळकंठेश्वर मंदिराच्या मार्गाची चौकशी करत हळूहळू निळकंठेश्वर मंदिरापाशी पोहोचलो. तोपर्यंत इतर सगळ्यांचे नौकानयनही झाले होते

 नर्मदानदीकाठी देखावा अतिशय मनोहर दिसत होता. उजव्या बाजूला पुलावरून जाणाऱ्या रस्त्याची रहदारी, पथदिवे चित्तवेधक दिसत होते.





अय्यरकाका त्या गटात सामील झाले. मात्र पुढे गेलेल्या गटाला त्यांच्या बेजबाबदारपणाची जाणीव व्हावी ह्यासाठी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत, मौन राखत, अस्मादिकांनी एकट्यानेच स्वामीनारायण मंदिराकडे परत जाणे पसंत केले.

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

दादाभाईंच्या साम्राज्यात: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख ८

भारतीय सौर २ पौष १९४१ (जागतिक निधर्मी कॅलेंडर).


युरोपियन ख्रिस्ती दिनांक २३ डिसेंबर २०१९


पहाटे सगळ्यांनाच लवकर जाग आली. सायकलींची तयारी सुरू असतानाच प्रकल्पातील प्रतिनिधी आमच्यासाठी चहा घेऊन आले. दूध उपलब्ध नसल्याने खास काळा चहा आमच्या सेवेत हजर होता. खरंतर काहीजणांना काळा चहा नको होता, अस्मादिकांना मात्र कोणत्याही प्रकारचा चहा असो, तो हवाच होता. आलं घालून केलेला तो काळा चहा खरोखरच उत्कृष्ट होता. हळूहळू जवळपास सगळ्यांनीच तो चहा घेतला.

चहापान झाल्यावर सगळेजण एकामागोमाग जाऊ लागले. मुंबई अहमदाबाद रस्ता अक्षरशः गुळगुळीत असल्याने आज पहाटेपासूनच MTB श्रेणीतील श्विनऐवजी अस्मादिकांनी हायब्रीड श्रेणीतील फुजीलाच पसंती दिली होती. फुजीने भुसारा सरांचे आभार मानत कूच केले. फूजीच्या पाठोपाठ गौतम त्याच्या टेम्पोसह जाऊ लागला. अद्यापि तेजोनिधी प्रकट व्ह्यायला अवकाश होता. त्यामुळे सगळ्याच सायकलींनी विजेऱ्या लावल्या होत्या. फुजीने लगेचच पुढे गेलेल्या सायकलपटूंना गाठले. तलासरी येथील वनवासी विकास प्रकल्पापासून अवघ्या १२ किमी अंतरावरच गुजरात राज्याची सीमा सुरू होते. सायकलयात्रींनी गुजराथेत प्रवेश केला तोपर्यन्त रविराजही क्षितिजावर अवतरले होते. साधारण तासाभराच्या प्रवासानंतर पुन्हा एकदा चहापानाची तहान लागली होती.

हमरस्त्याच्या शेजारीच असलेल्या एका चहा टपरीसमोर  सगळ्या सायकली रांगेत उभ्या राहिल्या. चहा/दूध बिस्किटांवर सगळे तुटून पडले.






एव्हाना बऱ्यापैकी उजाडले होते. रस्ताही सुंदर होता. पुन्हा एकदा मार्गाला लागत सगळ्यांनी वेग घेतला. त्या लोण्यासारख्या मऊ रस्त्यावर फुजी दिमाखात पूढे जात होती. अर्थातच फुजी संपूर्ण चमुच्या मागेच होती. जेव्हा तुम्ही एखाद्या चमूचे नेतृत्व करता तेव्हा तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी घ्यावीच लागते. केवळ अधिकार स्वतःच्या हातात ठेवून जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवणे योग्य ठरत नाही.


थोड्या वेळाने नाश्त्यासाठी थांबा घेतला. नाश्त्यासाठी शेंगदाणे घातलेली रोटी खाताना उदरभरण होत होतेच पण रसनेचीही तृप्ती होत होती. ह्या रोटीमुळे मिळालेली ऊर्जा आता मनुष्यशक्तिमध्ये रूपांतरीत झाली होती. त्या इंधनाच्या जोरावर सगळ्या सायकली वेगाने अधिक वेगाने मार्ग कापू लागल्या.






पाहता पाहता सकाळ पासून जवळपास ९० किमी अंतर पार झाले होते. सुर्यदेवही आता डोक्यावर पोहोचला होता. आपोआपच सगळेजण हमरस्त्याच्या डावीकडे असलेल्या हॉटेल डिसेंटकडे वळले. हॉटेलमधील खाणे नावाप्रमाणेच डिसेंट होते. गुजराथ प्रांतात आल्यामुळे फुजीने गुजराथी थाळीचा आस्वाद घेतला.


 इतर जण जठराग्नी शांत करत असेपर्यंत फुजीची नजर हॉटेलच्याच आवारात भिंतीपालिकडे पसरलेल्या खाटांवर गेले. उदरभरण झाल्यावर लगेच सायकल चालवण्यासाठी पोटातील स्नायूंना ताणण्यापेक्षा आता जठराग्नीला मिळालेल्या आहुतीला पचवण्याचे काम त्या स्नायूंना करायचे होते. त्यासाठी वामकुक्षी करण्याची निकड फुजीला वाटू लागली. बाकीच्यांचे उदरभरण होईपर्यंत फुजीने संधीचा लाभ घ्यायचे ठरवले. मात्र थोड्याच वेळात एकापाठोपाठ सगळ्यांनीच तो मार्ग पत्करला.




आता केवळ १५-२० किमी अंतर बाकी असल्याने सगळेच सैलावले होते. थोडीशी वामकुक्षी झाल्यावर मात्र फुजी आणि तिच्या सख्या पुन्हा दौड करू लागल्या. नवसारी जवळ आल्याचे चिन्ह दिसू लागताच सातही स्वार आणखी वेगात जाऊ लागले. एके ठिकाणी हमरस्त्याशेजारी सेवा रस्ता सुरू होत होता. फुजी आणि इतर स्वार मुख्य हमरस्त्याकडे वळणार इतक्यात सेवा रस्त्यावरून हाका ऐकू आल्या....

एक उमदा माणूस आम्हा सर्वांना बोलावत होता. ते करसन भाई होते. आम्हा सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि आम्हाला दिशा दाखवण्यासाठी करसनभाई नवसारीहून ३-४ किमी पुढे आले होते. त्यांनी सर्व स्वारांना हार घातले आणि पेढे व चॉकलेट देऊन आम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजच्या मुक्कामी हॉटेल सुप्रीम येथे पोचलो.


महात्मा गांधींनी काढलेल्या सत्याग्रहयात्रेमुळे प्रसिद्ध पावलेल्या दांडी ह्या सगरतटानजीकच्या ठिकाणापासून नवसारी शहर जवळ आहे. पूर्णा नदिनजीक वसलेल्या नवसारी नगरीचे मूळ नवसारिका असे होते. ही नगरी विष्य ह्या प्रदेशाची राजधानी होती. ह्या नगरीला नुसारिपा असेही संबोधले जाते असे. दुसऱ्या शतकातील ग्रीक गणिती, खगोलशास्त्रज्ञ, भविष्यवेत्ता क्लाडिअस प्लॉटेमी ह्याच्या ग्रंथात नुसारिपा शहराचा उल्लेख आहे. चालुक्यांनी येथे प्रथम वसाहत केली. त्यानंतर राष्ट्रकूट आणि नंतर पारशी समाजाने येथे वसाहत केली.
इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी हेही नवसारी येथीलच.

सुप्रीम हॉटेलमधील व्यवस्था उत्तम होती. मुख्य म्हणजे हॉटेल हमरस्त्याशेजारीच होते. दुसऱ्या दिवशी पहाटे आमच्याबरोबर थोडी दौड करण्याची इच्छा व्यक्त करत करसनभाईनी आमचा निरोप घेतला.

गुजराथेत जेवण छान असणारच याची फुजीला खात्री होतीच. ह्याचा अनुभवही रात्री जेवताना आलाच.







बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

वनवासी विकास प्रकल्प, तलासरी: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख ७

'वनवासी विकास प्रकल्प' येथे पोहोचताच श्री भुसारा सरांनी आमचे स्वागत केले. डोंबिवली येथील क्रीडाभारती आणि नॅशनल युथ ऑर्गनायझेशनचे श्री कमलाकर क्षीरसागर, श्री नवरे ह्यांच्यामार्फत गेल्या वर्षी श्री सुनील ननावरे, श्री सुनील पाटील ह्यांच्याबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी (K2K) सायकलयात्रा करणाऱ्या चमुची येथे एक दिवस राहण्याची सोय झाली होती. तेव्हा K2K च्या सदस्यांना तेथून डोंबिवली येथे आणण्यासाठी मागील वर्षी श्विनने या प्रकल्पाला भेट दिली होती. त्याचवेळी श्विनचा या प्रकल्पाबरोबर भुसारा सरांशीही स्नेह जडला होता. आम्हा पुणे जम्मू सायकलसफरीतील सदस्यांचीही येथील सोय पुन्हा एकदा श्री नवरे व श्री क्षीरसागर ह्यांच्यामार्फत झाली होती.

श्री भुसारासरांनी स्वतः सुद्धा याच प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण घेत पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. गेली २३ वर्ष अविरतपणे दिवस रात्र भुसारा सरांनी या प्रकल्पासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.

सगळे सायकलस्वार थोडे शिथिलगात्र झाल्यावर चहासाठी प्रकल्प कार्यालयाच्या सज्जात जमले. सर तेथील प्रकल्पाची माहिती सांगत होते. येथील वसतिगृहात साधारण १५०-२०० मुले/ मुली राहत असून शाळेत एकंदर ८०० मुले शिक्षण घेत आहेत. दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय येथे केली जाते. शाळेमध्ये मुलांकरीता २५ संगणक असून सुसज्ज प्रयोगशाळाही आहे. पहाटे ५ ते रात्री १० असा येथील मुलांचा दिनक्रम असतो. आज मात्र येथील मुलांची सहल गेली असल्यामुळे त्यांना भेटण्याची आमची संधी हुकली होती.

