शनिवार, २५ जुलै, २०२६

बंगालचा राष्ट्रीय खेळ: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग १९

अहमदपूर येथे चहाचे इंधन मिळाल्यावर तीनही सायकली पुन्हा धावू लागल्या होत्या. ट्रक, टेम्पो, बसेसचे कर्णकर्कश आवाज अजिबात ऐकू येत नव्हते. रहदारी अगदीच तुरळक होती. त्यामुळे आम्ही अगदी आरामात पुढे जात होतो. दोनेक तासाने पोटातील कावळे ओरडू लागले. तोच काय तो आवाज ऐकू येई लागला. मात्र वाटेत कुठेही खाद्य केंद्र दिसेना. वाटेत एक गाव दिसले खरे. मात्र तिथे थोडा फार बाजार रस्त्याला लागला तरी हॉटेल, खानावळ दिसले नाही. बाजारात फळे दिसली. मनात विचार आला की निदान फळे तरी घेऊ. पण लगेच दुसऱ्या विचाराने त्यावर मात केली...पुढे एखादे हॉटेल असेलच की! पण हा दुसरा विचार मारक ठरला. खाणे राहो, चहासुद्धा दिसेना.

आम्ही पानागढ मोरग्राम राज्यमार्गावरून जात होतो. थोड्याच वेळात रस्त्याच्या डावीकडे थोडी गर्दी दिसली. त्या बाजूला न्याहाळत मी जात होतो. डावीकडे एक मोठे मैदान असावे.  तिथे बघे जमले होते. त्यांच्या पलीकडे मैदानात काय आहे हे मला दिसत नव्हते. मात्र कॉमेन्ट्रीचा आवाज कानावर आला. कॉमेन्ट्री चालू आहे म्हणजे तिथे एखादा सामना सुरू असणार...सामना म्हणजे क्रिकेट...हा माझा मुंबईकर अंदाज होता. क्रिकेट... मग ते लॉर्ड्स असो की दोन चाळींमधील अडनिड्या अरुंद जागेतील क्रिकेट असो...दोन क्षण का होईना थांबणार नाही तो मुंबईकर कसला! मी माझ्या क्रिकेटप्रेमाला जागत सायकलचा वेग कमी करत पेडलवर उभे राहून पाहण्याचा प्रयत्न केला. बघ्यांच्या बाजूने पाहिले तर तिथे झाडांच्या फांद्या मध्ये येत होत्या. कॉमेन्ट्री रंगात आली असली तरी ती बंगाली भाषेत होती. त्यामुळे त्यावरूनही मैदानातील खेळाचा अंदाज येईना. मग मात्र मी सायकल थांबवली. ती बाजूला घेत मैदानात पाहिले... सामना चांगलाच रंगात आला असावा... मात्र तो क्रिकेट नव्हे, फुटबॉलचा होता. 




मुंबईमध्ये अशी गर्दी, कॉमेन्ट्री फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी अनुभवण्याची सवय असलेल्या अस्मादिकांना आपण महाराष्ट्रात नव्हे बंगालमध्ये असण्याचे भान आले. बंगालचा 'राष्ट्रीय खेळ' बघण्यात मीदेखील काही क्षण गुंग झालो. फुटबॉलच्या सामन्यापुढे आमची भुकेची जाणीवही विरून गेली होती.

