शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

श्विनची नेरळ राइड

राष्ट्रीय दिनांक सौर २९ चैत्र, १९४१

गुड फ्रायडे म्हणजे या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले होते. येशूच्या बलिदानाचा हा दिवस म्हणून तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो, पण त्याचबरोबर ‘होली फ्रायडे’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इस्टर फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो.
गुड फ्रायडेच्या आधी चाळीस दिवस अॅश वेन्सडे येतो या काळात ख्रिस्ती बांधव आपल्या आवडीच्या कोणत्याही गोष्टीचा त्याग करतात. नंतरचा रविवार- म्हणजे ईस्टर सण्डे हा येशूचा परत प्रकटण्याचा दिवस असतो त्यामुळे ईस्टर संडे मोठ्या आनंदात ख्रिस्ती बांधव साजरा करतात.

ख्रिस्ती कॅलेंडर हे भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर प्रमाणेच सौर कॅलेंडर असल्याने ख्रिस्ती धर्मातील सण तारखांवर आधारित आहेत.

हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे कॅलेंडर मात्र चांद्र कॅलेंडर असल्याने हिंदू आणि मुस्लिम सण तारखांनुसार नव्हे तर तिथीनुसार असतात.

आज गुडफ्रायडे ह्या ख्रिस्ती बांधवांच्या शोकदिनानिमित्त सुट्टी मिळाली असली तरी योगायोगाने हिंदू तिथी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमानजयंती असल्याने हिंदू धर्मीयांसाठी मात्र आनंदाचाच दिवस.

श्विन आणि ट्रेकने आज नेरळपर्यंत मजल मारण्याचे ठरवले होते. सूर्यदेव पूर्वेच्या क्षितिजावरून आकाशात उंचावर पोचल्यावर श्विन आणि ट्रेक राइडसाठी सज्ज झाले. बदलापूर पाइपलाइन रस्त्यावर पोचताच सौमित्र सामंत परत येताना दिसला. डोंबिवली सायकल क्लब (DCC) चे काही शिलेदार मलंग गडाच्या दिशेने गेल्याचे तो सांगत होता. श्विनने मात्र नेरळला जाण्याचा बेत त्याला ऐकवला.

तेथून पुढे जात श्विन आणि ट्रेकने पहिला थांबा घेतला तो थेट अंबरनाथ औद्योगिक परिसरातील 'वैभव स्नॅक्स' या क्षुधाशांतिगृहात. तेथे इडली सांभारची फर्माईश करत ते येण्याची वाट पाहत असतानाच एकजण क्षुधाशांतिगृहात शिरला. त्याच्या पेहरावावरून तोही सायकलिस्ट असल्याचे कळताच श्विनने त्याला आपल्याच मेजावर सामील होण्यास सांगितले. त्याच्याशी गप्पा मारत असतानाच आणखी दोन सायकलिस्ट तेथे आले. ते तिघे होते हिरू आहुजा, सागर मेनन आणि साबळे. आम्हा पाच सायकलीस्टचा इडली सांभरवर ताव मारता मारता चांगलाच फड रंगला. ते तिघेही ५०-७० किमी सायकलिंग करून आले होते आणि घराकडे निघाले होते, तर श्विन आणि ट्रेकची अजून सुरुवातच होती.

एकमेकांबरोबर स्वयंचित्र घेत आम्ही सर्वजण आपापल्या मार्गाला लागलो. एव्हाना घड्याळ १०.३० हा आकडा दाखवत होते. दरवेळी नेरळकडे खेचून नेणाऱ्या 'नेरळ २० किमी' या पाटीकडे आज विश्वासाने पाहत श्विन ट्रेक पुढे निघाले. बदलापूर औद्योगिक परिसरापासून उजवीकडे वळण घेत दोघांनी खरवाई मागे टाकले. वांगणी पार करत असताना लस्सीची तहान ताकावर भागवावी लागली. पुढील रस्ता मोकळा आणि रुंद होता मात्र रविराज पूर्ण तेजाने तळपू लागले होते आणि रस्त्याला लागून वृक्षराजी मात्र अजिबात नव्हती. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने घशाखाली आणि चेहऱ्यावर पाण्याचा मारा करत आगेकूच सुरु झाली.

नेरळ जवळ येत असतानाच निरापानाचाही आनंद घेतला. नेरळ येथे गेल्यावर तेथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्याकडील रिकाम्या झालेल्या बाटल्यांमध्ये पुन्हा पाणी भरून घेणे हे श्विनसाठी सवयीचे झाले होते.  मात्र तेथील थंडगार पाणी लगेच पिता येण्याजोगे नव्हते. माथेरान कडे जाणाऱ्या मार्गा पाशी गेल्यावर तेथे मनसोक्त छायाचित्रे काढून श्विन ट्रेकने जवळच्याच क्षुधाशांतिगृहाकडे मोर्चा वळवला. श्विनचे नेरळमधील हेही एक नित्याचेच ठिकाण! उदरभरण झाल्यावर परतीचा प्रवास सुरु झाला.

