प्रत्यक्ष ब्रम्ह, विष्णू आणि शिव ह्यांच्यासाठी विशेष असलेल्या दिवशी सोमराज प्रसन्न असणे स्वाभाविकच.
सोमराज जरी प्रसन्न असले तरी रविराज दक्षिणेकडे मार्गस्थ होऊन दीड महिना होत होता. त्यामुळे हल्ली रविराज थोडा आळस करू लागले होते. रविराजांचे आगमन जरी थोडे उशिरा होत असले तरी ते अजूनही थोडे लवकरच तेजाने झळकू लागत. त्यामुळे रविराज डोक्यावर येण्या अगोदर आपण घरी परतणे आवश्यक आहे ह्याची खूणगाठ बाळगत फुजी बरोबर रमेशकाका आणि प्रसाद उषःकालीच मार्गस्थ झाले. PR नाका सोडला तेव्हा अजून रविराज क्षितिजावर यायचे होते. पेंढरकर महाविद्यालयामार्गे शिळ कल्याण हमरस्त्याला लागल्यावर मात्र फटफटू लागले होते. तिघेही एकामागोमाग एक जात होते. हळूहळू लय साधत होती. मात्र वेग पकडला नव्हता. तिघांच्या गप्पा सुरू होत्या. पुढील कार्यक्रमाविषयी चर्चा सुरू होती. पत्रिपुलामार्गे दुर्गाडी पुल ओलांडल्यावर मात्र फुजीला स्फुरण चढले. ती झपाट्याने जाऊ लागली. रमेश काका आणि प्रसाद पाठोपाठ होतेच.
रांजनोलीच्या पुढे ठाणे नाशिक महामार्ग ओलांडल्यावर उन्नत मार्गाने जाता येईल का याची तिघजण चाचपणी करू लागले. मात्र उन्नतमार्ग वंजारपट्टीच्या दिशेने जायला बंद असल्याचे लक्षात आले. खालून जाणारा रस्ता चांगल्या स्थितीत नव्हता तसेच रहदारीचाही होता. मात्र आता इलाज नव्हता. तिथून झपाट्याने मार्ग काढत तिघांनी शेलार गाव गाठले. तिथेच डावे वळण घेताच औद्योगिक गाळ्यांनी वेढलेल्या आणि फुटक्या रस्त्याने तिघांचे स्वागत केले. मात्र अजून तिथे फारशी रहदारी सुरू झाली नव्हती. थोड्या वेळातच जूनांदुरखी गावाजवळ तिघ पोचले. एव्हाना रमेशकाका आणि प्रसादने आघाडी घेतली होती. त्यांच्या पाठी एक मालवाहू वाहन जात होते. रमेश काका आणि प्रसाद ह्यांना गाठून पुढे जाण्यासाठी ते धुड अपयशी ठरत होते आणि त्या वाहनाच्या मंदावलेल्या वेगामुळे फुजीचाही वेग मंदावत होता. रस्ता अरुंद असल्याने फुजिला बाजूनेही पुढे जाता येत नव्हते.
त्या वाहनामागे लगोलग राहिल्यामुळे त्या फुटक्या रस्त्यातील खड्डे फूजीला दिसत नव्हते. अश्याच एका खड्यात फुजीचे मागचे चाक थोडे आपटल्याचे अस्मादिकांना जाणवले. थोडा अंदाज घेत फुजिने मार्गक्रमण सुरूच ठेवले. फुजी व्यवस्थित मार्ग कापत असली तरी अस्मादिकांनी एकदा तिची प्रकृती पाहण्याचे ठरवले. दुर्दैवाने अस्मादिकांचा अंदाज खरा ठरला. फुजीच्या मागच्या चाकातील हवा किंचित कमी झाली होती. भ्रमणध्वनीद्वारे प्रसादला कळवताच तो आणि रमेश काका लगेचच परत आले.