मात्र पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केल्यावर जठराग्नीचा दाह जाणवू लागला. इंधनाअभावी आमचा वेग मंदावला होता. वेग मंदावल्यामुळे अंतर कापायला आणखीच वेळ वाढू लागला. आमचे ' काम, काळ, वेग ' हे त्रैराशिक बिघडू लागले. अर्थातच माझ्याकडे रघुनाथगंज, उमरपूरपेक्षा वीसेक किमी कमी अंतरावरील सागरदिघीचा पर्याय होताच. संदीपप्रमाणेच गंधारनेही सागरदिघीला राहण्याबद्दल सांगितले होते. अखेरीस दुपारी १.३० -२ च्या सुमारास आम्ही नलहाटी येथे पोचलो. तिथे उजवीकडे वळण घेतले आणि एक छोटेसे खोपट दिसले. पोटातील कावळे फारच कावकाव करत होते. त्या खोपटात फार काही खायला दिसत नव्हते. मात्र आता भुकेला कोंडाही चालणार होता. सायकली त्या खोपटाच्या भिंतीला लावल्या. तिथे चॉइस करायला विशेष वाव नव्हताच. दोनतीन पदार्थच उपलब्ध होते. आम्ही खायला बसलो इतक्यात शाळकरी मुलांचा घोळकाच तिथे खायला आला. ते खोपट इतके छोटे होते की आम्ही तीनजण आणि ते शाळकरी ८-१० जण इतक्या लोकांना बसायला जागाच नव्हती. आम्ही पटापट आवरून त्या मुलांना बसायला जागा करून दिली.

अब्दुल अझीझ.. आमचा रघुनाथगंज येथील यजमान ह्याला फोन लावला. त्याला म्हटले आज आम्ही मुक्कामाला येऊ शकत नाही. इतक्या लांबवर अंधाराच्या आत पोचू असे वाटत नाही. त्याने आमचे ठिकाण विचारले. मी नलहाटी येथे आहे असे म्हणताच तो खात्रीपूर्वक म्हणाला की आम्ही नक्की रघुनाथगंज येथे पोहोचू. मी त्याला सांगितले की आमचा वेग कमी आहे. आम्ही उमरपूर येथे किंवा सागरदिघी येथे मुक्काम करू. अब्दुल मात्र आग्रह करतच होता. अखेरीस मी त्याला म्हटले की आम्ही ४ च्या सुमारास अंदाज घेऊ. आम्ही अंधारात सायकल चालवणार नाही. ५-५.३० ला अंधार पडेल असा माझा अंदाज होता. 

रघुनाथगंज अजूनही ४०-४२ किमी दूर होते. आमचा वेग लक्षात घेता आम्हाला अजूनही तीन तास सायकलवायला लागणार होते. त्याखेरीज वाटेत पुन्हा एक थांबा घ्यावा लागणार होता..त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सागरदिघी येथेच थांबण्याचा विचार करू लागलो. मात्र इंधन आमच्या पोटात जाताच आमच्या सायकली वेगात दौडू लागल्या.  



तासाभरातच आम्ही मोरग्राम येथील तिकाण्यावर पोचलो. इथे आम्ही पुन्हा कोलकाता गुवाहाटी महामार्गाला लागत होतो. डावीकडे उमरपूर तर उजवीकडे पुन्हा कोलकाता. सागरदिघी इथून ८ किमी वर होते. मात्र त्यासाठी पुन्हा थोडे कोलकात्याच्या दिशेने जाऊन मग बोटीने जावे लागणार होते. बोटी किती वाजेपर्यंत असतात ह्याचाही अंदाज नव्हता. आम्ही सागरदिघी रद्द केले आणि अब्दुलला सांगितले आम्ही उमरपूर येथे राहणार आहोत. तिथून पुढे रघुनाथगंजला येऊ शकणार नाही. अब्दुल पुन्हा म्हणाला तुम्ही उमरपूर येथे आलात तर रघुनाथगंजला नक्की पोहोचाल. तुम्ही नक्की माझ्याकडेच या.





मी अब्दूलला म्हटले आम्ही उमरपूर येथे पोचल्यावर तुला फोन करतो. अब्दुल मात्र अगदी आग्रहाने आम्हाला बोलावत होता. आम्ही त्या तिकाण्यावर डावीकडे उमरपूरच्या दिशेने वळण घेतले. आता उमरपूर जेमतेम १७ किमी अंतरावर होते. साधारण तास सव्वा तासात आम्ही पोहोचू असा अंदाज होता. आम्ही थोडा वेग घेतला. कारण उमरपूरला राहायचे ठरले तर उजेडातच हॉटेल शोधलेले बरे असे वाटत होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...