शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

जयहिंद: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग २२

 


बंगालमध्ये आमचा पाहुणचार उत्तम होत होता. येथील खाद्यपदार्थांची विविधता आमच्या रसनेची तृप्ती करत होती. तसेच येथील माणसेही आमची मने जिंकत होती. अब्दुलबरोबर मराठी आणि बंगाली भाषांचे नातेही उलगडत होते. एखादा माणूस किती साधा, सरळ आणि निर्मळ असावा ह्याचे अब्दुल हा मूर्तिमंत उदाहरण होता. रात्री आमची झोपही अगदी शांत आणि व्यवस्थित झाली. पहाटे आम्ही येथून निघण्याची तयारी करू लागलो. अब्दुलप्रमाणेच इतरही काही युवक येथे नोकरीनिमित्ताने राहत होते. त्यांच्यापैकी दोघेजण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले.

अब्दूलने त्यांची आमच्याशी ओळख करून दिली. आमच्या मोहिमेविषयी आम्ही त्यांना माहिती दिली. दोघांनाही आमच्या मोहिमेविषयी उत्सुकता वाटत होती. त्याच्या एका मित्राचे नाव होते राज! तो तेथील क्रिकेट क्लब मधील होतकरू खेळाडू होता. तेथील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो प्रयत्न करत होता. IPL खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी त्याला शुभेच्छा देत आम्ही आमच्या सायकली तयार केल्या. आमच्या सायकलींवर सामान लादताना अब्दुल आणि त्याचे मित्र कुतुहलाने पाहत होते. 'लवकरच आम्ही तुला IPL खेळताना पाहू, त्यावेळी आमच्या तिकिटाची सोय कर ', असे राजला सांगत आम्ही तिघांचाही निरोप घेतला.


सकाळची वेळ अतिशय प्रसन्न होती. आम्ही शांतपणे सुरुवात केली. आम्ही राष्ट्रीय महामार्ग सोडून राज्य रस्त्याने जात होतो. तो अरुंद होता. आमच्या मार्गापासून बांगला देशाची सीमारेषा  जवळच होती. आमच्या मार्गाला साधारणपणे ती सीमारेषा समांतर जात होती. रस्त्यात सगळीकडे मुस्लिम वस्ती होती. बहुतांश ठिकाणी गायी, बकऱ्या पाळलेल्या होत्या. मशिदीतून बांग ऐकायला येत होती. रस्त्यात सगळेजण आपापल्या कामात गर्क होते. इतक्यात एक अडीच तीन वर्षांचा मुलगा आम्हाला पाहून रस्त्यावर धावत आला. तिथे येताच तो ओरडायला लागला. मला पटकन तो काय म्हणतोय ते कळले नाही. मी त्याच्याकडे पाहिले. रस्त्याच्या डावीकडे अंगण होते. त्यापलीकडे असलेल्या घरातून धावत येत तो काहीतरी ओरडत होता. त्याच्या आवाजामुळे सायकलचा वेग एकदम कमी करून मी त्याच्याकडे बघू लागलो.  तो छोटा मुलगा माझ्याकडे पाहत कडक सॅल्युट मारत ओरडत होता.... 'जयहिंद!' त्याला घरातून काय शिक्षण मिळत होते, त्याच्यावर काय संस्कार होत होते.. हे उघडच होते. भारतीयत्वाचे बाळकडूच त्याला पाजले गेले होते. भारताची बांगलादेशकडील सीमारेषा किती बळकट आहे ह्याचे प्रत्यंतर आम्हाला येत होते.

लवकरच आम्ही पुन्हा महामार्गाला लागलो. वातावरण अतिशय सुंदर होते. रस्ताही चांगला होता. आम्हाला पाहून अनेकजण आमची प्रशंसा करत होते, आम्हाला शुभेच्छा देत होते. 



वाटेत एकाने आम्हाला थांबवले. त्याला आमची मुलाखत घ्यायची होती. तो एक यूट्यूब चॅनेल चालवत होता. वास्तविक तो एक चांगल्या ठिकाणी कामही करत होता. त्याच्या यूट्यूब चॅनेलसाठी त्याने आम्हा तिघांचीही थोडक्यात मुलाखत घेतली. आमच्याशी बोलत आमच्या मोहिमेविषयी त्याने मन त्या चॅनेलवर माहिती दिली. आम्हाला शुभेच्छा देत त्याने आमचा निरोप घेतला. अश्या मोहिमेदरम्यान आपली कोणी आस्थेने चौकशी करत असेल तर आपल्याला नक्कीच समाधान वाटत असते. मात्र त्या दरम्यान वेळ, काम, वेग ह्यांचेही भान सुटू द्यायचे नसते.


कल्याण, शहाड कडून टिटवाळा येथे जात असताना वाटेत 'पाचवा मैल' असा एक स्थानदर्शक दगड आहे. बंगालमधील रघुनाथगंज सोडल्यावर बऱ्याच वेळाने आम्हाला 'आठ मैल' असा स्थानदर्शक दगड दिसला. शहाड पुढील 'पाचवा मैल ' पाहून मला नेहमी प्रश्न पडायचा हे 'पांचवा मैल' नेमके आहे तरी आहे.. कुठून मोजले? आज पर्यंत पहिले चार मैल कधी दिसले नव्हते. पुढे सहा, सातवा मैल सुद्धा कधी दिसले नाही. आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळील शहाडपाशी 'पाचवा मैल' तर भारताच्या पूर्व सीमारेषेजवळ हे 'आठवा मैल'. 'पाचवा मैल' आणि 'आठ मैल' ह्या दोन ठिकाणामध्ये महाराष्ट्र ते बंगाल एवढा विभाग सामावला आहे ह्याची आम्हाला जाणीव नव्हती. सहावा मैल आणि सातवा मैल कुठे आहेत ह्याचीही मला आता उत्सुकता वाटायला लागली.


बंगाल मला विशेष आवडायला लागला होता. कारण शाळकरी मुले आणि मुली सायकली चालवत शाळेत जात आहेत हे दृश्य येथे अगदी नियमितपणे दिसत होते. शाळांच्या प्रांगणात मोठ्या संख्येने सायकली उभ्या असलेल्या पाहून खूप समाधान वाटत होते. मुंबई, कोलकाता सारखी महानगरे ह्या वैभवाला मुकली असली तरी येथील गावागावात सायकलींचे प्रगतीचे वारे वाहत असल्याचे पदोपदी जाणवत होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...