रविवार, १४ जून, २०२०

सांगता: पुणे जम्मू सायकलसफर भाग ४ लेख १०

भारतीय राष्ट्रीय अर्थात भारताच्या अधिकृत (official) कॅलेंडरनुसार दिनांक १६ पौष १९४१
ग्रेगोरीयन (युरोपमधील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित) कॅलेंडरनुसार दिनांक ६ जानेवारी २०१९



आमच्या राईडचे ठिकठिकाणी झालेले स्वागत पाहून वरूणराजही आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आतुर झाला होता. काल सकाळपासून त्याने सूर्यदर्शन होऊ दिले नाही. आम्ही अमृतसरला पोचल्यानंतर त्याने शुभेच्छांचा अविरत वर्षाव सुरू केला, तो रात्रभर सुरूच राहिला. आमचे अंबरसिया (अमृतसर येथे राहणारे) मित्र तसेच जम्मू येथील मित्रांनी आम्हाला सांगितले की पुढील २ दिवसही तो असाच वर्षाव करत असणार आहे. त्यांनी असेही पुढे सांगितले की अश्या वातावरणात आम्हीही सायकल चालवत नाही. अमृतसर येथून जम्मूकडे जाणाऱ्या मार्गावर अमृतसारपासून साधारण २०-३० किमी अंतरावर राहणाऱ्या मित्रानेही सांगितले की तेथेही पाऊस सुरूच होता... वास्तविक केवळ अमृतसर ते जम्मूच नव्हे तर पंजाब ते नेपाळपर्यंत पाऊस सुरूच राहणार असल्याचे समजले. 

आमच्या अमृतसर व जम्मू येथील मित्रांनी आमची यात्रा अमृतसर येथेच समाप्त करण्याची आग्रही सूचना केली. सकाळी ९-१० वाजेपर्यन्त वाट पाहून आम्ही वरूणराज आम्हावर अविरत करत असलेल्या शुभेच्छांना मान तुकवत आमची सायकलयात्रा अमृतसर येथेच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पंजाबात संपूर्ण प्रवास फुजीनेच केला होता आणि श्विन साहाय्य वाहनातच राहिली होती. आता दोघांनाही इतर मैत्रिणींबरोबर साहाय्य वाहनातच बसून अमृतसर येथूनच परतीचा प्रवास करायचा होता. पुणेकरांनी प्रत्येक सायकल व्यवस्थित परत जावी यासाठी प्रत्येक सायकलसाठी खोके आणले होते. त्यांच्या आणि गौतमच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येकाने आपापल्या सायकलचे हाताळे, पायपट्टी आणि एकेक चाक काढून सायकली एकेका खोक्यात भरल्या. आणि मग ते काढलेले भागही त्याच खोक्यात आजूबाजूला भरून ठेवले. खोके पक्के बंद केल्यावर ती खोकी साहाय्य वाहनात भरण्यात आली. श्विन, फुजी, ट्रेक, स्कॉट आता आम्हाला थेट डोंबिवली येथेच भेटणार होत्या.

आमची आज रात्रीची राहण्याची व्यवस्था पठाणकोट येथे केली होती. त्यामुळे सायकलींची व्यवस्था लावून आम्ही लोहमार्गाने अमृतसरहुन पठाणकोटला जाण्यासाठी गाडीमध्ये बसलो. सगळेजण निश्चिन्त आणि समाधानी होते. रसिकभाई आणि अस्मादिकांनी अहमदाबादहुन सायकलयात्रा सुरू झाल्यापासून रोज मुक्कामी पोचलो की बुद्धिबळाचा डाव टाकायचे ठरवले होते. मात्र रोज संध्याकाळी होणाऱ्या स्वागतसमारंभात राजा, वजीर, हत्ती, उंट, घोडे, प्यादी रणांगणामध्ये पोहोचतच नव्हती. ती संधी आम्हाला अमृतसरहुन पाठणकोटला जाताना लोहमार्गावरील गाडीमध्ये मिळाली. गाडी पठाणकोटला पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. राहण्याची व्यवस्था जेमतेमच होती. तीही सगळ्यांना एकाच ठिकाणी मिळाली नाही. मात्र केवळ रात्रच काढायची असल्याने आम्ही ती व्यवस्था स्वीकारली. वरूणराजाने अजूनही रजा घेतली नव्हती.