येथे अनेक सामाजिक उपक्रम केले जातात. एक गोशाळाही येथे असून त्यामध्ये १३० गाई वासरे आहेत. भारत विकास परिषदेमार्फत ह्या गोधनाचा खर्च उचलला जातो. अंगणवाडीचा अभ्यासक्रम येथे घेतला जातो. 'प्रथम' संस्थेमार्फत अभ्यासक्रम घेतला जातो. 'वृद्धांचा सांभाळ कसा करावा' याविषयी ३ महिन्यांचा अभ्यासक्रम येथे सुरू झाला असून तो पूर्ण झाल्याबरोबर मुंबई येथे त्यांना रोजगारही त्वरित सुरू होतो. रक्षाबंधनानिमित्त येथील मुली साधारण ५०००० राख्या बनवतात तसेच संक्रांती निमित्त २०००० ते २५००० तिळगुळ बनवून त्यांचे आसपासच्या शाळांमध्ये, गावांमध्ये वाटप केले जाते. तसेच गणेशोत्सवानिमित्त साधारण १५० गणेशमूर्ती बनवून त्यांचे गावागावात वितरण केले जाते. जवळपासच्या साधारण २० दहीहंड्या फोडायला प्रकल्पातील मुले जातात तेव्हा १०००० च्या आसपास लोक त्यांना प्रोत्साहन देण्यास जमत असतात. दरवर्षी साधारण ५० जोडप्यांचे सामूदायिक विवाहही प्रकल्पाद्वारे लावले जातात.

या प्रकल्पाचा आज दिसत असलेला वटवृक्ष लावणारे श्री माधवराव काणे हे मूळ कल्याणचे रहिवासी. १९६७ साली त्यांनी कल्याण येथील नगराध्यक्षपद सोडून तलासरी येथे केवळ ७ मुलांसह प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या नावाने प्रकल्पाद्वारे 'वनसखा' हे त्रैमासिकही काढले जाते.


(डावीकडून) आमचा टेम्पोचालक गौतम, श्री वसंत भुसारा सर यांच्याबरोबर पुणे जमू सायकलयात्रेतील सदस्य




                  वनवासी विकास प्रकल्पाचे प्रांगण

आमचे चहापान आणि सरांबरोबरील संभाषण होत असताना आमचा टेम्पोचालक गौतम मात्र मोकळा झाला नव्हता. मुळात केवळ टेम्पोचालक म्हणून तो आला नव्हता तर सायकल दुरुस्ती करण्यासाठीही गौतमला बरोबर घेतले होते. आजच्या दिवसात त्याला टेम्पो चालवण्याबरोबर सायकल दुरुस्तीच्या कामाचेही पूर्ण समाधान मिळत होते.

आम्ही फुजी, स्कॉटसह एकूण ४ राखीव सायकली बरोबर घेतल्या होत्या. डोंबिवली ते तलासरी या प्रवासादरम्यान श्विनबरोबर इतर तीन सख्या जायबंदी होऊन त्यांच्या बदली चारही राखीव सायकलींना टेम्पोतुन उतरण्याची संधी मिळाली होती. आम्ही सरांबरोबर बोलत बसलो असता गौतम चारही जायबंदी सायकलींची मलमपट्टी करत होता.

स्नान करून ताजेतवाने झाल्यावर अतिशय स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत सगळ्यांनी तृप्त मनाने निद्रादेवीची आराधना सुरू केली. येथील शांत आणि प्रसन्न वातावरणात निद्रादेवीही सगळ्यांना त्वरित प्रसन्न झाली.

  

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

वाघ्यादेवाच्या राज्यात: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख ६

वसईजवळच्या डोंगररांगात वसलेल्या साधारण ८५.७ चौरस किमी क्षेत्राला भारतीय राष्ट्रीय दिनांक २ कार्तिक १९२५ अर्थात ख्रिस्ती दिनांक २४ ऑक्टोबर या दिवशी अभयारण्याचा दर्जा मिळाला. हे तुंगारेश्वर अभयारण्य भटक्यांचे आवडते ठिकाण न झाल्यासच नवल. शिवाय येथील तुंगारेश्वराचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थानदेखील आहे.
या अभयारण्यातील जैवविविधता आपल्याला मोहिनी घालते. साग, शिसव, खैर, ऐन, आवळा, हिरडा, बेहडा अश्या विविध वनस्पती येथे आहेत. तसेच बिबटे, रानडुक्कर, ससे, भेकर, लंगूर यांच्यासह पक्ष्यांच्या १५० प्रजाती इथे पाहावयास मिळतात. तसेच अनेक प्रजातींच्या फुलपाखरांनी हे जंगल समृद्ध आहे. या क्षेत्रातील जवळपास २८ गावे ही अतिसंवेदलशील क्षेत्रात मोडतात.

