सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

खेडचा भटक्या विनायक




'अंबरनाथ पर्यंत आपण रेल्वेने जाऊ आणि तिथून पुढे 'त्याच्या'बरोबर सायकलने जाऊया' संजय दात्येने प्रस्ताव ठेवला. अंबरनाथ एवढ्या कमी अंतरासाठी रेल्वेने जायला श्विन तयार होणे कठीणच होते. मात्र त्याशिवाय पहाटे ६-६.३० ला अंबरनाथला पोचायचे तर घरातून ५ वाजता निघणे भाग होते. श्विनला तेही शक्य नव्हते. त्यामुळे श्विनने दात्येंचा 'त्या'च्या बरोबर जायचा प्रस्ताव नाकारला. 'ज्या'ला भेटण्यासाठी २० किमी अंतर जायचा प्रस्ताव श्विनने नाकारला होता, 'त्या'च्या ओढीने नंतर २०० किमी चा प्रवास करावा लागेल आणि २०-२५ महिने प्रतिक्षा करावी लागेल ह्याचा अंदाज मात्र तेव्हा श्विनला नव्हता.

दरम्यानच्या काळात फेबु (फेसबुक) असो की 'काय अप्पा' (व्हाट्सअप) असो, 'त्या'च्या बहारदार लेखणीने श्विनचे मन  जिंकले होते. त्याने लिहिलेला 'कोणती सायकल घेऊ' हा लेख तर कदाचित 'त्या'ने स्वतः पसरवला त्यापेक्षा जास्त वेळ श्विननेच पसरवला असेल. त्याचे कारणही तसेच होते. ह्या लेखात त्याने वाचकांची मानसिकता बरोबर जोखली होती आणि त्यावर भाष्य केले होते. त्या लेखानंतरही त्याचे अनेक लेख मन गुंगवून टाकत असत. लेखांबरोबरच त्याने अंबरनाथ येथे सायकलवेडही रुजवले होते. त्याला भेटण्याची श्विनची  इच्छा तीव्र होऊ लागली असतानाच आणि अंबरनाथ येथील सायकलवेडाचे रोपटे मोठे होत असतानाच तो कोकणातील त्याच्या मूळगावी खेड येथे परत गेल्याची बातमी कळली.

अर्थात काय अप्पा आणि फेबुच्या माध्यमातून श्विन त्याच्या लेखणीची करामत अनुभवत होती तसेच त्याच्याशी संपर्कातही राहत होती. भ्रमणध्वनीपेक्षा श्विनला काय अप्पा द्वारे संपर्क साधणे नेहमीच सोयीचे वाटे. 'त्या'च्या भेटीची ओढ वाढत होती. ठाणे येथील 'दुसरे सायकल संमेलनात' त्याच्याशी भेट झालीही... मात्र ती अगदी काही मिनिटे किंवा सेकंदाची होती. त्याच्या खेडजवळच्या सायकलसफरींची वर्णने वाचून श्विनला कधी एकदा खेडला जातोय असे झाले होते. मात्र योग काही येत नव्हता. विनायकच तो... त्याचे दर्शन असे सहजासहजी कसे होणार? हो, हो मी खेडच्या भटक्या विनायकबद्दलच सांगतोय. ह्या खेडच्या विनायकाला भेटण्याची श्विनची ओढ किती तीव्र आहे ह्याची बहुधा तो आकाशस्थ विनायक परीक्षाच घेत असावा. 



अंबरनाथला सायकलवण्याचे वेड लावून विनायकचे समाधान झाले नव्हतेच. त्याने हाच कार्यक्रम खेडला सुरू केला. गाव तसे आटोपशीर! इथे किती भिडू मिळणार? हा विचार त्याला काही काळ त्रस्त करत असेलही, मात्र एकदा गडी ह्याच्या नादाला लागला की ह्याचीच भाषा बोलू लागणार एवढे मात्र नक्की होते. विनायकची जादू खेडमध्येही पसरू लागली. नवनवे सदस्य सामील होत होते. एकदा त्याचा लेख आला- ज्यात १० वर्षाचा सदस्यही मोठमोठ्या फेऱ्या मारत असल्याचे समजले. कोकणातील रस्ते म्हणजे ५-६ किमी वर चढण आलीच. मात्र ह्या छोट्या सदस्याच्याही पुढे अश्या या मोठमोठ्या चढणी नतमस्तक होऊ लागल्या होत्या. खेड सायकल क्लब (KCC) आकाराला आला. विनायकने खेड तालुक्याचा नकाशाच भिंतीवर टांगला. आणि मग सुरू झाली तालुक्यातील प्रत्येक गावावर स्वारी. रविवार असो वा सोमवार, वेळ मिळेल तसा KCC चे सदस्य गाव अन गाव पिंजून काढू लागले. ह्या विषयी लिहिताना विनायकाची लेखणी आणखी बहारदार होत होती. आधी कोकणातील चिवट सायकलपटू आणि त्यात कोकणातील निसर्ग..ह्यांचा मिलाफ त्यात विनायकाची लेखणी हा त्रिवेणी संगम जमला होता. 

