शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

मुक्काम भोगापुरम: कोलकाता चेन्नई सायकलयात्रा





 श्रीकाकुलम येथे असताना जवळपास दोन अडीच वाजून गेले होते. आता जलदीने पुढे जायला हवे होते. वास्तविक संजय आणि आनंद ह्यांनी तिथे यायलाच खूप उशीर केला होता. तिथे पटकन जेवून न निघता त्यांनी आल्यावरही बराच वेळ घेतला होता. त्यामुळे आता पुढे तरी ते जलद गतीने यावेत अशी माझी अपेक्षा होती..आम्ही तिघांनी सुरुवात केली. पहिल्या दोन पाच मिनिटातच ते मागे राहिले. मला त्यांचे खूपच आश्चर्य वाटत होते.

पुढे एक छानसा उड्डाणपूल लागला. उड्डाणपूल आला की फुजीला आणखी उत्साही वाटत असे. फुजीने वेग घेतला. इतक्यात एक स्वयंचलित दुचाकी मला समांतर जाऊ लागली. बहुधा ते जोडपे असावे. मागील सीटवरील बाईने मला विचारले.... 'खाना '. मी म्हटले ' हो गया..' त्यावर तिने मला एक पिशवी देऊ केली. मी त्यांना परत म्हटले 'खाना हो गया है ' त्यावर ती म्हणाली ' Later ' आणि माझ्या हातात पिशवी सोपवली. एक पाण्याची बाटलीही त्यांनी मला दिली. वाटेत भेटणाऱ्यांचे हे असे प्रेम सायकल यात्रेत बऱ्याचदा अनुभवाला येते. ती पिशवी माझ्या हातात सोपवून लगेचच ती दुचाकी वेगात पुढे निघून गेली. खरं पाहता त्या पिशवीत काय आहे ह्याचीही मला कल्पना नव्हती. मी ती पिशवी तशीच प्यानियर्स मध्ये ठेवून दिली.

उड्डाणपुलांची एक मालिकाच तिथे दिसत होती. एक उड्डाणपूल संपतोय न संपतोय तोच दुसरा उड्डाणपूल दिसत होता. त्यामुळे फुजी खूष होती. संजय आनंद मात्र उड्डाणपूल टाळून सेवा रस्त्याने येत असत. उड्डाणपूल जेवढे चांगल्या दर्जाचे असायचे तेवढ्या चांगल्या दर्जाचे सेवा रस्ते असतीलच ह्याची खात्री नव्हती. तसेच गावातील गर्दी सेवा रस्त्याला लागू शकत होती. उड्डाणपूल सहापदरी होता आणि वाहतूक तुरळक होती. त्यामुळे उड्डाणपुलावरून वेग घेता येत असे.

आनंद आणि संजय मुळातच कमी वेगाने सायकल चालवत होते. त्यात उड्डाणपूल टाळत होते. त्यामुळे त्यांच्या आणि माझ्यामध्ये पुन्हा अंतर वाढत होते. आज खरेतर दीडशे किमी अंतर कापायचे होते. त्यामुळे वेग कायम राखणे गरजेचे होते. आम्ही पूर्व किनारपट्टीवर असल्याने साडेपाच वाजेपर्यंत इथे अंधारही पडत होता. त्यामुळे मी त्यांना सांगितले साडेपाच वाजता मी जिथे असेन तिथे तुमच्यासाठी थांबेन. अर्थात कोलकातापेक्षा इथे अंधार थोडा उशिराने पडत होता. ते दोघे माझ्या फार मागे राहू नयेत म्हणून मी वाटेत फोटो काढण्याची हौसही भागवत होतो. साधारण साडेपाचच्याच सुमारास सुदैवाने मला रांगेत चहाची काही दुकाने दिसली. तिथे आसपास निसर्गही छान दिसत होता. साहजिकच मी फुजीला तिथे थांबवले आणि दोघांची वाट पाहू लागलो.