भरत परत गेल्यानंतर पुणे जम्मू सायकलसफर करणारा गट आता या अभयारण्याच्या दिशेने निघाला होता. त्यांच्याबरोबर गंधार कुलकर्णी आणि कौशिक कुलकर्णी होतेच. आधीच्याच रविवारी संजय दात्ये आणि अभय कुलकर्णी पारोळ पर्यंतच्या रस्त्याची टेहळणी करून आले होते. त्यांनी ह्या रस्त्याला प्रमाणपत्र दिले होतेच.

रस्ता अरुंद असला तरी वर्दळ फार नव्हती. येथून पारोळपर्यंत रस्ता सरळ असल्याने श्विनने पुन्हा एकदा पिछाडी सांभाळायचे ठरवले. इतर सर्व सायकलपटू पुढे निघाले. श्विनने आता गोप्रो कॅमेराचा लाभ घेण्याचे ठरवले.






सगळे सायकलस्वार एकामागोमाग पुढे जात असताना श्विन अभयारण्यातील ठेवा अनुभवत पुढे जात होती. वर्दळ नसल्याने संपूर्ण रस्ता पुणे जम्मू सायकलस्वारांनाच आंदण दिल्यासारखाच वाटत होता. पारोळपर्यंतचा प्रवास अगदी सुखेनैव झाला. मात्र पारोळपाशी गंधार आणि कौशिकही परत फिरणार होते. दरम्यान गंधारने पुणे जम्मू चमुमधील प्रत्येकाबरोबर स्वयंछायाचित्र काढून घेतले होते. जुनांदूरकीहुन पारोळला पोचल्यावर डावीकडे वळल्यास शिरसाड नाक्यावर मुंबई अहमदाबाद महामार्ग लागतो, तर उजवीकडे वळल्यास वज्रेश्वरी मार्गे भिवंडी वाडा रस्त्याला जाऊ शकतो. श्विनने गंधारला आल्या वाटेने परत फिरण्यापेक्षा वज्रेश्वरी मार्गे भिवंडीकडे जाण्यास सुचवले. तर आम्ही सर्वजण शिरसाड फाट्याच्या दिशेने वळलो. श्विनने सगळ्यांना आपल्या मागील सायकलपटूची काळजी घेत पुढे जाण्याची आठवण केली. शिरसाड फाट्यापासून रामकृष्ण मिशनचा आश्रम जवळ असल्याचे श्विनला माहीत होते. त्यामुळे तेथेच नाष्टा करण्याचे श्विनने योजले होते.

शिरसाड फाट्याला पोचल्यावर सगळे सायकलस्वार थांबले. आजूबाजूची मंडळी कुतूहलाने पाहू लागली. उड्डाणपुलाखाली उभे राहून एका गृहस्थाकडे रामकृष्ण मिशनची चौकशी करत असता त्याने चहा नाश्त्यासाठी आग्रह केला. समोरील क्षुधाशांतिगृहात नाष्टा करत असता त्यांची ओळख झाली. मुंबई येथील एका शाळेत निवृत्त होऊन शिरसाड जवळ स्थायिक झालेले ते शिक्षक म्हणजे कुडू सर होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. कुडू सरांबरोबर गप्पा मारताना वेळ कसा गेला हे समजलेही नाही. सर स्वतः थोड्या गडबडीत होते. एका स्पर्धेसाठी त्यांना जायचे होते. मात्र तरीही वेळ काढून त्यांनी आम्हा सर्वांबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांचा निरोप घेऊन आम्ही अहमदाबाद महामार्गाला लागलो.

मुंबई अहमदाबाद महामार्ग म्हणजे वाहनचालकांसाठी पर्वणीच. अतिशय प्रशस्त आणि गुळगळीत महामार्ग असल्याने सगळेच सायकलस्वार वेगाने पुढे जात होते.





निरुपमा भावे, मीरा, श्विन आणि त्यांच्यामागे टेम्पो चालवत गौतम अशी शेवटची फळी होती. आम्ही तिघे सायकलस्वार अधूनमधून एकमेकांच्या पुढे मागे जात असताना मनोर नाका आला. पुढे गेलेले चार सायकलस्वार जेवणासाठी इथे थांबणे अपेक्षित होते. त्यांचा अंदाज घेण्यासाठी मीरा आणि श्विनने वेग वाढवला. दोघांनीही उड्डाणपूल घेतला नाही. मात्र उड्डाणपुलाखाली श्विनच्या रबरी नळीने 'राम' म्हटला.