श्विन आता खेडला जाण्यासाठी निमित्तच शोधत होती. विनायक प्रमाणेच सायकलवेड वाढवण्याचा श्विनलाही ध्यास होता. त्याचाच एक भाग म्हणून श्विन भारतीय राष्ट्रीय नववर्षाच्या निमित्ताने २१ दिवसांची सायकल मोहीम राबवत असे. यंदा मोहिमेचे सलग चौथे वर्ष होते. मात्र जागतिक महामारीमुळे यंदाची मोहीम लांबली ती तब्बल ८ महिने. यंदा ही मोहीम सुरू करत असताना श्विनने खेडमधील सायकलपटूंनाही ह्या मोहिमेत सामील होण्यास सांगण्याचा विनायकला आग्रह केला. सायकलवेड वाढवण्याची संधी विनायक तरी कसा सोडणार. विनायकच्या सांगण्यावरून खेडचे सायकलपटूही ह्या वर्षी २१ दिवसांच्या मोहिमेत सामील झाले. त्यांच्याशीही 'काय अप्पां'द्वारे परिचय वाढत होताच. २१ दिवसांची मोहीम संपली. मात्र खेडच्या सायकलपटूं चा संपर्क कायम होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त खेडमध्ये एक सायकल रॅली काढण्याचे ठरले. नितीशने श्विनला ह्या रॅलीत सामील होण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. एक दिवस रजा टाकली तर सलग ४ दिवस सुट्टी मिळणार होती. श्विनने विचार केला डोंबिवली-खेड- डोंबिवली साधारण ४५० किमी कापण्यासाठी ४ दिवस पुरेसे होते. श्विनने संधी साधली. श्विनने होकार दिला. मात्र अचानक रॅली रद्द झाल्याचे कळले. आता मात्र विनायकनेच फर्मावले ,'तू येण्याचे ठरवले होतेस ना, मग ये. रॅली रद्द झाली तरी येथील सायकलपटूंबरोबर संवाद साधू'. श्विनला काय तेच हवे होते. श्विनने लगेच होकार दिला.

लगोलग श्विनने जाताना येतानाची आखणी केली. डोंबिवली-कर्जत-खोपोली- पाली मार्गे पहिल्या दिवशी इंदापूर गाठले. दुसऱ्या दिवशी सकाळी महाड येथे शलाका वारंगे हिने नाश्त्यासाठी येण्यासाठी फर्मावले होते. श्विनने उजाडेपर्यंत वाट पाहून सुरुवात केली खरी मात्र लोणारे फाट्यापुढे धुक्याचा जाड पडदा पसरला होता. श्विनच्या विजेरीचा प्रकाश त्या पडद्याला दूर करण्यास असमर्थ ठरत असल्याने श्विनने थांबायचे ठरवले. सुदैवाने शेजारीच एक उपहारगृह दिसले. तिथे चहास्वाद घेत असतानाच श्विनने शलाकाला धुक्यामुळे उशीर होत असल्याचे कळवले. आणि काय आश्चर्य शलाकाला बातमी कळवून भ्रमणध्वनी बंद केला आणि तो धुक्याचा पडदा दूर झाला. 

श्विनने लगोलग महाड गाठले. शलाकाच्या घरी भरपेट पेटपूजा होत असतानाच तिच्या दोन्ही कन्यांबरोबर गप्पाष्टकही रंगत होते. खरेतर आधीच्या- म्हणजे रॅली होणार असती तर ठरवलेल्या- योजनेप्रमाणे कालचा मुक्कामच शलाकाच्या घरी होणार होता. मात्र रॅली रहित झाल्यामुळे मी आधी इंदापुरला मुक्काम केला होता. त्यामुळे शलाका नाराज होतीच. त्यामुळे मीही निघण्याची घाई न करता पुरेपूर पेटपूजा करून घेतली. गृहमंत्री, इंदापूर आणि शलाका तिन्ही ठिकाणी कशेळी खवटीचा घाट टाळून विन्हेरे मार्गे खेडला जाण्याचा सल्ला मिळाला होता. त्याप्रमाणे शलाकाने विन्हेरेच्या मार्गालाही लावून दिले. रस्ता सुंदरच होता.  