त्यांची वाट पाहता पाहता तेथील आल्याचा चहा घेतला. त्याचा स्वाद अप्रतिमच होता. त्यामुळे मी खुष झालो. आता अंधार पडायला सुरुवात झाली होती. विजयनगरमसाठी आम्हाला महामार्ग सोडून १५ किमी आत जावे लागणार होते. येथून विजयनगरम जवळपास २५ किमी अंतरावर होते. विशाखापट्टणम तर पन्नासेक किमी अंतरावर होते. आंध्र पोलीसखात्यातील आनंदच्या मित्राने आम्हाला सांगितले महामार्गालगतच तुमची सोय करतो. त्यामुळे मला जरा हायसे वाटले. अंधारात सायकल चालवणे मला अजिबातच आवडत नाही. तेही नेहमीच्या रस्त्याला असेल तर जरा तरी ठीक आहे. मात्र अनोळखी रस्त्यात एक छोटासा खड्डा असेल तरी अंदाज येत नाही. ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मी आता विजयनगरमपर्यंत जाण्यास फार उत्सुक नव्हतो. विनय तोश्नीवाल ह्यास मी तसे कळवून टाकले. आमची सोय चहाकेंद्रापासून साधारण १२ किमी अंतरावर भोगापुरम ह्या गावी केल्याची बातमी मिळताच सगळ्यात जास्त आनंदात मीच होतो. 

चहाकेंद्रावर आमचा बराच वेळ गेला होताच. चांगलाच अंधार पडला होता. आम्ही ओळीने पुढे जाऊ लागलो. थोड्या वेळातच भोगापुरम येथे पोचलो. तर तिथे एक माणूस आमची चौकशी करू लागला. आम्ही त्याला आमची मोहीम सांगितली आणि आमची आजची सोय हॉटेल अन्नपूर्णा येथे झाली असल्याचे त्याला सांगितले. तत्क्षणी तो म्हणाला, तुम्ही तिथे अजिबात राहू नका. आंध्र पोलिसांनी सांगितलेल्या हॉटेलमध्ये एक माणूस आम्हाला राहू नका म्हणून का सांगतोय आम्हाला कळेना. आम्ही तिथे घुटमळत असतानाच समोरुन दोन पोलिस आले. ते आमच्या स्वागतासाठीच आले होते. त्यांच्या मागोमाग तेथून साधारण एक किमी अंतरावर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा येथे पोचलो. तिथे एक दोन/ तीन मजली इमारत दिसली. तळमजल्याला गोडाऊन चे स्वरूप दिसत होते. एक वऱ्हांडा होता. तिथे आमच्या सायकली ठेवल्या. मात्र तिथेही बरेच सामान पडलेले दिसत होते. स्वागतकक्ष नव्हताच. वऱ्हाड्यांच्या एका कोपऱ्यात जिना दिसत होता. सुदैवाने त्या वऱ्हाड्यांला एक सरकते गेट होते. त्याला कुलूप लावून आमच्या सायकली सुरक्षित राहणार असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. 

आम्हाला दोन रूम देण्यात आल्या होत्या. आम्ही रूम ताब्यात घेताच आम्हाला जेवण काय हवे ते त्या पोलिसांनी विचारले. साधारण साडेआठ वाजले होते. मात्र ह्या हॉटेलमध्ये आणि आसपासही काहीही खायला मिळणार नाही. त्यामुळे आत्ताच ऑर्डर द्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दोन पोलिसांनीच आम्हाला जेवण आणून दिले आणि त्यांनी आमचा निरोप घेतला. येथील हॉटेल स्थलांतरित करण्यात येत असून सध्या ह्या जागेतील हॉटेल बंद केले गेले असल्याचे समजले. त्यामुळे इथे कोणीच दिसत नव्हते. ते पोलिसही निघून गेल्यावर हॉटेलमध्ये आम्ही वगळता चिटपाखरूही दिसत नव्हते.....

