सोमवार, ९ जानेवारी, २०२३

संघ (कन्याकुमारी चेन्नई सायकल मोहीम - भाग २)

 


माघी चतुर्थीनिमित्त कल्याण पाली सायकल यात्रा करण्याचा कल्याणच्या गजानन (विलास) वैद्य ह्याचा ध्यास गेली ३७ वर्ष सुरू आहे. ह्या सायकल वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या आणि त्यांचा उत्साह हा दरवर्षी वाढतच असतो. ३७ व्या वर्षीच्या सायकल वारीमध्ये खारघर येथील सर्वाननदेखील सामील झाला होता. त्याच वारीदरम्यान त्याची ओळख झाली होती. 

कल्याण पाली यात्रेतील सदस्यांच्या 'काय अप्पा ' समूहावर सर्वाननला कन्याकुमारी चेन्नई मोहिमेची बातमी कळली. त्याचे मूळ गाव तमिळनाडूमधीलच. त्यामुळे ह्या मार्गाचे त्याला आकर्षण असणे स्वाभाविकच. ' मै सर्वानन.. ' असे म्हणत जो फोन त्याने मला केला तो माझ्यासाठी खूपच महत्वाचा होता.

सर्वानन हे प्रत्यक्ष मुरुगन अथवा कार्तिकेयाचेच एक नाव. तामिळनाडू राज्यात मुरुगन ह्या देवतेस विशेष महत्त्व आहे. आणि आता तर तमिळनाडूमधील कन्याकुमारी ते चेन्नई ह्या सायकलवारीमध्ये प्रत्यक्ष सर्वानन सहभागी होऊ इच्छित होता. यापरते भाग्य ते काय?

सर्वाननच्या बोलण्यात उत्साह पुरेपूर भरलेला होता. तो सामील होण्यास उत्सुक आहे हे कळताच मी निर्धास्त झालो. तमिळनाडूमध्ये तेथील लोकांशी स्थानिक भाषेत संपर्क साधण्याची महत्वाची अडचण त्याच्या येण्यामुळे दुर होणार होती. सर्वाननचा सहभाग तेवढाच मर्यादित राहणार नव्हता. तर त्याला भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे आणि त्यांची कार्यालये असणाऱ्या ह्या राज्याची पूर्ण माहिती होती. 

मी आखलेला मार्ग त्यातील रोजचे टप्पे ह्याची माहिती देताच त्याने लगेचच दुजोरा दिला. तसेच रोजच्या प्रवासाची आणि निवासाची पूर्ण जबाबदारी घेण्याचेही सूतोवाच केले. दरम्यान इतर काही मार्गांनीही निवास व्यवस्था करण्याचा प्रयत्न मी करत होतोच. मात्र आता सर्वानन जोडीला असल्याचे कळताच एकंदर आखणीचे दडपण एकदम हलके झाल्यासारखे वाटू लागले.

वास्तविक ह्या मोहिमेची कल्पना सगळ्यात आधी उचलून धरली होती ती जयश्री पंडित ह्यांनी. त्यांचे स्वतःचे येणे निश्चित होत नव्हते. मात्र त्यांच्या आणि नयना आघारकार ह्यांच्या माध्यमातून अरुणा लागू ह्यांना मोहिमेत सामील होण्याची ओढ लागली. मी त्यांना समाजमाध्यमाद्वारे एक उत्तम गिर्यारोहक म्हणून ओळखत होतो. आमची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्यांच्या गिर्यारोहणाचे लेख मी वाचत असे. त्या लेखाद्वारे त्यांची ओळख झाली होती. 

सुनिता भणगे आणि अवनी कांबळे ह्या दोघी मैत्रिणी रोज पहाटे इतर सदस्यांबरोबर ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावर चालण्यास येत असत. अजित शिरवळकर ह्यांच्या गटातील हे सदस्य मी सायकल चालवत असताना रोज दिसत असत. बऱ्याच दिवसात अजित मात्र दिसला नव्हता. पण बहुधा त्याच्या माध्यमातून सुनिता आणि अवनी ह्याही मोहिमेत सामील झाल्या. दोघींचा स्वभाव मात्र एकदम विरुद्ध. सुनिता गप्पिष्ट तर अवनी शांत. कदाचित दोघींच्या मैत्रीचा पायाही हाच असावा.

' मी पवन चांडक ...' अशी ओळख फोनवर कळताच मी थोडा गोंधळलो. कारण मी ज्या पवन चांडकना ओळखत होतो ते होते परभणी येथील डॉक्टर. परभणी मधील डॉक्टर देखील आमच्या मोहिमेत सामील होणार असे वाटल्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. माझा गैरसमज काही दिवस तसाच राहणार होता. आमची गाठ पडायला वेळ होता. 

 प्रमोद दोडकेबरोबर पहिले संभाषण झाले तेव्हाच खात्री झाली की हा सर्व परिस्थितीत साथ देणारा साथीदार आहे. प्रमोदने ही खात्री संपूर्ण मोहिमेत सार्थ ठरवली. प्रसाद सरवटे हा खरतर पेडल रिपब्लिक ह्या घरच्याच सायकल गटातील सदस्य मात्र...तो सामील झाला तो सगळ्यात शेवटी. घरच्या आघाडीवर पाठिंबा मिळण्यात त्याला बराच वेळ द्यावा लागला असावा. 

अपवाद वगळता बहुतेक सगळ्याच सायकलस्वारांना अश्या मोहिमांसाठी घरच्या मंडळींना पाठिंबा मिळवण्यात थोडा वेळ जातो. मात्र अस्मादिकांना अश्या मोहिमेसाठी पूर्ण पाठिंबा मिळतो कारण गृहस्वामिनीच अश्या मोहिमेत साथ करत असते. किंबहुना तिच्या सोयीनेच अश्या मोहिमांची आखणी अस्मादिकांनी केलेली असते. माझी अर्धांगिनी... मीरा.. खरतर आता माझ्यापेक्षाही अश्या मोहिमांसाठी उत्सुक असते. डोंबिवली गोवा, अष्टविनायक, पुणे जम्मू अश्या मोहिमांनंतर तिचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे.

आमच्या मोहिमांमध्ये नयना आघारकर येणार हे तर आम्ही गृहितच धरलेले असते. भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांची सायकल फिरलेली आहे.

आमचा एकंदर संघ दहा जणांचा झाला होता. मी, मीरा आणि नयना मॅडम ह्यांनी दिर्घ दौरे केले होते तर पवन आणि प्रमोद ह्यांना लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीचा अनुभव होता. सर्वानन लांब पल्ल्याचे सायकलवणे करण्यात तरबेज होता.

मात्र आमच्या संघातील दहाजणांपैकी कोणत्याही चार जणांनी एकावेळी एकत्र सायकल चालवली नव्हती. तीन इतर डोंबिवलीकर वगळता इतर सर्व मला स्वतःला नवीन होतेच पण ते एकमेकांना पूर्ण अनोळखी होते.

मग एका रविवारी सर्वांनाच सोयीच्या ठिकाणी असलेल्या शीळ फाट्याजवळील गणेश घोळ मंदिरात भेटण्याचे ठरले. त्यावेळी पवन चांडक विषयीचा माझा गोंधळ संपला. हा पवन परभणी नव्हे तर अप्पा (धनंजय मदन) ह्यांच्या पनवेलचाच असल्याचे समजले. 

मात्र दीर्घ पल्ल्याच्या सायकल मोहिमेआधी एक दिवसीय शतकी सायकल सफर आखणे महत्वाचे होते. त्यासाठी विचारणा करताच पवनने सुचवले ... ' कडाव '




५ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...