बाकी सायकलपटू थोडे पुढे होतेच. त्यांना 'हॉटेल सिमला इन' मध्ये थांबायला सांगून श्विनने पायउतार होत मार्गक्रमण सुरू केले. येथून पुढे साधारण १५-२० किमी क्षुधाशांतीच काय पण पाणीही प्यायला मिळणार नाही हे श्विनला माहीत होते. त्यामुळे 'सिमला इन' मध्ये सगळ्यांनी उदरभरण केले. मात्र श्विन आता जखमी असल्याने टेम्पोत उभी राहणार होती. त्यामुळे श्विन ऐवजी फुजीला संधी मिळाली.  श्विन ही MTB म्हणजे mountain bike या श्रेणीतील असल्याने कच्च्या रस्त्यानेही जाऊ शकत असे. तर फुजी रोड बाइक होती. त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्णी लागल्याने फुजी चांगलीच खुलली. गुळगुळीत महामार्गावर फुजी झोकात पुढे जात होती. तिच्याबरोबर आणखी सहा सख्या होत्याच. महामार्ग चांगलाच रुंद होता, तर दोन्ही बाजूला घनदाट झाडे होती.

येथील प्रदेश म्हणजे वाघ्यादेवाचा प्रदेश! वारली समाज मुख्यतः डहाणू, तलासरी येथील जंगल आणि डोंगराळ प्रदेशात आढळतो. येथील गावांमध्ये मोठमोठ्या झाडांच्या सानिध्यात गावदेवाचे मंदिर असते. दरवर्षी कापणी नंतर गावदेवाची पूजा केली जाते. त्यामध्ये वाघ्यादेव म्हणजे 'वाघ देवता', कणसरी म्हणजे कणसांची देवता आणि इतर देव देवतांची पूजा केली जाते.

वाघ्यादेवाच्या प्रदेशात वाहतूक मात्र तुरळक होती. मनुष्यवस्तीही नव्हतीच. मध्येच थोडाफार चढ लागत होता. पुढे लांबलचक उतार आहे, असे सांगत फुजी सगळ्यांचा उत्साह वाढवत होती. सगळेजण शांतपणे पण निग्रहाने मार्गक्रमण करत होते. पुढे उतारावरून वेग घेत सर्व सायकली चारोटी जवळील टोळनाक्याला पोचल्या. इथे पाण्याची बेगमी करण्यासाठी एक थांबा घेतला

आता चहासाठी सगळे आतुरले होते. तेथून कूच करत सगळ्यांनी महामार्गालगत असलेले महालक्ष्मी मंदिर गाठले.  मंदिराशेजारी अनेक क्षुधाशांतिकेंद्र व इतर दुकाने होती. मंदिराच्या रस्त्याला लागल्यावर पहिल्याच क्षुधाशांतिकेंद्रावर सगळ्या स्वारांनी चहाचा आस्वाद घेतला. पृथ्वीवरील अमृतपानाचा लाभ झाल्यावर सगळे ताजेतवाने झाले होते. आजचे गंतव्यस्थान तलासरी आता नजीकच होते. महालक्ष्मी मंदिर सोडून महामार्गाला लागल्यावर चांगलाच उतार सुरू झाला. फुजीने आता आघाडी घेतली. इतर सर्व सायकलस्वार पाठीमागून येत आहेत याची  खातरजमा करतच फुजी वेग घेत होती. धुंदलवादी मागे टाकून दापचरी येथील टोळ नाक्याला सगळे सायकलस्वार एकत्र येण्यासाठी फुजीने वेग मंदावला. येथील टोळनाका चांगलाच रुंद आहे. तो महाप्रचंड टोळनाका मागे टाकून सायकलस्वार पुन्हा पुढे निघाले.

वाटेत नारळपाणी पिण्याचा मोह मात्र कोणालाच आवरला नाही.



नारळपाणी घेऊन पुन्हा सर्व स्वार एकापाठोपाठ जाऊ लागले. आता सगळ्यांनाच गंतव्यस्थानी पोचण्याची आस लागली होती. मात्र आजचे गंतव्यस्थान फुजीलाच माहीत असल्याने पुन्हा फुजीने आघाडी घेतली. संथ मात्र जागरूकपणे आजूबाजूचा कानोसा घेत फुजी जात होती. तलासरी जवळ येत होते. ओळखीची खूण पटू लागली. फुजी आणि पाठोपाठ इतर सहा सख्या सेवा रस्त्याला लागल्या आणि महामार्गाखालून इंग्रजी U आद्याक्षराप्रमाणे वळण घेत सगळेजण आजच्या गंतव्यस्थानी पोहोचले... समोर आम्हा सर्वांचे स्वागत करत होते 'वनवासी विकास प्रकल्प, तलासरी'!


बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

शुभारंभ : पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख ५

रजनीश अंमळ उशिरा प्रगटला होता. तेजोनिधी भास्कर आज लवकर हजर राहणार नसल्याने, रजनीश स्वच्छंदपणे विहरत होता. तेजोनिधी भास्कराचार्यांना उशीर होण्यास कारणही तसेच होते. आजपासून भास्कराचार्यांना दक्षिणेकडील राज्यकारभार हळूहळू आवरता घेत उत्तरेकडील राज्य अधिकाधिक वृद्धिंगत करायचे होते. तर रजनीश आता कलेकलेने दक्षिणेकडील मोहीम तीव्र करणार होता. अर्थातच वर्षातील सगळ्यात मोठी रात्र संपून आता उत्तरेकडील दिवस कलेकलेने वाढत जाणार होता. सूर्याशी संबंधित ह्या दिवसाची ठळक नोंद घेत आज भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये पौष ह्या दहाव्या महिन्याची सुरुवात म्हणजे पहिली तारीख होती.

सौर दिनांक १ चैत्र (२२ मार्च) या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जाऊ लागतो.सौर दिनांक १ आषाढ (२२ जूनला) तो उत्तरतम अंतरावर येतो.त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन (सूर्याची दक्षिणेकडे वाटचाल)सुरू होते.सौर दि. १ आश्विन (२३ सप्टेंबर) रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो आणि सौर दि.१ पौष (२२ डिसेंबर) यादिवशी तो दक्षिणतम अंतरावर येऊन नंतर पुनः त्याची उत्तरेकडे वाटचाल (उत्तरायण) सुरू होते.अशा प्रकारे निसर्गातील या चार महत्त्वाच्या घटनांच्या वेळी त्या त्या महिन्याचा प्रारंभदिन या भारतीय सौर कालगणनेत निश्चित केला आहे. दुर्दैवाने केवळ धार्मिक आणि केवळ युरोप खंडातील राजे यांचा विचार केलेल्या ग्रेगोरीयन कॅलेंडरमध्ये मात्र हे चारही दिवस महिन्याच्या अधेमध्येच येतात. त्यामुळे ग्रेगोरीयन कॅलेंडर सौर असूनही खगोलशास्त्राशी काडीमोड घेणारे आणि अशास्त्रीय ठरते.

(हिंदू पंचांग आणि मुस्लिम कॅलेंडर मात्र सौर कॅलेंडर नसून चांद्र कॅलेंडर म्हणजे तिथींवर आधारित असल्याने हिंदू व मुस्लिम कॅलेंडरचा भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरशी संबंध नाही.)


भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणी, भारतीय संसदेच्या कामकाजात हिचा वापर केला जातो.  किंबहुना भारताची राष्ट्रीय कालगणना असल्याने प्रत्येक नागरिकाने सर्व अधिकृत कामकाजात अशास्त्रीय, ख्रिस्ती ग्रेगोरीयन कॅलेंडर ऐवजी भारताच्या राष्ट्रीय कालगणनेचाच वापर करणे अपेक्षित आहे. 

श्रेष्ठ गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन ह्यांचा सौर कालगणनेनुसार वाढदिवस असल्याने आजचा दिवस 'भारत राष्ट्रीय गणित दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. तर इंडोनेशिया ह्या देशात आज मातृदिन साजरा केला जातो.

डोंबिवलीकर सायकलपटूंसाठी आजचा दिवस आणखी विशेष होता. कारण पुणेकरांबरोबरच आज डोंबिवली येथील ४ सायकलपटूसुद्धा पुणे जम्मू सायकलसफरीमध्ये सामील होणार होते. त्यामुळेच श्विनलाही आज ब्राह्म मुहूर्तालाच जाग आली. फुजी आणि स्कॉट आदल्या रात्रीच स्कॉटसह गौतमच्या टेम्पोमध्ये विराजमान झाल्या होत्या. त्यामुळे जम्मू मोहिमेला सुरुवात करण्याचा मान श्विन आणि ट्रेकला मिळाला होता. भास्कर क्षितिजावर यायला अजून बराच अवकाश होता. अस्मादिक आणि मीरा मोहिमेची सुरुवात करण्यास तयार झालो तेव्हा माझी मावशी डॉ निरुपमा भावे आमच्याबरोबरच होती. श्विनने हाताळ्यावर नवी विजेरी, नवीन कर्णा परिधान केला होता तसेच शेपटाकडेही दिवा परिधान केला होता. सुदैवाने गृहसंकुलाबाहेर पडल्यावर कोणतेही श्वान आम्हा तिघांकडे आकृष्ट झाले नाही. सावध आणि संथ सुरुवात करत आम्ही तिघेही डोंबिवली शहराचे ग्रामदैवत श्री गणेशमंदिर संस्थान येथे पोहोचलो. डोंबिवली सायकल क्लब आणि पेडल रिपब्लिकचे सदस्य तेथे हजर होतेच. डोंबिवली सायकल क्लब मधील सदस्य दर रविवारी एकत्रितरित्या प्रभात फेरीला सुरुवात करताना श्रीगणेशमंदिरापासूनच सुरुवात करत. हा पायंडा क्लबची स्थापना झाल्यापासून म्हणजे दिनांक १६ माघ १९३३ (५ फेब्रुवारी २०१२) पासून अव्याहत आणि अखंडपणे सुरू होता. गेल्या ७-८ वर्षात क्लबच्या सदस्य संख्येत गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ होत होती. काही सदस्य रविवारच्या छोट्या फेरीवर समाधानी असले तरी काही सदस्यांची भूक त्यात भागत नव्हती. त्यामुळेच आठवड्यातील सर्व दिवस साधारण ३० किमीची तर रविवारी ५० हुन अधिक किमीची फेरी काढणे, सायकलफेरी गटाच्या शिस्तीप्रमाणे करणे अश्या विचारांनी पेडल रिपब्लिक हा गट स्थापन झाला होता.

