सूर्यमंदिराचा परिसर पाहून होईपर्यंत सूर्यास्त होऊन गेला होता. कोणार्कहुन आमची गाडी पुरीकडे निघाली. कोणार्क ते पुरी हे अंतर मोटारीने साधारण तासाभराचेच होते. आम्ही पुरी येथे पोचलो मात्र अग्रिमाची गाडी अजूनही पुरीला पोचली नव्हती. तिने आम्हाला सांगितले की तुम्ही मंदिरात जा, तिथे मार्केट आहे तिथे फिरा, प्रसादाचे जेवण मिळते ते खा.....मात्र मी आल्याशिवाय मुख्य मंदिरातील दर्शन घेऊ नका. तिथे मिळणारा छप्पन भोग नक्की खाण्यास तिने सांगितले. मार्केट मध्ये फिरून आणि खाणे झाल्यावर आम्ही पुन्हा बाहेर येईपर्यंत ती मंदिरापाशी येईल असे तिने सांगितले.
ह्या मंदिराविषयी अनेक आश्चर्यकारक गोष्टी प्रचलित आहेत ज्या भाविकांना आणि संशोधकांनाही मोहित करतात. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे मंदिरावरील ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. याव्यतिरिक्त, मंदिराच्या वर कोणतेही पक्षी किंवा विमान उडत नाहीत आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी त्याची सावली पडत नाही असे म्हटले जाते. आणखी एक मनोरंजक घटना म्हणजे समुद्राचा आवाज, जो पुरीमध्ये इतरत्र ऐकू येतो परंतु मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या, सिंहद्वारममध्ये तो ऐकू येत नाही. शेवटी, महाप्रसादाची स्वयंपाक प्रक्रिया, जिथे वरच्या भांड्यात सात जणांच्या रचनेमध्ये प्रथम शिजवले जाते आणि तयार केलेले अन्न नेहमीच भाविकांच्या संख्येसाठी पुरेसे असते, हे देखील चमत्कार मानले जाते. मंदिराच्या वर असलेले सुदर्शनचक्र आपण शहरात कुठेही असलो तरी आपल्या समोर आहे असेच वाटत राहते.
हिंदू पौराणिक कथेनुसार,भगवान श्रीकृष्णाच्या मृत्युनंतर, त्यांच्या शरीराचे दहन करण्यात आले, परंतु त्यांचे हृदय, ज्याला ब्रह्म पदार्थ म्हणून संबोधले जाते, ते चमत्कारिकरित्या अबाधित राहिले. भगवान श्रीकृष्णाचे हृदय ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये ठेवलेले असल्याचे मानले जाते.

जगन्नाथाचे दर्शन घेण्यास आम्ही उत्सुक असलो तरी गाडी मंदिरापासून थोडी लांबवर थांबवावी लागत होती. गाडी थांबवून आम्ही मंदिराकडे निघालो. दोन्ही बाजूला दुकाने दिसत होती. रस्त्याला चांगलीच गजबज दिसत होती. अग्रीमाने जे मार्केट सांगितले ते मंदिराच्या आवारात की हेच जे आम्हाला गाडी थांबवून मंदिराकडे जाताना रस्त्यात दिसत होते ते... ह्याबद्दल आम्हाला संभ्रम वाटू लागला. तिने जो छप्पन भोग खायला सांगितला होता तो पदार्थ कसा असतो हेही माहित नव्हते. त्यामुळे जाता जाता रस्त्यात दिसला तरी आम्हाला कळणार नव्हते. आम्ही रस्त्यातील दुकानांकडे दुर्लक्ष करत थेट मंदिरात जायचे ठरवले.

रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर न्हाऊन निघाला होता. बाहेरूनदेखील मंदिराची सुंदर वास्तू मन प्रसन्न करत होती. आम्ही झपाट्याने प्रवेशद्वाराकडे जात होतो. अग्रीमाने मंदिराविषयी एक विशेष माहिती दिली होतीच ते म्हणजे मंदिरात मोबाईल, पिशव्या, चप्पल अश्या कोणत्याही गोष्टी नेता येत नाहीत. त्या ठेवण्यासाठी आजूबाजूला सरकारी आणि खाजगी कार्यालये असतात. मोबाईल नेता येत नसला तरी पैशांचे पाकीट मात्र आत नेता येत होते. अर्थात नाहीतर आतमध्ये असलेल्या मार्केटमध्ये आम्ही खरेदी कशी करू शकणार किंवा तेथील खाद्यपदार्थ तरी कसे घेऊ शकणार होतो?

एका कार्यालयात आमचे सामान ठेवून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. इथे प्रत्येक मुख्य दिशेच्या नावावरून वेगवेगळी प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर आम्ही आधी छप्पन भोग शोधायचे ठरवले. तिथे हारीने गोड पदार्थ, मिठाया ह्यांची दुकाने दिसत होती. सगळी दुकाने पाहत पाहत आम्ही पालथी घातली. शेवटी एका दुकानाकडे मोर्चा वळवला. वेगवेगळ्या प्रकाराच्या मिठाया तिथे दिसत होत्या. दुकानदाराला त्यांचे नाव विचारून आम्ही एकेक मिठाई खात होतो. छप्पन भोगही तिथे खायला मिळाला. अग्रिमाने छप्पन भोग खायला इतके वेळा सांगितले होते की तो खाणे आम्ही विसरूच शकत नव्हतो. पाच सहा प्रकाराच्या मिठाया खाऊन झाल्यावर आम्ही त्या दुकानदाराला प्रसादाचे ताटही द्यायला सांगितले. तो दुकानदार आणि तेथील सेवेकरी बोलण्यात अतिशय नम्र तसेच समोरच्याचे ऐकण्यात, समजून घेण्यात तत्पर होते. प्रसादाचे ताट संपवले पण आम्ही दर्शन घेतले नव्हते. अग्रीमा येऊन पोचली असली तरी आमचे मोबाईल बाहेर होते त्यामुळे आम्हाला कळू शकणार नव्हते. त्यामुळे आम्ही लगेचच बाहेर येऊन आमचे सामान परत घेतले. मी अग्रिमला फोन लावला तर ती माझ्या फोनची वाटच पाहत होती. आम्ही ज्या प्रवेशद्वारापाशी होतो तिथे तिला बोलावले. पुन्हा एकदा सामान एका दुकानात ठेऊन तेथील कूपन घेतले. आमच्या चौघांचेही सामान ठेवण्यासाठी दुकानदाराने एकच कूपन दिले होते.

अग्रीमाबरोबर आम्ही पुन्हा मंदिराच्या आवारात शिरलो. तिला काहीही खायला नको होते. रात्रीचे ९ चा सुमार झाला असावा. आम्ही मुख्य देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्यास उत्सुक होतो. तिथे तर चांगलीच रांग लागली होती. आम्ही गुपचुप रांगेत उभे राहिलो. १५- २० मिनिटे गेल्यावर एका सुरक्षारक्षकाने आम्हाला सांगितले मंदिरातील प्रवेश आत्ता थांबवण्यात आला आहे. तो दीड तासाने पुन्हा सुरू होऊ शकतो. आम्ही रांगेतच उभे राहिलो. आमच्या पुढेही रांगेत बरीच गर्दी होती. इतक्यात एक द्वार रक्षक आमच्याकडे आला आणि आम्हाला म्हणाला तुम्ही रांगेत न थांबता कुठेतरी बसून घ्या कारण दर्शन दीड तासानेही लगेच सुरू होणार नाही. कदाचित दोन तासदेखील मंदिर बंद राहील. आमची चलबिचल सुरू झाली कारण आम्हाला परत भुवनेश्वरला सुशांतच्या ऑफिसमधील लोकांना उठवावे लागणार होते..शिवाय पहाटे लवकर सायकलवणेही सुरू करायचे होते. त्यामुळे मी, आनंद आणि संजय ह्यांनी दर्शन न घेता परत जाण्याचे ठरवले. पण अग्रीमा ऐकायला तयार नव्हती.