समोरच एक चाळवजा वाडा दिसत होता. समोर अंगणही होते. प्रसादने लगेचच तिथे जाऊन फुजीवर उपचार करायचे ठरवले. फूजीच्या मागच्या चाकातील रबरी नळीचे हे वर्षभरात पाचवे छिद्र होते. (गेल्याच रविवारी चौथे छिद्र बुजवण्याचा योग आला होता). आताही हे छिद्र बुजवण्याचा जामानिमा अस्मादिकांकडे होता. मात्र प्रसादने नवी रबरी नळीच उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर ती नळीच बदलण्याचा निर्णय घेतला गेला.
फुजिवर उपचार करण्यात तिघेही शल्यविशारद पराकाष्ठा करत होते.
जवळपास पाऊण तास ह्या शल्यक्रियेमध्ये गेल्यावर फुजी पुन्हा एकदा सज्ज झाली. आता मात्र तिघांनी पारोळला जाण्याऐवजी आणखी चार पाच किमी वर जाऊन लगेच परतायचा निर्णय घेतला. चिंबिपाडा येथे पोचताच अस्मादिक आणि रमेशकाकांना येथील चहाकेंद्रावर मागील खेपेस थांबल्याची आठवण झाली. केरळहून काश्मीरला निघालेल्या हशिमला साथ करत तेव्हा दोघं डोंबिवलीहून शिरसाड फाटा पर्यंत ह्याच मार्गाने गेले होते. ती आठवण जागवत आजही त्याच चहाकेंद्रावर थांबा घेतला.
चहाबरोबरच गप्पाही छान रंगल्या होत्या. एव्हाना रविराज त्यांचा राग आळवू लागले होते. त्यांची मैफिल रंगात येण्याअगोदर आम्हाला घर गाठायचे होते. त्यामुळे तेथूनच आम्ही परतीचा निर्णय घेतला. आजूबाजूला हिरवा रंग पसरला होता. त्या वृक्षराजीने आमच्यावर छत धरल्यामुळे रविराजांचा आमच्यावरील हल्ला थोपवला गेला होता. त्या वृक्षराजीच्या आम्ही मोहात न पडलो तरच नवल!
तेथील निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुन्हा परतीचा मार्ग धरला. इतक्यात समोरून एका तीन चाकी सायकलवरून एक कुल्फिवाला येताना दिसला. तो वर्दी देत असतानाच आसपासच्या पाड्यातील लहान मुले तिथे आली. त्यांना पाहून प्रसादने त्या मुलांना कुल्फी देऊ केली.
त्या मुलांनी कुल्फी घेत पळ काढला खरा, पण त्यांना मिळालेल्या कुल्फिची वर्दी आता आख्या पाड्यावर पसरली होती. प्रसादने कुल्फिदान करून कार्तिकी पौर्णिमेचे पुण्य कमावले खरे मात्र ती बातमी पाड्यावर पसरताच मुलांचा लवाजमा वाढू लागला. तसा प्रसादला पुढील प्रसंगाची चाहूल लागली. तिघेजण पटापट स्वार झाले आणि मार्ग कापू लागले. पुन्हा एकदा शेलार गावाजवळील औद्योगिक परिसर -भिवंडी मार्गे रांजनोली गाठली. तिघांचे घसे कोरडे पडले होते. रविराज अधिकच तप्त झाले होते. निंबू शिकंजी चा आधार घेत आम्ही इंधन भरून घेतले. थोडा वेळ थांबल्यामुळे रविराजांचा त्रागा कमी झाल्यासारखे वाटले आणि अंतरात्मा ही थोडा शांत झाला.
वाटेत ९० फुटी रस्त्याला पुन्हा एकदा नेहमीच्या ठिकाणी अस्मादिकांनी निंबु शिकंजीसाठी थांबा घेतला. तिथे पुन्हा एकदा तृप्त होत तिघांनी आपापले घर गाठले तोपर्यंत रविराजाने मात्र मध्यान्हीची वेळ गाठली नव्हती.










वा, मस्त वर्णन
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाधन्यवाद शशांक ! खूपच छान वर्णन ! आम्ही नशीबवान म्हणून आपल्या सारख्या दिग्गज मंडळी सोबत सायकल रपेट झाली. आपण अशाच छान सायकल रपेटी करत राहू.
उत्तर द्याहटवाThanks Prasad. Actually it's you who inspired me to write today's blog.
हटवा