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

श्रीकाकुलम: कोलकाता चेन्नई सायकल सफर

आमची दौड सुरू होतीच. आजूबाजूचा सुंदर निसर्ग प्रफुल्लित करत होता. मध्यानाची वेळ उलटून गेली होती. आता इंधनाची सोय करणे आवश्यक होते. सायकल चालवण्यासाठी मनुष्य शक्ती हेच इंधन आवश्यक असते. त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच उदरभरण करणे आवश्यक होते. मात्र आंध्र प्रदेशात शिरल्यापासूनच ह्या महामार्गाला लागून क्षुधाशांतीगृह सापडणे कठीणच होते. सहा पदरी हमरस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता असा एकंदर आठपदरी रुंद असलेल्या ह्या महामार्गालगत आमच्या पोटातील कावळ्यांचे काय करायचे ह्याचे उत्तर सापडत नव्हते. 

वास्तविक मी जेव्हा आमची सफर आखली तेव्हा जी महत्वाची शहरे दिसत होती त्यानुसार राहण्याची ठिकाणे निवडली होती. मात्र पहिल्या दिवसापासूनच आम्ही मागे पडत गेलो होतो. माझ्या मूळ आराखड्याप्रमाणे काल रात्री आम्ही श्रीकाकुलम ह्या शहरात मुक्काम करायला हवा होता. मात्र आम्ही आजचा अर्धा दिवस संपल्यानंतर तिथे पोचत होतो. शहर सुरू व्हायच्या बऱ्याच आधीपासून शहर मोठे असल्याचा अंदाज येऊ लागला होता. श्रीकाकुलम हे आंध्र प्रदेशातील जिल्ह्याचे ठिकाण होते. ह्या जिल्ह्यामध्ये बौद्ध पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत.

कलिंगाच्या मध्ययुगीन आणि नंतरच्या ऐतिहासिक काळातील श्रीकाकुलम किंवा चिकाकोल हे खूप महत्वाचे ठिकाण आहे. श्रीकाकुलमचा सर्वात जुना इतिहास पूर्व गंगा राजवंशाच्या काळापासून सुरू होतो. गोवलकोंडा कुतुब शाह्यांनी त्याच्या ताब्यात येईपर्यंत ते नंदापूरच्या सूर्यवंशींच्या थेट राजवटीखाली होते. गोवलकोंडाच्या सुलतानांच्या काळात, श्रीकाकुलम उत्तर आंध्र प्रदेशाचे मुख्यालय बनले आणि प्रशासनाची देखरेख करण्यासाठी 'फौजदार' नावाचा एक अधिकारी नियुक्त करण्यात आला. १६७३ मध्ये जयपूरचा राजा विश्वंभर देव-१ आणि चिकाकोलचा नवाब यांच्यातील युद्धाने या प्रदेशातील गोवलकोंडाचे राज्य संपले. गोवलकोंडाच्या कमकुवत राज्यामुळे, चिकाकोलच्या फौजदाराने नवाब ही पदवी स्वीकारली आणि स्वतंत्र शासन स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तथापि, विश्वंभर देव-१ ने त्याचा पराभव केला, ज्याने उत्तर आंध्र प्रदेशात जयपूरचे राज्य पुन्हा स्थापित केले.

इतका पुरातन इतिहास कालीन असलेल्या ह्या शहराची सध्याची लोकसंख्या साधारण दीड लक्ष आहे. अर्थातच आम्हाला ह्या इतिहासापेक्षा आमच्या वर्तमानाची अधिक काळजी होती. संजय आणि आनंद बरेच मागे पडले असावे. श्रीकाकुलम शहर दिसू लागताच इथे आमची जेवणाची सोय होऊ शकेल असे वाटू लागले. मी उड्डाणपूल टाळून त्या बाजूने जाऊ लागलो. शहरात जाणारे रस्ते मी पाहत होतो. मात्र आनंद आणि संजय दिसतही नसल्याने मी हॉटेल शोधण्यासाठी महामार्ग सोडून आत शिरू शकणार नव्हतो. एका उड्डाणपुलाशेजारून जात असताना मला पुलाखाली तीन कॉलम मधून जाणारे प्रशस्त रस्ते दिसले. शहर डावीकडे होते. शहरात शिरणारे रस्तेही सुंदर, स्वच्छ होते. तसेच पुलाखालील कॉलम मधून जाणारे रस्तेही अतिशय स्वच्छ होते. तिथेच एक कॉलम जवळ मला जेवणाची सोय दिसली. तिथे एक गाडी भोवती बसायला प्लास्टिक ची आठ दहा स्टूल ठेवलेली होती. मामला अगदीच आटोपशीर दिसत होता. ती गाडी चालवायला तीन चार बायका दिसत होत्या. सायकल बाजूला लावून मी तिथे जाऊन जेवायला काय उपलब्ध आहे ह्याची हिंदीमध्ये चौकशी केली. त्यांना काहीच कळेना. इंग्रजीची मात्राही चालत नव्हती. अखेरीस तुटक्या फुटक्या इंग्रजीत त्यांनी तिथे उपलब्ध असलेले तीन पर्याय सांगितले... चिकन राईस, वेज राईस आणि एग राईस.