मी अग्रीमाला म्हटले आम्ही इथे तीन तास थांबूनही आम्हाला दर्शन मिळत नाहीये, आम्हाला भुवनेश्वरसाठी निघणेही आवश्यक आहे. कदाचित ही देवाचीच योजना असावी की आपल्याला त्याचे दर्शन मिळू नये. वैष्णोदेवी, अमरनाथचेही दर्शन तेव्हाच मिळते जेव्हा देवाच्या मनात तसे येते. त्यावर ती म्हणाली,'शशांक तुझे म्हणणे मला पटलेही असते, मात्र... आत्ता मी कटक स्टेशनवर जेव्हा आले तेव्हा ट्रेन सुरू झालेली होती. मी मनात म्हटले जर मी दर्शन घ्यावे अशी देवाची इच्छा असेल तर ही गाडी थांबेल. आणि क्षणभरात गाडी थांबली, मी गाडीत चढल्यावर गाडी सुरू झाली. ह्याचा अर्थ मी देवाचे दर्शन घ्यावे ही देवाचीच इच्छा आहे.'
ह्यावर आमच्याकडे काहीच उत्तर नव्हते. तरी तिला एकटी तिथे सोडायला आमचे मन मनात नव्हते. अखेरीस मी आणि संजय बाहेर जाऊन आमचे सामान सोडवून घ्यावे, तिथे संजय थांबेल आणि मी परत अग्रिमाच्या सामानाचे कूपन घेऊन परत रांगेपाशी येईन तोपर्यंत दर्शन सुरू झाले तर ठीक असे आम्ही ठरवले. ह्या सगळ्यात आणखी १५- २० मिनिटे गेली. मात्र दर्शन अजूनही सुरू झाले नव्हते. अखेर नाईलाजाने मी आणि आनंद अग्रीमाला तिथे सोडून बाहेर आलो. संजय, आनंद आणि मी परत गाडीकडे गेलो न गेलो तोच आग्रिमाचा मला फोन आला. ज्या अर्थी तिचा फोन आला त्या अर्थी ती मंदिराच्या बाहेर आली होती, कारण फोन मंदिरात नेता येत नव्हता. मला वाटले तिनेही दर्शन न घेता परत यायचे ठरवले असावे. ती अतिशय उत्साहाने बोलली, तुम्ही थांबा मी दर्शन घेऊन बाहेर आले आहे, मी तुमच्याबरोबरच भुवनेश्वरला येत आहे. तीन- तीन तास पुरीमध्ये राहून आम्हाला दर्शन मिळाले नव्हते मात्र आमची साथ सुटल्यावर अग्रीमाला मात्र जगन्नाथाने लगेचच दर्शन दिले होते.
खरा चमत्कार एवढ्यावरच संपत नव्हता. अग्रीमा भेटल्यावर आम्ही तिला विचारले. तर ती म्हणाली,' तुम्ही गेल्यावर रांग सुरू झाली. मी आत शिरले आणि लगेचच मागच्या माणसाला द्वार रक्षकाने अडवले आणि सांगितले की रांग चुकून सुरू केली गेली, मंदिर आणखी काही काळ बंदच राहणार आहे.' म्हणजे ती रांग जणू फक्त अग्रिमासाठीच सुरू केली गेली होती. ही योजना प्रत्यक्ष जगन्नाथाचीच असू शकते.
कोलकाता चेन्नई सायकलसफर ह्या प्रवासवर्णनातील आधीच्या लेखांच्या लिंक्स:
जय जगन्नाथ!
उत्तर द्याहटवा