डोंबिवली सायकल क्लब सुरू झाला तेव्हा अवघ्या पाच सात वर्षांचे असताना क्लबमध्ये सामील झालेले जिया शाह आणि श्रीराज अय्यर हे आज पुणे जम्मू सायकलसफरीच्या सदस्यांना ध्वज दाखवण्यासाठी खास हजर झाले होते. डोंबिवली सायकल क्लब आणि पेडल रिपब्लिक यांतील इतर सदस्यही मोठ्या संख्येने आणि उत्साहात हजर झाले होते. नयना आघारकर, जयंत देवधर आणि एकादशी कोल्हटकर तसेच श्री विश्वनाथ अय्यर हे पुणे जम्मू सफरीतील सहभागीसुद्धा श्रीगणेशमंदिरापाशी आले होते.


                                                               श्रीराज अय्यर


                                                                    जिया शाह



                           पुणे जम्मू सायकलसफरीमध्ये सहभागी पुणे व डोंबिवली येथील सायकलपटू


                   डोंबिवली सायकल क्लब आणि पेडल रिपब्लिकच्या सदस्यांसह पुणे जम्मू सायकलसफरीतील सहभागी

डोंबिवली शहरातील प्रत्येक महत्वाच्या सायकल फेरी आधी अडूरकाका शंखनाद करत. त्याप्रमाणे ते सज्ज झाले. एकूण सातजण आज डोंबिवली हुन जम्मूसाठी निघणार होते. श्री गणेशाचे दर्शन घेऊन, समूहछायाचित्र काढून झाल्यावर सगळे सायकलपटू रांगेत उभे राहिले होते. श्विनने सगळ्यात मागे राहायचे ठरवले होते. त्याप्रमाणे श्विन सातव्या क्रमांकावर होती. श्विन तेथील उपस्थितांचा निरोप घेत असतानाच अचानक पुढील सायकलपटू जाऊ लागले. श्विनने इतर सायकलपटूंबरोबर मोहिमेची सुरुवात केली. DCC आणि पेडल रिपब्लिक चे सदस्य बरोबर होतेच. श्रीगणेश मंदिर संस्थानापासून निघाल्यावर ९० फुटी रस्त्यावर पोचल्यावर शिरगणती झाली. DCC चे सदस्य पत्रीपुलापर्यंत येणार होते. तेथे पोचल्यावर श्विनने DCC सदस्यांचा निरोप घेतला. पेडल रिपब्लिकच्या सदस्यांचे मात्र इतक्यात समाधान होणे शक्य नव्हते. ते पुढे येतच होते.  दुर्गाडी किल्ल्यापुढील चौकात शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ मूर्तीपाशी डावे वळण घेत सगळ्यांनी कोन गावाकडे मोर्चा वळवला. रस्त्याला वर्दळ फार नव्हती. त्यामुळे हळूहळू सगळ्यांचा वेग वाढत होता. कोनगाव केव्हा मागे पडले हे कळलेही नाही. एव्हाना १० किमीचा टप्पा पार पडला होता. गोवेगावही मागे पडले. एकमेकांमागोमाग सगळेजण लयीत जात होते. रांजणोली गावापुढे कल्याण भिवंडी रस्त्याला छेद देणारा नाशिक ठाणे महामार्ग लागला. पेडल रिपब्लिकच्या सदस्यांचा निरोप घेण्याची वेळ आली होती. DCC सदस्य पत्रिपुलापासून जसे परत फिरले होते, तसेच आता पेडल रिपब्लिकचे सदस्य माघारी फिरणार होते. पत्रिपुलापाशी अरुंद रस्त्यामुळे छायाचित्र घेता आले नव्हते. मात्र रांजणोली नाक्यापाशी चौक रुंद होता. त्यामुळे पेडल रिपब्लिकच्या सदस्यांचा निरोप घेतानाचा क्षण कैद करण्याचा मोह आवरणे शक्य नव्हते.



पेडल रिपब्लिकचे स्वारही आता माघारी फिरणार असले तरी भाषाप्रभु गंधार डोंबिवलीकर (गंधार कुलकर्णी), शीघ्र कवी भरत यांनी पुढेही साथ देण्याचे ठरवले होते. यापुढील रस्त्याची टेहळणी अस्मादिकांनी नयना आघारकरांसह आधीच्या रविवारी केली होती. त्यामुळे आता अस्मादिकांनी आघाडी घ्यायचे ठरले.

