जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार दिनांक: १५ पौष १९४१
सोधी, गुरुमुखसिंग आणि हरबीर ह्यांचा निरोप घेऊन आम्ही डावीकडे ९० अंशात वळून अमृतसरकडे जाणाऱ्या महामार्गाला लागलो. तेव्हा डोळ्यासमोर प्रशस्त रस्ता दिसत असला तरी चाकांची गती अडखळली होती, कारण आमचे सुहृद मागे राहिले होते.
अमृतसर ५०-६० किमी दूर होते. आज दुपारी ३-३.३० ला पावसाची शक्यता असल्याने त्याआधी अमृतसरला हॉटेलवर पोचणे गरजेचे होते. थोडा सूर्यप्रकाश आला असल्याने आणि सहा- आठ पदरी रस्ता दिसल्याने उत्साह वाटू लागला.. अर्थातच हळूहळू वेग वाढू लागला. फुजी आणि तिच्या मैत्रिणी महामार्गाचा आनंद घेत असताना पुन्हा मळभ दाटून आले. थोड्या वेळात आम्ही माखू गावाजवळ पोचलो. माखू गाव तसे लहानसेच.. जेमतेम १२-१५ हजार वस्तीचे. येथून हरीके पक्षी अभयारण्य जवळच होते. सतलज आणि बिआस नदीचा संगम येथून अवघा ५ किमी दूर होता. रस्ता पुन्हा अरुंद झाला होता. ट्रेकचा वेग अचानक मंदावला. त्यामुळे श्विननेही थांबा घेतला. दरम्यान ट्रेक आणि रसिकभाई वगळता इतर सर्व सायकलस्वार पुढे निघून गेले. उजवीकडे लांबवर हरिके येथील पाणथळ जागा दिसू लागली होती. ह्याला 'हरी के पट्टण' असेही म्हणतात. उत्तर भारतातील ही सर्वात मोठी पाणथळ जागा आहे. याच्याच खोलवर जागेत हरिके तलाव आहे.
जेमतेम १०००० च्या आतबाहेर लोकसंख्या असलेले हरिके गाव तरण तारण साहिब आणि फिरोजपुर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या ६ वर्षात हरिके गावाच्या दक्षिणेस सतलज आणि बिआस नदीच्या संगमाजवळ पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने बांधकाम करून पाणथळ जागा आणि तलाव निर्माण केला होता. हरिके येथील ही मानवनिर्मित नदी वा सरोवर ह्या दोन जिल्ह्यांसह कपूरथला ह्या जिल्ह्यातही पसरली आहे
ह्या पाणथळ जागेमुळे नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा तसेच जगातील नामशेष होऊ घातलेल्या स्थलांतरित पाणपक्ष्यांसह इतर पक्षी ह्यांचे संवर्धन होत आहे. येथील जैवविविधतेमुळेच भारतीय राष्ट्रीय वर्ष १९१२ (ग्रेगोरीयन वर्ष १९९०) मध्ये रामसार कन्व्हेंशन (Ramsar Convention on Wetlands of International Importance especially as Waterfowl Habitat) या आंतरराष्ट्रीय परिषदेने या जागेला एकमताने अधिकृत मान्यता दिली. वेगवेगळे पक्षी, कासव, साप, उभयचर, मासे, अपृष्ठवंशी ह्यांनी हे अभयारण्य समृद्ध आणि संपन्न आहे. वाढीव क्षेत्र धरून येथील ८६०० हेक्टर क्षेत्रास हरिके पट्टण पक्षी अभियारण्य घोषित करण्यात आले आहे. येथे हिवाळ्यात पक्ष्यांच्या २०० हुन जास्त प्रजाती भेट देतात. तसेच १९३० नंतर भारतात न दिसलेल्या इंडस डॉल्फिननेही ह्या अभयारण्यातील बियास नदीपात्रात १२ वर्षांपूर्वी दर्शन दिले होते. नामशेष होण्याच्या मार्गावरील कासवं, सुसर आणि पाणमांजरीही येथील पाणथळ जागेत सापडले आहेत.
फुजी आणि ट्रेक सतलज नदीवरील पुलापाशी पोहोचले. मागे वळून पाहिले तर रसिकभाई दिसत नव्हते. ट्रेकलाही थोडी विश्रांती हवी होती. त्यामुळे दोघांनी तिथे थांबायचे ठरवले. बाजूलाच एक पोलीस चौकी दिसत होती. चौकी म्हणजे जेमतेम २०-२५ चौरस फूट आकाराचे दगडविटांचे बांधकाम होते. तिथे असलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकजण लगेचच फुजी आणि ट्रेककडे आला. पुणे जम्मू सायकलसफरीबद्दल ऐकताच तो स्तिमित झाला. लगेचच त्याने प्यायला गरम पाणी हवे आहे का म्हणून विचारणा केली. थंडी वाजत होतीच. रसिकभाई यायला अजून वेळ होता. तेवढ्यात पाणी गरम करून मिळेल म्हणून फुज आणि ट्रेकने त्यांना गरम पाणी द्यायला सांगितले. इतक्यात ते दोन्ही कर्मचारी चौकीबाहेर येऊन फुजी आणि ट्रेकला चहा घेण्याचाही आग्रह करू लागले. चहाचा मोह फुजी (श्विन)ला कधीच आवरत नाही. तरी थोड्याश्या संकोचाने फुजीने नकार दिला. मात्र ते दोन्ही कर्मचारी अगदी आग्रहाने पुन्हा विचारायला लागले. तेव्हा मात्र फुजी आणि ट्रेकने चहा चालेल म्हणून सांगितले. त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी फुजी आणि ट्रेकला बसायचा आग्रह केला. चौकीमध्ये एक छोटा ओटा होता. त्यावर असलेल्या शेगडीवर प्यायला गरम पाणी करून त्या कर्मचाऱ्यांनी फुजी आणि ट्रेकला दिले. इतक्यात रसिकभाईही तेथे पोहोचले. त्यांनीही गरम पाण्याने घसा ओला केला. पाठोपाठ आलेल्या चहाने फुजी (श्विन), ट्रेक आणि रसिकभाई ह्यांना चांगलीच तरतरी आली. तिघेही आता पुढील टप्पा पार करण्यासाठी सज्ज झाले होते.



खुप सुंदर, छान👌👌👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद! आपले नाव कळू शकेल का? ब्लॉग आवडला असल्यास कृपया follow करा.
हटवा👍👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद! ब्लॉग आवडला असल्यास कृपया follow करा.
हटवाSunder
उत्तर द्याहटवाधन्यवाद! ब्लॉग आवडला असल्यास कृपया follow करा.
हटवा