मुळातच नुसताच राईस खाऊन माझे पोट भरणे शक्य नव्हते. त्यामुळे वेज राईस खाऊन उपयोग नव्हता. एग राईस मी खाऊ शकणार नव्हतो, कारण मला एग चालत नाही. म्हणजे माझ्यासाठी फक्त चिकन राईस हाच पर्याय होता. चिकनचे तुकडे खाऊन तरी पोट थोडे भरणे शक्य होते. मी संजय आणि आनंदला माझे लोकेशन कळवले. थोडावेळ त्यांची वाट पाहिली मात्र त्यांचा काहीच पत्ता नव्हता. अखेरीस मी माझ्यासाठी चिकन राईस ची ऑर्डर दिली. तेथील ताई आग्रहाने पुन्हा पुन्हा राईस, चिकनची करी वाढत होत्या. मी पोटभरून जेवलो. अजूनही माझ्या सहकाऱ्यांचा पत्ताच नव्हता. ते नक्की का आणि किती मागे राहिले कळत नव्हते. मग मी सायकल तिथेच लावून इकडेतिकडे भटकू लागलो. तिन्ही कॉलम वर सुंदर चित्रे काढलेली दिसत होती. मी नुसताच टाईमपास करतोय असे वाटून त्या ताई मला जेवणाचे पैसे मागू लागल्या.  मी त्यांना आणखी दोन जण येत आहेत असे सांगितल्यावर त्या शांत झाल्या. मात्र त्यानंतरही जवळपास अर्ध्या तासाने माझे सहकारी आले. एव्हाना माझी चांगलीच विश्रांती झाली होती. त्यांचे जेवण होईपर्यंत मी आजूबाजूला भटकून आलो. तेथील सुंदर सुंदर चित्र पाहून मी खुश झालो. आमचे तिघांचेही मनसोक्त जेवण झाले. तिघांचे मिळून फक्त २१० रुपये बिल! अमर्यादित चिकन राईस फक्त ७० रुपयात! तेही अतिशय रुचकर.

त्या ताईंना आणि त्यांना मदत करणाऱ्या मुलांना आमच्याबरोबर फोटो काढून घ्यायचे होते. त्यांना आमचे खूपच कौतुक वाटत होते. आम्हाला आग्रहाने जेवण तर त्यांनी दिले होतेच त्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आमच्याबद्दलची आपुलकी स्पष्ट दिसत होती. आम्हाला संवाद साधायला भाषेची अडचण येत नव्हती. आम्ही निघत असताना त्यांनी आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या. आम्ही तेथून निघालो ते नवे नाते जोडूनच!



रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

मालगुडी डेज: कोलकाता चेन्नई सायकलप्रवास

अमरावती हॉटेल मधील वास्तव्य सुखावह होते. झोप छान झालीच होती. मी पहाटे ५ वाजताच उठलो होतो. लगेचच warmshower वर विजयनगरम शहरामध्ये आजची राहायची सोय कुठे होऊ शकते का ह्यासाठी शोध घेऊ लागलो. विनय तोष्णीवाल ह्यांचा संपर्क तिथे दिसला. आमची आज रात्रीची सोय होऊ शकेल का हे विचारण्यासाठी मी त्यांना मेसेज केला. अक्षरशः दुसऱ्या मिनिटाला त्यांनी आमची सोय होईल असे उत्तर दिले. पहाटे ५- ५.१५ ला इतक्या लगेच उत्तर येईल ह्याची अपेक्षाच नव्हती. विनयची माझी काहीही ओळख नव्हती की त्याचा reference देखील नव्हता. केवळ warmshower वर शोधताना त्याचे नाव पाहून मी मेसेज केला काय आणि लगेचच त्याचे उत्तर आले देखील. Warmshower सारख्या साईट्स हे फिरस्त्यांसाठी खरोखरच अनमोल ठेवा आहे. विनयने केवळ आमची राहण्याचीच व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले तर तर त्याने पुढे आणखी काही विशेष व्यवस्था हवी आहे का ह्याचीही चौकशी केली. वास्तविक विनय तिथे आज असणार नव्हता. मात्र त्याने सांगितले की त्याचा माणूस तिथे असेल आणि तो तुम्हाला हवी असेल ती सगळी व्यवस्था नक्कीच करून देईल.

मी लगेचच आनंद आणि संजय ह्यांना आपली आजची सोय होत असल्याचे कळवले. आनंदही लगेच म्हणाला आंध्र पोलिसांतर्फेही आजची राहायची सोय होण्याची शक्यता आहे. आज दोन ठिकाणाहून सोय होणार होती. आता आम्हाला निर्णय घ्यायचा होता.


                                                   

त्याच आनंदात मी चहा घेण्यासाठी हॉटेलशेजारील दुकानात गेलो. तिथे चहाखेरीज इतर अनेक वस्तू होत्या.दुकानदारही सायकलवरून बराच फिरला होता. त्यामुळे तोही आमची मोहीम ऐकून खूप उत्साहित झाला होता. चहातर एकदम फर्मास होता. त्यामुळे आम्ही चांगलेच ताजेतवाने झालो होतो. वातावरणही आल्हाददायक होते. आजचा सूर्योदय आमचा उत्साह वाढवत होता. आम्ही तिघांनीही सायकली सज्ज केल्या आणि मार्गस्थ झालो. प्रशस्त आणि सुंदर रस्ता आम्हाला वेग घेण्यास आवाहन करत होता. आम्ही त्याची आज्ञा शिरसावंद्य मानत वेग घेतला.

आज आमच्या सायकल प्रवासाचा सातवा दिवस होता. आमच्या मोहिमेतील राखीव दिवस आम्ही चौथ्याच दिवशी उपयोगात आणल्यामुळे आता आम्हाला रोजचे अंतर पूर्ण करावे लागणारच होते. ते सूर्यास्तापूर्वी पार केले तरच गंतव्यस्थानी गेल्यावर तेथील परिसर, संस्कृती अनुभवण्याची संधी मिळणार होती. आजचे अंतर जवळपास १५० किमी होते. अर्थातच त्यामुळे आता दिवसभर वेग कायम राखणे आवश्यक होते. सुदैवाने आज बऱ्यापैकी चढ उतार , उड्डाणपूल असलेला रस्ता होता. त्यामुळे फुजीचा उत्साह वाढत होता. साधारण अडीच तास सायकलवल्यावर मी नाश्त्यासाठी हॉटेल शोधू लागलो. आनंद आणि संजय ह्यांची गती मंदावली होती. मी त्यांना आणखी अर्ध्या तासाच्या अंतरात आपण थांबूया असे सांगून पुढे निघालो.























सुदैवाने थोड्याच वेळात रस्त्याच्या डाव्या बाजूला मोकळ्या जागेत एक चारचाकी वाहन उभे असलेले दिसले. त्याच्या आजुबाजूला बरेचजण तिथे नाश्ता करत असलेले दिसल्यावर मी कुतुहलाने पाहू लागलो. तर तिथे दाक्षिणात्य पदार्थांची मेजवानी दिसत होती. एव्हाना ४८ किमी अंतर पार झाले होते. मी लगेचच सायकल बाजूला लावली. संजय आणि आनंदही लगेचच आले. इडली, गोल वडा, उत्तप्पा, डोसा अशा अनेक पदार्थांची रेलचेल तिथे होती. आम्ही मनसोक्त ताव मारला आणि क्षुधाशांती करून घेतली.

                                     


नाष्टा करून आम्ही पुढे निघालो. मात्र नाष्टा झाल्यावर आनंद आणि संजय वेग घेईनात. माझ्या मनातील घड्याळ आणि काम काळ वेग हे त्रैराशिक मला वेग कमी करू देत नव्हते. मी पुढे निघालो. थोड्या वेळातच एक दुचाकीचालक माझ्या समांतर जात माझी चौकशी करू लागला. तो वैद्यकीय कॉलेजमधील विद्यार्थी होता. आमच्या प्रवासाबद्दल ऐकल्यावर त्याने लगेचच पन्नास रुपये काढून दिले आणि त्याच्याकडून ती मदत घेण्याविषयी सांगू लागला. मी त्याला नम्रपणे नकार दिला. मात्र तो म्हणाला त्याला स्वतःला अशी यात्रा करायला आवडले असते, मात्र ते सध्या शक्य नाही. तर आमच्या प्रवासात मदत करून तेवढे समाधान तरी त्याला हवे होते. मी ती नोट स्वीकारली. लगेचच तो डावीकडील फाट्यावरून जवळच्या गावात निघून गेला. 

                                             

काही वेळ गेला न गेला तोच आणखी एका दुचाकीवरून दोन स्वार माझी चौकशी करू लागले. त्यांनीही मला पैसे देऊ केले. मात्र मी त्यांचे आभार मानून त्यांना नकार दिला. त्यांना म्हटले तुमच्या शुभेच्छा ह्याच आम्हाला आवश्यक आहेत. दोघेही थोडे नाखुश झाले. मात्र त्यांच्याबरोबर थोडा वेळ सायकलवत गप्पा मारल्यावर तेही निघून गेले. बरेच जण आमची चौकशी करत आम्हाला शुभेच्छा देत होते. आसाममधील मोटारसायकलपटू दिगंत बारुआ आणि जितेंदर सिंग पुन्हा एकदा आम्हाला दिसले. त्यांच्याबरोबर गप्पा मारत आम्ही पुढे निघालो. त्यांनी वेग घेतल्यावर मी मागे राहिलो. त्याचा निरोप घेतो न घेतो तोच आणखी एक मोटार सायकल पटू माझ्या समांतर येऊन माझी चौकशी करू लागला. मी त्याला माझ्या फिट इंडिया मोहिमे अंतर्गत आत्तापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली आणि ह्यावेळच्या कोलकाता चेन्नई प्रवासाच्या टप्प्याची माहिती दिली. त्याचे नाव होते तेजा. तो पलासा येथेच राहणारा होता. परीक्षेसाठी तो विशाखापट्टणम येथे जाणार होता. त्याची परीक्षा दुसऱ्या दिवशी ९.१५ ते ११.१५ दरम्यान होती. त्याने सांगितले की ११.१५ नंतर मला नक्की फोन करा. आम्ही बराच वेळ गप्पा मारत जात होता. अखेर तोही पुढे निघाला.

      

                                                                               

वाटेत एक सुंदर रेल्वे स्टेशन दिसत होते. इनमिन दोन फलाट आणि दोनच रेल्वे रुळ होते. आमचा रस्ता त्या फलाटांच्या पुढील उड्डाणपुलावरून जात होता. त्या फलाटांच्या दुतर्फा शेती दिसत होती. फलाट बराच लांबलचक होता. इतका की फलाटाची दुसरी बाजू दिसतही नव्हती. मात्र इतक्या लांबलचक दोन फलाटांवर मिळून एकच माणूस दिसत होता. चित्र अगदी मनमोहक होते. त्या रेल्वे स्टेशनचे नाव होते हरीसचंद्रपुरम. बहुधा ते हरिश्चंद्रपुरम असे असावे. मात्र देवनागरी लिपी मध्ये मात्र हरीसचंद्रपुरम असाच उल्लेख तिथे होता. तेथील मनमोहक आणि शांत वातावरण पाहताना मला मात्र मालगुडी स्टेशन (हिंदी मालिका मालगुडी डेज ह्या मधील काल्पनिक गाव) ची आठवण येत होती.





फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...