नाशिक ठाणे हमरस्ता ओलांडून अस्मादिकांपाठोपाठ सगळेजण रांगेत जाऊ लागले. सुरुवातीचा थोडा खराब रस्ता गेल्यावर नव्याने बांधलेला उड्डाणपूल दिसू लागला. या उड्डाणपुलावरून जाण्याची मजा श्विन आणि नयना आघारकरांनी घेतली होतीच. त्यामुळे त्या उड्डाणपुलापाशी पोचताच श्विनचा उत्साह अधिकच वाढला. सगळे सायकलस्वार पाठोपाठ आहेत याची खात्री केल्यावर श्विनने उड्डाणपूल चढायला सुरुवात केली. हा भिवंडीच्या दिशेने जाणारा एकदिशा मार्ग होता. परतीच्या प्रवासात उड्डाणपुलाखालून यावे लागते. उड्डाणपुलावरील रस्ता खूपच अरुंद आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर मागे वळूनही बघता येणार नव्हते आणि थांबताही येणार नव्हते. श्विनने आघाडी घेत उड्डाणपुलावर कूच केले. बाकी सायकलिस्टही एकामागोमाग रांगेत येऊ लागले. हा उड्डाणपूल अरुंद असला तरी बऱ्यापैकी लांब आणि उंच होता. श्विनने वेग घेतला. उड्डाणपूल पार झाल्यावर लगेचच दुसरा उड्डाणपूल होता. त्या उड्डाणपुलावर उजवे वळण घ्यावे लागणार होते. मात्र सलग दुसरा उड्डाणपूल घेतला तर, मागे सगळे सायकलस्वार आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी थांबता येणार नव्हते. कारण दोन्ही उड्डाणपुलांमध्ये फार जागा नव्हती. त्यामुळे श्विनने पहिल्या उड्डाणपुलानंतर रस्त्याच्या डावीकडे मोर्चा वळवला. पाठोपाठ ४-५ सायकलपटू आले. बाकीचे अजून पुलावरच होते. त्यांची वाट पाहत थांबलो असता आजूबाजूचे लोक आमच्या सायकलसफरीबद्दल चौकशी करू लागले. आम्ही जम्मूपर्यंत सायकलप्रवास करणार असल्याचे समजताच ते आम्हाला चहानाश्त्यासाठी आग्रह करू लागले. आम्ही त्यांना नम्रपणे नकार दिला. शेवटचा सायकलपटू आल्याची खात्री झाल्याचार श्विनने पुन्हा पुढे कूच केले. पुढील चौकात उजवे वळण घेत वाडा शहराच्या दिशेने जाणारा रस्ता पकडला. खरेतर भिवंडीहून तलासरीकडे जायला चारपाच वेगवेगळे मार्ग होते. श्विन आणि नयना आघारकर यांनी आठवडाभर आधीच एक खुष्कीचा मार्ग शोधून ठेवला होता.

वाडा रस्त्याला लागल्यावर कामोरी नदी ओलांडून शेलार गावाजवळ मीठपाडा रस्त्यापाशी श्विनने थांबा घेतला. इथे डावीकडे वळण घ्यायचे होते. श्विनने पून्हा एकदा शिरगणती करत सगळे सायकल स्वार असल्याची खात्री केली आणि मगच डावीकडे वळण घेत मीठपाडा रस्त्याकडे मोर्चा वळवला. रस्ता थोडा अरुंद आणि खडबडीत असल्याने सगळ्यांचा वेग मंदावला होता. मात्र हळूहळू त्यावर मात करत सगळेजण वेग घेत होते. थोड्या वेळातच सर्व सायकलयात्री पारोळ रस्त्याला लागले. वर्षभरापूर्वी जम्मू कन्याकुमारी सायकलयात्रा करणाऱ्या सुनील ननावरे, सुनिल पाटील यांच्या गटाला तलासरीहून डोंबिवलीकडे घेऊन येताना पारोळ रस्त्याने श्विनला भुरळ घातली होतीच. आता त्याच रस्त्याने मात्र विरुद्ध दिशेने जायचे होते.

एव्हाना डोंबिवली शहर मागे पडून दीड-दोन तास झाले होते. सगळेजण चहाच्या शोधात होते. श्विनला पुढे जुनांदूरकी गावाजवळ चहा मिळेल याची खात्री होतीच. श्विनचा अंदाज खरा ठरला कांबे गावाजवळ चहापानाची पहिली संधी मिळाली. सर्व स्वारांनी त्वरित आपापल्या हातातील लगाम खेचत चहाकेंद्राकडे मोर्चा वळवला.


चहा घेत असतानाच जठराग्नीला आहुती देण्याचे यज्ञकर्मही केव्हा सुरू झाले हे कळलेही नाही. जम्मू मोहिमेच्या शुभारंभाच्या पहिल्यावहिल्या यज्ञकर्मात सगळेच गुंग झाले होते. पुणे जम्मू सायकलसफरीमध्ये सामील झाल्याचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. गप्पांनाही उधाण आले होते. भास्करचार्यही सगळ्या सायकलपटूंकडे कौतुकाने पाहत होते. मात्र शीघ्र कवी भरत आता परतणार होते. कांबे गावापाशीच त्यांचा निरोप घेत आता  पुणे जम्मू सायकलसफरीतील सहभागी तुंगारेश्वर अभयारण्याच्या दिशेने जाऊ लागले.

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...