एव्हाना पृथ्वीतलावर आदित्यनारायणाचा मुक्त संचार सुरु झाला होताच. खरतर तो आता ऐन भरात आला होता. थोड्या वेळातच पुन्हा चेहरा आणि घसा पाण्याची मागणी करू लागले. काही अंतरावरच पोलिसांचा एक तंबु दिसला आणि त्या तंबूमागे ठेवलेला माठ श्विनने लांबूनच हेरला. तेथे महिला अधिकारी एकटीच उपस्थित होती. माठातील पाणी घेत असताना तिने श्विन आणि ट्रेकच्या सायकलफेरीविषयी विचारणा केली. एवढ्या उन्हात सुरु असलेला तो प्रवास तिला बूचकळ्यात टाकत असला तरी ती स्वतः त्याच उन्हात तिचे कर्तव्य बजावत होती. माठातील पाणी बरेच खाली गेले होते. त्यामुळे त्या महिला अधिकाऱ्याला अजून किती वेळ थांबावे लागेल आणि तोपर्यंत तिला हे पाणी पुरेल का, हा श्विनला प्रश्न पडलेला असताना ती अधिकारी मात्र श्विन ट्रेकला पुरेसे पाणी मिळाले आहे ना याची खात्री करत होती. अश्या अनुभवांमुळे पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांविषयी श्विनचा आदर आणि विश्वास नक्कीच वाढत होता.

वांगणी मागे टाकून खरवाई येण्याच्या मार्गात रस्त्याच्या डावीकडे असलेल्या एका झाडाच्या सावलीत थांबण्याचा मोह श्विनला झाला. रस्त्याच्या थोड्या आतल्या बाजूला काही मोठे वृक्ष हातात हात घालून उभे होते. त्यातील दोन वृक्ष तर एकमेकांना बिलगुनच उभे होते. अशी वृक्षराजी टिकवायची असेल तर बिभास आमोणकर ह्यांच्या कल्पनेतून निघालेल्या #saveoursahyadri ह्या मोहिमेतील तळमळ सर्व लोकांनी जपण्याला पर्याय नाही. दुर्दैवाने आजूबाजूला मात्र विपरीत परिस्थिती होती. त्या सलग वृक्षराजीपासून काही फुटांवरच मातीचा छोटा उंचवटा पोखरलेला होता. रस्त्यापासून काही फूट आतपर्यंत केवळ माती होती आणि तेथे कधीकाळी झाडे असलीच तर त्याचा मात्र मागमूसही नव्हता.

बदलापूर येथे घसा ओला करून रणरणत्या उन्हात श्विन ट्रेक पुढे निघाले. वाटेतच कलिंगडांची रास रचलेला तंबू दिसला. श्विन ट्रेकने लगेचच आजच्या भोजनाची तृप्तता कलिंगडावर ताव मारत पूर्ण करण्याचे ठरवले. कलिंगड गोड आणि रसाळ तर होतेच. पण श्विन आणि ट्रेकला आणखी आनंद झाला कारण त्यांना त्या तंबूमध्ये सावलीत बसून सूर्याला वाकुल्या दाखवता येत होत्या. तेथे बसलेले असताना सुखकर वाराही श्विन ट्रेकचा उत्साह वाढवत होता. त्याचा आनंद घेत स्वयंचित्र काढण्याचाही कार्यक्रम करण्यात आला. जठराग्नी शांत झाल्यावर त्याच तंबूत आडवे होण्याचाही मोह होत होता. मात्र तो आवरत श्विन ट्रेकने पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला. नेवाळी फाटा, तळोजा फाटा, मानपाडेश्वर मंदिर येथून डोंबिवलीमध्ये शिरताना थोडक्यात शतक हुकण्याची शंका डोकावू लागली. मग मात्र सोसायटीच्या आवारात शिरल्यावर सोसायटीला फेऱ्या मारत शतक पूर्ण करण्याचे श्विनने ठरवले.

संपूर्ण प्रवासात अजूनही हनुमानाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे श्विन आणि ट्रेक थोडे खट्टू होते. मात्र टंडन रस्त्याला लागताच मारुतीरायांचे दर्शन तर झालेच शिवाय राम लक्ष्मण यांच्याही सुंदर मूर्तींचे दर्शन झाले. पळस्पे फाट्याकडून रसायनी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील मारुतीरायांच्या विशाल मूर्तीचे दर्शन घेण्याचे श्विन ट्रेकच्या मनात होते. मात्र डोंबिवली -शिळ- पनवेल मार्गातील गर्दी टाळत नेरळ मार्गात एखादे हनुमान मंदिर दिसले तर तेथे मारुतीरायांचे दर्शन घ्यायचे असा विचार दोघांनी केला होता. डोंबिवली- नेरळ- डोंबिवली प्रवासात कोठेही रस्त्याला लागून मारुतीरायांचे दर्शन झाले नव्हते. मात्र टंडन रस्त्यावर मात्र ती मनीषा पूर्ण होत आजची सायकलसफर पूर्ण झालीच शिवाय श्विनची शंका खोटी ठरवत strava आणि endomodo दोघांनीही शतकी राइड पूर्ण झाल्याचीही ग्वाही दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...