कोकणातील घाटांची ओळख करून घेत श्विनने खेड गाठले. विनायकची तसे पाहिले तर ही पहिलीच भेट. मात्र भेटताक्षणीच आमचे बालपणीपासूनचे संबंध असल्याची खात्री पटत होती. घरामागे त्याने फुलवलेली बाग पाहून शहरात आपण कोणत्या ठेव्याला मुकत आहोत ते कळत होते. विनायक मूळचा इथलाच. डोंबिवली, अंबरनाथ इथल्या वास्तवाने त्याची खेडची ओढ कमी झाली नव्हती तर वाढली होती. 

इथल्या रानमेव्याने विनायकने श्विनला तृप्त केले. अर्थात जवळपासचा निसर्ग श्विनला दाखवल्याशिवाय ही खेडवारी पूर्ण होणार नव्हती. विनायकने आसपास फेरफटका मारायचा प्रस्ताव ठेवताच श्विनला आजचे शतक थोडक्यात हुकल्याची आठवण झाली. मात्र विनायकने स्वयंचलित दुचाकीने जाण्याचा प्रस्ताव ठेवला. तो सायकलने जिथे जातो तिथे स्वयंचलित दुचाकीनेच जाण्याचा प्रस्ताव त्याने का ठेवला ह्याची प्रचिती मात्र लगेचच आली. वाट उभ्या चढणीची होतीच, शिवाय डांबरीकरण नावालाच होते. पहिल्या टप्प्यालाच श्विनने विनायकच्या स्वयंचलित दुचाकीने जाण्याच्या प्रस्तावाबद्दल आभार मानले. मात्र ही केवळ सुरुवात होती. संपूर्ण चढ संपेपर्यंत तर श्विनने संपूर्ण शरणागती पत्करली होती. चढ संपल्यावर मात्र आसपासचा निसर्ग, तेथील मंदिर देहभान हरवून टाकत होते. 





अर्थात तिथे फार वेळ थांबता येणार नव्हते. घड्याळबाबा मानगुटीवरच बसले होते.  घरी परत गेल्यावर KCC चे सदस्य आवर्जून भेटायला आले. नितीश, अमीत लढ्ढा,  मिलिंद बोडस ह्यांच्याबरोबर गप्पा रंगत होत्या. हेच नव्हे तर KCC मधील एकेक सदस्य हा हिरा होता. सदस्य संख्येपेक्षा सदस्यांची गुणवत्ता किती महत्वाची असते हे KCC तील सदस्यांकडे पाहून कळत होते. घड्याळ बाबांच्या धाकामुळे महफिल आवरती घ्यावी लागली. 


रात्रीचे जेवण ही मेजवानीच होती. एकूणच विनायकच्या घरी पोचल्यापासून कोकणातील पदार्थांचे वैविध्य जाणवत होते. कंदमुळांपासून ते श्रीखंडापर्यंत असे निरनिराळे पदार्थ रसनेची तृप्ती करत होते. जेवण करून पोट भलेही भरले असेल पण विनायकबरोबर गप्पागोष्टी करत मन भरत नव्हते. खरतर 'दिल मांगे मोअर' अशी परिस्थिती होती. अखेर नाईलाजानेच निद्रादेवीच्या स्वाधीन झालो. दुसऱ्या दिवशी विनायकचा निरोप घेऊन परतणे श्विनला मान्य होत नव्हते. अखेर लहान मुलाप्रमाणे गावाला जाऊन घरी परताना होणारे मानसिक द्वंद्व सहन करतच श्विनने विनायकचा निरोप घेतला. 




४ टिप्पण्या:

  1. धन्य आहेस तू आणि विनायक. . .खरच सायकलने कोकणात फिरण्याची मजा काही औरच असेल . . त्यातही एका"भटक्याला भेटला दुसरा भटक्या"

    विनायकरावांच्या KCC ला अनेक शुभेच्छा 🙏👍🚴🏿‍♂️

    उत्तर द्याहटवा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...