सायकलने भारत परिक्रमा करत असताना माझा आणखी एक महत्वाचा उद्देश मनात असतो.. तो म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणे.. वाढवणे. तो संपर्क केवळ परिक्रमा करत असतानाच साध्य करायचा असतो असे नव्हे तर परीक्रमेच्या तयारीसाठी देखील जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा माझा प्रयत्न असतो.
आमच्या कन्याकुमारी चेन्नई संघात प्रथमच आठवड्यापेक्षा जास्त दिवसांचा दौरा करणारे अनेक चेहरे होते. असा दौरा करताना सगळ्यात महत्वाचे असते आपल्या सायकलची ओळख आपल्याला असणे. ह्यासाठीच सर्व सहभागी सदस्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्याचा विचार सुचला. मला स्वतःला देखील फारसे तांत्रिक ज्ञान होते असे नव्हे. ह्या उपक्रमासाठी माझ्या डोळ्यासमोर पहिले नाव होते सुमित मोकलचे. खरतर सुमित स्वतःच आमच्याबरोबर यावा अशी माझी इच्छा होती. मात्र तो ह्यासाठी उपलब्ध नसला तरी कार्यशाळा घेण्यासाठी तो लगेचच तयार झाला. सर्व सदस्यांना त्याने सायकल विषयी महत्वाची माहिती थोडक्यात पण नेमकेपणाने दिली.
सायकलची माहिती तर झाली मात्र त्या सायकल कन्याकुमारीपर्यंत नेणे आणि चेन्नईपासून परत आणणे ही व्यवस्था आवश्यक होती. तसेच कन्याकुमारी ते चेन्नई प्रवासात सायकल स्वारांना सहाय्य करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे आवश्यक होते. ह्यासाठी विचारताच सतीश दप्तरी लगेचच तयार झाला. पंढरपूर पदयात्रेसाठी तो नेहमी सहाय्य वाहन नेत असतो. त्यामुळे त्याचा अनुभव आम्हाला उपयोगी पडणार होता. खरतर सतीश हा आमच्या संघातील अकरावा सदस्य म्हणूनच सामील झाला.
कोणत्याही स्पर्धा अथवा मोहिमेसाठी जर गणवेष असेल तर सहभागी सदस्यांचा उत्साह तर वाढतोच शिवाय सांघिक भावनाही वाढीस लागते. डोंबिवलीतील आहारतज्ञ डॉ अर्चना नाईक आणि त्यांचे सहकारी Eatgoodgo चे श्री अजिंक्य परब ह्यांनी आम्हाला जर्सी तर दिलेच शिवाय प्रत्येक सायकलस्वारासाठी खाऊही दिला.
सायकल आणि सायकलस्वार ह्यांची प्राथमिक तयारी सुरू असतानाच मी आणि सर्वानन ह्यांचा तमिळनाडू येथील निवास व्यवस्थेसाठी पाठपुरावाही सुरू होताच. खरतर सर्वानन काही दिवस आधी त्याच्या गावाला जाणार होता. त्याने संपूर्ण मार्गातील व्यवस्था करण्याची पूर्ण खात्री दिली होतीच. मात्र माझीही स्वतंत्रपणे काही व्यवस्था होते का ह्याची चाचपणी सुरू होती. आमच्या मोहिमेबद्दल कळताच TJSB बँकेतील माझी सहकारी स्नेहा शिंग्रीने ताबडतोब संपूर्ण व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तिच्या मार्फत वनवासी कल्याण आश्रमाच्या श्री शरद चव्हाण ह्यांच्याशी संपर्क साधला. स्नेहा केवळ शरददादांचा संपर्क देऊन गप्प राहिली नाही, तर सातत्याने माझाही पाठपुरावा करत होती. शरददादांनी मला पूर्णपणे आश्वस्त केले होतेच. तसेच त्यांनी श्री अभय बापट ह्यांचाही संपर्क साधून दिला. साखळी जोडली जात होती. सायकल सफर आखतानाचा माझा दुसरा उद्देश.. ' जास्तीत जास्त लोकांशी संपर्क वाढवण्याचा..' सफल होत होता.

उत्सुकता वाढते आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा