सकाळी आम्हाला जाग आली तेव्हा संदीप घरी नव्हता. आम्हाला त्याने ती कल्पना आधी दिली होतीच. माँ ना तर हिंदी येत नव्हते. मात्र त्या माँ होत्या. मुलांना कधी काय हवे असते त्याची कल्पना माँ ना असणारच ना! आम्ही जागे होताच त्यांनी लगेचच ' चा ' असे विचारले. तेही केवळ एकदा चहा देऊन नव्हे तर पुन्हा एकदा. माँ बरोबर आमची दोस्ती होणारच ना!
संदीपने आम्हाला जी खोली राहायला दिली होती त्या खोलीला लागून पुढे ओळीने तश्याच आणखी चारपाच खोल्या संदीपच्या घरात होत्या. त्या सर्व खोल्यांना एक सामायिक असा लांबलचक व्हरांडा तिथे होता. तो व्हरांडा संपल्यावर पुढे बाथरूम होते. संदीपचे घर वास्तविक चांगलेच लांबलचक होते. आमच्या पुढच्या खोलीत माँ, पुढे संदीपची खोली, जेवणाची खोली आणि त्यापुढे आणखी एखाद दोन खोल्या असाव्यात.
आम्हाला आज जमेल तेवढे कोलकाता बघायचे होते. संजयची सायकल हावडा स्टेशनला जाऊन आणायची होती. बेलूर मठ संदीपच्या घरापासून जवळच होता. त्यामुळे बेलूर मठापासूनच कोलकाता दर्शनाची सुरुवात करायचे ठरवले. कोलकाता चेन्नई सायकल सफर आम्हाला बेलूर मठापासूनच करायची होती. मात्र तेव्हा ते जमले नव्हते. त्यामुळे बेलूर मठ दर्शन ह्यावेळी नक्कीच करायचे होते. आवराआवर करून निघालो तेव्हा समजले की बेलूर मठ दर्शनाची सकाळची वेळ संपायला थोडाच अवधी शिल्लक आहे. आम्ही लगबगीने आत शिरलो.
तेथील परिसर देखील थोड्या घाईघाईने पाहिला. मठातूनच दक्षिणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी बोटी मिळतात. आम्ही लगोलग बोट पकडण्यासाठी गेलो. बोट अजून आली नव्हती. आम्ही काही वेळ तेथील प्रतीक्षालयात बसलो. जवळपास अर्ध्या तासाने बोट आली.


आम्ही बेलूर मठातून दक्षिणेश्वर मंदिराकडे बोटीने निघालो. बोट पूर्ण भरलेली होती. हुगळी नदीमधील जलप्रवास करून दक्षिणेश्वर मंदिराकडे जाताच आम्हाला तेथील दर्शनासाठी जमलेली गर्दी दिसली. नदीकिनारी तट बांधलेले होते. मंदिराचे आवार प्रशस्त होते.
बोटीतून दिसणारे दक्षिणेश्वर मंदिर
ख्रिस्ती ग्रेगोरियन शक १८५५ मध्ये राणी रासमानी ह्यांनी हे मंदिर बांधले आहे. दक्षिणेश्वर काली मंदिर किंवा दक्षिणेश्वर कालीबारी हे हिंदू नवरत्न शैलीचे मंदिर आहे. मंदिराची प्रमुख देवता भवतारिणी (काली) आहे, ती महादेवी किंवा पराशक्ती आद्य कालीचे रूप आहे. ती आदिशक्ती कालिका म्हणून ओळखली जाते. चट्टोपाध्याय कुटुंबातील एका तरुणाला येथील पूजा अर्चेचे काम मिळाले होते. त्याच्या मदतीला त्याचा धाकटा भाऊ गदाधर देखील येथे येऊन राहिला. दुर्दैवाने गदाधरच्या थोरल्या भावाचा तरुण वयातच मृत्यू ओढवला. त्याच्या पश्चात मंदिराची जबाबदारी गदाधरवर आली. तो दिवसरात्र देवीच्या पूजेमध्ये मग्न राहू लागला. त्याला देवी ही प्रत्यक्ष त्याच्यासमोर अस्तित्वात आहे ह्यावर ठाम विश्वास होता. तंत्रसाधनेने साकार परमेश्वराची प्राप्ती झालेला गदाधर म्हणजेच श्रीरामकृष्ण. त्यांनी आणि त्यांची पत्नी शारदा देवी ह्यांनी ह्या मंदिराची अनेक वर्ष सेवा केली.
नदीला समांतर थोड्या अंतरावर मात्र मंदिराच्याच परिसरात एका बाजूला एका रांगेत काही उपहारगृहे होती. आम्हाला भूक लागली होतीच. तिथे एक राजस्थानी जोडपे आमच्या बरोबर जेवायला बसले होते. त्याचा एक मोठा गट दर्शनासाठी राजस्थानहून आला होता. आम्हा सगळ्यांना तेथील जेवण आवडले.
मंदिराबाहेर पडत असताना तेथील भिंतीवरील एका संदेशाने माझे लक्ष वेधले. ' जितक्या व्यक्ती तितके मार्ग ' अश्या अर्थाचा तो संदेश होता. खरोखरच इतका व्यापक विचार इतर कोणी केला असेल का! रामकृष्ण मिशन अथवा विवेकानंद केंद्र ह्यांचा हा संदेश मनावर कोरला गेला.
आम्हाला संजयची सायकल हावडा स्टेशनला जाऊन घ्यायची होती. त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये अधिक वेळ न घालवता तेथून निघालो. पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मजा घेत हावडा स्टेशन गाठले. तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला ओळखले. त्यांनी लगेचच संजयची सायकल आम्हाला दिली.
काल मी आणि मनोजकडे सायकल होती तर संजयकडे नव्हती. आता मात्र उलट झाले होते. अखेर संजय सायकल चालवत घराकडे निघाला. मी आणि मनोजने लोकल प्रवास करत बेलूर स्टेशन गाठले. बेलूर स्टेशन कडून संदीपच्या घरी जाताना वाटेत एक सायकल दुरुस्तीचे दुकान दिसले. बहुधा तिथे भाड्यानेही सायकली मिळत असाव्यात.
घरी पोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. आम्ही घरी जाताच माँ चा आवाज आला ' चा' . आम्ही खुश होणारच.
संजय, अस्मादिक, माँ, मनोज आणि संदीप
संदीप आम्हाला म्हणत होता की माँ आणि तुमची आता चांगली मैत्री झाली आहे. त्या आमची चौकशी करत होत्या. संदीप बरोबर तर आमच्या गप्पा रंगत होत्याच. पण माँ बरोबर देखील आम्ही बंगाली vs हिंदी भाषेत गप्पा मारत होतो. आज रात्रीही आमच्यासाठी माँ नी उत्तम स्वयंपाक केला होता. संदीप ने रात्री जेवणासाठी मीहीदाना आणि सीताभोग आणले होते. संदीप आणि माँ ह्यांच्या गप्पा आणि जेवण दोन्हीमुळे आम्ही अगदी तृप्त झालो होतो.
मस्त.. संदीप आणी माँ यांची आठवण झाली
उत्तर द्याहटवा