शांतिनिकेतन येथिल 'सोनाझुरी हाट'चा अनुभव फारच उत्साहवर्धक होता. सोनाझुरी हाट हे लाकडी हस्तकला, टेराकोटा हस्तकला (टेराकोटाचा शब्दशः अर्थ आहे 'भाजलेली माती), कच्च्या धातूचे दागिने, ढोकरा कला आणि स्थानिक बनावटीचे कपडे पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी, शांतीनिकेतनच्या स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे
कोपाई नदीकाठच्या लाल मातीच्या परिसरात, खोई (दरीसारख्या) प्रदेशात आणि सोनाझुरी वृक्षांच्या दाट सावलीखाली भरणारा हा बाजार प्रामुख्याने दुपारी २:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत चालतो. हा एक गावचा बाजार असून येथे स्थानिक हस्तकला वस्तू खरेदी करता येतात. येथे भेट देणारे लोक हाताने बनवलेले 'डोकरा' दागिने, 'कांथा' विणकामाच्या साड्या आणि टेराकोटाच्या (मातीच्या) वस्तूंची खरेदी करू शकतात. त्याच वेळी बाऊल लोकगायक झाडांच्या फांद्यांमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशात आपली कला सादर करतात. मनाला भिडणारे 'बाऊल' संगीत आणि 'संथाल' आदिवासी नृत्याचा आनंदही हा एक विलक्षण अनुभव आहे.
शांतिनिकेतन हे तसे पाहिले तर बोलपूर शहराचा एक भाग आहे. १९ व्या शतकाच्या मध्यास बोलपूर हे एक लहानसे गाव होते. शांतीनिकेतनच्या वाढीबरोबर त्याचाही विकास झाला. रायपूरचे जमीनदार भुबन मोहन सिन्हा यांनी बोलपूर परिसरात एक लहानसे गाव वसवले आणि त्याचे नाव भुवनडांगा ठेवले.
१८६३ मध्ये, देवेंद्रनाथ टागोर यांनी भुबन मोहन सिन्हा यांच्याकडून, दोन सप्तपर्णी (अल्स्टोनिया स्कॉलॅरिस) झाडांसह २० एकर जमीन ५ रुपये वार्षिक भाड्याने कायमस्वरूपी भाडेपट्ट्यावर घेतली. त्यांनी तेथे एक अतिथीगृह बांधले आणि त्याचे नाव शांतीनिकेतन (शांतीचे निवासस्थान) ठेवले. हळूहळू, संपूर्ण परिसर शांतीनिकेतन म्हणून ओळखला जाऊ लागला.
भुवनडंगा हे कुप्रसिद्ध दरोडेखोरांच्या टोळीचा अड्डा होता. दरोडेखोर इतके निर्ढावलेले होते की लोकांना मारण्यात त्यांना काहीच विशेष वाटत नव्हते. देवेंद्रनाथांसाठी संघर्ष आणि चकमकीची परिस्थिती ठरलेलीच. परंतु अखेरीस टोळीच्या म्होरक्याने देबेंद्रनाथांसमोर आत्मसमर्पण केले आणि त्यांनी परिसराच्या विकासात त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. तिथे एक सप्तपर्णी वृक्ष होता, ज्याखाली देबेंद्रनाथ ध्यान करत असत. मूळतः लंडनच्या हाइड पार्कमध्ये १८५१ च्या ग्रेट एक्झिबिशनसाठी बांधलेल्या आणि नंतर स्थलांतरित केलेल्या 'द क्रिस्टल पॅलेस'पासून प्रेरणा घेऊन, देबेंद्रनाथांनी ब्राह्मो प्रार्थनेसाठी ६० फूट × ३० फूट आकाराचे एक सभागृह बांधले. त्याचे छत कौलारू होते आणि जमिनीवर पांढरा संगमरवर होता, परंतु उर्वरित रचना काचेची बनलेली होती. अगदी सुरुवातीपासूनच, हे सगळ्या लोकांसाठी एक मोठे आकर्षण होते.
देवेंद्रनाथ टागोर यांचे पुत्र रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनचा विस्तार केला. रवींद्रनाथांनी वयाच्या १२ व्या वर्षी, फेब्रुवारी १८७३ मध्ये प्रथम शांतीनिकेतनला भेट दिली. १८८८ मध्ये, देवेंद्रनाथांनी एका विश्वस्त कराराद्वारे ब्रह्मविद्यालयाच्या स्थापनेसाठी संपूर्ण मालमत्ता समर्पित केली. १९०१ मध्ये, रवींद्रनाथांनी ब्रह्मचर्याश्रम सुरू केला आणि १९२५ पासून तो पाठ भवन म्हणून ओळखला जाऊ लागला. रवींद्रनाथ टागोर यांनी १९२१ मध्ये स्थापन केलेल्या विश्वभारतीला १९५१ मध्ये केंद्रीय विद्यापीठ आणि राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आले. रविंद्रनाथांच्या दूरदृष्टीमुळे विश्व-भारतीची निर्मिती होऊन हे आताचे विद्यापीठ शहर बनले आहे.
हा परिसर दोन बाजूंनी अजय आणि कोपाई नद्यांनी वेढलेला आहे. पूर्वी शांतिनिकेतनमध्ये विस्तृत जंगल होते, परंतु मोठ्या प्रमाणात झालेल्या जमिनीच्या धूपमुळे काही भाग उजाड दिसू लागले, या घटनेला स्थानिक पातळीवर 'खोई' म्हणून ओळखले जाते. तथापि, वनस्पतीशास्त्रज्ञांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, शहराच्या काही भागांमध्ये संपूर्ण भारतातील वनस्पती आणि झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात. जरी आजूबाजूच्या परिसराचे एकूण पर्यावरण काळानुसार बदलले असले तरी, शांतिनिकेतनच्या मुख्य भागाने निसर्गाशी आपले सान्निध्य टिकवून ठेवले आहे.
१९४२ मध्ये स्थापन झालेले रवींद्र भवन, हे विश्वभारतीचे केंद्रबिंदू आहे. येथे एक संग्रहालय, अभिलेखागार, ग्रंथालय आणि इतर विभाग आहेत.
सोनाझुरी जंगल आणि हाटचा आनंद आम्ही घेतला मात्र ह्याखेरीज विश्व-भारती विद्यापीठ आणि आश्रम, अमर कुटीर आणि बल्लवपूर वन्यजीव अभयारण्य येथे भेट देण्याचा योग मात्र आम्हाला वेळेअभावी मिळवता आला नाही.
विश्व-भारती विद्यापीठ आणि आश्रम येथे आजही मोकळ्या आकाशाखाली वर्ग भरतात. येथील प्रमुख ठिकाणांमध्ये उपासना गृह (काचेचे प्रार्थना सभागृह) आणि रवींद्र भवन संग्रहालय यांचा समावेश आहे.
अमर कुटीर ही कांथा स्टिच, बाटिक प्रिंट्स आणि टेराकोटा यांसारख्या पारंपरिक बंगाली हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध असलेली एक सहकारी संस्था आहे.
कोपाई नदीजवळ वसलेले बल्लवपूर वन्यजीव अभयारण्य हे एक हरीण उद्यान आहे, जे निसर्गाचा एक शांत अनुभव देते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा