बुधवार, २४ मार्च, २०२१

मागोवा


 दिनांक : भारतीय सौर चैत्र ३, १९४३


तीन दिवसांपूर्वी -रविवारी- संपलेल्या राष्ट्रीय वर्ष १९४२ चा मागोवा


भारतीय राष्ट्रीय वर्ष १९४२...

अखेर हे वर्ष संपले.. ह्या वर्षाने आपल्याला काय दिले ह्याचा हा मागोवा...


हे वर्ष सुरू झाले ते व्यायाम, प्रतिकारक्षमता ह्यांचे महत्व पटवून देतच! 'Survival of the fittest' ह्या उक्तीचा पडताळा ह्या वर्षात सगळ्यांना आला.


सायकलवणे हा कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त फायदा देणारा व्यायामप्रकार. गेल्या अनेक वर्षात सायकलवण्याचे महत्व कळले नसेल ते ह्या एका वर्षाने शिकवले. 

वाहतूक करण्यास इतर मार्ग बंद झाल्याने काहीजण निव्वळ नाईलाज म्हणून सायकलकडे वळले. काहीजण चक्क ५०० ते १००० किमी अंतर कापत कर्मभूमीकडून मायभूमीकडे सायकल चालवत परतले. 


एका तरुणीने तर चक्क तिच्या वडिलांनाही सायकलवरून घरी परत नेले. ह्या सगळ्यांची सायकल चालवण्याची जिद्द वाखाणण्यासारखी होती. त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले गेले. मात्र मला एक शंका सतावत होती, हे लोक सायकलकडे वळले ते त्यांना सायकलविषयी प्रेम होते म्हणून की निव्वळ नाईलाज म्हणून! ह्यांनी ताबडवत गावापर्यंत नेलेल्या सायकलबद्दल ह्यांना खरोखरीच काही प्रेम आहे का? की ते गावाला पोचल्यावर ह्या सायकली अडगळीत टाकल्या जातील? वर्ष संपल्यावर ह्या प्रश्नांची उत्तरे आता तरी मिळायला हवी. ह्या लोकांच्या सायकल चालवण्याचे जे कौतुक केले जात होते ते सार्थ होते का? हे आता तरी कळायला हवे. ज्या सायकलने ह्यांना मदत केली, तिची ह्यांनी काय निगा राखली आहे हे समजायला हवे.


ह्या वर्षभरामध्ये सायकलची खरेदी सुरुवातीलाच प्रचंड प्रमाणात वाढली. विक्रेते, उत्पादक ह्यांना सुगीचे दिवस आले ह्यात आश्चर्य नाही. नेहमीपेक्षा एकदम १० पटीने विक्री होऊ लागली. मात्र ह्याचा सायकल बाजारावर उलट परिणाम जाणवू लागला. मागणी आहे, मात्र पुरवठा अपुरा पडू लागला. वर्ष संपले तरी सुरळीत पुरवठा कधी सुरू होईल ह्याची शाश्वती नाही.


मात्र ह्या कालावधीत काही सायकलपटूंनी मात्र मनसोक्त सायकलप्रवास केला. काहीजणांनी आपले ऑफिसच पाठीवर घेऊन देशभ्रमंती केली. पाठीवर लॅपटॉप, स्लीपिंग बॅग घेऊन हे स्वार सायकलसफरीवर निघाले होते. रोज पहाटे सायकलची रपेट करून सकाळी १०-११ ला हे सायकलपटू एखाद्या धाब्यावर थांबत. तिथेच लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत. काम आटोपून संध्याकाळी पुन्हा सायकलची रपेट करत. दिवसभरात ऑफिसच्या कामासह ह्यांनी जवळपास शतकी पल्ला गाठलेला असे. ह्या सायकलपटूंनी १५-२० दिवसात मुंबई हुन कन्याकुमारीही गाठली होती.


सगळ्यांना ऑफिसच्या कामासह सायकलसफर करता आली नाही. काही जणांना तर नोकरी गमवावी लागली होती. मात्र त्यांनीही निराश न होता ह्या कालावधीत सायकलवरून भारतभ्रमण केले. 


एक सायकलस्वार तर इतका जिद्दी होता की त्याच्याकडे सायकलही नव्हती. भावाची मोडकळीला आलेली सायकल ह्याने पहिली. स्वतःचा कॅमेरा विकून आलेल्या पैशातून त्याने ती सायकल दुरुस्त करून घेतली... आणि अवघ्या दीडशे रुपयांसह ह्याने केरळमधील आपले गाव सोडले. जिथे थांबेल तिथे चहाविक्री करायची, मिळतील ते पैसे गाठीला बांधून पुढील प्रवास सुरु करायचा. अश्या पद्धतीने ह्या पठ्ठ्याने दक्षिणोत्तर भारत चक्राकांत केला. 


पाठीवर ऑफिस बांधलेली मंडळी असो की चहाविक्री करत रपेट करणारा तरुण असो ... पेट्रोल पंपाच्या आवारात रात्र काढण्याचीही ह्यांची तयारी होती.


अत्यंत कमी भांडवलात संपूर्ण देश फिरता येतो हा विश्वास ह्या तरुणांनी दिला.


आबाल वृद्धांना प्रतिकारशक्तीचे महत्व पटवण्याबरोबरच, जिद्द, धैर्य, चिकाटी ह्या सर्व गुणांची महती पटवण्याचेही काम सरत्या राष्ट्रीय वर्षाने अतिशय सहजतेने आणि अचूकपणे केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...