रात्र पठाणकोटला काढून दुसऱ्या दिवशी म्हणजे राष्ट्रीय दिनांक १७ पौष १९४१ अर्थात ग्रेगोरीयन दिनांक ७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी जम्मूला जाणारी गाडी पकडायला आम्ही लोहमार्गस्थानकात पोचलो. गाडी यायला बराच वेळ होता. संपूर्ण फलाट रिकामा होता. तिमिराचेच साम्राज्य होते. इतक्यात आम्हाला चिवचिवाट ऐकू येऊ लागला. वर पाहिले तर बरेच पक्षी तिथे जमले होते. रसिकभाई लगेचच हातावर काही खाद्य घेऊन त्या पक्ष्यांना आमंत्रण देऊ लागले.


त्यांनी बराच वेळ प्रयत्न केला पण त्या पक्ष्यांनी काही दाद दिली नाही. आम्ही सर्वजण मात्र निवांत बसलो होतो.







थोड्या वेळाने मी आणि देवधर फलाटावर फिरत असता समोर एक लष्करी जवान दिसला. बिल्ल्यावर मराठी नाव दिसले. आम्ही ज्या गाडीने जम्मूला जाणार होतो त्याच गाडीने पुण्याहून त्याचे कुटुंब येणार होते. बऱ्याच दिवसांनी भेटणार असलेल्या कुटुंबियांच्या भेटीची व्याकुळता त्याच्या डोळ्यात दिसत होती. गाडी येताच आम्ही त्याचा निरोप घेतला. गाडी आता जम्मूच्या दिशेने निघाली. गाडीतून रस्ता दिसू लागला की आम्ही हळूच खिडकीबाहेर नजर टाकत होतो. न जाणो पाऊस थांबला तर....(आता खरंतर पाऊस थांबला तरच आम्हाला निराशा आली असती कारण सायकली आमच्याबरोबर नव्हत्या). मात्र वरुणराजांची संततधार सुरूच होती.

गाडीत गर्दी नव्हती. इतके दिवस एकत्र असून एकमेकांशी निवांत गप्पा मारायला आता वेळ मिळाला होता. वाटेत एका स्टेशनवर गाडी थांबली आणि मला 'शोले' चित्रपटाची आठवण आली. स्टेशनचा फलाट संजीवकुमार गावाला जातो त्या स्टेशनच्या फलाटासारखा रिकामा होता. त्या गावाचे नाव होते ...'साम्बा'.  फलाटावर उतरणारे मोजके प्रवासी पाहून कदाचित स्थानकप्रमुख तिकीट तपासनीसाला विचारात असावा,'(आज) कितने आदमी थे?'

गाडी जम्मूला पोचली. स्थानक बऱ्यापैकी गजबजलेले होते. एक खाजगी बस करून आम्ही आमच्या नियोजित हॉटेलवर पोचलो. हॉटेलचा बोळ पाहताच साहाय्य वाहन आणि सायकली इथे न आणल्याबद्दल समाधानच वाटले. तसेच समाधान पठाणकोटचे हॉटेल पाहूनही वाटले होते.

जम्मू येथील हॉटेलसमोरील रस्ता अरुंद असला तरी हॉटेल मात्र आरामदायी आणि प्रशस्त होते. हॉटेल रघुनाथ मंदिरापासून हाकेच्या अंतरावर होते. जम्मूमधील हॉटेल वास्तव्य सुखद होते. पावसाच्या संततधारेमुळे आम्हाला बाहेर मात्र पडता येत नव्हते. जम्मू येथील सायकल क्लबचे सदस्य आमच्याबरोबर अमृतसर/ पठाणकोट पासून सायकलवत येणार होते. मात्र पावसामुळे त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला होताच शिवाय आम्हालाही सावध केले होते. मात्र आदरातिथ्य करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. तेथील सायकलपटू हरप्याससिंग आणि त्यांचे मित्र आम्हाला भेटायला आले. हरप्याससिंग ह्यांनी प्रत्येक सायकलपटूला सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले.






त्यांनी इतक्या छान प्रकारे आदरातिथ्य केले की आम्हाला आमच्या सायकलयात्रेची सांगता अमृतसर नव्हे तर जम्मू येथेच झाल्याप्रमाणे समाधान वाटले. हरप्याससिंग ह्यांचे कार्यालय जम्मू विमानतळाजवळच होते. डोंबिवलीकर आणि पुणेकर हवाई मार्गाने तर अहमदाबादकर लोहमार्गाने परत जाणार असल्याचे समजताच त्यांनी जाण्याअगोदर त्यांच्या कार्यालयातही येण्याचे निमंत्रण दिले. जम्मू येथे रात्र काढल्यावर पुढील दिवशी म्हणजे राष्ट्रीय दिनांक १८ पौष १९४१ (ग्रेगोरीयन दिनांक ८ जानेवारी २०१९) रोजी पहाटे पावसातच रघुनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. एव्हाना काकड आरतीही झाली नव्हती.

डोंबिवलीकरांचे विमान (जम्मू मुंबई) सकाळी लवकर असल्याने आम्ही हरप्याससिंग ह्यांच्या कार्यालयात न जाता थेट विमानतळावर गेलो. अमृतसर येथे पोचताच आमच्यावर शुभेच्छांचा करत असलेला वर्षाव थांबवायला वरुणराज अजूनही तयार नव्हता. त्यामुळे त्याच्या ह्या प्रेमामुळे आकाशात अजूनही सूर्यदेव दर्शन देत नव्हता. परिणामी जम्मू विमानतळावर कोणतेही विमान कालपासून उतरलेले नव्हते. आज सकाळीही जम्मू येथे उतरण्याचा प्रयत्न दोन वेळा असफल झाल्यावर आमचे विमान चंदीगडला पाठवले गेले होते. ह्यानंतरच्या प्रयत्नात यश आले नाही तर मात्र आमचे विमान रद्द होणार होते. सुदैवाने ५ तास जम्मू विमानतळावर प्रतीक्षा केल्यावर आमचे विमान धावपट्टीवर उतरले आणि आम्ही निश्वास सोडला. मग मात्र ते विमान जम्मू येथे फार काळ थांबवून न ठेवता लगेचच आकाशात झेपावले.

त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आविष्काराचा चमत्कार अनुभवत आम्ही हवाई मार्गाने अडीच तासातच जम्मूहून (आमची) मुंबई गाठली. मात्र ह्या हवाई प्रवासात यांत्रिक चेहरे मिळालेली माणसे वगळता ना इतर कोणाशी गाठ पडली, ना कोणाशी ऋणानुबंध जुळले गेले. डोंबिवली येथे परत पोचल्यावरही विज्ञान आणि तंत्रज्ञानातील चमत्कारापेक्षा आमच्या हृदयाच्या कप्प्यात साठवले गेले ते महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू येथील जमिनीवर भेटलेल्या सुहृदांशी जुळलेले अतूट नाते!


२ टिप्पण्या:

  1. लॉक डाऊन पूर्वी तुमची सफर यशस्वी झाली. भाग्यवान आहात.सर्व टीमचे अभिनंदन! पुढील सफरी साठी शुभेच्छा! पुढचा प्लॅन काय आहे?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आम्ही सफर केली तेव्हा असा काही रोग आहे हेच माहीत नव्हते. पुढचा प्लॅन डोक्यात शिजायला लागला आहेच.

      हटवा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...